गोखले, शरद
सरळ नाकाचा, डोक्यावरचे छप्पर जवळजवळ उडालेले, बोलताना जरासा अनुनासिक उच्चार, लाघवी वागणे अशी व्यक्ती बाजारात सहज भेटली तरीही तुमच्या लक्षात येणार नाही, की आदल्या रात्री रंगमंचावर आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे ते हेच शरद गोखले. वयाच्या पस्तिशीत संगीत रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शरद गोखले यांना आयुष्यभर संगीताने स्वरमय साथ दिली.
जयराम आणि जयमाला शिलेदारांच्या संगीत रंगभूमीवर मनापासून सेवा करणारा हा व्रतस्थ कलावंत आयुष्यभर सहजपणे जगू शकला, याचे कारण त्याचे आयुष्य केवळ संगीतावरच अवलंबून होते. संगीत सौभद्र, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी अशा अनेक नाटकांमधून विविधरंगी भूमिका करताना शरदरावांनी आपल्या गायनावर नेहमी लक्ष केंद्रित केले. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीची पक्की तामील मिळाल्यामुळे अभिजात संगीताची उत्तम जाण होतीच. ग्वाल्हेर गायकावर लालित्याचे संस्कार करण्याचे कसबही विनायकबुवांनीच शिकवले असणे शक्य होते. कारण स्वत: विनायकबुवा हेही संगीत रंगभूमीचे पाईक होते. त्यांच्या काळात ही रंगभूमी ऐन भरात होती. शरद गोखले यांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. संगीत रंगभूमी जवळजवळ अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना छोटा गंधर्व आणि शिलेदार कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे ही संगीत रंगभूमी पुन्हा कात टाकू लागली होती. विनायकबुवांकडे गाणे शिकत असतानाच त्यांचे पुत्र रामचंद्र पटवर्धन यांच्याकडून तबला वादनाचे शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठीही गोखले यांनी कष्ट घेतले. लयतालावरील हुकमत आणि रागज्ञानाची शिदोरी यांच्या जोरावर संगीत रंगभूमीवरील पदार्पण करणे त्यांना शक्य झाले. ग. श्री. खैर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू झालेल्या ‘अनाथ विद्यार्थीगृह’ या एका अनोख्या सामाजिक चळवळीचा भाग होण्यासाठी शरद गोखले या संस्थेत अध्यापक म्हणून काम करू लागले. पण अध्यापनाबरोबरच संगीत स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती त्यांनी रंगभूमीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या जगण्यात खरा आनंद निर्माण करणारा ठरला. उत्तम मैफली गवई होण्याची क्षमता असतानाही गोखले यांनी रंगभूमीला आपलेसे केले. रंग लावून रंगमंचावर जाताना त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या गळ्यातील गाणे त्यांना सतत साद घालत होते. त्यामुळे शिलेदार कुटुंबातील जयराम, जयमाला, कीर्ती, दीप्ती यांच्यासारख्या तालेवार कलावंतांबरोबर काम करताना आपली गायन साधनाच आपल्याला मदत करू शकणार आहे, याची पुरेपूर जाणीव शरद गोखले यांना होती. या सगळ्या कलावंतांबरोबर देशभर दौरे करताना त्यांनी आपली अभिजात संगीताची तालीम बंद होऊ दिली नाही. ज्या काळात संगीत हा प्राधान्याचा विषय असणाऱ्या आकाशवाणीचे शरद गोखले हे नेहमीचे यशस्वी कलावंत ठरले. संगीत रंगभूमीवरील दीर्घ कारकीर्दीबद्दल मिळणारे पुरस्कार हा अविभाज्य भाग होता. परंतु गोखले यांनी संगीतावरील आपले चिंतन सतत सुरू ठेवले. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एक हुन्नर संपला आहे.
------------------------------------------------------------------------------
पंडित शरद गोखले यांचे निधन
जयराम शिलेदार यांच्या मराठी रंगभूमी संस्थेतील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. शरद घनश्याम गोखले (७१).
संगीत सौभद्र, स्वयंवर, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी, विद्याहरण, शारदा, कान्होपात्रा, एकच प्याला ही त्यांची नाटके गाजली.
गोखले ह्यांचा जन्म दि. २६ मे १९४० ला झाला. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी संगीत अलंकारापर्यंतचे धडे गिरवले.
राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले.
वाड्मयीन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, साहित्य विश्वाचा अचूक संदर्भग्रंथ, परखड समीक्षक, व्यवहारात पारदर्शक, लिखाणासोबत स्वभावातही नितळपण..अशा अनेक वैशिष्टय़ांनी व्यक्तिमत्व सजलेले असल्याने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत रामचंद्र वर्तक यांच्या निधनाचा धक्का अवघ्या मराठी साहित्य विश्वाला बसणे साहजिकच. रायगड जिल्ह्य़ातील महाड या गावी २७ जुलै १९३० रोजी प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांचा जन्म झाला.
प्राथमिक शिक्षण मुंबईतील छबिलदास शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. विद्यार्थीदशेतच त्यांची लेखनकलाही बहरत होती. वर्धा येथील गोविंददास सक्सेरिया महाविद्यालयात प्राध्यापकी स्वीकारल्यानंतर हा पेशा व प्रवासाच्या आवडीमुळे त्यांच्या लेखनकलेस खतपाणी मिळाले. पुणे विद्यापीठातून ‘सन १८०० ते १९५० हा दीडशे वर्षांचा प्रवास’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे हं.प्रा.ठा., बिटको आदी महाविद्यालयांमधून त्यांनी प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. पी.एचडी आणि एम.फिलसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. १९९० मध्ये नाथीबाई ठाकरसी महिला महाविद्यालयातून ते निवृत्त झाले. कथाकार, समीक्षक, उत्कृष्ट वक्ता म्हणून असलेली त्यांची कामगिरी नवोदितांसाठी आदर्शवत अशीच. नाशिकमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सान्निध्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व साहित्यिकदृष्टय़ा अधिकच बहरले. आपल्या साहित्यामधून त्यांनी वाचकाला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. ‘वळणावरचे साकव’ या व्यक्तिचित्रणसंग्रहातून ते सहजपणे वाचकाला अंतर्मुख करून जातात, तर ‘माळंदे’ या ललित लेखसंग्रहातून त्यांच्या खेळकर लेखनशैलीचा सहज सुंदर आविष्कार पहायला मिळतो. प्रवास करताना केवळ ‘पाहाणे’ नव्हे, तर ‘अभ्यासणे’ या त्यांच्या वृत्तीचे दर्शन ‘लू यू चीन,’ ‘देशादेशांतून’ या प्रवासवर्णनसंग्रहांमधून दिसते. ‘मराठी ललित गद्य’, ‘सफर बहुरंगी रसिकतेची’, ‘संशोधनाची लेखनशैली’ ही त्यांची समीक्षा व संशोधनपर पुस्तके. मुक्त विद्यापीठासाठी १६ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या प्रा. वर्तक यांचे ‘पारंब्या’, ‘फुलपंखी दिवस’, ‘अंकुर’, ‘मनमोर’, ‘धून’, ‘केटलिक वार्ताओ’ (गुजराती) हे कथासंग्रहही प्रसिध्द आहेत. ‘कॉन्व्हर्सेशन विथ स्टॅलिन-एक शर्थीची झुंज’ या समीक्षात्मक व संशोधनात्मक ग्रंथाचीही साहित्यवर्तुळाने विशेष दखल घेतली. याशिवाय त्यांच्या नावावर ‘मराठी नियतकालिकांचा इतिहास खंड २, २४,’ ‘प्रभाकर पाध्ये-समग्र वाड:मयदर्शन’, ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड १३’ आदी ग्रंथ आहेत. लघुकथा, प्रवासवर्णन, व्यक्तिचरित्रे, ललित गद्य या प्रकारांमध्ये स्वैर मुशाफिरी करणारे वर्तक समीक्षक म्हणून अधिक ओळखले गेले. नवीन लेखकांचे तर ते गुरूच. आपल्या पुस्तकासाठी वर्तक यांनी दिलेला अभिप्राय नवलेखकांना बहुमोलाचा वाटे. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे विद्यापीठाने साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार त्यांना प्रदान केला. याशिवाय डॉ. य. वा. परांजपे, किलरेस्कर, मराठी साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा मु. ब. यंदे पुरस्कार त्यांना अधिक भावत असे. महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साहित्यभूषण परीक्षा समितीचे अध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. येत्या २७ जुलै रोजी ८१ व्या वर्षांत ते पदार्पण करणार होते. वाढदिवस कशा पध्दतीने साजरा करावयाचा, या नियोजनात पत्नी, दोन मुले यांसह मित्रांना मग्न ठेवत ते स्वत: परलोकीच्या प्रवासाला निघून गेले.
‘जय भवानी-जय शिवराय.,’ ‘छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार.’ हे शिवछत्रपतींचे गुणगान ऐकत-त्याच्यातील जोश कानात साठवत महाराष्ट्रातील अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. या पंक्ती राज्यातील अनेक गायक मनसोक्तपणे गात आणि श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होई, मात्र त्या रचना नेमक्या कोणाच्या याची माहिती सर्वानाच नव्हती. मराठी मनांचा ठाव घेणारे या पंक्तींचे कर्ते होते शाहीर योगेश. योगेश ऊर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर.
आपले काव्य आणि पोवाडे योगेश स्वत:च गात असत, तेव्हा त्यांचा आवेश पाहण्यासारखा असे, खडा आवाज ऐकण्यासारखा असे. तो ऐकण्याचे भाग्य लाभलेले मराठीजन त्यांच्या सादरीकरणाविषयी सांगतातच, पण त्यांच्या रचना दुसऱ्यांकडून ऐकलेलेही त्या पंक्तीतील चमक, देशप्रेम पाहून दिपून जात. शाहीर मूळचे विदर्भातील. अमरावती जिल्ह्य़ातील अंजनगाव सुर्जी या लहान गावात त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२८ ला झाला. आपल्या भावामुळे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रचनांकडे ओढले गेले. त्यांच्या रचना म्हणण्याचा छंद त्यांना लागला. मात्र त्यानंतर शाहीर पांडुरंग दत्तात्रेय खाडिलकर यांचा शाहिरी कार्यक्रम त्यांनी ऐकला आणि शाहिरीतील तेजाने ते तिकडे आकर्षिले गेले. खाडिलकर यांचे पोवाडे गातगात ते स्वत:च रचना करू लागले. मराठी आणि हिंदीतील तब्बल पाचशे काव्यरचनाही त्यांनी केल्या. जुन्या मॅट्रिकनंतर चरितार्थासाठी त्यांनी पशुसंवर्धन खात्यात नोकरी केली, पण त्यांचा खरा ओढा हा काव्यरचना करून त्या गाण्याकडे होता. त्यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घातला. शिवाजीमहाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर त्यांनी पोवाडे रचले. शिवछत्रपतींप्रमाणेच शंभूराजे, संत तुकाराम, रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, लहुजी वस्ताद साळवे, डॉ. हेडगेवार आदींवरही त्यांनी केलेले पोवाडे गाजले. त्यांची गीते चटकन ओठांत खेळू लागत आणि मग ती पाहतापाहता सर्वच जण गाऊ लागत. सातवीच्या एका पुस्तकात त्यांचे शिवबाचे गोंधळी हे गीत समाविष्ट करण्यात आले होते, मात्र त्यांचे नावच त्यात नव्हते, तसेच ‘देश धरमपर मिटनेवाला, शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था।’ या संभाजीमहाराजांचे यथार्थ चित्र रंगणारे गीतही कोणीतरी स्वत:च्या नावाने छापले. हे लक्षात आल्यावर आपल्या रचनांची पुस्तके प्रसिद्ध करण्याचे योगेश यांनी ठरविले. ‘शिव-मातृ वंदना’, ‘वीरश्री गाथा-पोवाडे’, ‘प्रहरी’ अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. केवळ शाहिरीला नव्हे तर राज्यातील सर्वच शाहिरांनाही कायम आठवणीत राहील अशी गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे शाहीर हिंगे यांच्या साथीने स्थापन केलेली शाहीर परिषद. १९६८ मध्ये स्थापन झालेल्या या शाहीर परिषदेच्या २६ जिल्ह्य़ांत शाखा सुरू झाल्या आणि शाहिरांचे प्रश्न सोडविण्याच्या महत्त्वाच्या कामाला सुरूवात झाली. आपल्या आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत म्हणजे तब्बल ८३ व्या वर्षांपर्यंत ते कार्यरत होते, खडय़ा आवाजात ‘ही रात्र शाहिरांची’ सारखे कार्यक्रम गाजवत होते. मात्र अचानक काळाने त्यांना हिरावून नेले आणि खडय़ा आवाजातील शाहिरी आवाज मुका झाला.
अपनालय. मुंबई शहरातील गलिच्छ वस्त्यांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये सुमारे ४० वर्षांपासून काम करीत असलेली सेवाभावी संस्था. उद्दिष्ट अगदी साधं. कुपोषण दूर करणं. डॉ. अभय बंग समितीचा अहवाल येईपर्यंत मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये कुपोषणाची समस्या असू शकते, यावर कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. पण बंग समितीनं हा आकडा ५६ हजारांच्या घरात जाऊ शकतो असं मत अधिकृतपणानं नोंदवलं आणि सरकार खाडकन जागं झालं.
सुदूर ग्रामीण भागामध्ये जशी प्राथमिक आरोग्य केंद्रं असतात, तशी आरोग्य केंद्रं महानगरांमधल्या उपेक्षित वस्त्यांमध्ये नाहीत याविषयीची चिंता बंग समितीनं त्या अहवालात व्यक्त केली होती. मुंबईत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, महापालिकांचे दवाखाने आहेत, मॅटर्निटी होम्स आहेत, लसीकरण केंद्रं आहेत पण तळागाळातील गोरगरीबांना परवडतील अशी प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र नाहीत, ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला शोभणारी नाही, यावर बंग समितीनं तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. २००५ साली एका झोपडपट्टीत कुपोषणानं झालेल्या मृत्युची दखल प्रसिद्धी माध्यमांनी गंभीरतेनं घेतल्यानंतर शासनानं मुंबईमध्ये ११०० आंगणवाडय़ा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आंगणवाडय़ांना सरकार ना जागा देऊ शकलं होतं, ना शिक्षक. अशीच स्थिती प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांची असल्याबद्दल बंग समितीनं नाराजी व्यक्त केलेली होतीच. सरकारी नियुक्ती स्वीकारायला एकही डॉक्टर तयार होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना शासनानं यावर ठोस उपाययोजना करायला हवी असं मत समितीनं मांडलं होतं. बंग समितीनं कुपोषणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधण्या आधीपासूनच खरं तर अपनालयानं या विषयात काम सुरू केलं होतं. १९७२ साली अपनालयाची स्थापना झाली. आज मुंबई महानगरातील दहा प्रमुख झोपडपट्टय़ांमध्ये अपनालयाची केंद्रं आहेत. त्यांचं काम चालतं ते प्रामुख्यानं कचरा गोळा करणाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये. दिवसभर कचरा गोळा करायचा, संध्याकाळी तो आणून कचरा गोळा आणि खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यांकडे जमा करायचा, आणि हातावर पडतील तेवढे पैसे घेऊन पोटाची खळगी भरायची, हेच या कामगारांचं जीवन. पैसे मिळाले तर मिळाले, नाहीतर एखादा दिवस पाणी पिऊनच उपाशीपोटी काढायचा ही स्थिती. पण हे पाणी पिऊन पोटाची खळगी भरणं कोवळ्या मुलांना कसं चालायचं. त्यांचं पोट जाळण्यासाठी मग त्यांना अंगावर पाजायचं एवढंच त्यांच्या हातात उरणारं. आईच जिथे उपाशी, कुपोषित तिथे त्या मुलांचं पोषण व्हायचं कसं. गेल्या सहा महिन्यात मुंबई शहरातल्याच एका उपेक्षित वस्तीत १७ बालकांचे मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली ती याच परिस्थितीतून. नॅशनल इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत अपनालयाचे ज्ञानेश्वर तरवडे आणि त्यांची ऐंशी सहकाऱ्यांची टीम या मुलांच्या देखभालीची, त्यांना स्वच्छ पाणी, सकस आहार मिळेल याची, कचरावेचक महिलांचे बचतगट चालवून त्यांना पुरेसा रोजगार मिळेल याची काळजी घेतच आहेत. पण त्याचबरोबर हजार-बाराशे कुटुंबांचं नियमित आरोग्य सर्वेक्षण, एडसग्रस्तांची देखभाल, क्षयरूग्णांसाठी औषधोपचार आदींचा अंतर्भाव त्यात आहेच. जो मुंबईत पैसा कमावतो त्याचेसाठीच सोयीसुविधा ही स्थिती योग्य नाही, जीवनदायी सुविधा सर्वाना सारख्याच हव्यात, हेच तर अपनालयाचं ध्येय आहे.
---------------------------------
From Aniket
ज्ञानेश्वर तरवडे हे मुंबईमधील झोपडपट्टयांमध्ये अत्यंत हालाखीच्या परिस्थितींमध्ये गुजराण करणार्या हजारो कचरावेचक मजूरांच्या कल्याणाकरिता अपनालय नावाची सेवाभावी संस्था चालवित आहेत. १९७२ मध्ये अपनालयाची सुरूवात अगदी मोजक्या प्रमाणात व घरगुती स्वरूपात झालेली होती. आज तरवडे व त्यांच्या ८० सहकार्यांच्या निरपेक्ष व सेवाभावी मेहेनतीमुळे अपनालयाचा वृक्ष भलताच बहरला आहे व मुंबईतल्या दहा प्रमुख झोपडपट्टयांमध्ये तो असंख्य निराधार कुटुबांना मायेची सावली देत आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीवासीयांच्या सानिध्यात राहून त्यांचा संघटित आवाज सरकारपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या वस्त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून रोग्यांना योग्य ते औषधोपचार पुरविणे, लहान मुलांना सकस आहार, आरोग्यदायी वातावरण, निर्मळ पाणी व पोषणद्रव्यांचा पुरवठा करणे व त्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजनांचा अधिकतम लाभ घेणे असे त्रिवेणी लक्ष्य डोळ्यांशी ठेवून तरवडेंची ही संस्था गरिबांच्या विकासकार्यांमध्ये अव्वल बनली आहे. याशिवाय क्षयरोग, व एड्स अशा महाभयंकर रोगांनी पिडीत रूग्णांना मानसिक, वैद्यकिय, व आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रमदेखील सध्या यशस्वीपणे सुरू करण्यात आलेला आहे. या सर्व उपक्रमांची मांडणी, अंमलबजावणी, व त्याकरिता लागणारे भांडवल उभी करण्याची कसरत, व ही कसरत प्रभावीपणे वठविण्यासाठी आवश्यक असलेली कला त्यांना चांगलीच अवगत झालेली आहे.
अरविंद गणपत सावंत हे शिवसेनेतील राजकीय नेते आहेत. १९६८ मध्ये अरविंद सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गटप्रमुख ह्या पदापासून केली. स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी मागणी करणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीत ते सामील झाले.
नंदकिशोर कलगुटकर हे अनेक मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख होते. कलगुटकर यांनी विशेषतः दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मुका घ्या मुका, सासरचं धोतर आदी मराठी आणि तेरे मेरे बीच में, आगे की सोच अशा हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता. युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.
बुजुर्ग रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुठल्याही पुरस्कारासाठी किंवा मानसन्मानासाठी त्यांनी कधीच काही केलेले नाही. नाटक या एकमेव वेडाने झपाटलेले हे झाड मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईत प्रथम आले ते चक्क क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी! परंतु हिंदी चित्रपट दिग्दर्शक विजय आनंद यांनी त्यांना मुंबईतल्या नाटय़सृष्टीशी परिचय करून दिला आणि दुबे क्रिकेट सोडून रंगभूमीकडे वळले.
इब्राहिम अल्काझी या नाटय़क्षेत्रातील भीष्माचार्याकडे त्यांनी नाटकाचे पहिले धडे गिरविले. त्यांच्या ‘थिएटर युनिट’ या संस्थेत साहाय्यक म्हणून दुबेंनी शागिर्दी पत्करली आणि पुढे अल्काझी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्यावर त्यांच्या थिएटर युनिटची सूत्रे दुबेंच्या हाती आली. विजया मेहता आणि दुबे हे दोघेही अल्काझींचे शिष्योत्तम असले आणि दोघांनीही प्रायोगिक-समांतर रंगभूमी हीच आपली कर्मभूमी मानली होती तरी त्यांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या राहिल्या. पाच दशकांत दुबेंनी आपली समांतर रंगभूमीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’शी (NSD) समांतर असे ‘नॅशनल स्कूल ऑफ दुबे’ (NSD) देशभरात अस्तित्वात आहे. त्यांची शिष्यमंडळी केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटय़सृष्टीतच नाहीत, तर बॉलिवूडमध्येही आहेत. तरूण रंगकर्मीचा घोळका त्यांच्याभोवती कायम असतो. दुबे हिंदीभाषिक असले तरी त्यांनी अनेक मराठी नाटके दिग्दर्शित केली आहेत. कणकवली नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी, असा आग्रह संमेलनाच्या संयोजकांनी धरला होता. परंतु नाटय़ परिषदेच्या त्यावेळच्या धुरिणांनी कोत्या वृत्तीचे दर्शन घडवत हा आग्रह अव्हेरला होता. दुबेंचे मराठी रंगभूमीवरील मौलिक योगदान त्यांना ज्ञात नव्हते, ही वस्तुस्थिती होती. विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे, चेतन दातार आदींची मराठी नाटके त्यांनी केली. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा आगळा रंगाविष्कारही त्यांनी सादर केला. ‘आधेअधुरे’, ‘अबे बेवकूफ’, ‘संभोग से समाधी तक’, ‘अंधायुग’, ‘एज्युकेटिंग रिटा’, ‘हयवदन’, ‘डॉन जॉन इन हेल’ अशी अनेक नाटके त्यांनी केली. नाटककाराच्या संहितेवर दिग्दर्शकीय कुऱ्हाड चालवून तिचे आपल्या पद्धतीने अर्थनिर्णयन करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे अनेक लेखक त्यांच्यावर नाराज झाले. पण त्यांनी लेखकांच्या नाराजीची कधीच पर्वा केली नाही. दुबे हे भणंग, कलंदर, अवलिया रंगकर्मी आहेत. त्यांच्या व्यवहाराची काळजी नेहमी त्यांच्या शिष्य व हितचिंतकांनीच वाहिली. त्यांच्या कार्यशाळांतून अनेक लेखक घडले. सत्यदेव दुबे हे मूळचे रा. स्व. संघाचे. पण ही विचारधारा त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणली नाही. गो. पु. देशपांडेंसारख्या डाव्या नाटककाराची नाटकेही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने सादर केली. हिंदुत्वाचा पुरस्कार ते त्यांच्या वक्तव्यांतून करीत असले तरी त्यात कडवेपणा आढळत नाही. हिंदुत्ववादी भाजपच्या कथनी व करणीत अंतर दिसल्यावर त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायलाही त्यांनी कमी केले नाही. त्यांनी काही नाटकेही लिहिली. त्यातून त्यांचे आयुष्य तुकडय़ा-तुकडय़ांत समजून घेण्यास मदत होते. त्यांच्या मतांवर नेहमीच जोरदार चर्चा, वादविवाद होत असतात. ‘थिएटर मर रहा है’ असे म्हणणारे दुबे दुसरीकडे सातत्याने नाटके करतच असतात. कारण ते त्याशिवाय जगूच शकणार नाहीत.
निफाडकर, प्रमोद
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणाऱ्यांमध्ये डॉ. प्रमोद निफाडकर यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांचा आशेचा किरण हरपला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतातील अस्थमा रुग्णांची सेवा करण्यात घालवले. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी कॅन्सरने झालेले त्यांचे निधन वैद्यक क्षेत्रालाही चटका लावून गेले.
जे.जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ‘एमडी’ केल्यानंतर अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकमधून अस्थमा व अॅलर्जीतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. खरे तर अमेरिकेतच सुखासीन जीवन त्यांना जगता आले असते. मात्र भारतातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी ते मुंबईत परत आले. खासगी तसेच शासनाच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या माध्यमातून ते हजारो अस्थमा रुग्णांवर उपचार व संशोधन करीत होते. ‘अॅलर्जी’ या विषयातही त्यांची मास्टरी होती. भारतात मधुमेह, हृदयविकाराबरोबरच अस्थमा रुग्णांची संख्याही भयावह म्हणावी एवढय़ा वेगाने वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०२० मध्ये भारत ही अस्थमा रुग्णांची राजधानी बनेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर डॉ. निफाडकर यांनी शहरी व ग्रामीण भागातील अस्थमा रुग्णांसाठी केलेल्या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण म्हणावे लागेल. प्रामुख्याने शहरी भागात लहान मुलांमध्ये अस्थमा होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. एकटय़ा मुंबईत १० लाख अस्थमा रुग्ण असून त्यामध्ये लहान मुलांची संख्या सहा लाख एवढी आहे. या रुग्णांच्या औषधावरील खर्च मोठा असून डॉ. निफाडकर यांनी केलेल्या संशोधनातून योग्य आहारविहार, घरात खेळती हवा ठेवल्यास तसेच अन्य काही उपाय केल्यास औषधाचा खर्च निम्म्याने कमी होतो हे दाखवून दिले. यामुळेच त्यांच्या संशोधनकार्यात कधीही वैद्यकीय कंपन्यांनी मदत केली नाही. ‘अस्थमा अॅण्ड ब्राँकायटीस असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते २० वर्षांहून अधिक काळ सचिव होते. या संस्थेच्या माध्यमातून तीन आंतरराष्ट्रीय परिषदा, अस्थमासंदर्भात फॅमिली डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या ५० हून अधिक कार्यशाळा, अस्थमा रुग्णांमध्ये आत्मविश्वास जागा करण्यासाठी ४०० हून अधिक शिबिरांचे आयोजन, शिक्षण, प्रबोधन, रुग्णांसाठी व्याख्याने, शोधनिबंध, पुस्तक लिखाण, वाचनालय असे जनजागृतीचे अनेक उपक्रम त्यांनी गेल्या तीन दशकांमध्ये केले. हा उपक्रम राबविताना त्यांनी दिल्लीच्या सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बलराम घोष यांच्या सहकार्याने एक संशोधनही केले होते. यात शिखराच्या पायथ्याशी असताना अस्थमा रुग्णांच्या फुप्फुसाची क्षमता व शिखरावर चढल्यानंतर त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून स्टिरॉईड न घेताही फुप्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येते हे दाखवून दिले. यावर अधिक संशोधन सुरू होते. औषध कंपन्यांच्या मुळावर येणाऱ्या या संशोधनासाठी कोणतीच औषध कंपनी पुढे येणे शक्य नव्हते. मात्र पदराला खार लावून त्यांनी आपले संशोधन व अस्थमा रुग्णांसाठीचे उपक्रम सुरूच ठेवले हेते. त्यांच्या खासगी दवाखान्यातही येणाऱ्या शेकडो गोरगरीब रुग्णांवर ते मोफत उपचार करीत असत. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांच्या जीवनातील आशेचा एक किरण हरपला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti