नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मी अभ्यासात आणि चित्रकलेत हुशार होतो. माझा चित्रकलेचा छंद पुढे बरेच वर्ष मी लहान मुलांना चित्रे काढून देऊन जोपासला पण नंतर माझ्यातील चित्रकार जगण्याच्या धावपळीत कोठे हरवला ते माझं मलाच कळलं नाही.
नाटक हा एक सांघिक कलाप्रकार आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचा मेळ तर जमून यावा लागतोच, पण त्यांना नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा याची साथही मिळावी लागते. मात्र या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळणारे रंगकर्मी नेहमी पडद्यामागे राहतात. त्यांचे चेहरे फार क्वचित प्रेक्षकांना दिसतात, पण त्यांचे कला कौशल्य, तंत्रावरील हुकूमत नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी निश्चित महत्त्वाची असते. अशाच काही पडद्यामागच्या ठाणेकरांची ही एक झलक.
‘पडद्याला टाळी’ या शब्दप्रयोगाला मराठी नाट्यपरंपरेत काही आगळे महत्त्व आहे. आपल्या नेपथ्याला हमखास दाद घेणाऱ्या नेपथ्यकारांच्या यादीतले ठाणेकर नाव म्हणजे दत्ता चोडणकर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्टचा डिप्लोमा घेतलेले दत्ताभाऊ हे गणपतीच्या सजावटींपासून ते रांगोळी काढण्यापर्यंत अनेक बाबतीत माहीर होते. त्यांना रंगभूमीकडे वळवलं ते नाना कुलकर्णी यांनी. ठाण्याच्या भालचंद्र रणदिवेंशी, लिटल थिएटरच्या सुधा करमरकरांशी, रंगभूषाकार बाबा कदम यांच्याशी दत्ताभाऊंची ओळख झाली आणि मराठी रंगभूमीला नवा नेपथ्यकार गवसला. १९६६ साली ठाण्याच्या नाट्यमन्वंतरने स्पर्धेत सादर केलेल्या ‘आसक्ती कसली मजला’ या नाटकाचे नेपथ्य करून दत्ता चोडणकरांनी आपली कला कारकीर्द सुरू केली. या पदार्पणात त्यांनी पारितोषिक मिळवले. आचार्य अत्रे यांच्या अत्रे थिएटर्ससाठी ‘मी मंत्री झालो’, ‘पराचा कावळा’ या नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले. ‘पराचा कावळा’ मधील चौपाटीच्या नेपथ्याला चोडणकर टाळी घेत. १९६९ मध्ये त्यांनी मधुसूदन कोल्हटकरांच्या ‘हा स्वर्ग सात पावलांचा’ या नाटकाचे अत्यंत आकर्षक नेपथ्य उभारले. ‘झडप’ या नाटकात तर कारागिरीची कमाल दाखवून त्यांनी प्लायवूडची फियाट गाडीच रंगमंचावर आणली होती. नाटकवाल्यांची गरज ओळखून हलक्या वजनाचे, सहज सुटे होणारे, फोल्डिंगचे, सहज जोडता येणारे नेपथ्य बनवण्यात दत्ताभाऊ वाकबगार होते. राज्य नाट्यस्पर्धेपासून ते व्यावसायिक रंगमंचापर्यंत शंभरहून अधिक नाटकांचे नेपथ्य दत्ता चोडणकरांच्या कलेतून साकारले गेले आहे.
नाट्याभिमानीच्या नाटकांचे नेपथ्य करण्यापासून ते मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या चित्ररथाचे नेपथ्य करण्यापर्यंत आपल्या कलाकौशल्याचे चौफेर प्रदर्शन मांडणारा नेपथ्यकार म्हणजे कै. प्रकाश टिपणीस. नाट्याभिमानीच्या ‘का असंच का?’, ‘अर्ध्याच्या शोधात दोन’, ‘पत्यात पत्ता’ या नाटकांचे नेपथ्य अतिशय प्रभावीपणे साकारले ते प्रकाश टिपणीसांच्या कलात्मक कौशल्यामधूनच. गणेश कल्चरल अॅकॅडमीच्या गोपीकृष्ण महोत्सवासाठी टिपणीसांनी १५ वर्षे साकारलेलं नेपथ्य त्यांच्या अभिनव कल्पनांची आणि अप्रतिम कलेची साक्ष देणारं होतं.
राज्य नाट्यस्पर्धा जोरात होती तेव्हा बहुदा प्रत्येक संस्थेचा एक नेपथ्यकार ठरलेला असायचा. म्हणजे ‘मित्रसहयोग’चं नेपथ्य मधुसूदन ताम्हाणे करणार, नंतरच्या काळात अशोक कार्लेकर; तर ‘कलासरगम’साठी विश्वास कणेकर आपले कौशल्य पणाला लावणार असं ठरलेलं असायचं. त्यात स्पर्धेची चुरस असल्याने एकदम ‘आउट ऑफ द बॉक्स’ कल्पना लढवून प्रेक्षकांना आणि परीक्षकांना चकित करण्यावर भर असे. त्यातूनच ‘अश्वमुद्रा’चे सायकलच्या रिम्सचा वापर करून केलेलं नेपथ्य अवतरलं. राहायला ठाण्यात नसूनही ठाण्याच्या नाट्यवर्तुळात मिसळलेलं नाव म्हणजे सुरेश मगरकर. ‘दर्शन दिग्दर्शन’ ‘काजळडोह’, ‘अदृष्टाच्या वाटेवर’ मधील त्यांचं नेपथ्य आजही जाणकारांच्या लक्षात आहे. ‘कॅलिग्युला’तलं रोमन शैलीतले नेपथ्य, ‘अमॅड्युअस मधून युरोपमधलं नेपथ्य, ‘विठ्ठला’त शिडीचे झाड असे वैविध्यपूर्ण नेपथ्य त्यांनी उभारले होते.
नेपथ्यानंतर नाटकाची परिणामकारकता वाढवणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशयोजना. नाटकातील प्रसंगांना उठाव देण्यासाठी, त्यातील भावभावना अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे टाकलेले झोत म्हणजेच प्रकाशयोजना नव्हे बरं. व्यक्तिरेखा लिहिताना आणि ती साकारताना नाटककार, दिग्दर्शक जसा आणि जितका सूक्ष्म विचार करतात, तितकाच सखोल विचार करून प्रकाशझोतांना व्यक्तिरेखेचं स्थान मिळवून देतो तो खरा प्रकाशयोजनाकार. कुमार सोहोनीने केलेली ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ची प्रकाशयोजना, अशोक साठें नी केलेली ‘चक्रावर्त’ची (४८ का ५५ स्पॉट्स?) प्रकाशयोजना अशा काही संस्मरणीय प्रकाशयोजना राज्य नाट्यामुळे ठाणेकारांना पाहायला मिळाल्या. ठाण्याच्या प्रकाशयोजनाकारांची परंपरा पुढे नेणारं आणि व्यावसायिक रंगभूमीला स्थिरावलेलं नाव म्हणजे योगेश जगन्नाथ केळकर. १९९२ पासून योगेश मराठी, हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर प्रकाशयोजना करीत आहे. एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या योगेशने २००३ साली ‘सवाई प्रकाशयोजनाकार’ म्हणून बक्षीस मिळवले होते. २५ पेक्षा अधिक नाटकांची प्रकाशयोजना करणाऱ्या योगेशला राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘दांडेकरांचा सल्ला’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकांसाठी सलग तीन वर्षे पारितोषिक मिळाले आहे. याखेरीज ‘ती आई होती म्हणुनी’, ‘किमयागार’, ‘यंदा कदाचित’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस ३६’, ‘अनधिकृत’, ‘रज्जू’ इ. नाटकांसाठी योगेशने प्रकाशयोजना केली आहे.
नाटकाच्या प्रकृतीनुसार प्रसंगांना उठाव देण्याचे आणि प्रेक्षकांच्या मनात तो भाव जागा करण्याचे काम पार्श्वसंगीतामधून केले जाते. मुळात मराठी रंगभूमीचा उगमच संगीत रंगभूमी म्हणून झाला असल्याने संगीता शिवाय नाटक ही कल्पनाच प्रेक्षकांना रुचत नाही. ठाण्याच्या नाट्यवर्तुळात रेकॉर्डेड पार्श्वसंगीताची मिरास सांभाळली ती प्रभाकर साठे यांनी. पोलिसांच्या सायरनपासून ते वारकऱ्यांच्या नामघोषापर्यंत आणि कोंबड्यांच्या आरवण्यापासून ते हृदयाच्या ठोक्यापर्यंत कोणताही आवाज हमखास मिळायचा तो प्रभाकर साठेंच्या ‘स्टॉक’मध्ये. पाषष्ठपासून पार्श्वसंगीताची जबाबदारी पेलणाऱ्या प्रभाकर साठें चा ‘मिनी स्टुडिओ’ हा ठाण्यातला पहिला स्टुडिओ मानला जातो. राज्य नाट्यच्या नाटकांसाठी हौशी नाट्यसंस्थांना नेहमीच सवलतीच्या दरात (क्वचित चकटफू देखील) म्युझिक देणाऱ्या प्रभाकर साठें नी ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘एक दिवस अचानक’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘अबोल झाली सतार’, या व्यावसायिक नाटकांची रंगतही पार्श्वसंगीताने वाढवली होती. ऑस्ट्रेलियातून आलेल्या ‘टिक टू’ या पपेट शो साठी पार्श्वसंगीत देण्यापासून ते प्रजासत्ताकदिनाच्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला पार्श्वसंगीत देण्यापर्यंत साठेंनी चौफेर कामगिरी बजावली आहे. नाटकांसाठी म्युझिक अरेंजर म्हणून सुरुवात करून,
आज मराठी चित्रपटांसाठी साउंड डिझायनर म्हणून काम करणारा रंगकर्मी म्हणजे अभिजीत केंडे. यदाकदाचित, जाणून बुजून, हलकं फुलकं या नाटकांसाठी म्युझिक अरेंजमेंट करणाऱ्या अभिजीतने ‘गोजिरी’, ‘तुला शिकविन चांगलाच धडा’, ‘शर्यत’, ‘ती रात्र’ इ. चित्रपटांसाठी साउंड इंजिनीयर म्हणून काम करून पारितोषिके मिळवली आहेत.‘रंगायतन महोत्सव’ एकांकिका स्पर्धेच्या संयोजनात अभिजितचा पुढाकार असतो. नंतर प्रफुल्ल आठवले, विष्णू आव्हाड, रोहित प्रधान, केनिथ डिसोझा यांचे ध्वनिमुद्रणाचे स्टुडिओ ठाण्यात सुरू झाले.
नाटक म्हणजे एक आभासी वास्तव, जे नाही ते आहे असं भासवणाऱ्याचा खेळ. हा खेळ हुबेहूब वठवायचा तर रंगभूषा अर्थात मेकअप करायलाच हवा. ठाण्याच्या नाट्यवर्तुळात मेकअपच्या संदर्भात सर्वात जुने नाव म्हणजे राजाभाऊ गद्रे. गणेशोत्सवातल्या नाटकांपासून ते व्यावसायिक नाट्यप्रयोगांपर्यंत राजाभाऊंनी शेकडो कलाकारांची रंगभूषा जाणकारीने केली. ठाण्याच्या नाट्यवर्तुळातील तीन पिढ्या राजाभाऊंनी रंगवल्या असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
राजाभाऊंकडून ‘मेकअप’चे धडे घेतलेले दीपक लाड गेली ३१ वर्षे रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदिरमध्ये शिकत असतानाच गॅदरिंगच्या कार्यक्रमांसाठी दीपक मुला-मुलींचा मेकअप करू लागला. राजा भाऊंप्रमाणेच अशोक पांगम, बाबा वर्दम, नाना जोगळेकर, कृष्णा बोरकर या मान्यवर रंगभूषाकारांचे मार्गदर्शन दीपकला लाभले आहे. कलासरगम, मित्रसहयोग, नाट्य परिषद ठाणे शाखा, सावित्री कला केंद्र, माता अनुसया, चंद्रकला अशा विविध संस्थांच्या नाट्य प्रयोगांची रंगभूषा दीपक लाड यांनी साकारली आहे.
रंगभूषेप्रमाणेच वेशभूषाही महत्त्वाची असते. सर्वसाधारण हौशी नाट्यसंस्थेत वेशभूषेची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवलेली नसते, तर बहुतेक वेळा तालमीत होणाऱ्या चर्चांमधून वेशभूषा कशी असावी हे ठरते आणि मग ती जमवायला सुरुवात होते. ‘पीरिएड प्ले’ करताना नाटकाचा नेमका काळ कोणता, त्या काळात पुरुषांचे कपडे कसे असत, महिला काय परिधान करीत, पायात पादत्राणे असायची का? डोक्यावर काय असायचे? अशा गोष्टींचा बारकाईने विचार करून वेशभूषा नक्की व्हायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वेशभूषेची सवय कलाकारांना व्हावी म्हणून तालमीपासूनच ते कपडे अंगावर चढवले जायचे. अर्थात इतकं करूनही ऐनवेळी रंगमंचावर धोतराचा काष्टा सुटणं, डोक्यावरचा शिरपेच पडणं, पायघोळ अंगरख्यामुळे धडपडणं हे प्रकार व्हायचेच. या ‘नाटकातल्या नाटकामुळे’ प्रेक्षकांची करमणूक व्हायची ती निराळीच.
कोणताही नाट्यप्रयोग सुरळीत, सुविहीत होण्यासाठी गरज लागते ती ‘बॅक स्टेज कामगारांची.’ हौशी नाट्यसंस्थांमध्ये या पडद्यामागच्या कामगारांची कमी नसते. ज्या कुणाला नाटकात रोल मिळालेला नाही, तो बॅक स्टेजला, हा तर अलिखित नियमच. पण नाटकात भूमिका करणारे कलाकारही प्रसंगी लेव्हल्स ओढण्यापासून ते नेपथ्याची मांडणी करण्यापर्यंत कोणतेही काम मनापासून करत असत. आता काही वेळा उत्साहाच्या भरात बॅक स्टेजवाल्यांकडून (चुकून) विंगेतली प्रॉपर्टी उचलण्याचा किंवा सेटवर नको तो बदल करण्याचा प्रमाद घडायचा; पण नाटक म्हटलं की हे सगळं आलंच. असो.
ठाण्याच्या रंगपरंपरेत नवे रंग भरणाऱ्या पण अनेकदा प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष समोर न येणाऱ्या रंगकर्मींची आठवण जागी करण्याचा हा प्रयत्न. कदाचित यात काहीजणांची नावे निसटली असतील तर क्षमस्व!
सेंट जॉनमध्ये आम्ही रहात असलेल्या इमारतीत, सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे मराठी युवक आता आमचे मित्र बनले होते. एक भाषा, एक देश या नात्याने विदेशातली आमची ओळख घट्ट बनली होती. न कळत आपलेपणा निर्माण झाला होता. आम्ही दिवसभर पर्यटन स्थळाना भेटी देऊन यायचो नि ते ऑफिसची आपली ड्युटी संपवून घरी परतायचे. मग रात्री चर्चेचा तास रंगायचा. कुठे गेलो होतो ? काय, काय पाहिले? कसे आहे.... ? बरीच चर्चा रंगायची. एक दिवस त्यांनी मिस्कीलपणे हसत सहज विचारले,
‘थ्री सिस्टर्स' पाहिलात का ?'
त्यांच्या बोलण्यातील मिस्किलपणामुळे मी कांहीसा गोंधळलो. त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला नाही. मात्र त्यामुळे मनाला उत्कंठा लागली. म्हणून मीच विचारले,
‘थ्री सिस्टर्स !' ....... काय भानगड आहे ?
‘भानगडबिनगड कांही नाही, बंदराशेजारी हा एक पॉईंट आहे. पहा आणि जाणून घ्या'
सेंट जॉन नदीवरील भव्य पूल पार करून बंदराशेजारील नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आम्ही सलग दोन दिवस फेरफटका मारला होता. पण ‘थ्री सिस्टर्स’ पॉईंट आमच्या निदर्शनास आला नव्हता. त्यांच्या मिस्कील बोलण्यामुळे ‘थ्री सिस्टर्स' भानगड जाणून घेण्याची ओढ लागली. संतोषीला याबाबत विचारले त्यावर ‘आपण तिथे उद्या जाऊ' असे ती म्हणाली.
दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलोही. प्रिन्स विल्यम स्ट्रीट रस्त्याच्या शेवटच्या टोकावर एका उंचवट्यावर हे ठिकाण आहे. इथून दूरवर पसरलेला फंडीचा उपसागर स्पष्ट दिसतो. सेंट पेट्रीक स्क्वेअरच्या शेजारी एका खांबावर तीन लाल दिवे दाखवित संतोषी म्हणाली,
‘याच त्या थ्री सिस्टर्स ........!'
‘लाल दिवे ....... थ्री सिस्टर्स .....' कांहीच अर्थबोध होत नव्हता. मी गोंधळून तिला प्रश्न केला.
‘हे तर तीन लाल दिवे, यात एवढे काय आहे ?' माझी कन्या विचारी नि तेवढीच भाऊकही आहे. ती म्हणाली,
‘पप्पा, तुम्ही शिक्षक आहात. त्या तीन दिव्यांच्या मागे कांही इतिहास असू शकतो; तो जाणून घ्या. लाल दिव्यांच्या शेजारी असलेली माहिती वाचा म्हणजे लक्षात येईल.'
गोष्ट दिसायला साधी असली तरी त्याच्या मागे दडलेला इतिहास कांही वेळा मोठा असतो. तो जाणून घेतल्यानंतर त्यामागच्या लोकांच्या भावना नि त्याचे महत्व समजून येते. या तीन लाल दिव्यांच्यामागे अशीच एक कथा आहे. ‘थ्री सिस्टर्स' (तीन बहिणीं) .... नावावरून कोणा तीन बहिणीची यामागे कथा असावी हे समजण्यास वेळ लागला नाही. तीन दिवे हे त्या तीन बहिणींचे जणू प्रतिकच आहे.
दिव्याच्या रुपात या तीन बहिणी शेकडो वर्षे उभा आहेत. महासागरत वादळ, वाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना दिशा दाखविण्याचे काम करीत आहेत. पर्यटन स्थळ म्हणून पहाण्यासरखे इथे विशेष कांही दिसणार नाही, परंतु एक स्मारक म्हणून त्याचे संवर्धन करण्यामागची भावना व उद्देश मला महत्वाचा वाटला.
मी तीन लाल दिव्यांच्या स्तंभाशेजारी गेलो. स्तंभावर असलेल्या तीन दिव्यांकडे निरखून पाहिले. पण केवळ दिवे पाहून कांही उमजण्या सारखे नव्हते. शेजारीच एक माहिती फलक दिसला. स्वाभाविक ओढीने मी फलकाशेजारी गेलो. तेवढ्याच उत्कंठेने त्यावर लिहिलेली कथा वाचली. इंग्रजी नि प्रेंचमध्ये कथा अगदीच थोडक्यात लिहिली होती. मी पुन्हा, पुन्हा ती वाचली नि जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती सत्य कथा कि दंत कथा हे सांगता येणार नाही; मात्र त्या मागचा उद्देश समाज प्रबोधनाचा होता नि आहे, हे लक्षात आले.
रात्रीची वेळ. तीन बहिणी महासागराच्या किनाऱ्यावर उभ्या होत्या. समुद्रात गेलेल्या आपल्या प्रियकरांची त्या आतुरतेने वाट पहात होत्या. एव्हाना सर्वत्र गडद आंधार दाचला. सोसाट्याचा वारा सुरू झाला. उफाळलेल्या वादळाबरोबर समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या लाटांचा भयंकर आवाज, त्यांच्या काळजाचा थरकाप उडवून द्यायचा. त्यामुळे त्यांच्या मनात भितीचे वादळ घोंघाऊ लागले. त्या दीनवाने आपल्या प्रियकरांना हाका मारू लागल्या. अन्न-पाण्याविना त्यांच्या प्रतीक्षेत त्यांनी संपूर्ण रात्र कडाक्याच्या थंडीत जागून काढली.
समुद्रात गेलेल्या त्यांच्या प्रियकरांचे पुढे काय झाले, याचा कुठे स्पष्ट उल्लेख आढळला नाही. परंतु त्या काळात समुद्रात जाणे किती धोक्याचे होते. पाठिमागे तुमचे लोक तुमची आतुरतेने वाट पहात आहेत, वेळेत नि सुखरुप परत या हाच संदेश देण्याचा या कथेमागे उद्देश आहे हे निश्चित. हे तीन दिवे म्हणजे त्या तीन बहिणींचे प्रतिक आहे.
या दंत कथेत वास्तविक अंश असू शकतो. परंतु आज या लाल दिव्यांचा दिशा दर्शक म्हणून वापर होत आहे. बंदराकडे येणाऱ्या जहाजाना रात्रीच्या अंधारात योग्य मार्ग दाखविण्याचे काम हे दिवे करतात. किनाऱ्यापासून तीन मैल दूर समुद्रात असलेल्या खलाशांना हे दिवे दिसतात. तिन्ही दिवे दिसल्यास आपण योग्य दिशेने जात असल्याची त्यांना खात्री होते. परंतु केवळ दोन किंवा एकच दिवा त्यांच्या दृष्टीस पडल्यास आपल्या मार्गक्रमणाची दिशा चुकल्याचे त्यांच्या निदर्शनास येते व ते योग्य दिशेला आपले जहाज वळवितात.
थ्री सिस्टर्स लॅंपच्या जागी 1842 मध्ये एका खांबावर एकच तेलाचा दिवा लावण्यात आला होता. पुढे 1847 मध्ये सेंटजॉन गॅस कंपनीने नाविकांना दिशादर्शक म्हणून त्याच ठिकाणी एक गॅसचा दिवा उभा केला. एका पायलट बोटमध्ये प्राण गमविलेल्या खलाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेंटजॉन आयर्न वर्क्सने 1967 मध्ये त्याचे तीन दिव्यांमध्ये रुपांतर केले. आज समुद्रातून प्रवास करणाऱ्या खलाशांना या ‘थ्री सिस्टर्स' (तीन दिवे) वरदान ठरले आहेत. समुद्र सपाटीपासून 42 फूट उंचीवर हे दिवे आहेत. या आधी पाहिलेले लाईट हाऊस आणि थ्री सिस्टर्स दिव्यांच्या उभारणीचा उद्देश दूरवर सहसागरात गेलेल्या लोकांना दिशा दाखविणे हाच आहे.
-- मनोहर (बी. बी. देसाई)
एक न्यायमूर्ती होते. अतिशय निःस्पृह व कर्तव्यकठोर म्हणून त्यांची ख्याती होती. खुनाचा आरोप सिद्ध झालेल्या प्रत्येक खुन्याला कोणीतीही दयामाया न दाखविता त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. कोणताही खून खटला त्यांच्या न्यायालयात असला की, आरोपीला फाशी होणारच हे जवळजवळ निश्चित झालेले असायचे.
आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती घरातही तसेच वागायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लहानपणापासून प्रेम मिळाले नाही. त्यामुळे तरुणपणी मुलगा वाईट संगतीने बिघडला. त्याच्याच हातून एकाचा खून झाला व तो खटला चालविण्यासाठी नेमका याच न्यायमूर्ती समोर आला.
एरवी प्रत्येक खुन्याला फाशी देणारे हे न्यायमूर्ती समोर आपला मुलगा आरोपी असल्याचे पाहून कचरले. त्यांची कर्तव्यकठोरता कमी झाली. त्यांचे मुलाविषयीचे ' ममत्व' एकदम जागे झाले. त्यामुळे न्यायदान करताना ते आता बुद्धिवादाची भाषा बोलू लागले.
सध्याच्या काळात फाशीची शिक्षा अमानुष आहे. एकाने दुसऱ्याचा जीव घेतला म्हणून त्याचा पुन्हा आपण जीव घ्यायचा का? अशी भाषा त्यांनी सुरू केली. मात्र मुलानेच त्यांना अडविले. तो म्हणाला, ''माझ्यावरील ममत्वामुळे तुम्ही आता हे बोलत आहात. मात्र खुनाचा गुन्हा मला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही मला फाशी दिलीच तरच ती योग्य होईल व तुमच्याही न्यायदानास 'कलंक' लागणार नाही.
मात्र न्यायमूर्तीना आपल्या मुलाकडून घडलेल्या अपकृत्यात आपणही थोडेफार वाटेकरी आहोत, असे वाटू लागले. त्यांना उपरती झाली, परंतु आता खूप उशीर झाला होता.
आपल्या हातून या खटल्याचा योग्य निकाल लागणार नाही हे ओळखून त्यांनी हा खटला दुसऱ्या न्यायमूर्तीकडे चालवावा, अशी शिफारस केली व आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते न्यायालयातून बाहेर पडले.
आपण आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात आहोत, मात्र सहवासात नाही.कधी मनसोक्त बोलणं नाही, चर्चा नाही. आपण सारेच ‘स्वमग्न’ झालो आहोत. फक्त स्वतःचाच विचार!
ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली.
विजय ! म्हणजे तुझा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही ? यामिनीने विचारलेल्या या प्रश्नात जोर होता. त्यावर विजय म्हणाला, ‘ लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही असं मी म्हणालो तर तू म्हणशील अरे लग्नसंस्था नसती तर तुझा जन्मच झाला नसता हा आता तू जो विचार करतोयस तो वेचार करायला ! पण मी स्पष्टच सांगतो ! कुत्री मांजरे कुठे लग्न करतात तरी त्यांचा वंश वाढतो ना ? आमचा वंश वाढवा म्हणून आम्ही लग्न करतो ! अरे पण वाढलेला वंश पाहायला असतो कोण ? तसही म्हणतात की प्रत्येकाचा वंश दहा पिढ्या झाल्या की संपतो. तुला सांगतो कालच मला माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान असणारा मित्र भेटला होता समाजाच्या नजरेत अंत्यत साधा भोळा भोळसट पण त्याने जे जे उकिरडे फुकले आहेत त्याबद्दल ऐकून मला पेलाभर पाण्यात डुबून मरावस वाटत होत. प्रत्येक आईवडिलांच्या नजरेत आपली मुलं धुतल्या तांदळाची असतात पण ती तशी असतातच असं नाही, आजचे आई- वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवत नसतात तर फक्त नगाला नग जुळवू पहात असतात. त्यातही अज्ञानामुळे चुकीचे नग जुळवितात.
कुसुमाग्रजांचे शब्द लागूंच्या वाणीतून कृतार्थ झाले. त्यांच्यानंतर दत्ता भट /यशवंत दत्त यांनी साकार केलेले नटसम्राटही मला भावून गेले. पण लागूंचे interpretation आणि सादरीकरण केवळ ! त्यांच्या “लमाण” ने थरारून सोडले. Athlete/Philosopher ही स्वतःबद्दलची ओळख किती वेगळी ! “मी तो हमाल भारवाही” ही विनम्र भूमिका मांडणारा आणि अखेरपर्यंत जगणारा हा कलावंत !
जंगली भागात, पहाड-पर्वतामध्ये एक छोटेसे पिवळ्या रंगाचे फूल दिसून येते. टेहरी, गढवाल मधील लोक त्या फुलाला ‘प्ली’ म्हणून ओळखतात. तिकडील लोकांमध्ये या फुलासंबंधी एक लोककथा आहे
दुसऱ्या महायुद्धातल्या ‘ ज्युडी’च्या अनेक कामगि-या कल्पनेपलिकडच्या आहेत ….. तिने असंख्य लोकांचे प्राण रक्षण करायला मदत केली. अनेक जहाजांना बुडण्यापासून वाचवले… तिची कामगिरी इतकी मोठी की दुसरया महायुद्धातली एक हिरो ठरली. एच.एम.एस. ग्नट (HMS Gnat) आणि एच.एम.एस. ग्रासहॉपर या दोन जहाजांची ती शुभशकुन करणारी देवताच होती.
Copyright © 2025 | Marathisrushti