(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • माझ्या संगीतमय प्रवासाचा श्रीगणेशा

    मी तेव्हा बारा वर्षांचा असेन. मला मेहंदी हसन कोण ते माहित नव्हते. या गाण्याला गजल म्हणतात हे ठाऊक नव्हते. उर्दू भाषेशी माझा दुरूनही संबंध नव्हता. त्यामुळे शब्दांचा अर्थही नीटसा उमगत नव्हता. पण मी वेड्यासारखा ऐकत होतो पुन्हा पुन्हा. मला इतके नक्की जाणवले होते की, या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते हेच. ती संध्याकाळ माझ्या मनावर ‘गझल’ हे नाव कोरून गेली.

  • मजल-दरमजल ६५०

    सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदक अशोक शेवडे यांच्या 'सूर तेच छेडिता' या कार्यक्रमाच्या अनेक प्रयोगात मी गायलो. माझ्याबरोबर मनोज टेंबे, मीनाक्षी गुणाजी, अलोक काटदरे, नीलाक्षी पेंढारकर, पुष्पा पागधरे असे अनेक कलाकार असायचे. निवेदनात अशोकजींच्या बरोबर प्राची देवस्थळी असायच्या. अशोकजींचे किस्से, विनोद आणि इतक्या कलाकारांच्या सहवासामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच मजा यायची. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या समारंभात माझे गाणे झाले. लवकरच मुंबई युनिव्हर्सिटीसाठी मी हिंदी गझलची मैफल आणि त्यावरील चर्चासत्र असा कार्यक्रम केला. हा माझा ६५० वा जाहीर कार्यक्रम होता. धीरे धीरे मगर निश्चित रूपसे माझी 'मुक्काम पोस्ट एक हजार'च्या दिशेने वाटचाल सुरू होती. मंजिल अजूनही बरीच दूर होती. पण गुरुजनांचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद पाठीशी होता. माझी पत्नी प्रियांका आणि दोन्ही मुली शर्वरी आणि केतकी यांचा भावनिक पाठिंबा होता. वादक मित्रांची मोलाची साथ होती आणि अगणित रसिक श्रोत्यांचा आधार होता. त्यामुळे आत्मविश्वास मात्र खूपच वाढला होता.

    गाण्याच्या कार्यक्रमांबरोबरच आमची केमिकल कंपनी व्यवस्थित सुरू होती. दोन नवीन जागा मी विकत घेतल्या होत्या. शेअर मार्केटमध्ये ऑप्शन्स अँड फ्यूचर्स ट्रेडींग सुरू झाले होते. पण त्यात गुंतवणुकीसाठी फक्त आर्थिक कंपन्यांना परवानगी होती. या क्षेत्रात काम करण्यासाठी माझा मित्र उमेश गद्रे याच्याबरोबर मी आर्थिक कंपनी सुरू केली. शेअर बाजार हे काम करण्यासाठी माझे आवडीचे क्षेत्र होते. या नव्या कंपनीमुळे आम्ही आर्थिक उलाढाल बरीच वाढवू शकलो.

    कविवर्य निरंजन उजगरे माझे चांगले मित्र होते. त्यांचा पहिला कवितासंग्रह माझ्या आई-वडिलांनी निशीगंध प्रकाशनतर्फे प्रकाशित केला, तेव्हापासून आमचे जवळचे संबंध होते. माझ्या गाण्याचे ते चाहते होते आणि पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या माझ्या गायनक्षेत्रातील वाटचालीचे ते साक्षीदार होते. काहीतरी निराळे करायचे हा त्यांचा ध्यास होता. संत कबीरांच्या रचनांचा त्यावेळी मी अभ्यास करत होतो. एकदा त्यासंदर्भात आमची चर्चा झाली. निरंजनजी फारच खूष झाले आणि अखिल महाराष्ट्र युवा संमेलनासाठी गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात त्यांनी माझा संत कबीरजींच्या भजनांचा खास कार्यक्रम आयोजित केला. उषा तांबे यांचाही या आयोजनात मोलाचा वाटा होता.

    ६ जानेवारी २००५ रोजी कोकण मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित कला महोत्सवामध्ये मी गझलचा कार्यक्रम सादर केला. दुसऱ्याच दिवशी ७ जानेवारी २००५ रोजी कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या सुरूवातीसाठी लिहिलेले खास स्वागत गीत आणि कोकण गीत मी गायले. जानेवारीतच पुण्याला एक गझलचा जाहीर कार्यक्रम केला. त्सुनामी रिलीफ फंडासाठी ठाण्यातील सर्व कलाकारांनी मिळून एक जाहीर कार्यक्रम केला. हा कार्यक्रम रात्री संपवून दुसऱ्या दिवशी पहाटेच मी औरंगाबादला रवाना झालो. त्या रात्री अखिल भारतीय मराठी गझल संमेलनामध्ये माझा गझलचा कार्यक्रम झाला. मराठी गझलचे नामवंत गायक भीमराव पांचाळे यांची भेट झाली. भीमरावांबरोबर गझलवर चर्चा करणे ही आनंदाची पर्वणी असते. भीमरावांनी एका व्यक्तीशी माझी ओळख करून दिली. ते होते गझलकार दिलीप पांढरपट्टे. काही दिवसांपूर्वीच 'ऋतुरंग संगतीला' या सीडीसाठी मी त्यांची गझल रेकॉर्ड केली होती. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आज होत होती. "ठाण्याला गेल्यावर सावकाशीने भेटू. घरी जेवायलाच या,” दिलीपजी म्हणाले. “आपणही ठाण्यालाच राहता?" मी विचारले. “अहो, मी ठाणे महानगरपालिकेचा डेप्युटी कमिशनर आहे." मी चाटच पडलो. इतक्या मुलायम गझल लिहिणारा हा गझलकार दिवसभर महापालिकेच्या रूक्ष फाईल्स हाताळत असेल, असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.

    व्हीपीएम पॉलिटेक्नीक आयोजित करिअर फेअरसाठी संगणकतज्ञ अच्युत गोडबोले यांच्याबरोबर मला आमंत्रित करण्यात आले. संगणक क्षेत्रातील संधींबाबत अच्युत गोडबोले बोलले आणि साऊंड टेक्नॉलॉजी आणि म्युझिक इंडस्ट्रीतील संधींबाबत मी भाषण केले. भाषण संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गाण्याचा आग्रह केला. तेव्हा एक गाणे त्यांच्यासाठी गायलो. अच्युत गोडबोले गंमतीने म्हणाले, “अनिरुद्ध, तुझं हे बरं आहे की भाषणाचा शेवट तू गाण्याने करू शकतोस. आम्ही काय करायचं?" मी त्यांना म्हणालो, “अहो, तुमचे भाषण इतके परिणामकारक असते की इतर काही करण्याची तुम्हाला गरजच रहात नाही. एक मात्र इथे मी मान्य करतों की गाण्याइतकेच मला भाषण करायला, थोडक्यात बोलायलाही आवडते. गप्पा-संवाद आणि किस्से मला अत्यंत प्रिय आहेत. नातेवाईक आणि विशेषतः मित्रमंडळींबरोबर रात्रभर गप्पा मारणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब असते.

    डॉ. शुभा चिटणीस 'यशवंत' या पुस्तकाचे लिखाण करीत होत्या. त्यासाठी त्या अनेकांच्या मुलाखती घेत होत्या. एक दिवस त्यांनी माझी मुलाखत घेतली. अनेक मान्यवरांच्या मुलाखतींमधून "यशवंत' हे त्यांचे पुस्तक आकार घेत होते. 'परचुरे प्रकाशन मंदिर' या प्रख्यात प्रकाशन संस्थेतर्फे १० एप्रिल २००५ रोजी गडकरी रंगायतन, येथे या पुस्तकाचे भव्य प्रकाशन झाले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अरुण गुजराथी, महापौर राजन विचारे यांच्या उपस्थितीत मी गाणे सादर केले. कारण यशवंत पुस्तकाचा मी एक भाग होतो. गझलगायक अनिरुद्ध जोशी असा माझ्यावरील लेख या पुस्तकात होता. ही गोष्ट माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होती. याबद्दल मी डॉ. शुभा चिटणीस यांचा कायम ऋणी राहीनच. पण अजूनही एका गोष्टीसाठी मी त्यांचा आभारी राहीन. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी मला समाविष्ट केले होते. याच दिवशी 'जगावेगळ्या' या त्यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. त्यासाठी एक खास गाणे संगीतकार विनय राजवाडे यांनी माझ्या आवाजात रेकॉर्ड केले होते. एकूणच हा दिवस मला बरेच काही देऊन गेला.

    -अनिरुद्ध जोशी

  • वेडया कासवाची गोष्ट

    कोणे एके काळी, एका तळ्यांत कंब्रुग्रीव या नावाचा एक कासव रहात होता. कंबुग्रीव म्हणजे कमानदार मानेचा. तर हा कमानदार मानेचा कासव ज्या तळ्यांत रहात होता, त्या तळयांत दोन हंस पक्षीही रहात होते. त्या तिघांची छान मैत्री जुळली होती नि ते दिवसभर एकमेकांशी खेळण्यात आणि गप्पा मारण्यात रमत असत.

  • आगे भी, जाने न तू.. पीछे भी, जाने न तू..जो भी है, बस इक ‘यहीं पल’ है..

    तिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या.

  • आठवण चाळवणारे अनामिक !

    एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला  मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे  मिटून चिंतन करीत, शांत बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच   आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते.

  • वारसा सांभाळणारी लेखिका

    आई-वडील दोघेही प्रख्यात वैज्ञानिक होते. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू जणू तिला लहानपणापासून मिळाले होते. आई-वडिलांचा तिला सार्थ अभिमान होता. कारण दोघांनाही भौतिकशास्त्रातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला होता. तिच्या आईने तर दोनदा नोबेल पुरस्कार मिळवून साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले होते. अशा या थोर संशोधक आई-वडिलांचे नाव होते मेरी क्युरी व पिअरे क्युरी आणि त्यांच्या पोटी जन्म घेऊन स्वतःही नोबेल मिळविणारी ती संशोधिका होती आयरीन ज्युलिएट क्युरी. १९३५ मध्ये रसायनशास्त्रातील मौलिक शोधाबद्दल आयरीनला तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट यांच्याबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. आयरीन क्युरीचा जन्म १२ सप्टेंबर १८९७ मध्ये पॅरिस येथे झाला. रात्रंदिवस संशोधनामध्ये गढून गेलेल्या आई-वडीलांमुळे आयरीनला संशोधनाचा जणू वारसाच मिळाला होता. आयरीनने आपल्या प्राथमिक शिक्षणानंतर 'रेडिओग्राफर नर्स' म्हणून काम सुरू केले. अल्का किरणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल तिला १९२५ मध्ये डॉक्टरेट मिळाली. रेडियम इंस्टिट्यूटमध्ये काम करीत असताना ती फ्रेडरिक ज्युलिएटच्या संपर्कात आली. दोघांची कार्यक्षेत्रातील आवडनिवड सारखीच होती. त्यामुळे दोघांनी १९२६ मध्ये विवाह केला व नंतर मेरी क्युरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनकार्य सुरू केले. आयरीनने अल्का किरणांसंदर्भात आधीच संशोधन केले होते. त्यानंतर तिने रेडिओधर्मी मूलतत्त्वांची कृत्रिम निर्मिती असा शोध लावला. याच शोधाबद्दल तिला फ्रेडरिकबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. नंतर तिने न्यूट्रॉनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले. काही काळ प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर १९४६ मध्ये ती आयरीन रेडियम इन्स्टिट्यूट या संस्थेची ती संचालिका झाली. वैज्ञानिक संशोधनाबरोबरच तिला सामाजिक कार्यातही रस होता. 'वर्ल्ड पीस कौन्सिल' या संस्थेची ती सदस्य होती. १९५६ मध्ये पॅरिसमध्ये तिचे निधन झाले. तिचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट याने नंतर पार पाडली.

  • पडद्यामागचे ठाणेकर

    नाटक हा एक सांघिक कलाप्रकार आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचा मेळ तर जमून यावा लागतोच, पण त्यांना नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा याची साथही मिळावी लागते. मात्र या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळणारे रंगकर्मी नेहमी पडद्यामागे राहतात. त्यांचे चेहरे फार क्वचित प्रेक्षकांना दिसतात, पण त्यांचे कला कौशल्य, तंत्रावरील हुकूमत नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी निश्चित महत्त्वाची असते. अशाच काही पडद्यामागच्या ठाणेकरांची ही एक झलक.

    ‘पडद्याला टाळी’ या शब्दप्रयोगाला मराठी नाट्यपरंपरेत काही आगळे महत्त्व आहे. आपल्या नेपथ्याला हमखास दाद घेणाऱ्या नेपथ्यकारांच्या यादीतले ठाणेकर नाव म्हणजे दत्ता चोडणकर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्टचा डिप्लोमा घेतलेले दत्ताभाऊ हे गणपतीच्या सजावटींपासून ते रांगोळी काढण्यापर्यंत अनेक बाबतीत माहीर होते. त्यांना रंगभूमीकडे वळवलं ते नाना कुलकर्णी यांनी. ठाण्याच्या भालचंद्र रणदिवेंशी, लिटल थिएटरच्या सुधा करमरकरांशी, रंगभूषाकार बाबा कदम यांच्याशी दत्ताभाऊंची ओळख झाली आणि मराठी रंगभूमीला नवा नेपथ्यकार गवसला. १९६६ साली ठाण्याच्या नाट्यमन्वंतरने स्पर्धेत सादर केलेल्या ‘आसक्ती कसली मजला’ या नाटकाचे नेपथ्य करून दत्ता चोडणकरांनी आपली कला कारकीर्द सुरू केली. या पदार्पणात त्यांनी पारितोषिक मिळवले. आचार्य अत्रे यांच्या अत्रे थिएटर्ससाठी ‘मी मंत्री झालो’, ‘पराचा कावळा’ या नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले. ‘पराचा कावळा’ मधील चौपाटीच्या नेपथ्याला चोडणकर टाळी घेत. १९६९ मध्ये त्यांनी मधुसूदन कोल्हटकरांच्या ‘हा स्वर्ग सात पावलांचा’ या नाटकाचे अत्यंत आकर्षक नेपथ्य उभारले. ‘झडप’ या नाटकात तर कारागिरीची कमाल दाखवून त्यांनी प्लायवूडची फियाट गाडीच रंगमंचावर आणली होती. नाटकवाल्यांची गरज ओळखून हलक्या वजनाचे, सहज सुटे होणारे, फोल्डिंगचे, सहज जोडता येणारे नेपथ्य बनवण्यात दत्ताभाऊ वाकबगार होते. राज्य नाट्यस्पर्धेपासून ते व्यावसायिक रंगमंचापर्यंत शंभरहून अधिक नाटकांचे नेपथ्य दत्ता चोडणकरांच्या कलेतून साकारले गेले आहे.

    नाट्याभिमानीच्या नाटकांचे नेपथ्य करण्यापासून ते मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या चित्ररथाचे नेपथ्य करण्यापर्यंत आपल्या कलाकौशल्याचे चौफेर प्रदर्शन मांडणारा नेपथ्यकार म्हणजे कै. प्रकाश टिपणीस. नाट्याभिमानीच्या ‘का असंच का?’, ‘अर्ध्याच्या शोधात दोन’, ‘पत्यात पत्ता’ या नाटकांचे नेपथ्य अतिशय प्रभावीपणे साकारले ते प्रकाश टिपणीसांच्या कलात्मक कौशल्यामधूनच. गणेश कल्चरल अॅकॅडमीच्या गोपीकृष्ण महोत्सवासाठी टिपणीसांनी १५ वर्षे साकारलेलं नेपथ्य त्यांच्या अभिनव कल्पनांची आणि अप्रतिम कलेची साक्ष देणारं होतं.

    राज्य नाट्यस्पर्धा जोरात होती तेव्हा बहुदा प्रत्येक संस्थेचा एक नेपथ्यकार ठरलेला असायचा. म्हणजे ‘मित्रसहयोग’चं नेपथ्य मधुसूदन ताम्हाणे करणार, नंतरच्या काळात अशोक कार्लेकर; तर ‘कलासरगम’साठी विश्वास कणेकर आपले कौशल्य पणाला लावणार असं ठरलेलं असायचं. त्यात स्पर्धेची चुरस असल्याने एकदम ‘आउट ऑफ द बॉक्स’ कल्पना लढवून प्रेक्षकांना आणि परीक्षकांना चकित करण्यावर भर असे. त्यातूनच ‘अश्वमुद्रा’चे सायकलच्या रिम्सचा वापर करून केलेलं नेपथ्य अवतरलं. राहायला ठाण्यात नसूनही ठाण्याच्या नाट्यवर्तुळात मिसळलेलं नाव म्हणजे सुरेश मगरकर. ‘दर्शन दिग्दर्शन’ ‘काजळडोह’, ‘अदृष्टाच्या वाटेवर’ मधील त्यांचं नेपथ्य आजही जाणकारांच्या लक्षात आहे. ‘कॅलिग्युला’तलं रोमन शैलीतले नेपथ्य, ‘अमॅड्युअस मधून युरोपमधलं नेपथ्य, ‘विठ्ठला’त शिडीचे झाड असे वैविध्यपूर्ण नेपथ्य त्यांनी उभारले होते.
    नेपथ्यानंतर नाटकाची परिणामकारकता वाढवणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशयोजना. नाटकातील प्रसंगांना उठाव देण्यासाठी, त्यातील भावभावना अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे टाकलेले झोत म्हणजेच प्रकाशयोजना नव्हे बरं. व्यक्तिरेखा लिहिताना आणि ती साकारताना नाटककार, दिग्दर्शक जसा आणि जितका सूक्ष्म विचार करतात, तितकाच सखोल विचार करून प्रकाशझोतांना व्यक्तिरेखेचं स्थान मिळवून देतो तो खरा प्रकाशयोजनाकार. कुमार सोहोनीने केलेली ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ची प्रकाशयोजना, अशोक साठें नी केलेली ‘चक्रावर्त’ची (४८ का ५५ स्पॉट्स?) प्रकाशयोजना अशा काही संस्मरणीय प्रकाशयोजना राज्य नाट्यामुळे ठाणेकारांना पाहायला मिळाल्या. ठाण्याच्या प्रकाशयोजनाकारांची परंपरा पुढे नेणारं आणि व्यावसायिक रंगभूमीला स्थिरावलेलं नाव म्हणजे योगेश जगन्नाथ केळकर. १९९२ पासून योगेश मराठी, हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर प्रकाशयोजना करीत आहे. एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या योगेशने २००३ साली ‘सवाई प्रकाशयोजनाकार’ म्हणून बक्षीस मिळवले होते. २५ पेक्षा अधिक नाटकांची प्रकाशयोजना करणाऱ्या योगेशला राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘दांडेकरांचा सल्ला’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकांसाठी सलग तीन वर्षे पारितोषिक मिळाले आहे. याखेरीज ‘ती आई होती म्हणुनी’, ‘किमयागार’, ‘यंदा कदाचित’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस ३६’, ‘अनधिकृत’, ‘रज्जू’ इ. नाटकांसाठी योगेशने प्रकाशयोजना केली आहे.

    नाटकाच्या प्रकृतीनुसार प्रसंगांना उठाव देण्याचे आणि प्रेक्षकांच्या मनात तो भाव जागा करण्याचे काम पार्श्वसंगीतामधून केले जाते. मुळात मराठी रंगभूमीचा उगमच संगीत रंगभूमी म्हणून झाला असल्याने संगीता शिवाय नाटक ही कल्पनाच प्रेक्षकांना रुचत नाही. ठाण्याच्या नाट्यवर्तुळात रेकॉर्डेड पार्श्वसंगीताची मिरास सांभाळली ती प्रभाकर साठे यांनी. पोलिसांच्या सायरनपासून ते वारकऱ्यांच्या नामघोषापर्यंत आणि कोंबड्यांच्या आरवण्यापासून ते हृदयाच्या ठोक्यापर्यंत कोणताही आवाज हमखास मिळायचा तो प्रभाकर साठेंच्या ‘स्टॉक’मध्ये. पाषष्ठपासून पार्श्वसंगीताची जबाबदारी पेलणाऱ्या प्रभाकर साठें चा ‘मिनी स्टुडिओ’ हा ठाण्यातला पहिला स्टुडिओ मानला जातो. राज्य नाट्यच्या नाटकांसाठी हौशी नाट्यसंस्थांना नेहमीच सवलतीच्या दरात (क्वचित चकटफू देखील) म्युझिक देणाऱ्या प्रभाकर साठें नी ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘एक दिवस अचानक’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘अबोल झाली सतार’, या व्यावसायिक नाटकांची रंगतही पार्श्वसंगीताने वाढवली होती. ऑस्ट्रेलियातून आलेल्या ‘टिक टू’ या पपेट शो साठी पार्श्वसंगीत देण्यापासून ते प्रजासत्ताकदिनाच्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला पार्श्वसंगीत देण्यापर्यंत साठेंनी चौफेर कामगिरी बजावली आहे. नाटकांसाठी म्युझिक अरेंजर म्हणून सुरुवात करून,

    आज मराठी चित्रपटांसाठी साउंड डिझायनर म्हणून काम करणारा रंगकर्मी म्हणजे अभिजीत केंडे. यदाकदाचित, जाणून बुजून, हलकं फुलकं या नाटकांसाठी म्युझिक अरेंजमेंट करणाऱ्या अभिजीतने ‘गोजिरी’, ‘तुला शिकविन चांगलाच धडा’, ‘शर्यत’, ‘ती रात्र’ इ. चित्रपटांसाठी साउंड इंजिनीयर म्हणून काम करून पारितोषिके मिळवली आहेत.‘रंगायतन महोत्सव’ एकांकिका स्पर्धेच्या संयोजनात अभिजितचा पुढाकार असतो. नंतर प्रफुल्ल आठवले, विष्णू आव्हाड, रोहित प्रधान, केनिथ डिसोझा यांचे ध्वनिमुद्रणाचे स्टुडिओ ठाण्यात सुरू झाले.

    नाटक म्हणजे एक आभासी वास्तव, जे नाही ते आहे असं भासवणाऱ्याचा खेळ. हा खेळ हुबेहूब वठवायचा तर रंगभूषा अर्थात मेकअप करायलाच हवा. ठाण्याच्या नाट्यवर्तुळात मेकअपच्या संदर्भात सर्वात जुने नाव म्हणजे राजाभाऊ गद्रे. गणेशोत्सवातल्या नाटकांपासून ते व्यावसायिक नाट्यप्रयोगांपर्यंत राजाभाऊंनी शेकडो कलाकारांची रंगभूषा जाणकारीने केली. ठाण्याच्या नाट्यवर्तुळातील तीन पिढ्या राजाभाऊंनी रंगवल्या असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

    राजाभाऊंकडून ‘मेकअप’चे धडे घेतलेले दीपक लाड गेली ३१ वर्षे रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदिरमध्ये शिकत असतानाच गॅदरिंगच्या कार्यक्रमांसाठी दीपक मुला-मुलींचा मेकअप करू लागला. राजा भाऊंप्रमाणेच अशोक पांगम, बाबा वर्दम, नाना जोगळेकर, कृष्णा बोरकर या मान्यवर रंगभूषाकारांचे मार्गदर्शन दीपकला लाभले आहे. कलासरगम, मित्रसहयोग, नाट्य परिषद ठाणे शाखा, सावित्री कला केंद्र, माता अनुसया, चंद्रकला अशा विविध संस्थांच्या नाट्य प्रयोगांची रंगभूषा दीपक लाड यांनी साकारली आहे.

    रंगभूषेप्रमाणेच वेशभूषाही महत्त्वाची असते. सर्वसाधारण हौशी नाट्यसंस्थेत वेशभूषेची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवलेली नसते, तर बहुतेक वेळा तालमीत होणाऱ्या चर्चांमधून वेशभूषा कशी असावी हे ठरते आणि मग ती जमवायला सुरुवात होते. ‘पीरिएड प्ले’ करताना नाटकाचा नेमका काळ कोणता, त्या काळात पुरुषांचे कपडे कसे असत, महिला काय परिधान करीत, पायात पादत्राणे असायची का? डोक्यावर काय असायचे? अशा गोष्टींचा बारकाईने विचार करून वेशभूषा नक्की व्हायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वेशभूषेची सवय कलाकारांना व्हावी म्हणून तालमीपासूनच ते कपडे अंगावर चढवले जायचे. अर्थात इतकं करूनही ऐनवेळी रंगमंचावर धोतराचा काष्टा सुटणं, डोक्यावरचा शिरपेच पडणं, पायघोळ अंगरख्यामुळे धडपडणं हे प्रकार व्हायचेच. या ‘नाटकातल्या नाटकामुळे’ प्रेक्षकांची करमणूक व्हायची ती निराळीच.

    कोणताही नाट्यप्रयोग सुरळीत, सुविहीत होण्यासाठी गरज लागते ती ‘बॅक स्टेज कामगारांची.’ हौशी नाट्यसंस्थांमध्ये या पडद्यामागच्या कामगारांची कमी नसते. ज्या कुणाला नाटकात रोल मिळालेला नाही, तो बॅक स्टेजला, हा तर अलिखित नियमच. पण नाटकात भूमिका करणारे कलाकारही प्रसंगी लेव्हल्स ओढण्यापासून ते नेपथ्याची मांडणी करण्यापर्यंत कोणतेही काम मनापासून करत असत. आता काही वेळा उत्साहाच्या भरात बॅक स्टेजवाल्यांकडून (चुकून) विंगेतली प्रॉपर्टी उचलण्याचा किंवा सेटवर नको तो बदल करण्याचा प्रमाद घडायचा; पण नाटक म्हटलं की हे सगळं आलंच. असो.
    ठाण्याच्या रंगपरंपरेत नवे रंग भरणाऱ्या पण अनेकदा प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष समोर न येणाऱ्या रंगकर्मींची आठवण जागी करण्याचा हा प्रयत्न. कदाचित यात काहीजणांची नावे निसटली असतील तर क्षमस्व!

  • तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ!

    राज कपूरच्या “हिना” मध्ये छान ओळी होत्या- “मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं !” त्याच धर्तीवर आजच्या पोस्टचे शीर्षक !

  • नवरा आमदार, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू?

    या हेमलताबाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते .

  • अमेरिकन गाठुडं – ७

    ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली. पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लॉट्स मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती.