सुधाकर तोरणे यांनी १९६५ पासून महाराष्ट्रात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यवतमाळ, जळगांव, रत्नागिरी, रायगड, धुळे,नाशिक, पुणे या जिल्ह्यात काम करताना तेथील लोकजीवनाशी संपूर्ण समरस.- उपसंचालक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक येथे कार्य.
सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी मिरज येथे ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला.
सरस्वतीबाई राणे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांसाठी पार्शवगायन, भावगीत गायन, संगीत रंगभूमीवर अभिनय असे त्यांचे विविधांगी कर्तृत्व होते. गायिका मीना फातर्पेकर यांच्या त्या आजी होत.
उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांच्याकडून सुरू झालेली किराणा घराण्याची परंपरा पुढे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, कमलाबाई बडोदेकर या भावंडांनी समर्थपणे सुरू ठेवली. त्यांनी किराणा घराण्याला अनेक दिग्गज गायक दिले. संगीत एकच प्याला..संशय कल्लोळ..संगीत सौभद्र या मराठी संगीत नाटकात सरस्वतीबाई राणे यांनी कामे केली होती.
सरस्वतीबाई राणे यांचे निधन १० ऑक्टोबर २००६ रोजी झाले.
संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित “झेंडा” या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये “जब मिले छोरा छोरी” आणि “पोलिस लाइन” या चित्रपटाचा समावेश आहे.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून अखेर पर्यंत एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिवसेनेचा मुस्लिम चेहरा अशी ओळखले असणारे नेते म्हणजे साबीर शेख ! साबीर शेख यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे १५ मार्च १९४५ रोजी झाला होता. साबीर शेख यांचे शालेय शिक्षण नारायणगावातील शाळेत झाले. त्यानंतर ते अंबरनाथ येथील “ऑर्डनन्स फॅक्टरीत” नोकरी करू लागले, आणि तेथेच कामगार नेते म्हणून नावारूपाला आले. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणारे साबीर शेख हे युती सरकारच्या काळात ते कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समावून घेतल्यामुळे त्यांचा जनसंपर्क ही दांडगा होता. ठाणे जिल्ह्यातील कामगारांच्या अडचणी सोडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कल्याणच्या उपशहरप्रमुखापासून ते ठाणे जिल्हाप्रमुखापर्यंत विविध पदे त्यांनी भूषवली. ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, शिवचरित्राचे अभ्यासक, कीर्तन-प्रवचनासोबतच हिंदू धर्म, संत वाङ्मय, साहित्य आणि दुर्गप्रेमी म्हणून ते प्रसिद्ध होते.
साबीर शेख आमदार असताना देखील कल्याणजवळच्या कोन गावातील एका चाळीत राहात होते यावरुन त्यांचा साधेपणाची जाणीव होते. शिवचरित्र मुखोद्गत असलेल्या साबीरभाईंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले पालथे घातले. बाळासाहेब ठाकरेंनी साबीरभाईंना “शिवभक्त” ही पदवी दिली होती.
साबीर शेख यांच्या अअयुष्यातील अखेरच्या काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांनी साबीर शेख कसे विपन्नावस्थेत जीवन जगताहेत, याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्यांना अनेकांनी मदत केली होती. मात्र पुन्हा त्यांची दयनीय अवस्था झाल्यानं त्यांना कोन गावच्या घरातून “कल्पतरू युवाविकास मंच”ने पुढाकार घेऊन औरंगाबादच्या “मातोश्री वृद्धाश्रमा”त नेण्यात आलं होतं. १५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी त्यांचे निधन झाले.
(लेखन व संशोधन - सागर मालाडकर)
आयुष्याच्या वाटचालीवर वा ज्याला जीवनकर्तृत्त्व असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यावर आसपासच्या वातावरणाचा वा संस्कारांचा प्रभाव असतो. वातावरण आणि संस्कार याच्या जोडीला पिंड म्हणून जो काही प्रकार असतो तोच त्या व्यक्तीच्या कर्तृत्वगाथेची उंची ठरवत असतो. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यातील क्षण न क्षण दुसऱ्यासाठी वेचलेल्या आणि कृतार्थ ठरलेल्या संभा चव्हाण यांचा पिंड हा शूर योद्धय़ाचा, लढवय्याचा होता.
म्हणूनच अंतिम श्वासापर्यंत हा वीर झुंजत राहिला. त्यातील सुमारे ६० वर्षे समाजातील दुर्लक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि अखेरची सात-आठ वर्षे मृत्यूविरुद्ध या योद्धय़ाचा लढा हा असा अखंड होता. कोकणातील देवगडमधील तारामुंब्री हे मूळ गाव असलेल्या संभा चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य मुंबईत आणि तेही वरळी विभागात गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घट्ट संस्कार आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा गडद प्रभाव त्यांच्यावर पडला होता. स्वातंत्र्याचं तेज उरात घेऊन नवा भारत घडवायला निघालेल्या तळागाळातील आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय तरूण पिढीचा झपाटय़ाने भ्रमनिरास झाला.
देशप्रेम, साधेपणा, कृतज्ञता, त्याग ही मूल्ये भांडवलशाहीच्या चक्रात नष्ट होत गेली आणि याचसाठी का मिळवले स्वातंत्र्य असा प्रश्न त्या पिढीला पडू लागला. संभा चव्हाण याच भ्रमभारित युवा पिढीचे एक प्रतिनिधी होते. मात्र या चकव्यात त्यांनी स्वत:ला गुंतू दिले नाही. आधी समाज सुधारला की देश सुधारेल, या विचारधारेचे ते पाईक बनले आणि ज्या पोलीस दलात काही काळ त्यांनी सेवा केली, त्या पोलिसांच्या जीवनकल्याणासाठी अखंड झुंजण्याचा निर्धार त्यांनी केला.
कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यासाठी जे दल राबते ते पोलिसच अत्यंत हलाखीत राहतात, त्यांना चांगलेवेतन मिळत नाही, त्यांना कायम मानसिक दडपणाखाली काम करावे लागते आणि ज्यांची वरिष्ठ कायम उपेक्षा करतात, त्या महाराष्ट्र पोलिसांवरचा अन्याय दूर करण्यासाठी अखंड लढय़ाला पर्याय नाही, हे संभा चव्हाण यांनी हेरले. म्हणूनच १९६६ साली जगावेगळा असा पोलिसांच्या पत्नींचा मोर्चा त्यांनी पोलीस आयुक्तालयावर नेला. या त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली. त्या शिक्षेच्या दरम्यान येरवडा तुरुंगात तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना जाऊन भेटले. पोलीस कल्याणाचे काम सोडून द्या, आपण म्हणाल त्या पदावर पोलीस दलात आपली नियुक्ती करतो, अशी सुखासीन भविष्याची हमी देणारी ऑफर त्यांनी संभा चव्हाण यांना दिली.
कारावासात असलेल्या अन्य कोणालाही हा मोहाचा क्षण स्वीकारावासा वाटला असता; त्याचे चित्त डळमळले असते. पण भगवद्गीतेचा संस्कार झालेल्या संभा चव्हाण यांनी आपले पोलीस कल्याणाचे समरांगण अधिक मोठे मानले आणि मुख्यमंत्र्यांची ऑफर निग्रहाने बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि मग याच पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले संभा चव्हाण कर्मयोद्धा ठरले. याच भूमिकेतून त्यांनी वरळीच्या पोलीस वसाहतीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. १९५६-५७ साली वरळीच्या गांधीनगरात गुंडांचे साम्राज्य होते.
दारूच्या भट्टय़ा राजरोस लागायच्या. हे गुंड संभा चव्हाण यांनी संपुष्टात आणले. पत्रकारितेत त्यांनी आचार्य अत्रेंना आपले गुरू मानले होते. अत्रेंची बेधडक, जहाल लेखणी संभा चव्हाणांना प्रिय होती. आपल्या ‘शूर शिपाई’ आणि ‘आमचा हिंदुस्थान’ या नियतकालिकांतून संभा चव्हाण यांनी अत्रेंचाच वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आपले लेखणी परजली.
संघ विचार आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहताना सुखकर आयुष्यासाठीच्या साऱ्या तडजोडी झुगारून दिलेल्या या लढवय्याची इच्छा महाराष्ट्राच्याविधिमंडळात जाऊन पोलीस कल्याणासाठीचा आवाद बुलंद करण्याची होती. आमदारकी ‘विकत’ घेतली जाण्याच्या आजच्या काळात ती पूर्ण होणे अशक्यच बाब होती. मात्र झाले ते एका अर्थाने चांगलेच झाले. एका झुंजाराची जीवनगाथा शंभर टक्के निष्कलंकच राहिली!
बोस्टोन येथील हार्वर्ड मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये सर्जरी विभागात इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणार्या संदीप कराजनगीने पोस्ट डॉक्टरेट अभ्यासादरम्यान एमआयटीमधील तज्ज्ञांसोबत व्होकल कॉर्डच्या आजारांवर उपयुक्त अशा जेलची निमिर्ती केली आहे. आवाजाच्या आजारांवर मात करून आवाजाला पुर्नजन्म देण्यासाठी तो झटत आहे.
जिद्द, सचोटी आणि महत्त्वाकांक्षा ज्याच्याकडे असेल, त्याला यश हमखास मिळणारच. याच त्रिसूत्रीचा वापर करून डोंबिवलीच्या संदीप कराजनगी या तरुणाने आज जगातील तमाम वैद्यक क्षेत्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. गायक, शिक्षक अशा गाण्याच्या किंवा बोलण्याच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनेकदा व्होकल कॉर्डचा आजार उद्भवतो. या आजारावर तोडगा काढण्यासाठी २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात अमेरिकेत संशोधनाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे १५वर्षांनी अमेरिकेतील मॅसेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये एका टीमने या संशोधनाला मूर्त स्वरूप देऊन व्होकल कॉर्डसारखं काम करणारं जेल तयार केलं आहे. या टीममध्ये संदीपची भूमिका महत्त्वाची ठरली.
संदीप लहानपणापासूनच हुशार. डोंबिवलीतील ग्रीन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असलेला संदीप दहावीत ९१.२८ टक्के गूण मिळवून शाळेतून पहिला आला होता. इंजिनीअरिंग करायचं हे ठरलेलं असल्यामुळे त्याने रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासातील कामगिरी कायम ठेवत संदीपने बारावीत ९८ टक्के मिळवले. केमिकल इंजिनीअरिंग करायचं असल्यामुळे अर्थात पहिलं प्राधान्य त्याने युडीसीटीला दिलं होतं. मात्र तेथे प्रवेश मिळू शकला नाही म्हणून त्यानं विलेपार्ले येथील डी.जे. संघवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विद्यापीठ पातळीवरही आपली अव्वल क्रमवारी कायम ठेवत संदीपने इंजिनीअरिंग पूर्ण केलं. हे करत असतानाच त्यानं जीआरई, टोफेल यासारख्या परीक्षा दिल्या. या परीक्षांमधील चांगल्या गुणांमुळे त्याला सुमारे आठ ते दहा परदेशी विद्यापीठांनी पूर्ण स्कॉलरशिप देऊ केली. यातील न्यूयॉर्कमधील ट्रॉय येथे असलेल्या 'रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट'मध्ये त्याने प्रवेश घेतला. या सर्वात विशेष नमूद करायची बाब म्हणजे संदीपने कोणतंही शिक्षण घेण्यासाठी कधी कोचिंग क्लासेसची मदत घेतली नाही. शाळेतील अभ्यास आणि स्व-अभ्यास यावरच त्यानं यशाची शिखरं गाठण्यास सुरुवात केली. याचा त्याला भविष्यातही फायदा झाला.
२००१मध्ये संदीप केमिकल आणि बायोलॉजिकल इंजिनीअरिंगच्या अॅडव्हान्स अभ्यासासाठी ट्रॉय येथील शैक्षणिक संस्थेत दाखल झाला. तेथे घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेतही तो पहिला आला. यामुळे त्याच्या आवडीचा विषय निवडण्याची संधी त्याला मिळाली. पाच विषयांतून नॅनोटेक्नॉलॉजी हा विषय त्याने निवडला. २००६मध्ये त्याने रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून आपली डॉक्टरेट पदवी मिळवली. हा अभ्यास करताना तो जैवशास्त्रातील नॅनोमटेरिअल्सची नवलाई शोधण्यात गुंतला होता. याबाबतीतील त्याची निरीक्षणं त्याने ११ संशोधन प्रबंधांच्या माध्यमातून विज्ञान जगतासमोर मांडली. यानंतर २००६मध्ये प्रतिष्ठीत अशा एमआयटीमधील प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये त्याला पोस्ट डॉक्टरेटल संशोधनाचं काम करण्याची संधी मिळाली. एमआयटी आणि मॅसेस्टस जनरल हॉस्पिटल अर्थात एमजीएच या दोन प्रतिष्ठीत संस्थांचा मिळून बायोमटेरिअल आणि टिश्यू इंजिनीअरिंगचा हा अभ्यास होता. यामध्ये व्होकल कॉर्डमध्ये होणार्या आजारांवर उपाय म्हणून इंजेक्टेबल बायोमटेरिअल तयार करण्याचं त्याच्यासमोर आव्हान होतं. त्याच्यासोबत तेथील काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही काम करत होती. हे आव्हान स्वीकारून संदीप कामाला लागला आणि त्याने त्यात यशही मिळवलं. संदीप आणि त्याच्या टीमला व्होकल कॉर्डच्या आजाराने त्रस्त असलेल्यांवर उपचार करण्यासाठी व्होकल कॉर्डसारखं काम करणारं काहीतरी कृत्रिम मटेरिअल तयार करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पूवीर्ची सर्व गृहितकं मागे ठेवून ही समस्या केवळ एक यांत्रिक समस्या आहे, असं समजून त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी आवाजाचा दर्जा सुधारण्यासाठी अथवा त्या आजारांवर मात करण्यासाठी उतींचा वापर करणं टाळण्याचा निर्णय घेतला. याला पर्याय काय असू शकेल यावर विचार करत असताना त्यांनी पॉलिथिलीन ग्याकोल अर्थात पीईजीची निवड केली. याचं मुख्य कारण म्हणजे पीईजी हे एफडीएने मान्यता दिलेल्या विविध औषधांमध्ये वापरण्यात येतं. यानंतर संशोधकांनी व्होकल कॉर्डच्या हालचालींसारखी पीईजीची हालचाल कशी करता येईल यावर भर देण्यास सुरुवात केली. यासाठी पीईजीच्या सूक्ष्म कणांचा त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. आपली व्होकल कॉर्ड ही फुप्फुसातून येणार्या हवेमुळे व्हायब्रेट होत असते. अशाप्रकारेच पीईजीला व्हायब्रेट करण्याची गरज होती. यासाठी व्होकल कॉर्डच्या व्हायब्रेशनचं प्रमाण लक्षात घेणंही गरजेचं होतं. अखेर संशोधकांना एका ठिकाणी पीईजी आणि व्होकल कॉर्डचं व्हायब्रेशन समान जाणवलं. या स्थितीला त्यांनी पीईजी ३० असं नाव दिलं. नव्याने तयार झालेलं हे जेल प्राण्यांमध्ये इंजेक्ट करून चाचण्या यशस्वी करण्यात आल्या. आता मानवावर याची चाचणी करण्यात येणार असून हा प्रयोग यशस्वी झाला तर जगातील अनेक पेशंट्सना दिलासा मिळेल.
या संदर्भातील रिसर्च पेपर्स प्रसिद्घ करून संदीपचं पोस्ट डॉक्टरेट पूर्ण झालं. त्याच्या या संशोधनाची दखल तेथील प्रसिद्घ वृत्त वाहिनी सीएनएनने घेऊन संदीपची खास मुलाखतही घेण्यात आली. संदीप सध्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरी विभागात इंस्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. तो अमेरिकन केमिकल सोसायटी आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअर्सचा सभासदही आहे. त्याचं संशोधनाचं काम सुरू असून आवाजाचा हा किमयागार भविष्यात मायदेशी परतणार आहे, हे मात्र निश्चित!
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
वसंतराव नाईक यांचा वारसा लाभलेले सुधाकरराव नाईक हे मीतभाषी पण करारी बाणा असलेले व्यक्तिमत्व. पाणलोट क्षेत्राचा विकास हे नवे सूत्र सुधाकररावांनी प्रभावीपणे वापरले.
ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचा जन्म २० एप्रिल १९६० रोजी अलिबाग तालुक्यातील चौल गावी झाला. दिलीप ठाकूर यांचे बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन मुंबईत गिरगावातील खोताची वाडीतील अवघ्या दहा बाय दहाच्या खोलीत गेले. जीवन घडताना एकीकडे दक्षिण मुंबईतील अनेक चित्रपटगृहात स्टाॅलच्या तिकीटात सतत नवे जुने चित्रपट पाहणे आणि त्या काळातील अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचणे यात घडले. शिवाय गल्ली क्रिकेट आणि गल्ली चित्रपट यातून जनसामान्यांशी नाळ जुळली होतीच. त्यांनी गिरगावातील हिंद विद्यालय हायस्कूलमध्ये शालेय तर चौपाटीच्या भवन्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. यातूनच विद्यार्थी दशेतच त्यांनी विविध नियतकालिकांमधून वृत्तपत्र लेखन सुरु केले. एकाद्या लेखावरचे मत अथवा एकाद्या ताज्या घडामोडीवरचे आपले मत 'वाचकांच्या पत्रा'तून प्रसिद्ध होत आहेत या त्यांच्यासाठी खूपच मोठा उत्साहाचा भाग होता.
मार्मिक, रसरंग, चित्रानंद, सोबत, लोकप्रभा, क्रीडांगण अशा साप्ताहिकातून आपली पत्रे तर कधी लेखही प्रसिद्ध होत असल्याने त्यांचा लेखनातील कल वाढला. १९८२ साली त्यांनी नवशक्ती दैनिकात प्रूफ रिडर म्हणून रुजू झाले आणि त्याबरोबरच रविवार नवशक्तीत चित्रपटविषयक सदरही लिहायला मिळाले. १९८६ साली त्यांना संपादकीय विभागात बढती देण्यात आली. ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्यक्षात शूटिंग रिपोर्टीगसाठी सेटवर जाणे, चौफेर निरीक्षण आणि लहान मोठ्या स्टार्ससह अनेक प्रकारचे तंत्रज्ञ आणि कामगार यांच्याशी संवाद साधणे यातून त्यांच्याकडे वेगळी माहिती, संदर्भ, तपशील, आठवणी यांची जमा होत गेली. याचीच पुढची पायरी म्हणून २००३ सालापासून त्यांचे चित्रपटविषयक लेख संग्रह प्रसिद्ध होत आहेत. आतापर्यंत त्यांची चाळीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात स्थित्यंतरातील सिनेमा, क्लॅप, पैसा वसूल, यादगार पल, फस्ट डे फर्स्ट शो, काॅर्नर सीट, सिनेमा घर, ओपन थिएटर, बारा ते तीन तीन ते सहा, गल्ला पेटी, सिनेमा मसाला मिक्स इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. २००९ सालापासून ते मुक्त पत्रकार आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. जनसामान्य रसिकांना समजतो आणि आवडतो अशाच पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटांवर आणि त्या विश्वावर त्यांनी कायमच फोकस ठेवला. आणि त्यातूनच त्यांच्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सर्व स्तरांवर खूप ओळखी झाल्या. इसाक मुजावर आणि शिरीष कणेकर हे त्यांचे विशेष आवडते लेखक आहेत. विशेष म्हणजे, चित्रपती व्ही शांताराम फाऊंडेशनच्या 'शतक महोत्सवी मराठी चित्रपट ' या शंभर वर्षातील मराठी चित्रपटांची तपशीलवार माहिती दिलेल्या सूचीच्या संपादनाची संधी त्यांना मिळाली.
चित्रपटविषयक माहिती आणि अनुभवाचा त्यांना जवळपास सर्वच मराठी तसेच काही हिंदी वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देताना, एकाद्या चर्चेत सहभाग घेताना कायमच फायदा होत असल्याचे दिसतेय. टाईम्स ऑफ इंडिया सारख्या इंग्रजी वृत्तपत्रातही त्यांची चित्रपटसृष्टीतील एकाद्या घटनेवर सातत्याने प्रतिक्रिया येत असते. त्यांना या वाटचालीत अनेक पुरस्कार प्राप्त होत आहेत. विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला चित्रकर्मी पुरस्कार, मराठी पत्रकार संघाच्या वतीने जयहिंद पुरस्कार आणि प्रमोद नवलकर स्मृती पुरस्कार, संस्कृती कलादर्पणच्या वतीने उल्लेखनीय पत्रकार पुरस्कार, इंडिवूड मिडिया एक्सलन्स अॅवाॅर्ड, शिवसेना गिरगाव शाखा पुरस्कार, 'मी गिरगावकर ' दक्षिण मुंबई शिवसेना शाखा पुरस्कार, थर्ड बेल एन्टरटेन्मेन्ट कलातीर्थ पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांचा समावेश होतो. त्यांचे 'आऊट फोकस ' हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.
जुन्या चित्रपटाच्या फोटोंचा त्यांच्याकडे उत्तम संग्रह आहे.
अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा
https://www.marathisrushti.com/articles/film-critic-dilip-thakur/
#DilipThakur
चतुरस्त्र लेखिका सरिता मंगेश पदकी यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला.
चैत्रपुष्प (काव्यसंग्रह) बारा रामाचे देऊळ, घुम्मट (कथासंग्रह) बाधा, खून पाहावा करुन, सीता (नाटके) व ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणार्या करोलिना मारिया डि जीझस यांच्या आत्मनिवेदनाच्या काळोखाची लेख या अनुवादासह चार अनुवादित पुस्तके व भरपूर बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.
## Sarita Mangesh Padaki
mss
ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ यांचा जन्म १९४५ मध्ये झाला.
असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.
देवयानी या शाळा संपण्यापूर्वीच दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण दुर्दैव दिलीप कुमारने देवयानी यांना नकार दिला. त्या मुळे देवयानी बिथरल्या. आधीच ती फटाकडी होती त्यात डोक्यात राग. सिनेमामध्ये करीयर सुद्धा झालं नाही. मग लिखाणाकडे वळल्या. अंगात भिनलेला सगळा जहर ती आपल्या लेखातून बाहेर काढू लागली. इंग्लिश वर तिची कमांड होतीच पण गरज पडेल तिथे हिंदी शब्द वापरून हिंग्लिश लिखाणाची पहिली सुरवात तिने भारतात केली. दिलीपकुमार यांच्या विरुद्ध लिहिण्यासाठी त्यांनी ज्युनियर रिपोर्टर म्हणून 'स्क्रीन' जॉइन केले, पण त्यांच्या वागणुकीने तीन दिवसांत नोकरीच्या बाहेर करण्यात आले आणि त्यांना नोकरी गमवावी लागली. पण, त्यांनी हार मानली नाही. त्या काळी 'स्टार अँड स्टाईल' नावाचे एक नवीन मासिक आले होते आणि त्यात महिला पत्रकारांची गरज होती तेथे देवयानी यांना नोकरी मिळाली आणि लवकरच त्या 'फ्रँकली स्पिकिंग' या नावाचा स्वतःचा स्तंभ देवी या नावाने लिहू लागल्या.
नावाप्रमाणेच बिनधास्त खुसखुशीत लेख, त्यातल्या तिखट जाळ गॉसिप गप्पा थोड्याच दिवसात पॉप्युलर झाल्या. लोक आवडीने या लेखांची वाट पाहू लागले आणि बॉलीवूड? बॉलीवूड तिच्या नावाने खडे फोडू लागले. यात सगळ्यात आघाडीवर होता सुपरस्टार दिलीप कुमार ज्यांनी देवयानी यांना नाही म्हणायची हिंमत केली होती. देवयानी आपल्या प्रत्येक लेखात त्याला उभा आडवा सोलायच्या. तो म्हातारा होत चाललाय, त्याची जादू संपलीय याच्या चर्चा करायची. त्याने मुलगा व्हावा म्हणून आस्मा नावाच्या बाईशी दुसरा निकाह केला ही बातमी सुद्धा तिने फोडली. दिलीप कुमार वैतागले. त्यांनी आपल्या फिल्मइंडस्ट्रीमधल्या सगळ्या दोस्तांना बजावलं की देवयानीला मुलाखत द्यायची नाही. पण ही अघोषित बंदी खूप काळ चालू शकली नाही. किती जरी नाव ठेवली तरी फिल्म इंडस्ट्रीला देवयानी चौबळ सारख्या पत्रकाराची गरज होतीच. देवयानी एकीकडे आणि बाकीचे फिल्म मगझीन एकीकडे. सगळ्यांच्यात ठसठसीत उठून दिसणाऱ्या देवयानीशी आपले संबंध चांगले राहावेत यासाठी सगळे फिल्मस्टार प्रयत्न करायचे.
आज जी फिल्मी पत्रकारिता प्रचलित आहे याचा देवयानी चौबळ यांनी शुभारंभ केला होता. आजकाल हे फंडे सिनेमा चे प्रमोशन करण्यासाठी सर्रास वापरले जातात, पण त्याकाळी लोकासाठी हे सर्व नवीन होते.
आराधना या सिनेमावेळी देवयानीची आणि राजेश खन्नाची ओळख झाली. या भेटीत त्याने काय जादू केली माहीत नाही पण देवयानी अगदी त्याच्या प्रेमात पडली. तसं पाहायला गेलं तर अख्ख्या देशातल्या पोरी तेव्हा राजेश खन्नाच्या प्रेमात होत्या, पण यात देवयानीचा मोठा हात होता.
इतरानां कायम शिव्या घालणारी फटाकडी देवयानी राजेश खन्नाबद्दल बोलताना मात्र नुसता कौतुक, विशेषणांचा भडीमार करायच्या. त्याला सुपरस्टार ही उपाधी पहिल्यांदा देवयानी यांनीच दिली. तिच्या लेखात येणाऱ्या सुपरस्टार, सुपरस्टार या उल्लेखामुळे सगळे राजेश खन्नाला सुपरस्टार म्हणू लागले. देवयानी अगदी बिनधास्त होती. राजेश खन्नाबरोबरची मैत्री, त्याच्यावरच प्रेम कधी लपवायची नाही. आपण आयुष्यात एकाच पुरुषाबरोबर रात्र घालवली आहे तो म्हणजे राजेश खन्ना असं रोखठोक सांगायची. राजेशने मात्र अंजू महेंद्रू बरोबर देवयानी चौबळला सुद्धा गंडा घालून लग्न केलं तरुण डिम्पल कपाडिया बरोबर आणि ही बातमी पहिल्यांदा सांगितली देवयानीलाच.
पण राजेश खन्नावर चिडणे त्यांना शक्य नव्हते. तो त्यांच्यासाठी देव होता. राजेशने देखील तिच्यावरचा आपला कृपाशीर्वाद कधी काढून घेतला नाही. असं म्हणतात की देवयानी चौबळ ने आनंद चित्रपट बघितल्यावर त्याला सांगितलेलं की या सिनेमात त्याच्याबरोबर काम केलेला अमिताभ बच्चन पुढे जाऊन त्याची खुर्ची काढून घेऊ शकतो.
त्यांनी त्या काळी अमिताभ यांच्याबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी उतरत आपली स्वतःची अशी वेगळी जागा बनवेल...’ आजवरचा या महानायकाचा प्रवास पाहता ते खरंच झालेलं दिसतं आहे!
देवयानी चौबळ यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉसिप कॉलमला कमालीचं ग्लॅमर मिळवून देण्यात यांचा खूप मोठा हातभार होता. त्यांच्या लेखणीबरोबरच त्यांची बिनधास्त अॅटिट्यूड, बोलणं, दिसणं या सर्वच गोष्टी चर्चेचा विषय असायच्या.
देवयानी चौबळ यांनी पत्रकारितेचे धडे आचार्य अत्रे यांच्या कडे गिरवले होते. शिरिष पै व देवयानी यांची खास मैत्री होती. एका दिपावली अंकात ताईनी "देवी" नावाचा तिच्या जीवनावर व आठवणी वर एक लेख लिहिला होता. एवढी वर्षे झाली तरी राजेश खन्ना विषयीच तीच एकतर्फी प्रेम कमी झालं नाही. त्याच्या साठी तिने डायट सुरु केलं होतं. पण याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला आणि त्यात पॅरालीसीसच्या अटॅकमुळे ती अगदीच गारद झाली. त्यातूनही तिने आपले फटाकेदार लिखाण चालूच ठेवले होते. या काळात धर्मेंद्र आणि सुनील दत्त यांनी तीला मदत केली.
असं म्हणतात की शेवटपर्यंत ती राजेश खन्नाच्या प्रेमातचं जगली. येणाऱ्या जाणाऱ्याना सांगायच्या, की राजेश मला रोज फुलं पाठवतो. त्याच्यासाठी मी बरी होणार.
देवयानी चौबळ यांचे १३ जुलै १९९५ रोजी निधन झाले.
#DevyaniChaubal
Copyright © 2025 | Marathisrushti