नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

बद्रीनाथपासून साधारण ३ कि.मी. अंतरावर मूर्तीमातेचे मंदीर आहे. सहस्रकवच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी नर-नारायणाच्या रूपात मूर्तीमातेच्या उदरात प्रवेश केला व भूतलावर प्रगट झाले. त्यामुळे मूर्तीमाता बद्रीनाथाची आई समजून तिची पूजा केली जाते. मूर्तीमातेच्या मंदिराला माता मंदीर म्हणतात. वामन द्वादशीच्या दिवशी बद्रीनाथाची व मातेची भेट घडवून आणली जाते. शृंगारलेली बद्रीनाथाची चांदीची चतुर्भूज उत्सवमूर्ती वाजत गाजत या ठिकाणी आणली जाते. मोठा उत्सव होतो. प्रसाद शिजवला जातो. संपूर्ण दिवस बद्रीनाथ आपल्या मातेच्या सहवासात असतात. या दिवशी बद्रीनाथाचे मंदीर बंद असते.
माता मंदिरापासून २-३ कि.मी. अंतरावर 'माना' हे छोटेखानी गाव आहे. प्राचीन काळी या गावाचे नाव 'मणिभद्र' असे होते. मणिभद्र या नावाचा एक यक्ष या ठिकाणी रहात होता व त्याच्या नावावरून हे गाव ओळखले जाते, असे या भागातील हे शेवटचे गाव! हे साडेदहा हजार फूट उंचीवरील गाव एके काळी भारत-तिबेट या मधील व्यापार केंद्र होते. माना गावापुढे कोणतेही गाव किंवा वस्ती नाही. माना मार्गे एकेकाळी प्रवासी/यात्रेकरू तिबेट, कैलास-मानसला जात असत. या गावातील एका चहाच्या दुकानावर दुकानदाराने दुकानाची पाटी 'भारत की आखिर की चाय की दुकान' अशी लिहून माना गावाची ओळख करून दिली आहे. तसेच वास्तवाची कल्पना दिली आहे.
भोटिया जमातीचे लोक या ठिकाणी राहतात. ह्यांच्या एकूण रूपावरून ते मंगोलियन वंशांचे असावेत असे वाटते. सौंदर्य ही या लोकांना मिळालेली दैवी देणगी आहे, असे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटू लागते.
हे स्थान तीन गोष्टींसाठी ओळखले जाते. व्यासगुंफा एका प्रचंड शिलाखंडाखाली ही गुंफा निर्माण झाली आहे. या ठिकाणी महर्षी व्यासांनी वेद-पुराणांची रचना केली असे सांगितले जाते. व्यास गुंफेच्या जवळच गणेश गुंफा आहे. या ठिकाणी महर्षी व्यासांनी महाभारत सांगितले व ते श्रीगणेशाने लिहून घेतले असे सांगितले जाते. जवळच, मुचकुंद गुहा आहे. पुढे साधारण अर्धा कि.मी. अंतरावर भीम पूल आहे.
स्वर्गारोहणासाठी पांडव पुढे जात होते त्यावेळी सरस्वती नदीच्या एका मोठ्या घळीने त्यांचा मार्ग अडवला. तेव्हा भीमाने एक प्रचंड शीळा या घळीवर ठेवली व मार्ग मोकळा केला. या शिळेलाच भीमपूल म्हणतात. साधारण १०-१२ फूट लांब व ३-४ फूट रुंद अशी ही शिळा आहे. या ठिकाणी निसर्गाचे एक रौद्र स्वरूप पहायला मिळते. घळीतून प्रचंड आवाज करत वेगाने वाहणारा सरस्वती नदीचा प्रवाह पहाणे मनात भिती उत्पन्न करतो. ह्या निसर्ग निर्मित पुलावरून निसर्गाचे हे रौद्र सौंदर्य अनुभवणे हा एक विलक्षण अनुभव आहे. पुलाच्या एका टोकाला भीमाचे एक छोटेसे मंदीर आहे. या घळीत वाहणारी सरस्वती नदी पुढे थोड्याच अंतरावर अलकनंदेला मिळते. या संगमस्थानाला 'केशव प्रयाग' म्हणतात.
मानापासून साधारण ३ कि.मी. अंतरावर 'वसुधारा प्रपात' आहे. साधारण ४०० फूट उंचीच्या कड्यावरून जमिनीकडे झेपावणारी जलधारा या परिसरातील निसर्गाचं सौंदर्य खुलवून टाकते. अष्टवसूंनी ह्या जलधारांच्या कुशीत तपोसाधना केली होती अशी श्रद्धा आहे. महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व भीष्माचार्य या अष्टवसूंपैकी एक! वसुधारेपासून ३-४ कि.मी. अंतरावर 'लक्ष्मीवन' आहे. ही लक्ष्मीदेवीची तपोभूमी. हीच वाट पुढे सतोपंथ सरोवराकडे जाते. सतोपंथ सरोवर हे अलकनंदा नदीचे उगमस्थान. या परिसरातून स्वर्गरोहिणी पर्वतशृंखलेचे सुंदर दर्शन होते.असे सांगतात की पांडवांनी आपला शेवटचा प्रवास या मार्गाने केला होता.
हा सर्व मार्ग अतिशय रमणीय आहे. अनेक पौराणिक घटना या मार्गाशी निगडित आहेत. पण माना नंतर या वाटेवर कोणत्याही प्रवासी सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे अनुभवी मार्गदर्शक व किमान ५-६ दिवस पुरेल एवढी अन्नसामुग्री व इतर व्यवस्था बरोबर घेणे आवश्यक आहे. ही सर्व वाट अतीउंचीवरची आहे. हवामानात व वातावरणात होणारे बदल लक्षात घेऊन आवश्यक सामुग्री जवळ असणे आवश्यक आहे व मानसिक तयारी पण हवी.
बद्रीनाथ मंदिराच्या मागे पर्वतात 'चरण पादुका' म्हणून एक स्थान आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी डोंगरात ५००-६०० फूट चढून जावे लागते. या ठिकाणी एका शिलाखंडावर पादुका सारखे चिन्ह आहे. हे चिन्ह श्रीविष्णूंच्या पादुकांचे आहे, या श्रद्धेने भाविक या ठिकाणी येतात. या ठिकाणाहून 'निळकंठ' या हिमाच्छादित पर्वतशिखराचे तसेच बद्रीधामाचे फार सुंदर दर्शन होते.
बद्रीधाम जवळ बामणी नावाचे गाव आहे. या गावात उर्वशी मंदिर आहे. उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील अप्सरा! नर-नारायण तप करत असताना त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने तिला पाठवले. पण नर-नारायणांनी आपल्या योगबलाने उर्वशीच्या कामशक्तीचे आत्मशक्तीत रूपांतर करून इंद्राचे गर्वहरण केले, अशी आख्यायिका सांगतात. या मंदिरात उर्वशी श्रीविष्णूंच्या मांडीवर बसलेली आहे असे रूप दाखवणारी श्रीविष्णूंची मूर्ती आहे. ही मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे.
हिमालयात जागोजागी शिवस्थाने आहेत. असे असताना हे विष्णूस्थान हिमालयात कसे? असा एक प्रश्न पडतो. प्राचीन काळी तिबेटमध्ये अनेक हिंदू श्रद्धास्थाने होती. (तिबेटचे प्राचीन नाव 'त्रिविष्टप') असेच एक स्थान म्हणजे थोलिंगमठ! पण कालांतराने भारत-तिबेटच्या सीमाभागात बौद्ध धर्माचा प्रसार वाढला. त्यामुळे थोलिंगमठचे हे श्रद्धास्थान स्थलांतरित झाले असावे. पण हे का, केव्हा व कसे? याचा तपशिल ज्ञात नाही. पुढे स्थलांतरित भागातही बौद्ध धर्माचा प्रसार वाढला. तेव्हा बद्रिनाथाची मूर्ती गाभाऱ्यातून काढून नारदकुंडात फेकण्यात आली. नवव्या शतकात आद्य शंकराचार्य या ठिकाणी आले होते त्यांनी नारदकुंडातील ही मूर्ती काढून तिची प्रतिष्ठापना केली. मंदिराचा जीर्णोद्धार केला. हिंदू ही मूर्ती भगवान श्रीविष्णूंची मानतात तर बौद्ध लोक गौतम बुद्धाची! जैन लोक ही मूर्ती पहिले तीर्थंकर पारसनाथ किंवा ऋषभदेवाची मानतात. पण बौद्ध, जैन भाविक या ठिकाणी फारच क्वचित येतात.
-प्रकाश लेले
July 25, 2022
तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे?
February 14, 2024
रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणाऱ्या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
June 16, 2014
आरतीचं ताम्हन धरायला जड जाईल असा विचार करणाऱ्या बाबांना आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं देखील जड जाऊ लागलंय. त्यांचा तो जोर वाढत्या वयामुळे कधी ओसरला ते कळलंच नाही.
March 31, 2023
१९५२ सालातील ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांनी स्वतंत्र दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. एकूण २५ वर्षांच्या कालावधीत २५ चित्रपट केले. त्यातील २२ मराठी, २ हिंदी व १ इंग्रजी. मराठी चित्रपटांसाठी मराठी साहित्यातील नामवंत लेखकांच्या कथांना प्राधान्य दिलं.
April 1, 2022
तालमी सुरु झाल्या पण म्हणावी अशी गती येत नव्हती. जसजसा गणेशोत्सव जवळ येऊ लागला. तसतसे वातावरण तापू लागले. शेवटी परीक्षा जवळ आल्या म्हणजे जसं आखलेलं वेळापत्रक बाजूला पडतं आणि दिवस रात्र अभ्यास चालू होतो तसंच झालं. आजपर्यंत हा नाही आला, तो नाही आला अशी टंगळमंगळ चालू होती. ती जाणवू लागली. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते त्यांचा फारसा प्रश्न नव्हता. पण ज्यांचे सहकार्यक्रम होते. त्यांना एकत्र जमणे आवश्यक होते. नाटिका तयार करणाऱ्यांना तर आता एकत्र जमून तालमी करणे गरजेचे होते. आम्हाला आता वेळ कमी पडू लागला. तालमींची वेळ हळूहळू वाढत चालली होती. रात्री सात आठपर्यंत चालणाऱ्या तालमी आता दहा दहा बाराबारा वाजेपर्यंत आटपेनात. आता सगळ्यांनाच एक प्रकारची झिंग चढू लागली होती. अगदी झपाटून गेले होते सगळे.
March 25, 2022
पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून…
आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू…
आता हे बसले तंबाखू मळीत पण पंचायत बायांची झाली. बायाच्या हागणदारीच रस्ताचं ग्रमपंचायती म्होरून जातो.तिथंचं हे मास्तरं उभं टाकलं.बरं लयं उशीर झाला की मग पंचाईतच व्हती बायांची. झावळात उरकून यावं लागतं.नाहीतर सकाळ सकाळ झॅक होऊन बरीचं गडी ग्रमपंचायती म्होरं थांबत्यात. खंडाची खंडाच असतो.उग उग चकाटया पिटीत बसलेला. तसल्या ख॓डयातून जमतं असतं व्हयं कुठं बायाला पोरीला टरमेल घेऊन जायला ? पाच सहा महिने झालं असलं. काळयाची सून अशीचं परसाकडं चालली व्हती.ते पवाराचं येडकोंढूळ माग माग गेलं. हासलं. पवारचं घर तसलं डेंजर..
दहा बारा जणांनी मरणाचं चेचलं.केसी भानगडी झाल्यात.बसलेतं खेटं देत कोर्टात…बाया तरी काय करत्याल ?
April 14, 2017
आज खूप दिवसांनी बेसनाची वडी केली, अगदी सहजच आणि अनाहूतपणे पाय देवघरा कडे वळले, देवाला नैवेद्य दाखवायला. खूपच छोटीशी कृती पण इतकं समाधान देऊन गेली आणि पार भूतकाळात घेऊन गेली.
October 5, 2018
एखाद दिवशी संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाला की मी शिवाजी पार्कच्या कट्टयावर जाऊन बसतो. तिथे माझ्याचसारखी संध्याकाळचा मोकळा वेळ घालविण्यासाठी अनेक मंडळी जमलेली असतात. कुणी कट्टयावर गप्पा छाटत बसलेले असतात, कुणी शिवाजी पार्कला राऊंड मारण्यात दंग असतात, तर कुणी शेंगदाणे, भेळ वगैरे टाईमपास खाण्याचा आस्वाद घेत असतात. हा सर्व माहौल निरखीत कट्टयावर शांत बसून राहणं हा माझा आवडीचा छंद. तासादोनतासांच्या या विरंगुळ्यात माणसांचे अनेकविध नमुने पाहायला मिळतात. पार्कवर फिरायला येणारी ही मंडळी कोण असतील, त्यांची घरची बॅकग्राऊंड काय असेल एवढंच नव्हे तर त्यांचा स्वभाव कसा असेल याचे तर्क लढवीत बसलं की वेळ सहज निघून जातो. हातापायांच्या व्याधींनी त्रस्त मंडळी व्यायामासाठी पार्कला रडतखडत फेऱ्या मारताना पाहिली की आपली तब्येत अजून बऱ्यापैकी ठाकठीक आहे याचं समाधान मिळतं आणि काहींच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव टिपले की आपल्यापुढील समस्या अगदीच किरकोळ असाव्यात याची शाश्वती मिळते. तासाभरानंतर मनाला तरतरी येते आणि आज चांगला विरंगुळा मिळाला याचं समाधान वाटतं. म्हणूनच संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाला की शिवाजी पार्कच्या कट्टयावर जाऊन बसणं मला मनापासून आवडतं.
कट्टयावर वेगवेगळ्या वयोगटांचे ग्रुप्स संध्याकाळचा आनंद लुटण्यात दंग असतात. तरुणांचे ग्रुप्स दंगामस्तीत व्यग्र असतात. कुणी बाईकवरुन जातयेत असतं, कुणी मोबाईलवरील गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरीत असतं तर कुणाचा नुसताच आरडाओरडा सुरु असतो. सळसळणाऱ्या रक्ताच्या या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. अर्थात या तरुणांमध्ये तरुणीही सहभागी झालेल्या असतात. या तरुणींचा उत्साह आणि त्यांची दंगामस्ती तरुणांपेक्षा कांकणभर अधिकच भासते. युवा पिढीचं हे उत्साहाने बागडणं पाहिल्यानंतर मनात नकळत आपल्या मनातील तरुणपणाच्या स्मृती जागृत होतात. आपण कधी आणि कुठे आपल्या मित्रांना भेटत होतो, कुठल्या विषयांवर आपले हास्यविनोद रंगत असत याची उजळणी होते. मन एका वेगळ्याच विश्वात भ्रमंती करु लागतं.
पार्कच्या कट्टयावर बसणाऱ्या वयस्क मंडळींच्या ग्रुप्सचं मला मोठं अप्रूप वाटतं. जीवनातील सर्व खेळी खेळून झाल्यानंतर निवृत्तीचं आयुष्य जगणारी ही मंडळी. या मंडळींचे बोलण्याचे विषय काय असतील, यांच्या कसल्या चर्चा झडत असतील याची मला फार दिवसांपासून उत्सुकता होती. एक दिवस मी मुद्दामहून या मंडळींच्या शेजारीच ठाण मांडून त्यांच्या गप्पा ऐकण्याचं ठरवलं. गुडघेदुखीनं आपल्याला कसं हैराण केलं आहे, सून वेळेवर कधीच चहा देत नाही, असल्या तक्रारींचे सूर आता आपल्याला ऐकायला मिळणार याची मला खात्री होती. मात्र त्यांच्या गप्पा ऐकल्यानंतर मी अक्षरशः चकीत झालो. एक जख्ख म्हातारेसे गृहस्थ चक्क परवीन बाबीने स्यूसाईड का केलं यावर हळहळ व्यक्त करीत होते! जवळ बऱ्यापैकी पैसा अडका असताना परवीन बाबीने आत्महत्या का करावी याचा संभ्रम त्या आजोबांना पडला होता आणि त्यांचा मित्रपरिवारही या चर्चेत उत्साहाने सामील झाला होता! जीवनाचा आनंद आकंठ लुटण्याची त्यांची हौस मला कौतुकास्पद वाटली. केवळ दिवसाचीच नव्हे तर आयुष्याची संध्याकाळही ही मंडळी मजेत जगत होती.
शिवाजी पार्कला राऊंड मारणारी अनेक मंडळी माझ्या आता परिचयाची झाली आहेत. म्हणजे या मंडळींची माझी प्रत्यक्ष ओळख झालेली नाही. मात्र त्यांचे चेहरे मी ओळखतो. चालण्याच्या त्यांच्या लकबी मी मनात टिपल्या आहेत. ही मंडळी दिसली की फारा दिवसानंतर मित्र भेटावा असा आनंद मला होतो. या मंडळींतल्या एका अतिउत्साही म्हाताऱ्याचा पेहराव मला मात्र खटकतो. मांडयांपासून संपूर्ण पाय उघडे टाकणारी आगदी छोटीशी चड्डी, बिनबाह्यांचा बनियन आणि मानेवर लटकणारा पिकलेल्या केसांचा बुचडा अशा विक्षिप्त पेहराव्यात हे गृहस्थ रोज संध्याकाळी शिवाजी पार्कला राऊंड मारण्यासाठी येतात. त्यांना पाहिल्याबरोबर चारचौघात जरा चांगल्या कपडयात वावरत जा असा सल्ला त्यांना द्यावा असा विचार मनात येतो. पण मी उठत नाही. जो पोषाख घालायला त्या सद्गृहस्थाला स्वतःला लाज वाटत नाही, आणि शिवाजी पार्कवर जमलेल्या अन्य कुणालाही त्यांच्या पेहरावाबद्दल काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला काय अधिकार अशी स्वतःची समजूत घालून मी शांत बसून राहतो. कधीकाळी या गृहस्थाची आपली ओळख झाली तर मात्र त्याला खडे बोल सुनवायचे असंही मी मनातल्यामनात ठरवून गप्प राहतो.
शिवाजीपार्कवर संध्याकाळी आणखी हमखास दिसते ती एका मायलेकींची जोडी. यातील लेक बहुधा कॉलेजात वगैरे जात असावी. टी शर्ट आणि जीन्स हा नव्या पिढीचा पेहराव तिने अंगावर चढवलेला असतो. तिची आई तशी साडीतच असते. मात्र गंमत अशी की त्या दोघीत ती आईच अधिक तरुण दिसते! मला राहूनराहून आश्चर्य वाटतं ते याच गोष्टीचं. संसारात विवंचनांना तर सर्वांनाच सामोरं जावं लागतं. या विवंचनांचं जाळं नकळत माणसांच्या चेहऱ्यावर आधी उमटतं. अगदी कितीही सुखवस्तु कुटुंबातील व्यक्ती असली आणि फारशा विवंचना नसल्या तरी वयानुसार चेहऱ्यावर थकवा हा जाणवतोच. मग एका वयात आलेल्या मुलीच्या त्या आईचा चेहरा स्वतःच्या मुलीपेक्षाही अधिक टवटवीत कसा राहतो? शरीर सौष्ठव जपण्याचे कोणते रहस्य त्या स्त्रीला उमगलं असावं? या मायलेकी समोरुन गेल्या की माझ्या मनात हे विचार पिंगा घालू लागतात. अर्थात इथेही मला शांतच बसून राहावं लागतं. त्या मायलेकींशी संवाद साधणं अशक्यच असतं. मायलेकी पुढे निघून गेल्या की मी अन्य मंडळींचे चेहरे निरखू लागतो.
शिवाजी पार्कच्या फेरीवाल्यांना निरखण्यातही माझा बऱ्यापैकी वेळ जातो. रुपया दोन रुपयांचे चणेशेंगदाणे विकणाऱ्या त्या भैयाच्या हाती दिवस अखेरपर्यंत किती मिळकत जमा होत असावी? या अगदीच तुटपुंज्या मिळकतीत तो आपल्या संसाराचा गाडा कसा हाकत असावा? चणेशेंगदाणे विकणाऱ्या भैयाचा हा कदाचित पार्टटाईम बिझिनेस असावा. पण त्या कुल्फीवाल्याचं काय? दिवसा राबराबून बिचारा कुल्फी तयार करत असावा आणि संध्याकाळी ती विकण्यासाठी वणवणत असावा. कसं भागतं या मंडळींचं अशा नगण्य व्यवसायांवर? प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. माझ्या विचारांचं चक्र भरकटतच राहतं.
सूर्य कलला की शिवाजी पार्कच्या शेजारी वसलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवर खाद्यप्रेमी मंडळींची जत्रा जमू लागते. शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव, बर्गर, फ्रॅन्की, बर्फाचे गोळे यावर जिभेचे चोचले पुरविण्यात आनंद मानणारी मंडळी तुटून पडतात. तासदोन तास बसून माझ्याही पायाला रग आलेली असते. मी कट्टयावरून खाली उतरतो. थोडे पाय झटकून चालू लागतो. जाताजाता एखादं आईस्क्रीम मीही विकत घेतो. आईस्क्रीमची मधुर चव जीभेवर रेंगाळते. मनात शिवाजीपार्कचा तो प्रसन्न माहौल रेंगाळतच असतो. पुन्हा कधी मोकळा वेळ मिळाला की कट्टयावर नक्की यायचं असा बेत पक्का करत मी सपासप चालू लागतो. शिवाजीपार्क मागे राहतं. मी माझ्या दैनंदीन व्यापात व्यग्र होतो.
- सुनील रेगे
July 5, 2022

त्या क्रूर राजाच्या रिंगण-मैदानांत ‘सुंदरी की वाघ’ या नांवाने ओळखली जाणारी घटना घडली त्याला एक वर्ष होऊन गेलं होतं. अशा वेळी एका दूरच्या देशांतून पाच जणांचं एक शिष्टमंडळ राजाच्या महाली आलं.
ह्या विद्वान आणि आदरणीय मंडळींचे राजाच्या एका महत्त्वाच्या अधिका-याने स्वागत केलं व त्यांनी त्याला आपल्या तिथे येण्याचा उद्देश सांगितला.
April 17, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti