नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी.
September 10, 2022
काही काही माणसं स्वत:वर इतकं अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणं जमतच नाही. त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात त्यामुळे अशी माणसं दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! अनेकदा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गमंत म्हणजे त्यांच्यावर मना पासून प्रेम करणारा एक मोठा वर्गही असतो. शास्त्रज्ञ, साहित्य, खेळाडू, कलावंत या क्षेत्रातील अनेक नामवंत त्यांच्या विशिष्ट अशा स्वभावामुळे कायम चर्चेत राहतात.
बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले. १९४० च्या दरम्यान या तरूण मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला हा एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूण इन्स्पेक्टरची एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती जाम आवडली. त्यांनी या तरूणाला चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. ज्या क्षणाची हा तरूण वाट बघत होता ताक चालून त्याच्याकडे आला होता. क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. दूबे यांनी आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका त्याला देऊ केली.
या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित. मागचा पूढचा फारसा विचार न करता मग त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना १९५२ ची. विशेष म्हणजे पूढच्या पाच वर्षात या तरूणाला रंगीली, अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. कलावंत असो की शाही माणूस पोट नावाचा अवयव त्याला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवत असतो. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.
एस.एस. वासन या दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाचा १९५९ मध्ये “पैगाम” हा चित्रपट आला जो सूपरहिट झाला. या चित्रपटात राजकुमार (रामलाल) दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. खरे तर राजकुमार ज्या सामाजिक घटकात व परिस्थितीत वाढलेला होता त्याला बरीचशी छेद देणारी भूमिका पैगाम मधील रामलाल या पात्राची होती. रामलाल हा एक सामान्या मील कामगार पण आपल्या भावावर अत्यांतिक प्रेम असणारा व यासाठी अफाट कष्ट करून त्याला शहरात शिकायला पाठवणारा. ही भूमिका त्याने खरोखच मना पासून केली. दिलीप राज या दोन्ही कुमारांनी आपापल्या अभिनयात जान ओतली. त्यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर मात्र हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही. दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. अभिनेत्यातील अहंकारी माणूस किंवा माणसातील अहंकारी कलाकार असे अनेकदा आमने सामने येतात तेव्हा असा बेबनाव होणे चित्रपटसृष्टीसाठी काही नवे नाही. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.
मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. बलराज सहानी, राजकूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिल टागोर, रेहमान, मदन पूरी असे सर्वच नामवंत अभिनेते यात होते. चित्रपटात भव्यते सोबत संगीताची मेजवानीही होती. विविध सुंदर लोकेशन्स वरील चित्रीकरण, श्रीमंती थाट व गरीबीचा खास भावूक ड्रामा सर्व काही यात होते. या चित्रपटातील राजकुमारची भूमिका आगोदरच्या सर्व चित्रपटापेक्ष वेगळी होती. कृष्णधवल चित्रपटातील गरीब, कामगार, मध्यमवर्गीय अश्सा चेहरा असणारा राजकूमार या चित्रपटात एकदम लॅव्हीश व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून पडद्यावर आला. जिच्यावर आपण प्रेम करतो ती आणखी कुणावर प्रेम करते आणि योगायोगाने तो आपलाच भाऊ आहे हे समजल्यावर होणारे भावनिक ताणतणाव यात राजकुमार यांनी अप्रतिम साकार केले. या चित्रपटातील त्यांचे सर्व डायलॉग “हम” या शब्दाने सुरू होत किंवा संपत.मात्र या चित्रपटा नंतर ही “हम”ची बाधा त्यानां कायम जडली किंवा बिंबवून घेतली. राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की ज्या चित्रपटात राजकुमार असत तो चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला तुफान गर्दी करायचे. याच वर्षातला त्यांचे “काजल” हा मिना कुमारी सोबतचा “रिश्तेनाते” आणि “उंचे लोग” हे चित्रपट चांगलेच गाजले.
भारतीय ग्रामीण नायकाचा चेहरा म्हणून ते अनेक चित्रपटात शोभले. भारतीय संस्कृतीत वडीला नतंर मोठा भाऊ हा वडीलाच्या ठायी असतो. हा भाऊ बहूतेक वेळा कुटूबांसाठी आपल्या अनेक इच्छा व भावनानां दडपून टाकतो. राजकुमार यांचा अशा भूमिकेतील अभिनय खरोखरच अप्रतिम असे. मनाचा होणारा कोंडमारा ते आपल्या अभिनयातुन उत्कृष्ट सादर करत. सोबत त्यांच्या आवाजाचा एक विशिष्ठ पोत आणि संवादफैकीमुळे अभिनय सहज व नैसर्गिक होत असे. खरे तर प्रत्यक्षात ते अत्यंत उजळ कांतीचे अभिनेते होते. कृष्णधवल चित्रपटामुळे त्यांचा रंग फारसा आडवा आला नाही. पण म्हणून कदाचित रंगीत चित्रपटात नंतर त्यांना तशा भूमिका मिळाल्या नसाव्यात.
चेतन आनंद या निर्माता दिग्दर्शक शिवाय अख्ख्या चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचे कुणाशी वैयक्तिक असे सूर कधी जुळले नाही चेतन आनंदच्या सर्व चित्रपटात राजकुमार आणि प्रिया राजवंश हे हमखास असत. चेतन आनंद यांचा ‘हिर रांझा’ (१९७०) हा चित्रपट एक वेगळा प्रयोग होता. या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. राजकुमार आणि प्रिया राजवंश या दोघांनही यातील सर्व काव्यमय संवाद अप्रतिमच म्हटले आहेत. हमराज, नई रोशनी (१९६७), मेरे हुजूर, नील कमल, वासना (१९६८), लाल पत्थर, मर्यादा (१९७१), पाकिजा, दिल का राजा(१९७२), हिंदुस्तान की कसम(१९७३), ३६ घंटे(१९७४), एक से बढकर एक (१९७६), बुलंदी व चंबल की कसम (१९८०), कुदरत (१९८१), या सर्व चित्रपटापैकी काही वगळता ते मूख्य नायक जरी नसले तरी त्यांची समातंर भूमिका लक्षणीय असे. १९९१ मधील सुभाष घई निर्मित दिग्दर्शीत “सौदागर” मध्ये ते दिलिपकुमार सोबत पुन्हा दिसले. ९० च्या दशकात चित्रपटाच्या तंत्रात लक्षणीय बदल झाले होते. या दोघांचे समोरा समोरचे प्रसंग शूट करतानां हे तंत्र कामी आले. या चित्रपटात एकाच फ्रेममध्ये हे दोघे क्वचितच दिसतात. चित्रपटात जरी दोघे एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही अभिनेत्याच्या मनातील अतंर कमी झाले होते का? माहित नाही. पण व्यावसायिक तडजोडी करतानां खाजगी आयुष्य शक्यतो मिसळू देता कामा नये हे अनुभवाने अनेकानां समजते तसे ते या दोघानाही कदाचित समजले असावे. १९९३ मधील काहीसा भडक असणारा “तिरंगा” हा मराठमोळा नाना आणि राजकुमार यांच्यामुळे चांगलाच गाजला. याती दोघांनीही आपापल्या स्टाईलने संवादाची चांगलीच फटकेबाजी केली.
८० च्या दशका नंतरच्या बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सहज सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. “दिल एक मंदीर” आणि “वक्त” या दोन चित्रपटाने त्यांना सह कलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. आयुष्यभर हा अभिनेता कायम चर्चेत राहिला. अत्यंत लॅव्हिश जगला. चित्रपट सुष्टीत त्यांच्या केसां बद्दल एक चर्चा नेहमी होत असे. त्याना खूप लवकर टक्कल पडले व त्यांनी विग वापरायला सुरूवात केली. हा विग त्यांनी आपल्या केसांच्या मूळ वळणा सारखा हुबेहुब बनवुन घेतला आणि वाढत्या वया सोबत विगचे केसही पांढुरके करून घेतले. स्वत:च्या प्रेमा पडलेला माणूस ही पण त्यांची एक ओळख होती त्यामुळे ही खरीखोटी चर्चा होत असावी. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणिणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. राजकुमारने आपल्या मुलाला शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
# चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है…..,(वक्ता)आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्हेंग जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे……. (पाकीजा)
# हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
# काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। ('सौदागर')
# हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं……। (तिरंगा)
# हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी…¬¬। (मरते दम तक)
# हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है………..। ('तिरंगा')
# दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं………….।
…….आज त्यांचा जन्म दिवस. मन:पूर्वक अभिवादन..
-दासू भगत
( ८ ऑक्टोबर २०१८ )
October 17, 2018
दाम करी काम’ चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या गीतांना जोग यांनी अविस्मरणीय चाली दिल्या. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ चित्रपटातील ‘शुभंकरोति म्हणा मुलांनो..’ हे जयश्री गडकर यांच्या तोंडी असलेले गीत कुणीतरी विसरणं शक्य आहे का?
October 31, 2021
१९७१ साली औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी अनिल औदुंबरला आले असताना त्यांच्या त्या मुक्कामातील हृद्य क्षण टिपले आहेत- प्रख्यात ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी.. त्यांच्या उत्कट, भावश्रीमंत शैलीत!
१९७१ ची रात्र.
शांत असलेले, अंधारात अधिकच दिसेनासे झालेले, काळ्या दगडी बांधणीचे भिलवडी रेल्वेस्टेशन.
कसलीच जाग नव्हती.
सिग्नल्सचे हिरवे-तांबडे दिवे. काळोखात तरंगत असल्यासारखे.
दोन चाळीसला जनता एक्स्प्रेस येणार होती. त्या बेतानं मी आणि माझा लहानगा भाऊ श्रीधर औदुंबरातून जीप घेऊन स्टेशनवर आलो. उद्याला, संक्रांतीला भरणाऱ्या आमच्या औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनासाठी कवी अनिल अध्यक्ष म्हणून येणार होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी आलो होतो.
अनिलांना मी पाहिलेलं नव्हतं. पण त्यांची छायाचित्रं मी पाहिलेली होती. त्यांचे ‘पेर्तेव्हा’, ‘सांगाती’ हे कवितासंग्रह मी आवडीनं वाचले होते. त्यांच्या ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध होत असलेल्या, मोह घालणाऱ्या लयीतल्या दहा-दहा ओळींच्या अवीट कविता मी वाचत होतो.
मी त्यांना पाहून ओळखेन या विश्वासानं त्यांना आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि मी ती आनंदानं स्वीकारली होती. अनिलांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांचंही ‘मोळी’, ‘माध्यान्ह’, ‘चंद्रास्त’, ‘मराठी कादंबरी : पहिले शतक’ आदी लेखन मी वाचलेलं होतं.
आम्हाला पुष्कळ वेळ थांबावं लागलं.
गाडी दीड तास उशिरा पोचणार होती.
जवळजवळ गाडी यायला चार वाजणार होते.
आम्ही स्टेशनच्या इमारतीच्या बाहेर येऊन उभे राहिलो. वरती आकाश चांदण्यांनी लकाकत होतं. ते मुग्ध होऊन बघत होतो.
पहिला कोंबडा आरवला.
समोर पुष्कळ टांगेवाल्यांची घरं होती. त्यातले नेवर्ती, तुकाराम असे काही टांगेवाले माहीत होते. पण त्यांचं जग झोपलेलं होतं. बाहेर बांधलेल्या घोडय़ांना आता जाग येत चालली होती. काहीतरी काहीतरी त्यांच्या हालचाली चालल्या होत्या. त्यांतलं एक घोडं अवचितच खिंकाळलं. त्याला काय झालं होतं, कोण जाणे. त्याच्या खिंकाळण्यानं अवतीभवतीचा परिसर थरकला. क्षणभरानं दुसरं एक घोडं खिंकाळलं. दोन घोडय़ांतला तो काहीतरी संवाद असावा.
प्राण्यांतले, पक्ष्यांतले संवाद आपल्याला आकळू येत नाहीत याचा विषाद मनात नेहमीप्रमाणं उतरत राहिला.
आणि दूरातून धडाडत येणाऱ्या गाडीचा आवाज जाणवू लागला. हळूहळू आवाज मंद करत गाडी स्टेशनात शिरली.
पहिल्या वर्गाच्या डब्यावर लक्ष देता देता उभ्या असलेल्या अनिलांना मी ओळखलंच. डब्याच्या दारात एका दाढीवाल्या गोऱ्यापान गृहस्थांशी बोलत उभे.
रूपेरी पांढरे केस. गोरटेले.
निळा-काळा सूट. पूर्वकालात ते न्यायाधीश होते.
विचारताच म्हणाले, ‘‘हो. हो. मी अनिलच.’’
जीपमधे बसल्यावर त्यांनी माझं नाव विचारलं.
‘‘नाव ऐकल्यासारखं वाटतं. लेखन करता काय?’’
मी ‘हो’ म्हटलं.
त्यांना म्हटलं, ‘‘हा माझा भाऊ. त्याला कविता फार आवडतात.
तुम्हाला पहिल्यांदा बघायचं म्हणून जागरण करून माझ्याबरोबर आलाय.’’
तो एवढासा. दहा-बारा वर्षांचा. शिडशिडीत. गोरा. रूपवान. अबोल.
अनिलांनी त्याच्याकडं बघून घेतलं.
म्हणाले, ‘‘मी याच्याएवढा असताना मला कवितेची गोडी लागली होती.’’
अनिल म्हणाले, ‘‘गाडीत झोप काही लागली नाही. मला दोन वाजायच्या पुढं नेहमी झोप लागते. पण दोन चाळीसला जनता एक्स्प्रेस भिलवडीला येणार म्हणून उचक्यानं जागा राहून राहिलो. गार्डला उठवायला सांगितलं होतं. तो कऱ्हाडला सांगत आला- गाडी दीड तास लेट असल्याचं.’’
मी त्यांना म्हटलं, औदुंबरला गेल्यावर त्यांनी थोडं झोपावं. उजाडायला उशीर असेल.
अंधूक अंधूक दिसत होतं.
पहाटेपूर्वीची पहाट होत होती वाटतं.
टार रोडवरनं आमची जीप धावत होती.
अनिल भवतालचा भूगोल विचारत होते.
सगळा पंधरा-वीस मिनिटांचा रस्ता होता.
खंडोबाची वाडी. माळवाडी गेली. ब्रह्मनाळची पांद. भिलवडीचा पूल. खाली कृष्णा वाहत होती. डाव्या हाताला भिलवडीचा प्रसिद्ध घाट. नदीत उतरायला लागलेला. खालून अगदी वरच्या उंच पायरीवर ठेवलेली सुपारी दिसावी अशी बांधणी. स्त्रियांना पाणी भरून नेणं सोपं व्हावं अशी रुंद पायऱ्यांची रचना.
पूल ओलांडला.
मळ्यांकाठची वस्ती आली.
पहाटेच्या थंड हवेत कोंबडे उंचावून ओरडू लागलेले. एक ओरडला की पाठोपाठ दुसरा. तिसरा.
अनिल म्हणाले, ‘‘यांची आरवण्याची स्पर्धा सुरू झालेली दिसते.’’
औदुंबरात पोचलो. कवी सुधांशु यांच्या घरी.
अनिलांनी अंग थोडंसं सैल केल्यावर सुधांशुंनी विचारलं, ‘‘चहा आणू दे ना?’’
‘‘वाऽ वा. आणा नं. पण यावेळी घरच्या माणसांना कशाला जागं करता?’’
‘‘हे करणं किती आनंदाचं आहे!’’ सुधांशु म्हणाले.
अनिल म्हणाले, ‘‘मी आता थोडी झोप घेतो.’’
पण बोलणी निघता निघता त्यांचा झोपायचा विचार मावळला. भिलवडीच्या घाटाच्या संदर्भात त्यांना त्यांनी पाहिलेले सुंदर घाट आठवले. अहल्याबाईंचं नाव निघालं.
‘‘आज कोठे नवीन घाट बांधले जातात का? बहुतेक कोठे नाहीत.’’
अनिलांनी पानाचं खानदानी साहित्य बाहेर काढलं.
‘‘रामटेकचं पान आता इतिहासजमा झालं. ती जातच मेली. बोअर नावाचा किडा असतो. वेल मांडवावर चढली आणि हजारभर पानं वर लागली, की हा किडा वेलीच्या खालून मूळच कातरतो..’’ अनिल म्हणाले.
पानांवरून संशोधनावर बोलण्यानं वळण घेतलं.
सुधांशु म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीविषयीच्या तुमच्या ‘किलरेस्कर’मधल्या लेखानं पुष्कळांची उत्सुकता वाढली आहे.’’
‘‘मला नाही वाटत, ते लोकांना इतक्या लवकर पटेल असं. काळ जावा लागेल. पण मी जिद्दीचा माणूस आहे. एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागलो की ते सोडायचं नाही. आयुष्याची जी काय पाच-सात र्वष उरली असतील ती या कारणी लावायची.
‘‘संशोधन करायला नको. ती दृष्टीच नाही आपल्या लोकांकडे. माझा दृष्टिकोन आशावादी आहे.. सांकलिया यांचे आणि माझे पुरातत्त्व संशोधनाच्या संदर्भात अनेकदा मतभेद झाले आहेत. ही माणसं ज्याचा प्रत्यक्ष पुरावा हातात मिळत नाही ते घडलंच नाही असं म्हणतात. उदाहरणार्थ रामायणातल्या गोष्टी. ते म्हणतात, भारतापासून लंकेचं इतकं मोठं अंतर. त्यावर सेतू बांधणं शक्यच नव्हतं. यावर मी त्यांना, १८ व्या शतकात पोर्तुगीज जहाज भारत आणि सिलोन यांमधून येताना अडकत होतं, इतका तो भाग अरुंद होता, हा उल्लेख दाखवला.
‘‘ख्रिस्तपूर्व दोन हजार र्वष तरी रामायणाचा काळ असेल की नाही? त्यावेळी लंका आणि भारताचं टोक यांत आजच्याइतकं अंतर असेल का?
‘‘तसंच रामायणकालीन घरांसंबंधी. पाच- पाच मजली घरं त्याकाळी वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं शक्य नव्हती असं त्याचं म्हणणं. पण ही घरं संपूर्ण लाकडाची होती असं मला वाटतं. या घरांचं एक तंत्र असे असं मला वाटतं. उत्तम जुनं लाकूड परीक्षा करून घेऊन, ते खोल पाया काढून त्यात रोवलं जाई. पाणी लागेपर्यंत पाया काढला जाई; आणि तो मजबूत बांधून त्यावर घराचा डोलारा उभा केला जाई. मोर्डीला तुम्ही चला. आजही संपूर्ण लाकडाचे वाडे तुम्हाला मी दाखवीन. आज तुम्हाला रामायणकालीन वाडय़ांचे अवशेष काय मिळणार? जळून गेलेल्या लाकडांची राख!
‘‘मी सांकलियांना म्हटलं, ‘तुम्हाला तत्कालीन वाडय़ांचे अवशेष हवे असतील तर अशा पायासाठी खोदलेल्या विहिरी मिळताहेत का ते शोधा.’ सांकलियांना माझं म्हणणं तर्कशुद्ध वाटलं आहे.’’
अनिल पुढं म्हणाले, ‘‘संशोधनाच्या दिशा चुकताहेत असं मला पुष्कळदा वाटतं. व्हावं तसं संशोधन होत नाही. पुष्कळशा महत्त्वाच्या मूर्ती, पोथ्या, ग्रंथ अजून असंशोधित आहेत. ते अजून मिळतील असं वाटतं. पूर्वी परचक्र आलं की शहाण्या माणसांनी कोठे ना कोठे गोष्टी दडवल्या. आमच्याकडे मेहेकर या गावी एक मूर्ती नुकतीच सापडली. पद्मपुराणातल्या वर्णनाप्रमाणं ती हुबेहूब आहे. जुन्या गढीचा ढीग म्हणून तिच्याकडं पाहिलं जाई. त्या दिशेनं आरती करायचा प्रघात होता. पण ती का, कशासाठी, ते काही पिढय़ांनंतर लोक विसरून गेले. त्याचं संशोधन करावं असं कुणाला वाटलं नाही. योगायोगानं ती सापडली. तुमच्याकडे ‘गढी’ ही संस्था नाही. वऱ्हाडात त्या तुम्हाला दिसतील. पूर्वी पेंढारांचे हल्ले येत. हल्ला आला की उंच गढय़ांवर आपल्या चीजवस्तू घेऊन लोक जात. वर दगड ठेवलेले असत. ते पेंढारांना मारण्यासाठी.’’ मेहेकरच्याच ना. घ. देशपांडे यांच्या कवितेत गढीचा उल्लेख आहे तो मनात आठवत होता : काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे..
सुधांशु म्हणाले, ‘‘औदुंबरला इथं डोहात ‘सिद्धमठ’ आहे. नेहमी पाण्याखाली असलेला. उन्हाळ्यातही त्याच्यावर पाणी असतं. उन्हाळ्यात त्याच्या पाण्यातल्या चौथऱ्यावर उतरता येतं. पण खोल पाण्यात आत काय आहे कळत नाही. त्या सिद्धमठाच्या दिशेनं आम्ही काठावरून आरती म्हणतो.’’
अनिल म्हणाले, ‘‘त्याचं संशोधन करायला हवं. सिद्धमठाचा उल्लेख कुठं झाला आहे?’’
‘‘ ‘कृष्णामाहात्म्य’ ही संस्कृत हस्तलिखित पोथी मी पलीकडच्या आमणापूर या गावातून आणून वाचली होती. ती पोथी ‘गुरुचरित्रा’च्या आधीची. पाच-सहाशे वर्षांपूर्वीची आहे. अजून ती छापली गेलेली नाही.’’ सुधाशुंनी सांगितलं. ते पुढं म्हणाले, ‘‘पाच-सहाशे वर्षांपूर्वी कृष्णेचा प्रवाह सिद्धमठाच्या पलीकडून वाहत असावा. आता तो मठ पाण्यात गेला असावा.’’
अनिल म्हणाले, ‘‘संशोधनात अनेक अडचणी असतात. मी सातारच्या िखडीतल्या गणपतीचं संशोधन करावं म्हणतोय. तिथल्या मंडळींनी मान्य केलं, पण तिथल्या पुजाऱ्यांनी हरकत घेतलेली दिसतेय. बघू या, काय होतंय ते. मी पेरिस्कोपिक कॅमेरा मागवला आहे. आता ही हरकत उपस्थित झालीय. औरंगजेबच्या स्वारीच्या वेळी मूळ मूर्ती आत लपवली गेली; आणि बाहेरच्या भिंतीवर शेंदूर माखला गेला. त्याचाच गणपती झाला असावा. पूर्वीच्या मूर्ती रत्नजडित असत. कदाचित हीही मूर्ती तशी असेल. पाहायला हवे.
‘‘रत्नागिरीजवळ महाड रस्त्यावर गुळे नावाचं लहानसं गाव आहे. तिथंही असाच गणपती असावा असा कयास आहे. त्यासाठी गुळ्याच्या ग्रामस्थांनी मला बोलावलं आहे. मी त्यांना सांगितलं, तुमची सगळी तयारी असेल तर मी येतो. निदान आत काय आहे याचं निश्चित चित्र तरी तुम्हांस मिळेल की नाही?’
‘‘ज्ञानेश्वरमाऊलींच्या समाधीविषयी माझं हेच म्हणणं आहे. ज्ञानेश्वरमाऊलींचा मीही भाविक आहे. ‘अमृतानुभवा’चा मी सखोल अभ्यास केला आहे. ज्ञानेश्वरमाऊलीनं संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधीविषयी मला अजून वाचायला मिळालेलं नाही. माझ्या ओळखीतले एक गृहस्थ आहेत. अध्यात्मशास्त्राचं त्यांनी चांगलं वाचन केलं आहे. या समाधीविषयी त्यांनी वाचलं आहे. पण कोठे, ते त्यांना आठवत नाही. पण आठवून सांगतील. निरनिराळ्या संप्रदायांचे निरनिराळे साधनेचे, समाधीचे प्रकार असतात. ते सगळं एकटय़ाला वाचून शोधणं शक्य नसतं.
‘‘ज्ञानेश्वरमाऊली तिथून दैवी शक्तीनं अंतर्धान झालेली असली तर, तरी नामदेवांनी वर्णिलेलं समाधीच्या आतल्या भागाचं, तिथल्या ओटय़ाचं जरी छायाचित्र मिळालं तरी खूप नाही का? नामदेवांचे अभंग जे काल्पनिक मानतात- त्यांना उत्तर मिळेल की नाही? पाश्चात्त्य देशांत अशा संशोधनांना कोणी विरोध करत नाही.’’
बोलता बोलता उजाडत आलं.
अनिलांनी सकाळचं सगळं आवरायला सुरुवात केली.
खाणं झालं.
त्यांना नदीवर आंघोळ करायची होती.
नदीपलीकडं उभं असलेलं, तेराव्या शतकातलं हेमाडपंती भुवनेश्वरीचं मंदिर बघायचं होतं.
भुवनेश्वरीच्या देखण्या मूर्तीचं, मंदिराच्या हेमाडपंती रचनेचं, प्राकारात असलेल्या अन्नपूर्णेच्या दगडी शिल्पाचं, वेताळ, हनुमान आदी मूर्तीचं अनिलांना अप्रूप वाटत होतं.
त्यांच्याबरोबर सुधांशु, प्रसाद जोशी आदी मंडळाचे सदस्य असे आम्ही मंदिराची चढण उतरत नदीकडे चाललो. धनगावहून मंडळाचे उपाध्यक्ष, मराठीतले प्रसिद्ध ग्रामीण लेखक म. भा. भोसले येऊन आम्हाला मिळाले. अनिलांना पाण्यातल्या ‘सिद्धमठा’कडे जायचं होतं. तिकडं नाव घेतली. सिद्धमठाच्या चौथऱ्यावर आम्ही उतरलो. अनिलही उतरले. गुडघाभर पाणी होतं. सिद्धमठाची मर्यादा संपली की डोहाचं खोल पाणी सुरू होत होतं. पाण्यात असलेली ही प्राचीन मंदिराची जागा अनिलांना रहस्यमय वाटत राहिली. ‘‘हे काय आहे, ते शोधलं पाहिजे,’’ म्हणाले. पलीकडं नाव निघाली होती. काठाला औदुंबराचे- उंबराचे खूप वृक्ष होते. औदुंबराच्या झाडांनी वेढलेलं गाव म्हणून गावाचं नाव- औदुंबर. अनिलांनी उंबर या झाडाच्या किती जाती आहेत ते सांगितलं.
नंतर नावेतच म. भा. भोसले यांनी त्यांच्या ‘उघडय़ा जगात’ या कादंबरीचा विषय काढला. अनिलांना ते म्हणाले, ‘‘माझ्या या कादंबरीवर ‘जिवाचा सखा’ चित्रपट निघाला. अनेक वृत्तपत्रांनी या कादंबरीवर चांगले अभिप्राय छापले. ‘मौज’ साप्ताहिकानंही या कादंबरीची प्रशंसा केली. पण अलीकडंच कुसुमावतीबाई देशपांडे यांनी ‘सत्यकथा’ मासिकात दोन भागांत मराठीतल्या कादंबरी- लेखनाचा प्रदीर्घ आढावा घेतला आहे. त्यांनी अनेक उल्लेखनीय कादंबऱ्यांची नावे दिली आहेत. मात्र, माझ्या कादंबरीचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. यासंदर्भात मी कुसुमावतीबाईंना पत्र लिहिलं. त्याची त्यांनी पोचही दिली नाही. नंतर ‘आमच्यासारख्या खेडय़ातल्या लेखकांना दुर्लक्षानं मारलं जातं,’ असे पत्र मी ‘मौज’ साप्ताहिकाला पाठवलं. ते पत्र त्यांनी छापलं. पण कुसुमावतीबाईंनी माझ्या लेखनाची कसलीच दखल घेऊ नये याचं मला वाईट वाटलं.’’
अनिल म्हणाले, ‘‘प्रत्येकाची वेगळी आवड-निवड असते. लेखकानं समीक्षकाच्या विशिष्ट दृष्टिकोनाचा एका मर्यादेपलीकडे विचार करू नये. आपली आपण वाट चालावी. कुसुमावतीबाईंनी तुमच्या लेखनाचा उल्लेख केला नाही तरी ते त्यांचं एकटीचं मत. तुमच्या कादंबरीची खूप वाहवा झाली आहे यात समाधान मानून आपलं लेखन करत राहावं, हे श्रेयस्कर. आणि कोणताही समीक्षक, हा लेखक खेडय़ातला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. कुसुमावतीबाई तर नाहीतच नाही.’’
हळूहळू आम्ही मंडळाच्या कार्यालयात आलो. दुरून दुरून रसिक अनिलांना भेटायला येत होते.
सदानंद सामंत या औदुंबरातल्या प्रतिभावंत लेखकानं वाङ्मयाची, निरनिराळ्या कलांची आवड भोवतीच्या तरुणांत निर्माण केली. सुधांशु, म. भा. भोसले अशी नामवंत मंडळी त्यातूनच उदयास आली.
वडाखालचं आवार रसिकांनी भरून गेलं होतं.
आणि अनिलांच्या भाषणासाठी, कवितावाचनासाठी सगळे उत्सुक झाले होते.
-- संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
## Atmaram Raoji Deshpande alias Kavi Anil
September 15, 2017
पावसाळा सुरू झाला की निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते. ठिकठिकाणी निसर्ग खुलून जातो, हिरवीगार वनराई फुलू लागते, फुलांच्या गालिच्यांनी धरती परत एकदा आपलं शरीर मुक्तपणाने सजवते पण त्यास माणूस एक संधी म्हणून त्याची ओढ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी करून घेतो आणि पावसाळा मृत्यूचे द्वार उघडायला कारणीभूत ठरतो.
October 18, 2021
विशालता ही प्रगतीची व्याख्या होऊ शकते, विशालता ही दिसण्यास जरी भव्य वाटली तरी त्याने आपल्याला खरंच काही मिळते का?
December 20, 2021
तो निश्चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. तो निर्जीव आहे . पण सजीवागत बोलतो. गप्पा करतो गुराख्यांशी. डावात सहभागी होतो. विटी-दांडू, गोट्या, लोकरीचा खेळ, नसता चिर्रऽ घोडी. गुरं रानोमाळ पांगलेली. गच्च फुगलेली. तिथेच आम्ही घेतो कागद आणि कागदावर उतरत जातात कविता. अभिव्यक्त होणं. गाव टप्प्यात असतंय. वस्ती नजरेत भरते. झाडात हरवलेलं.. बारीक सुंदर नक्षी दिसते रानाची. नदीची. बगळे रांगेत बागडतात. साप, सरडे, पाली, उंदीर, घोरपड हे घेतात आनंद. तसे हरण, ससा, साळिंदर, उदमांजर सर्वच बोलतात एकमेकांशी. तो आहे डोंगर. त्याचं नाव डोबीचा डोंगर. कृषकांचा, पशुपक्ष्यांचा आवडता. तसा माझाही आवडता. उन्हाळा, पावसाळा येतो. ऋतू बदलतात. तो अढळ असतो. साहित्य निर्माण झाले तिथे. भरभरून उतरवल्या कथा, कविता कागदावर तशा मनात. तो कलाटणी देऊन गेला. स्थिर उभा राहा माझ्यासारखा, असाच संदेश देत असतो मला. आता फिरकत नाही सहसा तिकडे मिळेल वेळ तसा दूरवरूनच पाहतो त्याला. तो जसा होता तसाच आहे नक्षीदार. आठव असतो सोबतीला त्या दिवसांचा..
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
मो.9421442995
November 20, 2016
बाळाप्पा खोत बऱ्यापैकी श्रीमंत. दहा एकराचा काळ्याभोर मातीचा मळा, त्यात असणाऱ्या दोन तुडुंब भरलेल्या विहिरी. एक विहिरीला पंप तर दुसरीला मोट, शेताला पाणी पाजवून हिरवं गार करायची आणि बाळाप्पाचा खिसा नोटांनी भरत ठेवायची.
February 5, 2026
मुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
January 14, 2024
January 31, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti