नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो.
May 25, 2022
-- किशोर कुलकर्णी
May 13, 2006
तर, त्या वेळी मी पुण्यातल्या राजा धनराज गिरजी शाळेमध्ये शिकत होतो. पाचवी किवा सहावी असेल, पण त्या वेळी वि. कृ. क्षोत्रिय नावाचे मुख्याध्यापक होते. मराठीत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, सुभाषितांचे संग्रह काढले, मुलांच्या मनावर संस्कार घडविले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आचार्य प्र. के. अत्रे यांनीही काम पाहिलं होतं. पुण्याच्या पूर्वभागातील ही शाळा त्या वेळी फारशी प्रख्यात नव्हती. गरिबांची शाळा असंही काही वेळा तिचं वर्णन केलं जायचं; पण शाळेसाठी देखणी इमारत होती, सुसज्ज प्रयोगशाळा होती, शरीराला व्यायाम व्हावा आणि मनाला ऊर्जा लाभावी, असं मैदानही होतं. त्या दिवशी शनिवार असावा. सकाळची शाळा होती. मी वर्गात प्रवेश करणार एवढ्यात उजवीकडे, भितीलगत काहीतरी चमकणारं दिसलं. वेग कमी झाला. मी थांबलो. पाहिले, तिथं एक घड्याळ पडलेलं होतं. उचललं आणि खिशात ठेवलं. घड्याळ ही मौल्यवान चीज आहे एवढं कळण्याजोगं वय होतं माझं. माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी घड्याळ घेतलं त्या वेळी त्या हॅन्री सॅन्डोजच्या घड्याळाला ९० रुपये लागले होते. हे घड्याळ तर भारी दिसत होतं. वर्गात बसलो; पण शिक्षकांच्या शिकवण्याकडे माझे लक्ष नव्हतं. अर्ध्या चड्डीच्या उजव्या खिशात त्या घड्याळाला मी सतत स्पर्श करीत होतो. या घड्याळाचं काय करावं, हा प्रश्न मला अस्वस्थ करीत होता. तोपर्यंच्या बालसुलभ आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा हा काही माझा स्थायिभाव नव्हता. शिवाय मोहही खूप होते. शाळेबाहेर बसणारा हिदुस्थानी काजूवाला (शेंगदाणे) चिक्कीवाला, शिवाय चुंबकीय खेळण्याचं नवं विश्वही मला कळलेलं होतं. काय करावं? काय करू शकू? प्रश्नांची मालिका मनात फेर धरीत असतानाच बेल झाली अन् मधली सुटी झाली. माझी तंद्री भंग पावली. मी उठलो, वर्गाबाहेर आलो. शेजारीच मुख्याध्यापकांची खोली होती. पाहिलं अन् सरळ आत घुसलो. श्रोत्रिय सर बसले होते. त्यांच्यासमोर ते घड्याळ ठेवलं. म्हटलं, ‘सकाळी हे घड्याळ सापडलं. माझा तास सुरू होता म्हणून जवळच ठेवलं, हे घ्या. ज्याचं असेल त्याला मिळायला हवं.’ मी हे बोललो. काही खरं होतं, काही खोटं... पण मी घड्याळ परत केलं होतं. का, हे मला आजही सांगता येणार नाही. कदाचित घड्याळासारखी वस्तू विकण्याची, पचविण्याची माझी क्षमता नसावी. सरांनी ते घड्याळ पाहिलं. शाब्बास म्हणाले अन् मी परत वर्गात आलो. आपण जे केलं ते योग्य की अयोग्य याचा वेध घेता येत नव्हता. स्वाभावाकिपणे कोणाला काहीच सांगितलं नाही. कदाचित इतर मुलं वेड्यात काढतील अशी भीतीही असावी. त्यानंतर आठवडाभरानं म्हणजे दुसर्या शनिवारी प्रार्थनेसाठी सर्व वर्ग एकत्र आलेले असताना प्रार्थनेनंतर सरांनी मला पुढे बोलावलं. सगळ्या विद्यार्थ्यांना माझी ओळख करून दिली. झालेली घटना सांगितली आणि अशी प्रामाणिक मुलं ही या शाळेचं नाव मोठं करतात, असं काहीतरी सांगितलं. हजार विद्यार्थ्यांच्या समोर आज मी प्रामाणिक विद्यार्थी झालो होतो. शाळेच्या अभिमानाचा विषय झालो होतो. ज्याचं घड्याळ होतं त्यानं मला देण्यासाठी एक पेन दिलं होतं. माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार. मी काही केलं नसताना मिळालेला! दोन दिवसांनी घरी पत्र आलं. मी मावशीकडे राहत असे. शाळेचं पत्र पाहून घरचे चकावले; पण पत्र वाचून त्यांनाही आनंद झाला. एका पोस्टकार्डवर श्रोत्रिय सरांनी माझ्या प्रामाणिकपणाला दाद दिली होती. आता घरातही मी प्रामाणिक ठरलो होतो. घरसामान आणताना दोन-पाच पैशाची हेराफेरी करणारा मी प्रमाणित प्रामाणिक ठरलो होतो. त्यानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मला खास प्रमाणपत्र देण्यात आलं. ‘तू प्रामाणिक आहेस याचा आम्हाला अभिमान वाटतो.’ असं ते प्रमाणपत्र सांगत होतं. जे माझं नव्हतं, जे मला मिळालं, ते मी परत केलं या एवढ्याशा बाबीवरून मी शाळेतला एक विशेष विद्यार्थी झालो होतो. खरोखर मी प्रामाणिक होतो का? मला तरी ठामपणे या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देता येत नाही. घड्याळाऐवजी पाच-दहा रुपये सापडले असते तर? तर कदाचित माझा प्रामाणिकपणा कधीच पुढे आला नसताही! पण एक मात्र खरं, या घटनेनंतर ज्या ज्या वेळी मोहाचे क्षण आले, त्या त्या वेळी जे आपलं नाही, जे दुसर्याचं आहे; ते आपल्याला नको, हाच आवाज मनानं दिला. मला ती शाबासकी, ते पेन, ते प्रमाणपत्र याचा कधी विसर पडू दिला नाही. मी मुळतः प्रामाणिक होतो की नाही मला माहीत नाही; पण वि. कृ. श्रोत्रिय सरांनी तू प्रामाणिक आहेस, असाच संस्कार केला. तो कायम राहिला हा त्यांच्या विश्वासाचा परिणाम असावा.
-- किशोर कुलकर्णी
March 6, 2006
चित्रकला, आणि निबंधाच्या दरवर्षी आंतरशालेय स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून फक्त एकच विद्यार्थी निवडला जाई. यावर्षी रैनाच्या शाळेतून तिची निवड निबंध स्पर्धेसाठी झाली होती.
रैनाला वाचनाची आवड आहे. तिच्याकडे गोष्टीची आणि वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तकं आहेत. तिचे आई बाब तिला वाढदिवशी खूप पुस्तकं भेट देतात. तिला चित्र काढण्यापेक्षा वाचायला, लिहायला अधिक आवडतं. रैनाने शाळेच्या मासिकात पण गोष्टी लिहिल्या होत्या.
रैनाच्या शाळेने तिचे नाव दिल्लीला पाठवून दिले.
रैना स्पर्धेच्या तयारीला लागली. निरनिराळ्या विषयांवर लिहिण्याचा सराव रैना करू लागली. वाचनालयात अधिक वेळ घालवू लागली.
ही स्पर्धा दिल्लीत होणार होती. या स्पर्धेत भारतातील काही वेगवेगळ्या शाळांतील निवडक मुलेच भाग घेणार होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ देशातील प्रमुख चॅनल्सवर दाखवला जाणार होता.
जोशी सरांबरोबर रैना दिल्लीला आली. 18 मजली काचेच्या प्रचंड मोठ्या इमारतीत ६०० मुलांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीतील ६ मजले चित्रकला स्पर्धेसाठ व ६ मजले निबंध स्पर्धेसाठी खास राखून ठेवले होते.
स्पर्धेची वेळ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत होती. त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार होता.
स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठीक १० वाजता सर्व मुलं हॉल मधे जमली. मुलांच्या नावाची घोषणा होत होती व मुले आपापल्या मजल्यावर जात होती.
त्याचवेळी एक घोटाळा झला.
रैनाचं नाव चित्रकला स्पर्धेत जाहीर झालं. रैनाची तर घाबरगुंडी उडाली.
जोशी सरांनी आयोजकांना विनंती केली पण त्याचा काही फायदा झाला नाही.
अशावेळी कोण मदत करणार?
आता प्रेमळ भुताला बोलावलेलं बरं, असा रैनाने विचार केला.
रैनाने डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली. उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली. उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला. मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत” त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“बोल रैना काय मदत कर? या सगळ्या मुलांची माकडं करुन टाकू? का हि काचेची इमारत वेडीवाकडी करुन टाकू?”
रैना म्हणाली “असं काही नको रे.” मग रैनाने मनातल्या मनात त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली आता तूच मला मदत कर.
“ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
जोशी सर फारच भडकले होते. त्यांची समजूत काढत रैना म्हणाली,“सर काळजी करू नका. मी खूप चांगलं चित्र काढीन. आता पाहालंच तुम्ही!”
सर्वमुले आपापल्या मजल्यावर पोहोचली. प्रत्येकासाठी जागा राखून ठेवलेली होती.
रैनाने मोठा पांढरा कागद घेतला. तिला विषय मिळाला होता “पावसाळ्यातील गमती जमती.” काय करावं बरं? असा विचार करत असतानाच पेन्सिलीने टुणकन उडी मारली, तिच्या बोटात जाऊन बसली. तिचा हात हलू लागला. पेन्सिल कागदावर फिरू लागली. चित्रं कागदावर दिसू लागलं. अजून काही मुलं खाडाखोड करत होती, तर काही विचारच करत होती. अकरा मिनिटात रैनाचं चित्र काढून पूर्ण झालं.
“रस्त्यावर पाणी तुंबल्याने गाड्या व बसेस पाण्यावर तरंगत होत्या. मुले मस्त खेळत होती. पोहत होती. गाडीवर चढून पाण्यात उड्या मारत होती. मुलांनी कुठल्यारी वेगळ्याच फॅशनचे कपडे घातले होते. पाण्यात एक छत्री उलटी झाल्याने तिची होडी झाली होती. त्या छत्रीच्या होडीत मांजरीची दोन पिल्लं आइस्क्रीम चा कोन खात बसली होती. त्या होडीच्या दांड्यावर चष्मा घातलेला एक हिरवा बेडूक चॉकोबार खात बसला होता.” इतक्या कमी वेळात इतके सुंदर चित्र काढलेले पाहून तेथील शिक्षक खूश झाले. त्यांनी रैनाची पाठ थोपटली.
आता हे चित्र रंगवायचं होतं. तिथेच एका मोठ्या टेबलावर वेगवेगळे रंग, लहान मोठे ब्रश, पॅलेटस्, पाण्याच्या बाटल्या, बाउल्स असं सर्व सामान ठेवलेलं होतं.
रैनाने बसल्या जागेवरुनच तिथे पाहिलं. आणि तिला हवं असणारं सर्व सामान तिच्या टेबलावर आलं. रैनाच्या टेबलावर आपोआप सामान प्रकट होताच तिच्या बाजूच्या टेबलावरचा मुलगा क्षणभर दचकलाच! रैनाला कळत नव्हतं.. कसं रंगवावं? कुठल्या रंगात कुठला रंग मिसळावा?कशासाठी कुठला ब्रश वापरावा? काय करावं? रैना विचार करत बसून होती. तिला काही सूचत नव्हतं. तिला पण हे कळेना, की आपलं प्रेमळ भूत गेलं कुठे? ते का नाही रंगवत आपलं चित्रं? खूप वेळ नुसतं बसून तिला कंटाळा आला. तिने ब्रश घेतला रंगांत बुडवला आणि तो चित्रावर घासायला सुरुवात केली. पण कमालच झाली. चित्रावर रंगच लागेना. तिने पुन्हा प्रयत्न केला. रंगात पाणी मिसळलं. ब्रशवर भरपूर रंग घेतला आणि तो ब्रश कागदावर फिरवला.
पण ब्रशवरचा रंग कागदावर उतरलाच नाही. कागदावरचे चित्र रंगेच ना..! आता मात्र रैना चांगलीच घाबरली. तिला वाटलं आता आपण फेल! तिने मनातल्या मनात प्रेमळ भुताला हाक मारली. त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“अगं मी चित्रं रंगवूनच ठेवलंय. हे आमच्या भुतांचे स्पेशल रंग आहेत.”
“म्हणजे?”
“अगं आम्ही हे रंग जीवंत घुबडाची बुबुळं, गरुडाचं रक्त, वाघाची चरबी, सापाची जीभ आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे डोळे एकत्र कुटून तयार करतो. हे जीवंत रंग आहेत!! यांना सुकायला थोडा वेळ लागतो. तासाभरात हे रंग सुकले की पाहा काय चमत्कार होतो ते..?! या रंगांनी चित्र रंगवलं तर चित्रसुध्दा जीवंत होतं!! खरंच!!
अपना तो, ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
रैनाने चित्रं झाकून ठेवलं आणि ती इतरांची चित्र पाहात हॉलमधे फिरू लागली. बाकिचि मुले माणसांनी तयार केलेले पचपचीत रंग वापरुन चित्र रंगवत होती.
तासाभरात रैना परत आली. झाकून ठेवलेलं चित्रं तिने सावकाश उघडलं.. तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आता ते चित्र काही वेगळंच दिसत होतं.
त्य चित्रातलं पाणी खरं होतं. त्या चित्रातलं आइम खरं होतं. त्या चित्रातली मुलं खरोखर पाण्यात उड्या मारत होती. आणि मुलांनी पाण्यात उड्या मारल्यावर चित्रातून पाण्याचे तुषार बाहेर उडत होते. त्या तुंबलेल्या पाण्यात खरोखरीच गाड्या व बसेस तरंगत होत्या!!!
रैना अवाक झाली! तोंडावर हात ठेवून ती म्हणाली,“ओऽऽह ऑसम!!”
इतक्यात बेल वाजली. स्पर्धेचा वेळ संपला होता!
परदेशातील तीन मोठे चित्रकार परीक्षक म्हणून आले होते. मिस्टर जॉन टँगोटा, मायकेल फेरी व मिसेस अॅना क्रू. त्यांच्या समोर देशातल्या निवडक ३०० मुलांनी काढलेली चित्रे ठेवली होती. हे सगले थक्क होऊन चित्रं पाहात होते.
इतक्यात जॉन यांचं लक्ष रैनाच्या चित्राकडे गेलं. त्यांनी चित्र हातात घेतलं व सहज गंमत म्हणून त्या बेडकाला हात लावला. त्याक्षणी ते बेडूक चिरक्या आवाजात म्हणालं,“आय वाँट डराँव डराँव, चॉकोबार चॉकोबार, डराँव डराँव”
मायकेल व अॅना जॉनकडे पाहून जोरजोरात हसू लागले.
जॉन ने ते चित्र घाबरुन अॅनाकडे दिलं. अॅनाला त्या चित्रातली मांजरं खूप आवडली. तिने मांजरांना हात लावताच ती मांजर लाडात येऊन म्हणाल,“हॅलो चोर चिम चिम, गिव्ह मी मोर आईस्क्रीम.”
अॅनाने घाबरुन चित्र खालीच ठेवलं. तिचा चेहरा घाबरुन लाल-निळा झाला.
अॅनाचा हा आवाज ऐकून, आता सगळेच हसायला लागले.
“ही मुलांची चित्र पाहताना कोण कुठले आवाज काढेल काही सांगता येत नाही” असं म्हणत मायकेल यांनी रैनाचं चित्र हातात घेतलं.“काय सुंदर रंग आहेत. पाणी तर खरं वाटतंय.या चित्रात खरा जीवंतपणा आहे.”
इतक्यात त्यांना जॉन चा धक्का लागला. त्यामुळे चित्रातली तरंगणारी बस थोडी पुढे सरकताना मायकेलने पाहिली. मायकेलचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना.
“या देशातली मुले ग्रेटच आहेत” असं मायकेलने म्हणताच बाकी दोघांनी टाळ्या वाजवल्या.
संध्याकाळी रिझल्ट जाहीर झाला, तेव्हा रैनाच्या समोर देशभरातल्या टि व्ही चॅनल्सनी, फोटोग्राफर्सनी एकच गर्दी केली. जगातल्या सगळ्या लोकांनी तिचं चित्रं पाहिलं.
तुम्हाला काय वाटतं, रैनाला बक्षीस मिळालं असेल? का? कुणामुळे?
प्रेमळ भुताला न भिता कळवा. त्याला इमेल करा. प्रेमळ भूत तुम्हाला नक्की उत्तर देईल. प्रेमळ भूत तुमच्या इमेलची नहमी वाट पाहात असतं
-राजीव तांबे
September 8, 2015
‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. ….चांदोबातून ओळखीच्या झालेल्या रामायण, महाभारत, शिवलिलामृत, वेताळ पंचविशीतील कथा पुढे थोड्याशा मोठ्या वयात संपूर्ण वाचून काढल्या, त्या याच पद्धतीेने. कळत फार नव्हतंच, परंतू त्यातलं नाट्य मात्र मोहवत होतं.
February 6, 2018
आकर्षण आणि उपभोग ह्या भिन्न गोष्टी आहेत. जेंव्हा भिन्न, तेंव्हा त्याच्याकडे बघण्याचा द्दष्टीकोन देखील वेगळाच असू शकतो. उपभोगाची साधने, फक्त दोनच आहेत. एक शरीर व दुसरे मन. दोन्हीवर ताबा असतो तो विचारांचा, विवेकाचा. शरीराचा विकलांगपणा बघतांच मन त्याची साथ सोडून देते. बुद्धीमधला विवेक वरचढ बनतो. हाच विवेक मनाच्या चंचल स्वभावाला मुरड घालून, शरीराला जगवण्यासाठी साथ देण्यास सरसावतो. तुमच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध तो शरीराला तन्दुरुस्त, आरोग्यवर्धक ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवेकासमोर असतात फक्त दोन मार्ग. त्या निसर्गाचा शोध घेणे. अर्थात ईश्वर सान्निध्य व शरीराला त्याच्याशी एकरुप करण्याचा प्रयत्न करणे.
August 17, 2012
त्याचबरोबर माझा बारावीचा अभ्यास सुरू झाला. हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. कारण या बारावीच्या मार्कांवरच इंजिनिअरींगची अॅडमिशन अवलंबून होती. शाळेत अगदी पाचवीपासून विनय देवस्थळी, सुबोध दाबके, पंकज देवल, सुभाष देसाई, नितीन थत्ते असे माझे जवळचे मित्र बनलेले होते. बारावीतही आम्ही सगळे बरोबर होतो. अभ्यास एकत्र करत होतो. कॉलेजमधील मजाही एकत्रच अनुभवत होतो. बारावीत विनायक महाजनही आमच्या ग्रुपमध्ये सामील झाला. अनेकदा लहानपणापासूनचे आपले मित्र पुढे आयुष्यात थोडे दूर जातात आणि ती जवळीक रहात नाही. पण आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही सगळे मित्र आजही तितकेच जवळ आहोत. आमच्या बायका आणि मुलेही आता आमच्या ग्रुपमध्ये एकत्र आली आहेत. सुभाष देसाई मस्कतमध्ये स्थायिक झाला असला, तरी वर्षातून अनेक वेळा आम्ही एकत्र येतो. या सर्वांमध्ये गाणारा मी एकटा. त्यामुळे आमच्या सहलीत गप्पा आणि मैफिलीत माझे गाणे हा अविभाज्य भाग असतो. ह्या सर्वांचेच माझ्याइतकेच माझ्या गाण्यावर प्रेम आहे आणि खूप लहान असल्यापासून माझे गाणे ते ऐकत आले असल्याने माझ्या गाण्याच्या प्रवासाचे ते साक्षीदारच आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनांचा मी गांभीर्याने विचार करतो.
बारावीमध्ये आम्ही सर्वांनीच मनापासून अभ्यास केला. केलेल्या परिश्रमांचे फळ सर्वांना मिळाले. इंजिनिअरींगच्या अॅडमिशनसाठी माझे मार्क होते ९० टक्के. माझ्या सर्वच मित्रांना चांगले मार्क मिळालेच होते. त्यामुळे जवळ जवळ सर्वांनाच इंजिनिअरींगला अॅडमिशन मिळाली. मला माटुंगा येथील सुप्रसिद्ध व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्यूट म्हणजेच व्ही. जे. टी. आय. या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अॅडमिशन मिळाली. तीर्थरूप आई आणि विशेषतः तीर्थरूप भाऊंना फारच आनंद झाला. कारण व्ही.जे.टी.आय. समोरच्याच युडिसीटी या कॉलेजमधून केमिकल टेक्नॉलॉजी या विषयात त्यांनी एम. एस. सी. टेक ही डिग्री मिळवली होती. आता माझा प्रवास ठाण्याकडून मुंबईकडे सुरू झाला. हा प्रवास माझ्या गाण्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचा होता. माझ्या लहानपणी टीव्हीवर 'फूल खिले है गुलशन गुलशन' नावाचा खास कार्यक्रम सादर होत असे. दर शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेत्री तबस्सुम चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या मुलाखती घेत असत. त्यांचा पहिला प्रश्न ठरलेला असे. आप बंबई कब आये? तेव्हा या मुंबईत आल्याशिवाय कोणत्याही कलाकाराचे चालत नसे. आता इंजिनीयरींग शिकण्याच्या निमित्ताने मीही मुंबईत पोहोचलो. व्ही.जे.टी.आय.मध्ये सगळे हुषार आणि अभ्यासू विद्यार्थी असल्याने गाणारे कलाकार कमीच होते. त्यामुळे कॉलेजच्या व्ही.जे.टी.आय. टॅलेंड परेड या स्पर्धेत मी भाग घेतला आणि पहिले पारितोषिक मिळवले. पारितोषिकापेक्षाही माझा जास्त फायदा हा झाला की मला आमच्या कॉलेजतर्फे अनेक आंतरमहाविद्यालयीन गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान माझा आणखी एक फायदा या कॉलेजने करून दिला. मला विवेक दातार नावाचा एक चांगला मित्र मिळाला. जो अतिशय उत्तम हार्मोनियम वाजवित असे. शिवाय विवेक काळे सरांकडे माझ्या आधीपासून हार्मोनियम शिकत होता. गाण्यामुळे आम्ही एकदम जवळ आलो आणि आमची अतिशय दाट मैत्री झाली.
- अनिरुद्ध जोशी
June 29, 2022
भूक आपल्याला लागते तशीच सर्व सजीव प्राण्यांनाही लागते. याची जाणीव ठेवून पहा. विशेष करून गरीब. अपंग असहाय्य यांच्या भूकेची काळजी घेतली पाहिजे.
December 14, 2021
सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.
October 18, 2009
‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’
August 15, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti