नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

अनामिकेसाठी आपण इतकी वर्षे वाया घालवली याचा आता विजयला पश्चाताप होऊ लागला होता. त्याच्या आयुष्यात आलेल्या इतक्या जणी त्याच्या आयुष्यातून ह्या ना त्या कारणाने दूर गेल्या त्याचे त्याला इतके दुःख झाले नाही जितके अनामिकेच्या जाण्याने होईल… कारण अनामिकेच्या बाबतीत त्याला असे वाटत होते कि त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचा नाते आहे . त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे मिलन हे होणारच ! मग अख्खं जग आडवं आलं तरी ! पण हे तोपर्यतरच वाटत होत जोपर्यत तिच्याही मनात त्याच्याबद्दल ओलावा आहे असे विजयला वाटत होते.

खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे. नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात.
माधव ! गाडी वेगात धावतेय. डोंगर, शेतं, झाडं सगळे मागं पळत आहेत. त्यांच्याबरोबर माझं मन ही मागंच पळतंय. शरीर गाडीबरोबर पुढं, मन मात्र मागं, कोल्हापूरच्या त्या माझ्या वाड्यात. त्या शाळेत, त्या देवळात, त्या तलावावर. खरंच, माधव, मन अजून तिथंच रेंगाळतंय रे. वयाची बावीस वर्षं तिथंच काढली ना मी. लग्नानंतर तुझ्याबरोबर तिथून आले. नंतरही अधूनमधून मी जायचे ना तिथं. तूही असायचाच बरोबर कधी कधी. नागपूरला आपला संसार थाटला होता. नागपूर-कोल्हापूर अंतरच किती मोठं रे ! इतक्या लांब सारखं सारखं नाही जमायचं. आपल्या पहिल्या बाळाच्या, हर्षदच्या वेळी मी माहेरी म्हणून आले होते. तेव्हा सलग तीन महिने राहिले, तोच माहेरचा मोठा मुक्काम अन् शेवटचाही.

आळशीपणा, दुर्गुण आणि दारू पिण्याची सवय ह्यांचा व्हायचा तोच परिणाम होऊन त्या आईचा थंडगार मृत देह तिच्या दुर्दैवी मुलांच्या मधोमध पडला होता.
ती दारूच्या नशेत स्वतःच्या घराच्या दारात येऊन पडली व भेदरलेल्या तिच्या मुलांच्या समोरच तिचा देह निष्प्राण झाला.
एऱ्हवी त्या बाईवर रागाने डाफरणारा प्रत्येक गांवकरी आता हळहळत होता.
मृत्यू माणसाच्या कोमल भावनांना आवाहन करतो.
तिच्या मृत्यूची बातमी हळू आवाजांत कानोकानी गांवभर पसरली.
गांवकऱ्यांचा राग गेला व हळहळ व्यक्त केली जाऊ लागली.
ऊन, थंडी, वारा, पाऊस ह्यापासून तिचं व तिच्या मुलांच रक्षण करणाऱ्या तिच्या जुन्या मोडक्या तोडक्या खोपटासमोर गांवकऱ्यांनी गर्दी केली.
कांही गांवकरी शवावर घालायला पांढरे शुभ्र कापड घेऊन आले तर कोणी तिच्या तीन मुलांसाठी कांही खायला घेऊन आले.
तिघांपैकी मोठा जनार्दन बारा वर्षे पूर्ण झालेला, धडधाकट व दुसऱ्याच्या शेतात काम करायलाही लायक झाला होता.
दहा-अकरा वर्षांची दुसरी मुलगी काशी चुणचुणीत, हुशार व मेहनती मुलगी होती.
योग्य व्यक्ती तिला घडवू शकत होती.
सर्वांत धाकटी, तिसरी मेनका मात्र पूर्ण पांगळी होती.
पहिल्यापासून ती अशी नव्हती पण दोन वर्षांपूर्वी ती खिडकीतून खाली पडली आणि तिच्या पाठीच्या कण्याला इजा झाल्यापासून तिच्या आईने उचलल्याशिवाय ती बिछान्यातून उठूही शकत नव्हती.
“मुलांच काय करायचं, हा गांवकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न होता.
त्यांची आई ह्या जगांतूनच गेली, तिच्या देहाची राख होईल, तेव्हां आता तिची काळजी करण्याचं कारण नव्हतं.
तिचे कुणी नातेवाईक नव्हते पण ही मुलं उघड्यावर पडतां कामा नयेत, उपाशी रहाता कामा नयेत.
कामते नावाच्या शेतकऱ्याने विचार करून, आपल्या बायकोची संमती मिळवून गांवकऱ्यांना सांगितले की तो जनार्दनला घरी घेऊन जाईल व त्याची चांगली काळजी घेईल तर श्रीमती जानकीबाई, ज्यांना एखादी मुलगी हाताशी मदतीला हवी होती, त्यांनी विचार केला की जरी काशीचा अजून दोन तीन वर्षे फारसा उपयोग नसला तरी नंतर तिची चांगलीच मदत होईल व आपण दया दाखवल्याचेही श्रेय आपल्याला मिळेल.
त्या म्हणाल्या, “ह्या मुलीला कांहीच वळण नाही, शिस्त नाही, तेव्हां तिचा त्रासच होण्याची शक्यता आहे पण कोणी हिला न्यायला तयार नाही तर कर्तव्य म्हणून मी हिला माझ्या घरी न्यायला तयार आहे.
कोणी म्हणालं नाही की आम्ही मेनकाला घेऊन जातो.
सर्व लोक तिच्याकडे अनुकंपेने पहात होते आणि त्यांना दुःख होत होते.
कांही बायकांनी तिचे अस्वच्छ कपडे बदलले व नवे चांगले घातले.
मेनकेचे दुःखी डोळे प्रत्येकाच्या हृदयाचे दार ठोठावत होती पण कोणीच हृदयाचे दार उघडायला तयार नव्हते.
अंथरूणाला खिळलेले मूल कुणाला हवे असणार ?
कोणीतरी विचारलं, “मेनकेचं काय करायचं ?”
त्यावर एक रांगडा गडी म्हणाला, “अनाथाश्रमात नेऊन टाका तिला !”
दुसरा म्हणाला, “अपंग मुलाला अनाथाश्रमांत फारच त्रास होईल.”
तो रांगडा इसम म्हणाला, “ते तुमच्या माझ्या मुलांसाठी.
ह्या कारटीला तो बदलही चांगला वाटेल.
तिला स्वच्छ ठेवतील, डॉक्टर तपासेल, बऱ्यापैकी खायला मिळेल, तिच्या सध्याच्या अवस्थेहून ते चांगले असेल.”
त्याच्या म्हणण्यात तथ्य होते पण गांवकऱ्यांना तें खुपत होते.
मुलांच्या आईचे दहन विधी पार पडल्यावर सर्व खोपटाशी परत आले, तेव्हां एकेका गांवकऱ्याने हळू हळू काढता पाय घेतला.
कामतेनी जनार्दनचा हात हातात घेतला व ते आपण जबाबदारीचा वाटा घेतल्याचे समाधान मानत त्याला आपल्या बैलगाडीतून घेऊन गेले.
श्रीमती जानकीबाईंनी काशीला आपल्या बहिणीचा निरोप घेण्याची घाई केली आणि दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात गळा घालून रडत असतांनाच काशीला हाताला धरून आपल्या घरी घेऊन गेल्या.
मग हळूहळू एकेक गांवकरी तिथून निघून जाऊ लागला.
कांही जण मेनकाकडे पहात तर कांही जण तिची नजर चुकवत तिथून बाहेर पडले आणि मेनका एकटीच राहिली.
खोपटाच्या उंबरठ्यावर खटारे बनवणारा जितू सुतार येऊन थांबला आणि घाईघाईने बाहेर जाणाऱ्या लोहाराच्या बायकोला म्हणाला, “तिला असं टाकून जाणं क्रूरपणा आहे.”
लोहाराची बायको म्हणाली, “मग जा घेऊन तिला अनाथाश्रमांत ! तिला तिथेच जावं लागेल.”
ती झपकन निघूनही गेली.
थोडा वेळ जितू तिथेच थांबला मग तो वळला.
मेनका कष्टाने वर सरकून उठून बसली होती आणि डोळे ताणून सर्वजण ज्या दारातून निघून गेले, तिकडे पहात होती.
भीतीची गडद छाया तिच्या कोवळ्या चेहऱ्यावर पसरली होती.
जितूला पाहून तिने श्वास रोखून धरला व ती रडत म्हणाली, “जितू काका, मला एकटीला इथे टाकू नका ना !”
दिसायला खडबडीत चेहऱ्याचा जितू सहृदय होता आणि मुलांसंबंधी त्याच्या मनांत माया होती.
जेव्हा मुलं त्याच्या दुकानांत येत तेव्हा मुलांसाठी बनवलेली लाकडाची खेळणी, तो मुलांनी साठवलेले पैसे कितीही कमी असले तरी त्यांना देत असे.
मेनकेच्या बिछान्याजवळ जात तो वांकून म्हणाला, “बेटी, तुला एकटीला इथे नाही टाकणार.”
मग त्याने तिला एखाद्या स्त्रीच्या हलक्या हातांप्रमाणे तिला शेजाऱ्यांनी आणलेल्या स्वच्छ चादरीत गुंडाळलं आणि स्वतःच्या बळकट हातांनी तिचं गांठोड उचललं.
तिला खोपटाबाहेर मोकळ्या हवेत आणलं मग तो तिला घेऊन झपझप मधल्या शेतातून स्वतःच्या घराकडे निघाला.
स्वतःचं मुलं नसलेली जितूची बायको कांही साधु संत नव्हती आणि दुसऱ्यासाठी कांही करायची तिची वृत्तीही नव्हती.
जितूला आपलं स्वागत ती कशी करेल याबद्दल शंकाच होती.
तो आपल्या बागेचा दरवाजा उघडून आत आला, तेव्हां आंतून खिडकीतून त्याला येतांना पाहिलेली त्याची पत्नी त्याला सामोरी गेली.
जितूने हाताने छातीशी धरलेल्या मेनकेच्या मनांत जितूबद्दल मायेचे आवर्त पसरत होते व जितूही त्यांत गुरफटला जात होता.
त्या दोघांत प्रेमाचा एक बंध आधीच निर्माण झाला होता.
त्याची पत्नी ओरडली, “काय घेऊन आलायत तुम्ही ?”
जितूला मेनका भीतीने त्याला बिलगलेली जाणवले.
तो कांहीच बोलला नाही पण त्याने पत्नीकडे अजीजीने पाहिले व त्याची नजर म्हणत होती, “सगळं सांगणार, थांब जरा आणि नरमाईने बोल.”
जितूची पत्नी राग आणि आश्चर्य ह्यांनी भडकून उठली होती.
ती म्हणाली, “तुम्ही त्या आजारी मुलीला तर घरी घेऊन आला नाहीत ना ?”
जितू म्हणाला, “केव्हां केव्हा स्त्रियांचे हृदय जास्तच कठोर होते.”
नेहमी जितू तिच्या तोंडी लागत नसे.
ती जेव्हां एखाद्या विषयावर चिडून बोलू लागे, तेव्हा तो निश्चयाने अगदी गप्प राही किंवा दुसरीकडे जाई.
जेव्हा आता त्याने गंभीर स्वरांत ठणकावून सुनावले, तें ऐकून व त्याच्या डोळ्यांतील दृढ निश्चय पाहून तिला थोडे आश्चर्यच वाटले.
ती म्हणाली, “स्त्रीहृदय पुरूषाच्या हृदयाच्या निम्म्यानेही कठोर नसते.”
जितूला लक्षात आले की त्याचा निश्चयीपणा तिने ओळखलाय व ती त्याने प्रभावित झालीय.
तो लागलीच थोड्या कडक आवाजांत म्हणाला, “कांही असो पण तिथे जमलेल्या साऱ्या स्त्रिया ह्या अश्राप मुलीकडे पाठ फिरवून एकेक करून हिला एकटीलाच तिथे टाकून निघून गेल्या."
जितूच्या पत्नीने विचारले, “तिचा भाऊ जनार्दन आणि काशी कुठे होते ?”
कामते आपल्या गाडीतून जनार्दनला घेऊन गेले तर जानकीबाई काशीला घेऊन गेल्या पण कोणालाही ही बिचारी आजारी चिमुरडी नको होती.
“तिला अनाथाश्रमांत पाठवा” असाच धोशा लावला होता सर्वांनी.”
“मग कां जाऊ दिलं नाहीत तिला ?
इथे कशाला घेऊन आलात ?” बायको ओरडली.
तो शांतपणे म्हणाला, “ती स्वतः चालत अनाथाश्रमात जाऊ शकत नाही.
कोणीतरी तिला आपल्या बाहुंनी उचलून अनाथाश्रमापर्यंत न्यायला हवं आणि माझे बाहु तितके बळकट आहेत.”
“मग सरळ तिकडेच कां नाही गेलात ? इथे कां थांबलात ?” तिने विचारले.
जनार्दन म्हणाला, “मी उगाचच जा ये करायला मूर्ख नाही.
आश्रमांत भरती करायला सुध्दा आधी कांही अटी पूर्ण कराव्या लागतात, कागदपत्र जमवावे लागतात.”
त्याचा कांही फार उपयोग झाला नाही.
तिने घाईघाईने विचारले, “मग कधी भेटणार आहात अधिकाऱ्यांना ?”
जितू म्हणाला, “उद्या जाईन त्यांच्या कचेरीत.”
ती म्हणाली, “उद्यावर कां ढकलताय ?
आताच जा आणि परवानगीचे कागदपत्र घेऊन या आणि आजच्या आज आपली सुटका करून घ्या यांतून.”
जितू पुन्हा तिला निश्चयी स्वरांत म्हणाला, "मी अनेकदा संत वाङ्मयात वाचलंय, “जे कां रंजले, गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु जाणावा, देव तेथेंची ओळखावा.”
शिवाय असंही म्हणतात की 'मुलं म्हणजे देवाघरची फुलं.'
गरीबांची सेवा करणाऱ्याला देव नक्कीच त्याचं फळ देतो.
ह्या लहान आईविना पोरीला आपल्याला एक रात्र घरी ठेवायला, तिच्याशी मायेने वागायला जड जाईल कां ?”
बोलता बोलता त्याचा आवाज कातर झाला.
आपल्या डोळ्यात दाटलेलं पाणी पत्नीला दिसू नये म्हणून तो वळला.
त्याच्या पत्नीने उत्तर दिले नाही पण कोमल भावनेने तिच्याही हृदयात हलकेच प्रवेश केला होता.
तो म्हणाला, “प्रिये, तिच्याकडे दयार्द्र दृष्टीने पहा, तिच्याशी प्रेमाने बोल.
तिची मृत आई, तिचं एकाकीपण, तिच्या यातना, तिचं, पुढे वाढून ठेवलेलं, दुःखी आयुष्य याचा विचार कर.”
त्याचे कोमल हृदय, आजवर कधीही तो बोलला नसेल अशी भाषा, त्याच्या मुखांतून पाझरवू लागले.
त्याची पत्नी कांहीच बोलली नाही पण ज्या खोलीत त्याने मेनकाला ठेवलं होती त्या खोलीत ती गेली.
जितू तिच्यामागे गेला नाही.
त्याने तिला मुलीबरोबर एकटं ठेवणंच उचित मानलं.
तो घराजवळच असणाऱ्या आपल्या दुकानांत दैनंदिन कामाला निघून गेला.
तो अगदी संध्याकाळी खूप उशीरापर्यंत खूप काम करत राहिला.
तो जेव्हा घराकडे जाऊ लागला तो प्रथम घरात लागलेल्या दिव्यांनी त्याचे लक्ष वेधून घेतले.
त्याला ते शुभ चिन्ह वाटले.
त्याचा रस्ता तिथूनच दाराकडे जात होता.
खिडकीजवळ आल्यावर त्याला आत डोकावण्याचा मोह टाळतां आला नाही.
मेनका एका लोडाला टेकून बसलेली होती.
तिच्या चेहऱ्यावर दिव्याचा छान उजेड पसरला होता.
त्याची पत्नी बिछान्याच्या बाजूला पण खिडकीकडे पाठ करून बसली होती.
त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता.
समोर दिसणाऱ्या मेनकेच्या चेहऱ्यावरूनच त्याला पत्नीच्या मनांतलं ओळखायचं होतं.
मेनकाचे ओठ अधून मधून हलत होते.
तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ती देत असावी.
तिचा चेहरा अजून दुःखीच होता पण आता चेहऱ्यावर भय किंवा कटुता दिसत नव्हती.
त्याच्या मनावरच दडपण कमी झाले व त्याने नि:श्वास सोडला.
घरात आल्यावर तो लागलीच त्या खोलीत गेला नाही.
तो स्वयंपाकघरांत गेल्याची चाहूल लागताच पत्नी तिथे लगबगीने आली.
जितूने मेनकाचा विषय न काढणे उचित ठरवून ती कशी आहे, हेही त्याने विचारले नाही.
जितूने पत्नीला विचारले, “जेवायला कधी बसायचे ?”
ती म्हणाली, “लगेच थोड्या वेळांतच !”
तिच्या आवाजांत कांहीच विशेष जाणवले नाही.
ती जेवणाच्या तयारीला लागली.
जितूने धुळीने माखलेले हात, तोंड स्वच्छ धुतले व तो बाहेर येऊन मेनकाच्या खोलीत गेला.
मऊ, सफेद बिछान्यातून दोन नाजूक डोळे त्याच्या डोळ्यांना भेटले.
त्या दृष्टीत कृतज्ञता होती, आदर होता, आर्जव होतं, कोमलता होती.
त्याची छाती अभिमानाने फुलली.
त्याचा श्वास किंचित वेगाने होऊ लागला.
तो आता प्रथमच त्या कृश बांध्याच्या छोट्या मुलीकडे दिव्याच्या उजेडांत निरखून पाहू लागला.
तिचा चेहरा मोहक होता आणि बालपणीचा सहज गोडवा तिच्या आजाराला न जुमानतां तिच्या चेहऱ्यावर कायम होता.
“तुझं नाव मेनका आहे ?” त्याने तिचे कोमल हात हातात घेत हळू आवाजात विचारले.
“हो ! जितू मामा.” तिच्या आवाजाने जणू सतारच छेडली.
“तू खूप वर्षे आजारी आहेस कां ?” त्याने विचारले.
“होय ! मामा !” पुन्हा तोच गोड स्वर !
“डॉक्टर येऊन तुला तपासलय त्यांनी ?”
“डॉक्टर येत असत पूर्वी.”
तिच्या आवाजात संयम होता.
“अलिकडे येत नसत कां ?” त्याने विचारले.
“हल्ली येत नसत.”
“तुला कुठे दुखतं कां ?” त्याने चौकशी केली.
“केव्हा, केव्हां दुखतं पण आता नाही.”
“अलिकडे कधी दुखलं होतं ?”
“आज सकाळी माझी बाजू आणि पाठ दुखत होती.
जेव्हां तुम्ही मला उचललं होतं तेव्हां !”
“तुला उचललं, फिरवलं तर दुखतं तुला ?”
“होय मामा !”
“आतां दुखतंय कां कुठे ?”
“नाही मामा.”
“तुझ्या कुशीत दुखतंय आता ?”
“आता नाही दुखतं.”
“दुखतं, तेव्हां खूप त्रास होतो कां ?”
“हो पण ह्या मऊ बिछान्यांत झोपवल्यापासून नाही दुखत.” ती म्हणाली.
“मऊ बिछान्यात बरं वाटतय ?”
“होय, मामा. खूप बरं वाटतय.”
तिच्या मृदू, मुलायम आवाजात समाधान आणि कृतज्ञता दोन्ही मिसळलेली जाणवत होती.
थोड्या वेळाने त्याची पत्नी खोलीत डोकावून म्हणाली, “जेवण तयार आहे.”
जितूने तिच्याकडे पाहिलं मग परत मेनकाकडे पाहिलं.
त्याची पत्नीला काय तें समजलं.
ती म्हणाली, “आपण आटपून घेऊया मग मी आणीन तिला कांहीतरी खायला.”
तिने आपल्या स्वरांत निष्काळजीपणा दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण जितूने तिला खिडकीतून पाहिलं होतं.
त्याला माहिती होतं की ही बेफिकीरी वरवरची आहे.
जेवताना हा विषय निघणार हे जितूला ठाऊक होतं कारण दोघांच्याही विचारात तोच मुख्य विषय होता.
पत्नी कधी बोलतेय, ह्याची तो संयमाने वाट पहात होता पण ती गप्प होती.
तोही मग कांही बोलला नाही.
जेवण संपतां संपतां अचानक पत्नी म्हणाली, “तुम्ही ह्या मुलीचं काय करणार आहांत ?”
आश्चर्य व्यक्त करत जितू म्हणाला, “मला वाटते तिला अनाथाश्रमात सोडून येण्याबद्दल आपलं बोलणं झालंय !”
पत्नी ह्यावर गप्प राहिली.
पुन्हा तो विषय निघाला नाही.
जेवण होतांच पत्नीने दोन चपात्यांना तूप लावलं.
एका ताटलीत चपात्यांबरोबर थोडी भाजी, चटणी व गूळ घेतलं.
ती ताटली व दूधाचा एक कप घेऊन ती मेनकाच्या खोलीत आली.
तिच्या बिछान्यावर एक लहानसं मेज ठेऊन त्यावर तिने ती ताटली ठेवली.
मेनकाला खूप भूक लागली होती.
ती ते खूप आवडीने खाऊ लागली.
तिचा खाण्यातला आनंद लक्षात येऊन जितूच्या पत्नीने विचारले, “चांगलं आहे कां ?”
क्षणभर मेनका खायची थांबली आणि अशा कांही कृतज्ञ निरागस नजरेने तिला उत्तर दिलं की जितूच्या पत्नीच्या हृदयामधील अनेक वर्षे दडपून ठेवलेले वात्सल्य एकदम उचंबळून आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहरीच्या वेळी जेव्हा जितू म्हणाला की मेनकाला अनाथाश्रमांत सोडण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी मिळवण्यासाठी तो आज जाणार आहे, तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, “आपण तिला आणखी एक दोन दिवस आपल्याकडेच ठेवूया.
ती फारच अशक्त आणि असहाय्य आहे".
“पण तुला तिची कामांत खूप अडचण होईल.”
जितू म्हणाला.
पत्नी म्हणाली, “एक दोन दिवस कांही हरकत नाही. मी सांभाळून घेईन. गरीब बिच्चारी !”
जितू अधिकाऱ्यांना त्या दिवशी भेटायला गेला नाही, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही नाही गेला.
नंतर तो कधीच त्यांच्याकडे गेला नाही कारण आठवड्याभरात त्याच्या पत्नीने मेनकाला आपल्या सुरक्षित घरांतून अनाथाश्रमांत पाठवण्याचा विचारच मनांतून काढून टाकला.
त्या आजारी आणि असहाय्य मुलीने जितूच्या घरात आनंद आणि उत्साह आणला.
ते घर अशा आनंदाला दीर्घ काळ मुकलेलं होतं.
ते घर दुःखी होतं कारण जितूच्या पत्नीला प्रेम करायला, काळजी घ्यायला मूल न झाल्याने ती उदास, रागीट, चिडचिडी आणि भांडखोर झाली होती आणि स्वतःचं स्त्रीत्व, मातृत्व हरवून बसली होती.
आता सतत तिच्याकडे कृतज्ञतेने, प्रेमाने, संयमाने पहाणारी ती असहाय्य मुलगी तिच्या हृदयाला जणू अमृत पाजत होती.
त्यामुळे तिने मेनकाला आपल्या हातात तर घेतलेच होते पण हृदयांतही जागा दिली होती.
ते ओझंच तिला प्रिय झालं होतं.
जितूला तर संपूर्ण गांवात त्याच्याइतका भाग्यवान कोणी दिसत नव्हता.
त्याच्या घरात स्वर्गातून प्रत्यक्ष देवदूतच एका आजारी, असहाय्य आणि दयनीय मुलीच्या रूपात आला होता आणि त्याने त्यांचं संपूर्ण घर आनंद व प्रकाश यांनी भरून टाकलं होतं.
-- अरविंद खानोलकर.
मूळ कथा - एंजल इन डीसगाईस
मूळ लेखक - टी. एस. आर्थर (१८०५-१८८५)
अत्यंत मोजक्या शब्दात सांगितलेली पण अत्यंत अर्थपूर्ण अति लघुकथा..
पांडबाच्या छपराच्या भोवताली धूर घोटळत होता.निळ्या रंगात वस्ती गुडूप झाल्ती.वस्तीवर सगळ्या घराच्या चुली पेटल्या होत्या.मसाला भाजल्याचा वास येत होता.काहीतरी गोडधोड ,मसालेदार खाण्याचा बेत सार्या वस्तीचा असावा असे वाटत होते. वस्ती धुंदाळल्यासारखी भासत होती. काळ्या कॅरीबॅगा वार्यानी उडून जात तराडाच्या झाडाला गुतल्या होत्या.येणारा जाणाराच्या नजरा रोखत होत्या.पळापळ वाढली होती.पोर्ही-सोरी लगबगीन इकडं-तिकडं पळत होत्या.गोठयातली जनावरं कावरी-बावरी झाली होती.
रस्ता मात्र झोपलेल्या अजगरासारखा गच्च होता. येणारा-जाणाराची वर्दळ कमीच होती.गावाकडून बगीररोडानं येणारी मोटरसायकल दिसत होती.धुरळा उधळीत येत होती.पँटशर्टातली एकच व्यक्ती गाडीवर होती.मसुबाला वळण घेत ती गाडी नजरेच्या आवाक्यात येत होती.रस्त्यावरच्या बुचाडाजवळ ती थांबली.गाडी स्टँडवर लावून ती व्यक्ती हातात काहीतरी घेऊन येताना वस्तीवरच्या लोकांनी पाहयलं.
"आमचे सर आल्येत..आमचे सर आल्येत" - सदाची पोर्गी वरडत गेली तव्हा कळल.
वस्तीवरची लोक जमा व्हायला लागली.गावाचे मास्तर आल्येत म्हटल्यावर वस्ती जागी झाली.
"या गुरूजी या ." धोतराचा पदर सावरीतच पांडबा पुढं झाला.दोनचार पडल्याले चिपाड उचलून बाजूला करत होता.
''ये पोरी सतरंजी आण. तिकडं लपती कशाला.आज शाळात गेली न्हाय म्हणून आलं दिसतय गुरूजी. त्यान्लाबी लई दट्टया असत्यूय वरून.' पांडबा अंदाज बांधत होता.भीताडाला उभी केलेली बाज आडवी केली.गुरूजी जवळ येत होते.तसे पांडबाची गरबड वाढली होती.तोपर्यंत पोरीन सतरंजी आणून दिली.पांडबान झटकली.बाजावर आणून टाकली.गुरूजीकडे इशारा "बसा गुरूजी बसा.'लई दिसा येण केल वस्तीला.ये पोरी बघतीस काय.पाणी आण की तांब्याभरून.आन् ऐक , तुझ्या मायीला म्हणाव.च्या टाक कप-दोन कप ''- पांडबा समजावत होता.गुरूजीनी कागद काढले .पेन घेतला अन लिहू लागले पांढर्याफट्ट कागदावर सूर्यप्रकाश पडत होता.पांडबाचे डोळे दिपत होते.मिचमिच्या डोळयाने पांडबा गुरूजीकडं पाहू लागला.तसे गुरूजी त्याला म्हणाले.
'तुमचं पुर्ण नाव''
''पांडू नारायण जाधव''
''वय''
''चाळीस-पंचेचाळीस करा''
गुरूजींनी जात न विचारताच तशीच लिहली
''का हो गुरूजी कशाला पाहिजी हे सारं?''
''ते सर्वेंक्षण असतय शासनाच.आपलं लिहून न्याव लागतय.आम्हाला.''
'व्हय का ? असुद्या , असुद्या.'
' किती माण्सयत घरात सगळी. लहान मोठी ?'
'लहानी चार आन् मोठी तीन.'आम्ही दोघं नवरा-बायको आन म्हातारी एक.सात करा.'
'जमीन कितीय ?'
'आता कशाचीय जमीन ?' -पांडबा हतबल झाल्यासारखा झाला होता.
'म्हणजे ?'
' ती पलीकडं तरटीच्या डव्हाकडं सतरा गुंठे होती ती आन् ही तेवीस गुंठे ..'पांडबाने वाक्य मधीच तोडलं.
''एक एक्कर म्हणा की''
''आता कशाची एक एक्कर
मग ?''
''काल दिले ना कागद करून.'
'म्हणजे ! ' गुरूजी कुतूहलाने विचारत होते.
' सगळया वस्तीचा ठराव झाला.त्या सनगराला कारखाना काढायचाय.'
'कसला ?'
'साखर कारखाना काढायचाय म्हणतूय.सहकारी. आम्हाला पाच हजार रूपये एकरानी पैसे दिले. परत खुटागणिक एकजण नवकरीला घितूय म्हणाला.त्याच्या लईमोठया शाळायेत. दूधाच्या डेर्यायत.पेट्रोलचे पंप का फंप काय म्हणतेत त्येय.एकेक पोर्ग चिटाकल तरी बास झालं ना.काय ह्या शेतात ? त्येबी बरडाच . कुसाळबी नीट यायनात. बाजरी कमी आन् कुर्डू वाढलाय नामी अशी गत.ठेवूनतरी काय व्हायचयं. आमच्या त् पाचवीलाच उसतोड आलीय पोरांचतरी कल्याण व्हईल.''
''मंग आता मजूरी करू का ?'- गुरूजी स्वत:च्या गालाला हात लावत बोलेले.
'आम्ही येव मजूर आन त्येव मजूर.पोरांना आरक्षण नाही.शिक्षण नाही.नोकर्या नाहीत.जे पुढं गेले त्ये मागच्याला विचारीत न्हायीत.मरणादारी का तोरणादारी अशी आमची अवस्था.म्हणून सगळयानी चकाट सगळया रजिस्टर्या दिल्या काल.मोकळे खट्ट झाले.''
'न्हाय म्हणजे मला काय यातल करायचय पण सहज विचारतो.कारखान्याच्या नावावर दिल्या का वैयक्तीक मालकाच्या?
"वैयक्तीक दिल्या काही.काही त्याच्या बायकांपोरांच्या नावावर आन काही जणांच्या कारखान्याच्या नावावर...''
'तुमची ?'
''आमची काय , आमची दिली त्याच्या बायकोच्या नावावर''
''व्हय का "
"का काही धोका व्हयील का काय? दोन तीनशे एकर जमीन दिलीय लोकांनी एवढे लोक हैत ना. परत मोठमोठे नेते-पुढारी येणारेत उद्घाटनाला.ती काय कालच बोर्ड लागलाय.तिथं पलीकडं त्ये रचलय ना तिथं. मंत्र्याच्या हातानी भूमीपुजन व्हणारेय."
"बss रं ! म्हण्जी आता ऊसतोडीला जाण्यापेक्षा कारखान्याचा मालकच झालात म्हणायच तुम्ही.काय नाव म्हणालात कारखान्याचं?"
"काहीतरी कर्परा का काय दिलय जणू ."
"इथ नदीच्या नावावर ठेवलयं म्हण.आपून कहयाला हया भानगडीत पडायच.आमचा त्यो भावकीतला पोर्या.पमा. जरा शिकला सवरल्याला.हिंडतू फिरतू इकड तिकडं त्योच पुढं व्हवून करतोय सम्दं."
" पाच हजार एकरानी म्हंजी जरा कमीच भाव झाला न्हाय काय ?"
"हाय कमीच जरा.पण पोर्ग नवकरीला लागलं.त्यालाबी भरावा लागले आस्ते त्ये वाचले ना."
"पुढचंबी पाव्हा लागल ना काहीतरी.म्हातारपणाला व्हणारेय का हयो कुटाळ धंदा.तुम्ही कसं पोर्ह शिकविता रोजाचा पैका घट्ट . परत आठवडयाला सुट्टी. दिवाळीत सुट्टी.उन्हाळयात सुट्टी."
गुरूजींनी रंग ओळखला अन् चर्चा आटोपती घेण्याचा प्रयत्न केला.पांडबा फूल मोसममधी होता. काल खरेदीच्या टायमाला च्याऊ-म्याऊ झाल होत. पुरता भारीला होता.त्यामुळं त्याच्या डोक्यातली हवा काही केल्या उतरत नव्हती. वेळ वाढतोय हे पाहून पांडबान तशी हाक दिली.
" आरं ऊक्काळलाका न्हायी चहा. लवकर आटपा की !" "गुरूजी आता जेवूनच जावा." - बाजावर टेकत गुरूजीला बोलला
"न्हायी अजुन बर्याच घरांना भेटी द्यायच्यात.सर्व्हे लवकर सादर करायचाय.सुमन आली नाही तुमची शाळेत दोन तीन दिवसापासून शाळेत." थोडा वेळ थांबून गुरूजीनी विषय काढलाच.
'हयोच राडा होता ना दोन तीन दिवस.कुणी आता येईल उद्यापासून.'
कधी नव्हे एवढया पांढर्याफट्ट रंगाच्या गाडया वस्तीला धुळ उधळीत येवून गेल्या होत्या.पांढर्या फट्ट कपडयाची पांढरी माणसं कावळ्यासारखे इकडून तिकडं वस्त्यांवर हिंडताना दिसली होती.वातावरण तसं बनवल होतं.गावातले गावपुढारी हाताखाली धरले होते.त्यांना झेड्.पी.,पंचायत समिती,बाजार समित्या,नाहीतर सरपंच सोसायटयाचं गाजर दाखविलं होते.त्ये खूष होते.रात्री -अपरात्री बोलून घेतले होते.काही विरोध करणारे मॅनेज केले होते.रोटी , बोटी अन् नोटाच्या बळावर हे घडत होतं.साखर कारखान्याच काम उद्याच सुरू होतय अस प्रत्येकालाच वाटलं. स्वप्नही पडत होते.वाहनांची वर्दळ वाढणार होती.छोटे-मोठे उद्योग वाढणार होते.सगळे लोक खुशीत दिसत होते.टीका करणारावर गुरकून माघारी बोलत होते. बाया-बापडया , पोर्ह - सोर्ह सगळयांचा एकच विषय होता. कर्परा सहकारी साखर कारखान्याचा .गुरूजींनी चहा घेतला. पांडबानंबी चहाचे घोट घेतले.नरडयाखाली उतरवले.गुरूजींना म्हणयाचं होत मनात क्षणभर विचारही आले.जर साखर कारखाना नाही झाला तर तुमच्या जमीनी परत मिळतील काय ? ही तुमच्या बापजादयाची इस्टेट . तुमची ओळख कुणी हिरावून तर घेणार नाही ना.याचा तुम्हाला काही मेळ आहे का ? तुमचे माणसं हाताशी धरून तुम्हाला दगा-फटका होऊ शकतो.तुम्ही तसा लेखी करार केलाय का पण गुरूजींनी तोंड आवरलं. काही न बोलताच ते निघू लागले. पांडबामात्र गुरूजींच्या धुसर होणार्या पाठमोर्या आकृतीकडे टक लावून पाहत राहीला.मागे वळून गुरूजींनी पुन्हा आठवण करून दिली. "तेवढं मुलीला पाठवा उद्यापासून नियमित शाळेत ."
पांदीच्या बाजून वळणा-वळणाची वाट जाते.केकताडाचे अड्डेच जणू ते.बाजूला त्यांचे अणकुचिदार काटे टोचण्यासाठी टोकत होते .बेशमीचे झाड तर एवढे होते की वाट काढायलासुध्दा जागा नव्हती. अधुनमधून गाजरगवतातून जागा करून जाव लागायच.सगळी रान तणकाटान जुळली होती.मशागती कमी पडायला लागल्या होत्या की काय कोण जाणे ! गुरूजी चालत होते. गाडीजवळ जात होते.चावी चाचपत होते . गाडीवर टांग मारून नाहीसे झाले.समाजाला शिक्षण देणार्या शाळेत.
आज त्या गोष्टीला सात-आठ वर्ष झाले असतील.पांडबा शिर्राच्या बाजारला निघाला होता.मागून पांढरीफट्ट कार हॉर्न वाजवीत येत होती.पांडबा पाठीमाग वळून पाहू लागला. गाडीच्या काचा बंद होत्या.आतला माणूस काही दिसत नव्हता.पण जरा हळूच गाडी आलीय म्हणाल्यावर आपल्या ओळखीचीच कुणाचीतरी गाडी असेल असे त्याला न जाणे वाटलेच.इथून शिर्रापर्यंत लिप्ट मिळाली तर बर होईल असं मनात वाटलं देखील .
आशाळभूतपणे तो गाडीकडे पाहू लागला.
"काय पांडबा कुणीकडं ?"- गाडीची काच खाली घेत आतली व्यक्ती बोलली.
पांडबाला नवल वाटल.गाडीतली माणसं मोठी.श्रीमंत.आपल्या गरीबाला कशाला हाक मारतील.असं मनाशीच पुटपुटला.गाडी अधिकच जवळ आल्यान आतली व्यक्ती टपकळपणे दिसली.
" ओळखल का नाय ? "ती व्यक्ती पांडबाला जवळची वाटत होती.पण विस्मृती झाली की काय म्हणून डोक खाजवलं
"बस बस.बाजाराला जायच वाटतं"
' हूँ ss निघालोय .म्हण्ल होउन जाईन कामात काम.'-पांडबा सांगायला लागला.
"म्हण्जी ?.''
" आज तहेशीलीवर मोर्चा हायी.पण म्या नाय ओळखिल तुम्हाला."
" मी तुमच्या गावात नवकरी केली.बरेच दिवस.प्राथमिक शाळेला नव्हतो का ? सर्वे करायला यायचो.तुमची मुलगी शिकली राव माझ्या हाताखाली."
"व्हय,व्हय आता आलं ध्यानात.हल्ली मला असंच होतय बघा.ध्यानात त् असतय पण ध्यानातबी येत न्हाय. बरं कसे कायेत तुमचे पोर्ह बाळं?'
'बरेयत सगळे.आता बीडलाच गेलोत र्हायाला.पोरांची बी सोय लागती.नोकरीला जायला काय आता गाडी घेतलीय.चार-दोन आमचे जोडीदार सीटावारी आणायचे.डिझेलच भागतय.'
'शाळासाठी गेलात व्हय.'
' हूँ..काय म्हणत होता कसला मोर्चाय. ?'
'काय धोका झाला बघा.'
' म्हण्जी ?'
'साखर कारखान्याच्या मालकांन दिला ना धोका.'
' व्हय का ? मंग..'
'लुबाडली सारी जमीन.नवकर्या गेल्या मातीत.अन् शेर्स गेले मातीत.दिवसा लुटलंय आम्हाला."
"मधी तर उद्घाटन झाल्त त्याचं."
"मस्स झाल्त उद्घाटन.मंत्री-संत्री झाडून सारे पुढारी आल्ते.नरडं ताणूस्तर भाषणं दिल्ती.आठ दिसात काम सुरू करतोत म्हणत सगळ्यांनी मिळून जत्रा केली आमच्या रानांवर अन् दुसरं काय ? उघड्यावर आलोत आम्ही."
"मंग आता काय म्हणतोय तो.कारखाना झाला नाही त् शेतकर्याची जमीन परत द्यावा असा कायदाय."
"स्वत:च्या , बायकापोरांच्या नावावर करून घेतली जमीन त्यानं. नाकब्लीला आलाय आता.द्यायची नाही म्हणतोय.दिवाळं निघालं म्हणतोय.काय करता येतय आता.लुटलं म्हणायचं दिवसा."
"म्हणून मोर्चा काढलाय का काय ?"
"सगळे जमून देणारेयत निवेदन.म्हण्लं आपलं सगळ्याबरोबर र्हावा हजर."
"मधी काहीतरी चाललं व्हतं ना माघारी द्यायचय.माघारी द्यायचय म्हणून."
"आमचा म्होरक्या. चोरांवर मोर झाला. मोर्चा काढायला लावायला त्योच.पैसे खाउन म्यानेज व्हणारा त्योच.आमच्या भांडवलावर त्याची झाली मांडी ओली. लाख -दोन लाख घेतले त्याच्याकडून झाला मिंधा.दिलं सोडून वार्यावर.सगळा खेळच बिघडलाय.."
"व्हय.."
"नितीमत्ताच र्हायली नाही. मधी आमच्या भावकीतल पोर्ग जमिनीसाठी भांडत होत.त्या पोराला त्यांनीच पुढं केल.कोण्त्यातरी समितीवर घेतल.त्येबी येड झालं खुश .जमिनी र्हायल्या की तशाच.कोणत्या धुंदीत वागत्येत लोकं कुणास ठाऊक. धा-पाच प्यायाला दिले की भाळले त्याच्यावर.आजचा मोर्चा तसाच प्रकार व्हायचा."
गुरूजी आता शहरात जावून सर झाले होते.सर गाडी चालवीत होते.मागे कान देउन ऐकत होते.माझ्या समोर हा प्रकार घडला. या गरीब लोकांचे संसार बघता बघता उघड्यावर आले याची त्यांना चुरचूर लागली होती.मनात अनेक विचार येत होते.पण आपण सरकारी नोकर आपल्याला काय करता येतय ? याच्यात नाही तर लढा, उभारला असता.उपोषण केले असते.शेतकर्यांची भाकरी त्यांना मिळवून दिली असती.सारं जीवन कसं साचेबंद झालय याचा विचार केला अन गुरूजी मनातल्या मनात शांत झाले.अस्वस्थता पुन्हा वाढत होती. बाजारकर्यांची वर्दळ वाढली होती.जनावराचे टेंम्पो भरून बाजाराला येत होते.थोडे अंतर कापून गेले की तहसिल येणार होती. स्टेंरीगवर हात फिरवत गुरूजी बोलते झाले.
"पांडबा, तुम्ही लढा तुमची जमीन तुम्हाला परत मिळेल'.सगळे एक्या जागंवर या. कुणी फूटू नका.मोहाला बळी पडू नका.कोर्ट प्रकरण करा.नियमान तरी जमीन परत मिळायलाच पाहिजे."
हे शब्द सरांचे एकले की पांडबाला हायसे वाटले.गुरूंजीवरच्या विश्वासापोटी शब्दावर विश्वास बसला. आपली जमीन नक्की परत मिळेल आपला संघर्ष संपेल.अंधुकशी किनार आशादायी वाटली.पोरांबाळांचा घास तरी त्यांना मिळेल.असं उगीचच वाटून गेल.गाडी पुढे पुढे जात होती.तशी पांडबाला उतरण्याची घाई झाली होती.पण तरी गुरूजीबद्दल काहीतरी बोलाव म्हणून बोलला.
" गुर्जी ,या एकदा गावाकड.पुढच्या महिण्यात हरिनाम सप्ताह गावात.मोठमोठे महाराज येणारेत किर्तनाला.नावाजलेले गायक-वादक सम्दे येणारेत.वर्गणी-फिर्गणी सम्द झालय."
"हो , येईन की मला बर्याच दिवसापासून यावा वाटतय.पण काही निमीत्त नव्हत येईल सप्त्याला.किती किती दिली वर्गणी."
"माणसी हजार दिल्येत."
" व्हय का !"
"परत लाल्याचे पैसे आले होते सरकारचे बँकीत.त्ये सम्द्यांनी सहया-आंगठे करून दिले सप्त्यावाल्याला."
"बरं, मंग तर बरेच जमले असतील."
"हूँ सगळा लाखातच खर्च म्हणायचा"
"परत त्ये कुपनावरचा गहू - तांदूळ कुणीच उचलला नाही.तो तसाच तिकडं वळती केलाय.मोठा सप्ता होणारेय.या बरका तुम्ही, तेवढयाच गाठी-भेटी व्हत्यात."
"बरंय, येईन बरं.किर्तन ऐकेल मंग तर झालं."
पांडबा चर्चा करत होता.तहसिल जवळ येतय का ते पाहत होता.न झालेल्या कारखान्याची जमिनी आता परत मिळती का काय अस झाले होत.स्वप्न डोळ्यासमोर दिसत होते.
" पोर्ह काय करत्येत आता."-गुरूजींनी विषय काढला.
"मोठ जातय बांधकामावर"
"म्हंजी,शिकले न्हायीत का काय पुढं."
" शिकले पण नोकरी काय लागली नाही जातेत आता थापी घेउन .कधी बिगारकाम करत्येत.कधी दुकानावर कामावर जातेत.पोट भरायचे म्हणल्यावर कराव लागतय काहीबी."
"बरं बरं तहसिलजवळ उतरायच ना आता."
"हूँ.बघतो ना कुणी मोर्चेकरी आल्येत का त्ये.आला असला तर तिथच त्यांच्यात थांबतो.ह्यो तिढा काय लवकर सुटन अस वाटत नाही."
तहसिल जवळ आल होतं.गाडी थोडी उताराला लागली.रस्त्यावरच्या खड्डयात आदळली.पण गाडीचे सीट मजबूत होते.मउशार सीटावर माणूस आदळत नव्हत.परत आलेला घाम पार कमी झाल्ता.गा र वाटत होत.एसी चालू केल्यामुळ काचा बंद झाल्या होत्या.काचातून बाहेरच दिसत होतपण आतलं दिसत नव्हतं.न झालेल्या कारखान्याचा बोर्ड मात्र स्वप्नात आल्यासारखा भासत होता.गाडीचं ब्रेक कचकन दाबल गेल.एक दचका घेउन गाडी थांबली.दार उघडल गेलं.पांडबा गाडीतून उतरला.हात जोडून उपकार झाल्यासारखे वाकून निरोप घेतला.गुरूजीची गाडी भुर्रकन निघून गेली.नोकरदार गाडीत अन् शेतीचा मालक उघडयावर अशीच गत झाल्ती.पण त्यांनी तरी आपल्याला लिप्ट दिली.आपली चौकशी केली म्हणून काहीसे दु:ख कमी झाले नसता बाकीचे साले तसेच कट मारून पुढे जातात अनेक प्रश्न मनात उपस्थित होत होते.
हळुहळू माणसं गोळा होत होती.एकमेकांशी चर्चा करत होती पांडबा त्या गर्दीत सामील झाला होता.घोषणा काय द्यायच्या याचा सराव होत होता.उन्मळून पडण्यापेक्षा इथ ताठपणे उभं राहणच बर असं वाटून गेलं.एक दोन नेहमीचेच कार्यकर्ते झगे घालून तयार होते.घोषणांचे फलक आणले गेले.कर्मचारी जिल्हयावरून पांढत्याफट्ट गाडयात येत होते. उतरत होते.आफिसात जात होते.पांडबाला मनात वाटल आपलं काट्ट शिकल असतं तर असच गेल असत हाफीसात.
मोर्चा निघाला.'आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. देणार कशा नाहीत? घेतल्याशिवाय राहणार नाहीत.एक , दोन,तीन,चार...'....परिसर दणाणून गेला होता. निवेदन दिल गेल.तुमच्या भावना मी वरीष्ठांपर्यंत पोहोचवतो.एवढे आश्वासन मिळाले.मागं पोलीस .पुढं पोलीस करत मोर्चा संपन्न झाला.
मोर्चा, निवेदन यातच दिवस गेला. बाजार संपला.पालं उठली. भाजीपाल्यावाले परत गेले.पांडबा भानावर आला. बाजार करायचा तसाच र्हायला. सूर्य डोंगरावर टेकला आता कसला मिळतोय बाजार ? या विचारांन डोक्यात प्रकाश पडला.गुलाल खांदयावर टाकलेले बैल परत जात होते.काही बैलाचे मालक बदलले होते.काहींचे ते तसेच होते काही बैल टेंपोत भरून चालले होते.तर काहींच्या नशीबी पायी चालणे आले होते.वाहनं माघारी घराच्या वडीनं निघाली होती. ही वाहनं निघून गेली की आपल्याला घरी जायला सुध्दा काही मिळणार नाही.पांडबाच्या मनात आले आता घर गाठलेलेच बरे. म्हणून तो रस्त्यावर आला. वाहनाला हात करत होता.पण गच्च भरलेल्या वाहनात पांडबाला कुणीच जागा देईना.
झाकड पडली होती. वाहनांचा उजेड भक्कदिशी पांडबाच्या अंगावर पडायचा.डोळे दिपायचे.भूंगे किलकिले डोळे करून आशाळभूतपणे वाहनांकडे पाहत होता.पण एकही वाहन उभे राहीले नाही.एकतर पांडबाच सीट त्यांना परवडणार नव्हतं.दुसरं म्हणजे त्यांच्याकड जागाच शिल्लक नव्हती.काय कराव ? काय कराव या विचारात पांडबा तसाच तडा-तडा पायी निघाला.घामाघूम होत चालतच होता. घराच्या वडीनं,पोर्ह अन् लेकराबाळांत जाण्यासाठी...
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,जि.बीड-4132449
मो.9421442995
vitthalj5@gmail.com

संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या .
खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. “

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला.
निवांतच्या दरवाजाची बेल वाजली आणि सदूने दार उघडले.
दोन प्रौढ गृहस्थ बाहेर उभे होते.
सदूने त्यांना विचारले, “अपोंटमेंट आहे कां तुमची ?”
सोफ्यावर बसलेले यशवंत हंसले आणि म्हणाले, “सदू पाहुण्यांच स्वागत आपण असं करतो कां ? येऊ दे त्यांना आंत.”
दोघेही आंत आले.
दोघे लांबून प्रवास करून आलेले वाटत होते.
थकलेले दिसत होते.
यशवंत त्यांना म्हणाले, “बसा जरा आराम करा.”
दोघे सोफ्यावर बसले.
Copyright © 2025 | Marathisrushti