(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • परळ

    परळला वाडिया हॉस्पिटलच्या समोर एका चाळीत आम्ही राहात असू. वाडिया हॉस्पिटलहून थोडं पुढे गेलं की के.इ.एम. हॉस्पिटल येतं. सुप्रसिद्ध हाफकिन इन्स्टिटयूट के.इ.एम.च्या शेजारीच आहे. याशिवाय टाटा कॅन्सर आणि बच्चूभाई डोळ्यांचे हॉस्पिटल ही देखील जवळपासच आहेत. यात भर म्हणजे जनावरांचं बैलघोडा हॉस्पिटलही परळचंच. सर्व हॉस्पिटल जवळजवळ एकाच परिसरात येत असल्याने आमच्या घरासमोरचा रस्ता नेहमी गजबजलेला असे. पेशंटस, त्यांचे नातेवाईक, मेडिकलचे विद्यार्थी, नर्सेस या सर्वांचीच रस्त्यावर लगबग असे. धन्यासोबत बैलघोडा हॉस्पिटलकडे जाणारी जनावरेही अधूनमधून दिसत. सकाळी अगदी सातपासून चाळीपुढच्या फूटपाथवर रहदारी सुरु होई.

    समोरच्या वाडिया हॉस्पिटलचे मॅटरनिटी हॉस्पिटल आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असे दोन विभाग होते. या हॉस्पिटलचे घुमट दूरवरुन नजरेत येत. हॉस्पिटलच्या मागल्या बाजूस नर्सेस क्वार्टर्स आणि नर्सेसच्या जेवणाखाण्यासाठी एक मेस होती. संपूर्ण परळमध्ये हा परिसर मात्र अगदी शांत भासे. शाळेत असताना आम्ही अनेकदा अभ्यासासाठी या मेसच्या आवारात जात असू. गंमत म्हणजे तिथे जाण्यास आम्हाला कधीच कोणी अटकाव केला नाही. उलट तिथल्या सिनिअर सिस्टर्स आम्हाला प्रेमाने चहापाणीही देत असत. शाळेचे दिवस आठवले की तो मेसचा परिसर आणि त्या प्रेमळ सिस्टर्स लगेचच आठवतात. परळच्या या हॉस्पिटल्समध्ये सुखसुविधांची वानवा असतानाही गोरगरीब रोग्यांना उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असे. साहजिकच या हॉस्पिटल्समध्ये केवळ मुंबईतीलच नव्हे तर बाहेरगावातील पेशंटसचीही रीघ लागलेली असे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर वामनराव महाडिक, विजय पर्वतकर असे अनेक कार्यकर्ते रोग्यांची देखभाल करण्यासाठी या हॉस्पिटल्समध्ये आवर्जून फेरी मारत आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी परळ लालबागमधील जनतेच्या मनात आपुलकीचं नातं जोडलं गेलं. शिवसेनाला परळ लालबागमध्ये जम बसविण्यात हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरला हे इथे आवर्जून नमूद कारवंसं वाटतं.

    हॉस्पिटलप्रमाणे परळमध्ये देवळेही बरीच होती. आमच्या घराच्या थोडं पुढे दत्ताचं देऊळ होतं. याच देवळात मारुतीचंही छोटं देवस्थान होतं. शाळेत परीक्षांच्या दिवसात आमची या देवळातली फेरी ठरलेली. दत्ताच्या देवळाच्या थोडं पुढे जयकरांचं विठ्ठल मंदिर होतं. संपूर्ण परळभर हे मंदिर जयकरांचं देऊळ म्हणूनच ओळखलं जाई. मनवमीच्या दिवशी या देवळात मोठा उत्सव भरत असे. या उत्सवात रामासाठी पाळणाही सजवीत असत. सोहळा संपल्यानंतर सुंठवडयाचा प्रसाद हातावर पडे. त्या सुंठवडयाची चव अजूनही जीभेवर रेंगाळतेच आहे.

    परळमधील कामगार मैदान व नरे पार्क या दोन मैदानंचीही आपल्याला नोंद घ्यावीच लागेल. आर.एम. भट हायस्कूलसमोरील कामगार मैदान आणि शिरोडकर हायस्कूलच्या मागील बाजूस असलेलं नरे पार्क या मैदानांनी अनेक राजकीय उपथापालथी अनुभवल्या. परळ लालबागसारख्या कामगार वस्तीत कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण सभा या मैदानांवरच गाजल्या. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड देसाई अशा अनेक समाजवादी नेत्यांच्या घणाघाती भाषणांनी या मैदानांचं नाव सर्वतोमुखी झालं. मात्र पुढे याच मैदानात सभा घेऊन शिवसेनेने आपलं बस्तान बसविण्यास सुरुवात केली व प्रचलित सामाजिक परिस्थितीमुळे त्यात त्यांना यशही लाभलं. अर्थात या सभा संध्याकाळनंतर होत. दिवसभर मात्र या मैदानांवर मुलांचा धुडगूस चाले. कामगार मैदानात संध्याकाळी चार नंतर लाऊडस्पिकरवरुन गाणीही वाजविली जात. येऊ कशी कशी मी नांदायला, गेला हरी कुणा गावा, चल ग हरिणी तुरु तुरु अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली ती या कामगार मैदानावरील जाहीर प्रसरणांमुळेच.

    परळच्या आठवणी सांगताना तिथल्या काही लोकप्रिय उपहारगृहांविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाही. दूध आणि मिठाईचे पदार्थ यांसाठी परळच्या नाक्यावरील सांडू आणि धूपकरांची दुकानं सर्वमान्य ठरली होती. या दुकानांतील दुधी हलवा- आणि गुरुवारी घरच्या देवांसमोर दाखविण्यासाठी -पेढे- यांना मोठी मागणी लाभत असे. तेच भाग्य अर्थातच पियुषलाही लाभलं होतं. मुंबईत उडप्यांनी संसार उघडला तेव्हा वाडिया हॉस्पिटलसमोरील मिनाक्षी भुवन दाक्षिणात्य पदार्थांची फौज सर्वप्रथम परळमध्ये उतरवली. उपमा, इडली, मसाला डोसा या पदार्थांची ओळख मिनाक्षी भुवननेच प्रथम परळच्या मराठमोळ्या कामगारांना घडविली. परळच्या नाक्यावरलं फिरदोसी हे इराणी रेस्टॉरंट मुंबईच्या तमाम इराणी हॉटेल्सचं प्रतिनिधित्व परळमध्ये करी. ब्रून मस्का, बन मस्का, प्लमकेक, पुडिंग, ऑम्लेट या पदार्थांची रेलचेल असलेलं हे हॉटेल निरुद्योगींच्या गप्पटप्पांचं माहेरघर मानलं जाई. याशिवाय के.इ.एम. हॉस्पिटलच्या रस्त्यावर मेडिको डायनिंग या नावाची एक गुजराथी खानावळ होती. या खानावळीत गुजराथी थाळी अगदी माफक दरात मिळे. या थाळीतील गरमागरम पुलके आणि अप्रतिम चवीची डाळ यांनी अख्ख्या परळला वेड लावलं होतं. याशिवाय काही मोजक्या हॉटेल्समध्ये मालवणी मांसाहारी पदार्थांनी संबंधीतांशी जिव्हाळ्याचं नात जोडलं होतं. एकदोन मुलतानी हॉटेल्समधील खिमा, चिकन आणि नान परळच्या घराघरात पोहोचले. गौरीशंकर छितरमल मिठाई वाल्याकडील बंगाली मिठाई आणि काही दूधवाल्यांकडची जिलेबी यांनीही परळच्या रहिवाशांच्या घरात मानाचं पान पटकावलं होतं.

    परळचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व धर्माचे आणि प्रांतांचे लोक गुण्यागोविंदाने राहात. चित्रा सिनेमाच्या जवळ मुसलमानांची वस्ती होती, हिंदमाता सिनेमाजवळ ख्रिश्चन धर्मियांचं प्रशस्त चर्च होतं आणि त्यांची सोसायटीही होती. बच्चूभाई हॉस्पिटलजवळ अनेक चाळींमध्ये ज्यू बांधव राहात. गुजराथी मंडळी तर जवळजवळ प्रत्येक चाळीत स्थिरावली होती व त्यांची मुलं अस्खलीत मराठी बोलत. जवळजवळ प्रत्येक चाळीखाली एका मारवाडयाचं दुकान असे व दुकानातच आतल्या बाजूस संसारही थाटून राहात असे. शिरोडकर हायस्कूल शेजारीच ख्रिश्चन समाजातील एका विशिष्ट गटाचं प्रार्थना मंदिर होतं. या हॉलवरील 'ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला' ही पाटी परळमधील सर्व रहिवाश्यांना परिचित होती.

    सुमारे तीसएक वर्षांपूर्वी आम्ही परळ सोडलं आणि उपनगरात आलो. आता कधीतरी काही निमित्ताने परळला फेरी होते. या फेरीत परळचा चेहरामोहरा बदलत असल्याचं जाणवतं. सांडूंच्या उपहारगृहाजागी आता कपडयाचं दुकान आलं आहे. नाक्यवरला इराणी आता ग्रिटिंग कार्डस विकतो तर के.इ.एम. समोरच्या इराण्याने औषधांचं दुकान थाटलं आहे! सूर्या सिनेमाच्या जागी आता भव्य इमारत उभी राहिली आहे तर हिंदमाता सिनेमा शॉपिंग मॉल बनला आहे. परळच्या बाह्य रुपात अनेक बदल घडत आहेत. लालबागला आता चाळींच्या जागी गगनचुंबी इमारती येत आहेत. काही वर्षांत तोच प्रकार परळमध्ये सुरु होईल. आमचेही परळशी असलेले ऋणानुबंध आता तुटले आहेत. शिवसेनेच्या भाषेत सागायचं तर आम्ही परळमध्ये आता उपरे झालो आहोत. परंतु परळच्या रस्त्यांवरुन पुढे जाताना जुनं परळ डोळ्यांसमोर येतं. या आमच्या परळचा चेहरामोहरा तोच असतो. ओळखीचा. त्या परळच्या अंतरंगात कुठेतरी आमचाही चेहरा लपलेला असतो. आम्ही सर्वार्थाने परळमय होऊन गेलेलो असतो...
    कायमचेच!

    -सुनील रेगे

  • हरवलेल्या बॅगचा शोध

    आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो.

    विशेष म्हणजे, ही यात्रा स्पेशल गाडी सुरू करण्यासाठी खामगाव-जलंब येथील प्रवासी संघटनेने खूप प्रयत्न केले. तसेच बुलडाणा मतदार संघाचे तत्कालीन खासदार आनंदराव आडसूळ यांनीही आमची मागणी रेटून धरली. त्यामुळेच ही गाडी सुरू झालेली आहे. सर्वसामान्य वारकऱ्याला स्वस्तात पंढरपूर जाण्याची संधी यामुळे मिळाली. फक्त दीडशे रुपयात जत्रा असल्याने अनेकांनी पंढरीची वारी सुरू केली. मलाही वाटले चला पंढरपूरला जावे. त्यामुळे दरवर्षी रेल्वेने पंढरपूर जात होतो. तेथे गेल्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या भक्तनिवासात तर कधी श्री संत सोनाजी महाराज कवठा यांच्या मठात मुक्काम असायचा. कधी विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळील एखाद्या भाड्याच्या खोलीत थांबायचो. त्यामुळे पंढरपुरातील बहुतेक रस्ते ओळखीचे वाटायचे. तसे काही नाही. आपल्या शेगावसारखेच पंढरपूर आहे. पण गर्दी लाखात असते. त्यामुळे एकदा ओळखीची व्यक्ती भेटली की, यात्रेत ती दुसऱ्यांदा भेटणे कठीणच आहे. अशा परिस्थिती जर एखाद्याची बॅग हरवली तर मग काय सोय?

    त्याचे असे झाले की, माझी बदली आकोटला झाल्यामुळे मी सन २००९ मध्ये वारीला जाऊ शकलो नाही. पण परिचयातील बरीच मंडळी खामगाव रेल्वेगाडीने पंढरपूरला निघाली होती. ही गाडी खामगाववरून निघत असल्यामुळे आपल्याकडचीच मंडळी जास्त असते. खामगाव, नांदुरा, जळगाव, शेगाव, बाळापूर, तेल्हारा, अकोला तालुक्यातील वारकरी खामगावहून बसतात, ते जागा मिळण्यासाठी. असेच अकोल्यातील दोन शिक्षक मित्र एका बोगीत बसले. हातरुणचे पांडुरंग चोपडे सर आणि अकोल्यातील महादेव शेगोकार हे साेबत असल्याने त्यांनी आपआपल्या बॅग प्रवासादरम्यान कॅरिअरवर ठेवल्या. सर्व वारकरी मंडळी आणि आपल्याकडची म्हटल्यावर चोरीचा धोका नव्हताच. प्रवासादरम्यान सर्वच निश्चिंत होते. मग २० तास जर पंढरपूरला जाण्यासाठी या गाडीने लागतात, तर सुरू झाल्या गप्पा. पीक पाणी काय म्हणते पासून तुम्ही कोण्या गावचे, कुठे असता, जमीन किती आहे, शेजारच्याचे आडनाव असे झाडून पुसून विषय प्रवासात एकमेकांशी शेअर केले गेले.

    नंतर प्रवास संपला, उतरण्याची सर्वांची घाई. गडबडीत यातील शिक्षक महादेव शेगोकार यांची काळ्या रंगाची वर ठेवलेली बॅग कुणीतरी उचलून उतरताना घेऊन गेला. त्याच रंगाची आणि तशीच दुसरी बॅग तेथे होती. ती आपली समजून हे शिक्षकही उतरले. आणि गेले मुक्कामाच्या ठिकाणी सोनाजी महाराजांच्या मठात. तेथे गेल्यावर आंघोळीसाठी कपडे, मोबाईलचे चार्जर काढण्यासाठी बॅग उघडली तर उघडेना. कुलप लावलेले असल्याने वांदा झाला. आता कसं? आपली बॅग कुणीतरी अनावधानाने नेली. आणि त्याची आपल्या हाती आली. बग अदलाबदल झाल्याने आता एवढ्या लाखोच्या जनसागरात ती सापडणे महाकठीण काम. मग काय करायचे तर लावा एकमेकांना फोन, पण त्या पंढरपुरात गर्दीच एवढी की मोबाईल टॉवर जाम झालेले. कुणाशीच संपर्क करता येत नव्हता.

    पण इकडून त्यांना फोन लागत होते. अशातच आकोटचे श्री संत वासुदेव महाराज यांचे निधन झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याची खात्री करण्याच्या उद्देशाने मी आमच्या नात्यातील चोपडे सरांना थेट फोन लावला. आणि माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, आमचे मित्र शेगोकार सरांची बॅग हरवली आहे. आता ४००- ५०० किमी अंतरावर मी आकोटला आणि यांच्या बॅगचे मी तरी काय करणार?

    पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी माझ्या परीने शोध घेणे सुरू केले. त्यांना विचारले तुमच्या आजुबाजूला कोण बसलेले होते. कोणत्या गावाचे होते. त्यांच्याविषयी काही माहिती आहे का? त्यावर त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, त्या माणसाच्या घरी दुकान असावे, कारण त्यांनी प्रवासादरम्यान आपल्या घरी फोन लावून चौकशी केली होती. बहुतेक नांदुरा तालुक्यातील असावे, आणि त्यांचे आडनाव घोराडे असण्याची शक्यता आहे. त्यांची बॅगही काळ्याच रंगाची होती. पण एवढे असून फायदा काय? म्हणून डोके चालवू लागलो.

    आणि मला आठवले आमच्या वडी येथील वार्ताहराचे नाव. मुकुंदा घोराळे पाटील हे आता हयात नाहीत. त्यांचे अपघाती निधन झाले आहे. परंतु त्यांचा अतिरिक्त व्यवसाय मला माहीत होता. त्यांच्याकडे नांदुरा तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्स वजन काटयांची एजन्सी होती, सर्व्हिसिंगसाठी ते ग्रामीण भागात जात होते. त्यामुळे जवळपास तालुक्यातील सर्वच दुकानदारांशी त्यांची ओळख होती. मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि घोराळे अाडनाव असलेल्या व्यक्तीचे आणखी कोण्या गावात दुकान आहे, हे विचारून बॅग हरवल्याची माहिती दिली. त्यांनीही तत्काळ त्या दुकानदाराचा फोन नंबर दिला. मी थेट पंढरपूरला गेलेल्या त्या दुकानदाराच्या घरी लॅण्डलाइनवर संपर्क साधला. सर्व हकीकत सांगितली. त्यांनाही पंढरपूरहून फोन आला होता की, आमची बॅग हरवली आहे. त्यानुसार मोबाइल नंबर घेतला व थेट त्यांच्याशी संपर्क साधला. दोघांचेही मोबाइल नंबर माझयाकडे होते. एकमेकांना ते दिले. परंतु टॉवर जाम मुळे त्यांचा एकमेकांशी एकाच गावात संपर्क होत नव्हता. मी ४०० किमी अंतरावरून आकोटवरून लॅण्डलाईनवरून दाेघांशी संपर्क साधत होतो. त्यानुसार हरवलेली बॅग घेऊन तुम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मठाजवळ या, असे दोघांनाही सांगत गेलो, दोघेही तेथे पोहोचले. एकमेकांना ओळखले, बॅगही ओळखली. आणि सुटकेचा निश्वास सोडला.

    यावर आमचे मित्र पांडुरंग चोपडे सर म्हणाले की, काय गड्या नऊ हजार लोकांच्या गर्दीत एकदा भेटलेला माणूस डबल भेटत नाही. अन‌ तू ४०० किमी अंतरावर बसून आमची बॅग एकमेकांनाा परत मिळवून दिली. हे ऐकून मी धन्य झालो. पण बॅग हरवणारे शिक्षक महादेव शेगोकार माझ्या परिचयाचे नव्हते.

    दरम्यान, सन २०१३ मध्ये मी अकोला शहरात राहायला आलो. एके दिवशी लग्न संबंधाच्या ठिकाणी शेगोकार सरही आले. परंतु ओळख नव्हती. आमच्या सोबतच्या पाहुण्यांना त्यांनी घरी नेण्याचे ठरवले, मलाही चला म्हटले. मी त्यांच्या घरी गेलो. मग एकमेकांचा परिचय सुरू झाला. माझा परिचय त्यांना नव्हता. मी माझा परिचय देताना सांगितले, जनार्दन गव्हाळे. दैनिक दिव्य मराठीला असतो. नाव ऐकताच अरे बापरे तुम्ही काय ? मी म्हटले काय झाले सर ? तर ते त्यांच्या वडिलांना सांगत म्हणाले, हे गव्हाळे साहेब. यांनीच माझी हरवलेली बॅग पंढरपूरच्या गर्दीत सापडून दिली होती. त्यावेळी मला मनात आले की, सांगा. आठवणी किती पक्क्या राहतात.

    — जनार्दन गव्हाळे,
    खामगाव जि. बुलढाणा, विदर्भ.

  • मतिपोसक जातक

    अनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळे त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनात फिरणे अशक्य झाले. तिला एका सुरक्षित स्थळी ठेऊन बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगली चांगली फळे वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलुप हत्ती वाटेतच ती फळे खात असत व बिचाऱ्या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.

  • पैज (संक्षिप्त रूपांतरीत कथा २)

    मूळ कथा – द बेट; लेखक – ॲन्टोन चेकॉव्ह (१८६०-१९०४) : हिंवाळ्यांतील एका मध्यरात्री रावसाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालत होते. राहून राहून त्यांना वाटत होते की पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ती पैज लावायला नको होती. पण आता सुटका नव्हती. ती पंधरा वर्षांपूर्वीची संध्याकाळ व त्यावेळी घडलेल्या गोष्टी रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवत होत्या. त्यांनीच दिलेल्या पार्टीत कशावरून तरी चर्चेला विषय आला होता फांशी बरी की आजन्म कारावास बरा. बऱ्याच जणांचे मत होते फाशीची शिक्षा रद्द व्हावी व केवळ आमरण कारावासाची शिक्षाच ठेवावी.

  • राजकारणांतील वैर

    राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.

  • स्पेस’ ची गरज.. (कथा)

    मला आता ‘ स्पेस ‘ ची गरज आहे. घंटा…स्पेस मी तिला म्हणालो . अरे स्पेस म्हणजे काय खरा अर्थ कळतो काय ? मी डाफरलो .

  • एक परीस स्पर्श – भाग ४

    जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता.

  • अलविदा

    हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.

  • संधिप्रकाशातील सावल्या – १ : भेटीची आवडी । उतावीळ मन

    आम्ही वृद्ध झालोत, पण टाकाऊ नाही झालोत. हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे. सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना, त्याला संधिप्रकाश म्हणतात. आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते. ती अनुभवानं समृद्ध असते. त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल. जीवन कसं जगायचं हे आम्हाला, आमच्या सावलीला विचारा. सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला. आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही. बघ, तूच ठरव, म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? “

  • एक परीस स्पर्श ( भाग – ७ )

    गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली.