(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • त्र्यंबक शंकर शेजवळकर

    निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता.

  • रामनाथ थरवळ

    त्यांच्या कार्यशाळेतून शिकून गेलेल्या कलाकारांची यादी तशी मोठी आहे. विद्या बालन, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे, सुमित राघवन, पंकज विष्णू, रसिक ओक जोशी, विशाखा सुभेदार, अतुल काळे, तारका पेडणेकर, दिपक वीज, बॉबी वीज ही त्यातली काही नावे.

  • समृद्धी बडे

    कॉलेजमध्ये शिकता शिकता करिअरच्या दृष्टीने काही कोर्सेस करणं, किंवा समर जॉब्ज किंवा पार्टटाइम जॉब्ज तर अनेकजणं करतात. नोकरीऐवजी पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करणारेही फार कमी असतात. पण समृद्धी बडेने याहीपुढे जाऊन स्वतःचा ब्रँड डेव्हलप करण्याचा विचार केलाय.

    झेवियर्स कॉलेजमध्ये थर्ड इयर आर्ट्सला शिकणार्‍या समृद्धीला वेगवेगळ्या कलाकृती करण्यात कायमच रस होता. ज्यूट, कागद, कापड, पातळ लाकूड अशा अनेक गोष्टींपासून विविध कलाकृती तिने साकारल्या आहेत. ज्यूटच्या बॅग्ज, झोळ्या, पेंटिंग केलेले टीशर्टस, वेताचे ट्रे, चिनीमातीच्या किंवा काचेच्या मग्जवरील पेंटिंग, भित्तीचित्रे अशा अनेक क्रिएटिव्ह वस्तू ती तयार करत असते. इतकंच नव्हे तर या वस्तूंच्या विक्रीसाठी तिने फेसबुकवर ' वरुणी कलेक्शन्स ' या नावाने एक पेजही तयार केलंय. त्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. या सगळ्या वस्तू ती स्वतःच बनवते. पण त्यांची विक्री करणं, किंमत ठरवणं हे सगळं समृद्धी आईच्या मदतीने ठरवते.

    तिच्या या पेजवर तिच्या वस्तूंसाठी मागणी नोंदवता येते. ग्राहकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वस्तू तयार केली जाते. त्यांची घरपोच डिलीव्हरीही दिली जाते. शिवाय आपल्या प्रॉडक्टच्या प्रसिद्धीचं कामही समृद्धी मनापासून एन्जॉय करतेय. तिच्या वरुणी कलेक्शनसाठी या सगळ्या गोष्टी करणं हा तिच्या अनुभवाचाच एक भाग आहे.

    बीए झाल्यानंतर एमबीए करुन पुढे स्वतःचा हस्तव्यवसायाचा ब्रँड तयार करण्याचं समृद्धीने आत्तापासूनच मनाशी पक्कं केलंय.

    समृद्धीची घोडदौड इथेच थांबत नाही. हस्तकलेच्या जोडीला तिला फ्रेंच भाषेचीही अत्यंत आवड आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटमधून ती सध्या फ्रेंचच्या परीक्षा देतेय. त्याअंतर्गत चार महिन्यांसाठी ती फ्रान्समध्ये कल्चरल एक्स्चेंजची विद्यार्थिनी म्हणून शिक्षणही घ्यायला गेली होती.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर

    बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे मराठी कवी, अनुवादक होते.

    ४ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे निधन झाले.

    ## Balkrishna Laxman Antarkar

  • नरेश भिकाजी कवडी

    कथाकार, अनुवादक, लोकगीतांचे संग्राहक नरेश भिकाजी कवडी यांचा जन्म ५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.

    “बीअरची सहा कॅन्स”, “चुळचुळ मुंगी पळीपळी कंटाळा” हे कथासंग्रह आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकगीतांचे “भरली चंद्रभागा” हे संकलन यांसाठी ते मराठीत अधिक परिचित झाले.

    ## Naresh Bhikaji Kawadi

  • चंद्रकांत सरदेशमुख

    संगीत हे केवळ कर्णसंपुटांना समाधान देणारे साधन नाही, तर संगीताचा प्रत्येक स्वर आणि त्यापासून निर्माण होणारी ध्वनिकंपने शारीरिक समाधान आणि प्रफुल्लित चित्तवृत्तींचे उगमस्थान असतात, ही आता केवळ समजूत राहिलेली नाही. भारतीय संस्कृतीने शतकांच्या सखोल साधनेतून सिद्ध केलेल्या या वास्तविकतेला पुन्हा जनमानसात रुजविण्याची गरज ओळखून स्वार्थनिरपेक्ष काम करणारे

    पं. डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या निधनाने संगीतसाधनेच्या परंपरेतला एक अलौकिक दुवा निखळला आणि शरीर, मन व संगीत यांच्या नात्याची वैज्ञानिक उकल करण्याचे एक ‘संशोधनव्रत’ खंडित झाले. केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट सतारवादक, एवढीच पं. सरदेशमुखांची ओळख नाही, तर संगीतविश्व हा मानवाच्या असंख्य भावविश्वांना सांधणारा प्रभावी दुवा आहे, हे ओळखून संगीतप्रसाराचा ध्यास घेतलेला एक आधुनिक मनस्वी माणूस अशी त्यांची खरी ओळख आहे. भारतीय संस्कृतीत संस्कृत मंत्रोच्चारांचे स्थान अढळ आहे, पण मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हा ‘पठडीबाज परंपरावाद’ असल्याचे अर्धज्ञान आजही उजळले जाते.

    संस्कृत श्लोकांचे संगीतशास्त्रीय पठण मानवी आयुष्याला परमोच्च समाधानाचे क्षण प्राप्त करून देते, मानसिक जाणिवा पराकोटीच्या प्रगल्भ करते आणि जीवन समृद्ध करते. संस्कृत श्लोकपठणातील ध्वनिलहरींच्या कंपनांतून शारीरिक व्याधींचे समूळ उच्चाटन होते, दुष्प्रवृत्ती दूर होतात आणि मनाला आपोआपच माणुसकीचा स्पर्श होतो. अशा तऱ्हेने, मंत्रपठण ही समृद्ध आयुष्यासाठीची एक तप:साधना बनते, हे पं. सरदेशमुखांच्या संशोधनाचे सार! वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच्या कठोर संगीत साधनेतून साधलेला हा साक्षात्कार समाजास अर्पण करण्याच्या भावनेतून पुढे, संगीत हे आरोग्य आणि मानसिक समाधानप्राप्तीचे साधन ठरावे, यासाठी पं. सरदेशमुख यांचे संशोधन सुरू झाले. वसंत बहरला, की कोकिळेच्या कंठातील अलौकिक सूर माणसाला मोहवून टाकतात. त्या सुरांच्या स्वर्गीयतेची जाणीव त्या कोकिळेला असेलच असे नाही, पण संगीताचा ‘स्वर’ ओळखणारा आणि जोखणारा जाणकार कान प्रकृतीने माणसालाच बहाल केला आहे. हाच ‘जाणता कान’ जोपासावा, यासाठी पं. सरदेशमुख सतत तळमळले.

    कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठातही संगीत साधना सुरू झाली, हे त्या तळमळीचेच फलित होय. याच तळमळीतून त्यांनी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कर्मभूमी जपानमध्ये भारतीय संगीताचे स्वर अजरामर केले. संगीत क्षेत्रातील नव्या दिशांचा शोध आणि वेध घेत नव्या पिढीसाठी संगीतात संशोधन करणाऱ्या पं. सरदेशमुख यांना त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा आयुर्वेदाचा वारसा मिळाला होता, पण तो केवळ व्यावसायिकतेसाठी न वापरता, मानवी आरोग्य आणि मनाच्या संपन्नतेसाठी आयुर्वेद आणि संगीतोपचारांची सुरेख सांगड घालणारे संशोधन पं. सरदेशमुखांनी सुरू केले. म्हणूनच, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची खरी ओळख झालेल्या या ज्ञानवंताने आपल्या अध्र्यामुध्र्या आयुष्यात केलेल्या कामाचे महत्त्व मोठे आहे.

  • संभा चव्हाण

    आयुष्याच्या वाटचालीवर वा ज्याला जीवनकर्तृत्त्व असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यावर आसपासच्या वातावरणाचा वा संस्कारांचा प्रभाव असतो. वातावरण आणि संस्कार याच्या जोडीला पिंड म्हणून जो काही प्रकार असतो तोच त्या व्यक्तीच्या कर्तृत्वगाथेची उंची ठरवत असतो. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यातील क्षण न क्षण दुसऱ्यासाठी वेचलेल्या आणि कृतार्थ ठरलेल्या संभा चव्हाण यांचा पिंड हा शूर योद्धय़ाचा, लढवय्याचा होता.

    म्हणूनच अंतिम श्वासापर्यंत हा वीर झुंजत राहिला. त्यातील सुमारे ६० वर्षे समाजातील दुर्लक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि अखेरची सात-आठ वर्षे मृत्यूविरुद्ध या योद्धय़ाचा लढा हा असा अखंड होता. कोकणातील देवगडमधील तारामुंब्री हे मूळ गाव असलेल्या संभा चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य मुंबईत आणि तेही वरळी विभागात गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घट्ट संस्कार आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा गडद प्रभाव त्यांच्यावर पडला होता. स्वातंत्र्याचं तेज उरात घेऊन नवा भारत घडवायला निघालेल्या तळागाळातील आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय तरूण पिढीचा झपाटय़ाने भ्रमनिरास झाला.

    देशप्रेम, साधेपणा, कृतज्ञता, त्याग ही मूल्ये भांडवलशाहीच्या चक्रात नष्ट होत गेली आणि याचसाठी का मिळवले स्वातंत्र्य असा प्रश्न त्या पिढीला पडू लागला. संभा चव्हाण याच भ्रमभारित युवा पिढीचे एक प्रतिनिधी होते. मात्र या चकव्यात त्यांनी स्वत:ला गुंतू दिले नाही. आधी समाज सुधारला की देश सुधारेल, या विचारधारेचे ते पाईक बनले आणि ज्या पोलीस दलात काही काळ त्यांनी सेवा केली, त्या पोलिसांच्या जीवनकल्याणासाठी अखंड झुंजण्याचा निर्धार त्यांनी केला.

    कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यासाठी जे दल राबते ते पोलिसच अत्यंत हलाखीत राहतात, त्यांना चांगलेवेतन मिळत नाही, त्यांना कायम मानसिक दडपणाखाली काम करावे लागते आणि ज्यांची वरिष्ठ कायम उपेक्षा करतात, त्या महाराष्ट्र पोलिसांवरचा अन्याय दूर करण्यासाठी अखंड लढय़ाला पर्याय नाही, हे संभा चव्हाण यांनी हेरले. म्हणूनच १९६६ साली जगावेगळा असा पोलिसांच्या पत्नींचा मोर्चा त्यांनी पोलीस आयुक्तालयावर नेला. या त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली. त्या शिक्षेच्या दरम्यान येरवडा तुरुंगात तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना जाऊन भेटले. पोलीस कल्याणाचे काम सोडून द्या, आपण म्हणाल त्या पदावर पोलीस दलात आपली नियुक्ती करतो, अशी सुखासीन भविष्याची हमी देणारी ऑफर त्यांनी संभा चव्हाण यांना दिली.

    कारावासात असलेल्या अन्य कोणालाही हा मोहाचा क्षण स्वीकारावासा वाटला असता; त्याचे चित्त डळमळले असते. पण भगवद्गीतेचा संस्कार झालेल्या संभा चव्हाण यांनी आपले पोलीस कल्याणाचे समरांगण अधिक मोठे मानले आणि मुख्यमंत्र्यांची ऑफर निग्रहाने बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि मग याच पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले संभा चव्हाण कर्मयोद्धा ठरले. याच भूमिकेतून त्यांनी वरळीच्या पोलीस वसाहतीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. १९५६-५७ साली वरळीच्या गांधीनगरात गुंडांचे साम्राज्य होते.

    दारूच्या भट्टय़ा राजरोस लागायच्या. हे गुंड संभा चव्हाण यांनी संपुष्टात आणले. पत्रकारितेत त्यांनी आचार्य अत्रेंना आपले गुरू मानले होते. अत्रेंची बेधडक, जहाल लेखणी संभा चव्हाणांना प्रिय होती. आपल्या ‘शूर शिपाई’ आणि ‘आमचा हिंदुस्थान’ या नियतकालिकांतून संभा चव्हाण यांनी अत्रेंचाच वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आपले लेखणी परजली.

    संघ विचार आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहताना सुखकर आयुष्यासाठीच्या साऱ्या तडजोडी झुगारून दिलेल्या या लढवय्याची इच्छा महाराष्ट्राच्याविधिमंडळात जाऊन पोलीस कल्याणासाठीचा आवाद बुलंद करण्याची होती. आमदारकी ‘विकत’ घेतली जाण्याच्या आजच्या काळात ती पूर्ण होणे अशक्यच बाब होती. मात्र झाले ते एका अर्थाने चांगलेच झाले. एका झुंजाराची जीवनगाथा शंभर टक्के निष्कलंकच राहिली!

  • पल्लवी जोशी

    पल्लवी जोशी यांनी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत काम केले आहे. एखादा अपवाद वगळता नेहमी हिंदीत रमणारी पल्लवी जोशी मराठीतून “सा रे ग म’ करू लागल्या, तेव्हा समस्त मराठी रसिकांना तो सुखद धक्का होता.

  • ई. एस. मोडक

    ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.

    त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.

  • प्रवीण तरडे

    अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.