नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात 'ए.क.कवडा' या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा 'ए.क.कवडा' नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहिर केले की 'ए.क.कवडा' म्हणजे ग.दि.माडगूळकरांचे हे लेखन होते.यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!.
पु.ल.देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक,त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते,त्यावर गदिमा भाष्य करतात
"पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"
गो.नी.दांडेकर तर दुर्गप्रेमी,चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती,त्यांच्या बद्दल
"चाले त्याचे दैव चालते,चढतो,त्याचे चढते
माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!"
कविवर्य मंगेश पाडगावकर,काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे,त्याकाळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत त्यावर गदिमा चिमटा काढतात
"तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले
घेऊ धजती इज्जत कैसी 'लिज्जत पापडवाले'"
दुर्गाबाई भागवतांबद्दल...
"जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां
दुर्गे,दुर्गे,सरले दुर्घट,आता हो शान्ता"
गोमंतक निवासी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता,त्यावर
"बोरीच्या रे बोरकरा,लेक तुझी चांगली
गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?"
राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते 'रा.नि.बढे' आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले 'राजा बढे',पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे 'राधे तुझा सैल अंबाडा' हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले...
"कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?
आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?"
रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत
"गिरीशांची ही गर्द 'आमराई'
त्यात उघडी यशवंत पाणपोई"
स्व:तालाही त्यांनी सोडले नाही!,गदिमांना गीतरामायणामुळे 'आधुनिक वाल्मिकी' म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं,गदिमांच्या हातात कुर्हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..
"कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा
काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्व पहिला धंदा?"
-- सुमित्र माडगूळकर
लवकरंच बाजारात येणारी नवीन पुस्तके. आजच आपली प्रत राखून ठेवा. यातील काही पुस्तके हातोहात खपतील तर काही कदाचित आंदोलकांकडून जाळली जातील...
छगन भुजबळ - अनुभव :- "बारामतीच्या करामती"
विजय मल्ल्या :- "विश्व कर्जाचे - कर्ज तुमचे सल्ला माझा"
शरदचंद्र पवार - व्यक्तिचित्रे :- "मी टिपलेली माणसे"
निखील वागळे - नाटक :- "मालकाची जात
अजित पवार - आत्मकथा- "स्वत:ची मोरी"
कुमार केतकर - लघुकथा :- "अर्णब - एक दुःस्वप्न आणि इतर"
राज ठाकरे -
1) "जाळाईदेवी माहात्म्य" (पोथी)
2) गगनभेदी थापा
उद्धव ठाकरे - रहस्यकथा :- "कमळाबाईचे प्रेम"
पंकजा मुंडे - "चिक्कित पडली मक्खी" (लहान मुलांच्या कविता)
नारायण राणे - "च्या राण्या ची कोंबडी"
किरीट सोमय्या - कादंबरी :- "छगनवेध"
देवेंद्र फडणवीस - मानसशास्त्र :- "शून्यातून विश्व"
एकनाथ खडसे - "आल अंगावर बेतलं शिंगावर"
पृथ्वीराज चव्हाण - लोकनाट्य अनुवाद (मूळ लेखिका: सोनिया गांधी) :- पोरान लावला घोर
आणि ...
विनोद तावडे - शिक्षणाच्या आयचा घो Part-II
रामदास आठवले - कवितासंग्रह (हिंदी) :- "ढाणेवाघ की बेडूक उडी"
स्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मृत्यू : मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले.
स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारलेला ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ नावाचा एक दृक्श्राव्य कार्यक्रम आहे.
स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५ वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.. .
-- विनय महाले
एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस ठेवला .
काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .
दुसरा मात्र उडेचना.
राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी. एक भरारी घेतोय दुसरा थंड.
काय करावे.. काय करावे..?
राजाने दवंडी पिटविली, गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत आला, बघतो तो दुसरा गरुड पहिल्या पेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. हे अजब घडले कसे ? आणि केले तरी कोणी !
एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला, "महाराज मी केले."
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,
दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.
तात्पर्य :-
आपली फांदी कधीतरी सोडून बघा.
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.
Change ur thought.....
May change ur life....
"विचार बदला, आयुष्य बदलेल"
comfort zone मधुन बाहेर पडा. आहे त्या परीस्थीतीत जीवनाचा आनंद घ्या ....
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.
जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.
कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.
काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अधिक दांडी हातात राहून कॅल्फी गाळून जमीनी वर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.
झोप पूर्ण होऊन सुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.
हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.
बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहाणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.
आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्या वर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.
फ्रुटी पिऊन झाल्या नंतर स्ट्रॉने शेवटच्या थेंबा पर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.
चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.
जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.
ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"
माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय !
माझी आजी म्हणजे माहेरची "द्वारका" ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, तरी "द्वारकाकाकू, द्वारकामावाशी" ह्याच नावाने सर्वत्र सुपरिचित होती. एकोणीसशे दहा सालचा तिचा जन्म ! त्या काळामध्ये लवकर विवाह व्हायचे. लाक्षणिक शालेय शिक्षण जरी नसले, तरी ती आदर्श गृहपत्नी होती.
शिवनेरी, लेण्याद्री जिथे आहे ते जुन्नर हे माझे आजोळ ! तेथील वरल्या आळीमधील श्री मुरलीधराचे मंदिरात ज्येष्ठी पौर्णिमेला तीन दिवसांचा हा उत्सव असायचा . माझी आजी तीन दिवस उपवास करायची. त्यावेळी वट सावित्रीच्या ह्या ३५० ओव्या, तीन भागामध्ये अर्थात तीन दिवसात, ती म्हणायची आणि ते ऐकण्यासाठी खूप गर्दी व्हायची. आजीचा आवाज गोड होता, श्लाघ्य होता, आजही तिचा तो मधाळ स्वर कानामध्ये घुमतोय !
नंतर काही वर्षे, पुण्यातील सदाशिव पेठेतील श्री खुन्यामुरलीधर मंदिरात तिने वटसावित्रीच्या ओव्या म्हणल्या होत्या. दिनांक १०, ११, १२ जून १९६८ ह्या तीन दिवसामध्ये माझ्या आजीने, तीन भागातील ह्या वट सावित्रीच्या ओव्या, पुण्यातील शनिवार पेठेतील गोळे राम मंदिरामध्ये सादर केल्या होत्या. त्याचे वार्तांकन आणि छायाचित्र, पुण्याच्या सकाळच्या सि. पु. थत्ते ह्यांनी केले होते, १३ जून १९६८ रोजी "सकाळ"मध्ये ते प्रसिद्ध झाले होते ! फोटोमध्ये आजीच्या डावीकडे, ओव्या लिहिलेली वही उघडून बसलीय ती माझी आई, उषा पंडित चिंचोरे !
जुन्नरच्या सराई पेठेमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा घाटपांडे पारुंडेकर मावशी ह्या तिच्या नातेवाईक, त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून मौखिक पद्धतीने "वटसावित्री"च्या ओव्या शिकल्या होत्या. त्या पारुंडेकर मावशींनी माझ्या आजीची जिद्द हेरून, तिला ह्या ओव्या शिकविल्या. माझी "आनंदीआजी घरातील सगळी कामे झाल्यावर, दररोज दुपारच्यावेळी पारुंडेकर मावशींच्या घरी जायची. त्या माझ्या आनंदी आजीला रोज एकेक ओवी म्हणून दाखवायच्या. ते ऐकून, माझी आजी ती ओवी घोकून घोकून पाठ करायची. विशेष म्हणजे, ओव्या शिकवत असतांना, पारुंडेकर मावशी माझ्या आनंदी आजीच्या पुढ्यात, त्यांचे निवडणं-टिपणं ठेवायच्या. आजी एकीकडे ते काम करता-करता, "परळी-आडणी या विस्तारली ताटं" अश्या ओव्या पाठ करायची. ओवी पाठ झाल्यावर, माझी आजी आपल्या स्वतःच्या घरी यायची की संध्याकाळची कामं - तेलवात, कंदील तयार ठेवणे, अशी कामे करायची. दुसया दिवशी दुपारचेवेळी, आजी मावशींच्या घरी गेल्यावर, आधल्या दिवसाची ओवी आधी म्हणून दाखवायची मग पुढची ओवी शिकायची, अश्या मौखिक पद्धतीने "वट सावित्रीच्या साडे तीनशे ओव्या" तोंडपाठ व्हायला तिला सहा महिने लागले !
आनंदी आजीची अफाट स्मरणशक्ती शेवटपर्यत तल्लख होती. आज मनात विचार येतो, आजकाल साक्षर मुलांना सर्व सुख-सुविधा उपलभ्द असूनसुद्धा साधी तीन कडव्यांची शाळेच्या पुस्तकातील कविता पाठ नसते.
"आनंदी"आजी नाव सार्थक करणारी होती, माझे आजोळ जणू "द्वारका" नगरी होती ! माझ्या आजीची गणपतीवर भारी श्रद्धा होती. गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय तिच्या मुखाखाली कधीही घास उतरला नव्हता. "मोरया मोरया" असा अविरत जप करणा-या माझ्या आजीला देवाज्ञा झाली, ती सुद्धा भाद्रपद चतुर्थीला १५ सप्टेंबर १९७२ रोजी आणि तेही अहेवपणी, जणू तिने घेतलेल्या, सत्यवान सावित्रीच्या वश्याची सांगता झाली !
-- उपेंद्र चिंचोरे
19 june 16
बंगालमधील थोर समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर हे त्यांच्या कनवाळूपणाबद्दल खूपच प्रसिद्ध होते. त्यांचा हा कनवाळू स्वभाव लहानपणापासूनच होता.
ईश्वरचंद्र विद्यासागर आपल्या शाळेतील गोरगरीब मुलांना नेहमीच मदत करीत. एकदा हिवाळ्यात अतिशय कडक थंडी पडली होती म्हणून ईश्वरचंद्रांच्या आईने खास बाजारात जाऊन उबदार लोकर आणली व त्या लोकरीचे ईश्वरचंद्रांसाठी स्वेटर विणल व तो स्वेटर घालून ईश्वरचंद्रांना शाळेत पाठविले. सकाळच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या ईश्वरचंद्रांना रस्त्याच्या कडेला एक भिकारीण आपल्या लहान मुलासमवेत बसलेली दिसली. तिच्या मुलाच्या अंगात फाटके कपडे होते व थंडी सहन न होऊन ते रडत होते. ईश्वरचंद्रांना ते पाहून त्या मुलाची दया आली व त्यांनी मागचापुढचा कसलाही विचार न करता स्वत:च्या अंगातील नवा कोरा स्वेटर काढून त्या भिकारणीला दिला व त्या मुलाला घालायला सांगितला.
तो उबदार स्वेटर मुलाच्या अंगात घातल्यानंतर थंडी पळत्यामुळे त्या मुलाचे रडणे थांबले. ते हसू लागले. ते पाहून त्या समाधानाने ईश्वरचंद्र शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर ते जेव्हा घरी परतले तेव्हा आईने छोट्या ईश्वरचंद्राला त्याबाबत विचारले; तेव्हा त्याने तो स्वेटर भिकारणीच्या मुलाला दिल्याचे सांगितले. आर्हने त्याच्यावर रागावल्याचे नाटक केले व ती
म्हणाली, “या गोष्टीबद्दल मी तुला आता चांगला मार देणार आहे. त्यामुळे तुला नक्कीच वेदना होतील.” त्यावर शांतपणे ईश्वरचंद्र म्हणाले, “मी तुझ्या दृष्टीने अपराध केला आहे खरा; त्याबद्दल मला तू जरूर मार. मात्र या मारामुळे होणाऱ्या वेदना मला ते मूल थंडीत कुडकुडताना पाहिल्यामुळे झालेल्या वेदनांपेक्षा नक्कीच कमी असतील” छोट्या ईश्वरचंद्रांचा तो कनवाळूपणा पाहून आईने त्याला मार तर दिला नाहीच; उलट जवळ घेऊन त्याचे कौतुक केले.
आज शैलेंद्रला जाऊन पन्नास वर्षं झाली. त्याच्या जीवनाच्या शोकांतिकेवर आतापर्यंत अनेकदा लिहिलं गेलयं. त्याचा शोकात्म शेवट आठवला की मन हमखास खिन्न होतं. म्हणून ठरवलं की आज त्याच्या फक्त आनंददायी आठवणींची उजळणी करायची आणि मस्त गाणी ऐकायची !! आणि मग जाणवलं की एक tragic end सोडला तर त्याचा सगळा कलाप्रवास म्हणजे एक "सुहाना सफर"* आहे.
मग मी गेलो या सफरीवर ....
मधुमती पासूनच सुरुवात केली :
मधुमतीमधलं, टूटे हुए ख्वाबोंने हमको ये सिखाया है हे काळजाला हात घालणारं गाणं त्यानं अवघ्या दहा मिनीटांत लिहिलं होतं आणि नंतर ते मधुमतीचं एक हायलाईटच बनून गेलं .
त्याच्या बंगल्याशेजारी हेमंतकुमारला चित्रपट दुनियेत सगळेजण, ''राजा 'साली'वाहन" असं म्हणायचे. कारण त्याच्या चार अविवाहित मेव्हण्या ( हिंदीत : साल्या) काही दिवस त्याच्या बंगल्यावर राहत असत. एके रात्री शैलेंद्र स्वतःच्या बंगल्याच्या गेटपाशी अडखळून पडला. त्याने मद्यपान केले होते . तो पडलेला पाहताच शेजारी गच्चीत उभ्या असलेल्या हेमंतकुमारच्या मेव्हण्या जोरात हसल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेंद्रनं गाणं लिहिलं :
जंगलमें मोर नाचा किसीने न देखा
हम जो थोडीसी पीके जरा झूमें...
रंगोली चित्रपट चालू असताना त्याचं आणि शंकर-जयकिशन यांचं थोडं भांडण झालं. हे तात्पुरतं भांडण रसिकांसाठी बरंच फायदेशीर ठरलं, कारण शैलेंद्र लिहिता झाला :
छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते है, तुम कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल .
बूट पॉलिशच्या एका सिच्युएशनवर, शैलेंद्र विचार करत, सोफ्यावर बसला होता. घरात काही पाहुणे आले होते.
तेवढ्यात त्याचा दोन वर्षांचा मुलगा, अर्धवट खाल्लेला लाडू, इवल्याश्या मुठीत धरून त्याच्या समोर आला आणि पाहुण्यांना पाहून सोफ्याच्या मागे लपला. तेव्हा पाहुण्यांनी त्याला विचारलं , 'बाळा, तुझ्या मुठीत काय आहे ?'
हे ऐकताच शैलेंद्रच्या लेखणीतून शब्द प्रकटले,
"नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमें क्या है
मुठ्ठीमें है तकदीर हमारी
हमने किस्मतको बसमें किया है"
कधी नव्हे तो एकदा 'राज कपूर' बरोबर वादविवाद झाला . शैलेंद्रनं लगेच आव्हान दिलं,
" हम भी है तुम भी हो दोनो है आमने सामने*"
( नंतरची ओळ मात्र चित्रपटाच्या प्रसंगाला साजेशी) .
आवारा ची कथा ऐकायला 'राज' त्याला, के ए अब्बास यांच्याकडे घेऊन गेला . अब्बास म्हणजे त्या काळातलं बडं प्रस्थं ! शैलेंद्र अगदीच नवखा ! अब्बासनी शैलेंद्रकडे बघितलं सुद्धा नाही. सलग दोन तास ते कथा 'सुनवत' राहिले. शेवटी राजने शैलेंद्रला विचारलं "क्यों कवीराज, कुछ समझमें आया?"
शैलेंद्र खाडकन म्हणाला ,
"गर्दीशमें था, आसमान का तारा था, आवारा था"
त्या दोघांनी चमकून शैलेंद्रकडे पाहिलं . या शब्दांनी फक्त टायटल साँग तयार झालं असं नाही तर चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचं स्वरूपही ठरुन गेलं.
पुढे हे गाणं रशियात सुद्धा इतकं लोकप्रिय झालं की तिथल्या 'कँसर वॉर्ड' या सुप्रसिद्ध कादंबरीदेखील या गाण्याचा उल्लेख आला.
" आवारा" नंतरच्या चित्रपटांत, राज कपूरच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करणारी बहुतेक सगळी गाणी शैलेंद्रनं लिहीली : मेरा जुता है जापानी, 'होटोंपे सच्चाई रहती है', ' मेरा नाम राजू घराना अनाम' इ. मुकेश हा राज कपूरचा 'प्रकट' आवाज होता तर शैलेंद्र हा 'आतला' आवाज !
एकदा शैलेंद्र आणि जयकिशन रस्त्यावर फिरत होते आणि समोरून एक अप्रतिम सौंदर्यवती येताना दिसली. 'ती पाहताच बाला कलीजा खलास झाला' अशी अवस्था जयकिशन यांची झाली. ते तिच्याकडे वळून वळून पाहत असताना, शैलेंद्र मागून उद्गारला :
'मुडमुडके न देख मुडमुडके
शैलेंद्रच्या अशा 'सुखद स्मृतींनी' मनात दाटी केली. मग, "घायल मनका पागल पंछी उडनेको बेकरार' मधील असह्य वेदना कुठल्या कुठे उडून गेली . "शैलेंद्र" म्हटलं की मनावर दाटून येणारी काजळी विरून गेली.
ताजंतवानं होऊन उठलो. "अनाडी"ची रेकॉर्ड काढली आणि लावली ,
के मरके भी किसीको याद आयेंगे
किसीकी आसूओंमें मुस्कुराएंगे
कहेगा फूल हर कलीसें बार बार
जीना इसीका नाम हैं
धनंजय कुरणे , कोल्हापूर
9325290079)
14.12.2016
"शके १९७८ च्या माघ महिन्यात दख्खन प्रांतात धामधूम उडाली होती. उधोजी राजांच राज्य खालसा करण्यासाठी आदिलशहा दहा लाखाची फौज घेऊन पुन्हा एकदा जातीने उतरला होता. आदिलशाही फौजेचं नेतृत्व देवा फडणविस नावाचा विदर्भातील ताज्या दमाचा सरदार करत होता.देवा फडणविस साध्या शिपायापासुन बारगीर, हवालदार , मनसबदार अशा पायऱ्या चढत चढत सेनापती पदापर्यंत पोहचला होता तर उधोजी राजांना राज्य वंशपरंपरागत मिळालेलं होतं. फडणविसाच्या दिमतीला शेलार मामा, विनोदराउ तावडा, किरीट बहाद्दर सोमय्या आदी बिनीचे शिलेदार होते. उधोजींची सारी मदार बाळ आदित्यराजे आणि समुद्री वारे अंगावर झेलत मोठा झालेला आगरी नाखवा मिलिंद नार्वेकरावर होती. घोडदळ, पायदळ, तिरंदाज, गोलंदाज अशी दोन्ही बाजूने जय्यत तयारी झाली होती.
नाशिकचा सुबेदार आणि उधोजींचा धाकटा भाऊ राजोजीने रसद आणि कुमक पाठवू का असा सांगावा घेऊन आपला पेशवा बाळाजी नांदगावकरनाथ राजधानी मातोश्री वर पाठवला पण उधोजी राजेंनी राजोजीसाठी "गर्दीस मेळल्यावीना तोंड देखिल दाखवू नकोस" असा उलट निरोप देऊन बाळाजीची बोळवण केली. पेशवा बाळाजी डोळ्यात अश्रु घेऊन राजगडावर परतला.
...............आणि एकदाची दोन्ही फौजांची गाठ साष्टीच्या बेटाजवळ पडली.एकच गर्दी झाली. गनिम चारी बाजुने हल्ला करू लागला पण उधोजी राजांनी स्वतः तोफेला बत्ती देऊन शत्रुला भाजुन काढुन बेजार केले. दक्षिण दिशेचा एक बुरुज लढवताना बाळ आदित्यच्या हल्ल्यात शेलार मामांचा धाकला बंधू ठार झाला हि खबर ऐकताच पिसाळलेल्या शेलारमामांनी ' तुमचा बाप इकडे मरुन पडला आहे आणि तुम्ही कुठे पळता' असं ओरडत उधोजींचा जवळचा सरदार राहुल शेवाळा याला जायबंदी करुन आपला बदला घेतला. अटीतटीची लढाई झाली.
दुपार पर्यंत हाडा मांसाचा चिखल झाला.रक्ताचे ओघळ पार दर्यात जाऊन मिळाले. कोणीच मागे हटत न्हवते. पण संध्याकाळ पर्यंत चित्र पालटू लागले. शत्रूने आपल्या राखीव फौजा बाहेर काढल्या आणि मराठी फौजा शत्रुच्या संख्येपुढं धाप टाकू लागलं.किती मोती गळाले आणि किती माणकं गर्दीत मिळाली याची मोजदाद करणं कठीण होऊन बसलं. प्रत्यक्ष रणांगणावरील खबर घेऊन जासुद टाकोटाक मातोश्री वर पोहचले. खलबतखान्यात आपल्या अष्टप्रधान मंडळासह बसलेल्या उधोजींना खबर देताना जासुदांना देखिल अश्रू आवरत न्हवते.
'राजं सध्या शिबंदी आणि रसद कमी आहे. गनिम अरबी घोडे आणि फिरंगी तोफांच्या जोरावर एकेक ठाणी काबीज करत चालला आहे. आपल्या जवळ हौसला आणि जिद्द भरपुर परंतु आत्ताच मराठी सैन्याजवळ खाण्यासाठी शिववड्याशिवाय काही उरले नाही, आदिलशाही फौजा ढोकळा फाफडा खाकरा खाऊन मस्तवाल झालं आहे. आपल्याला नुसत्या इरशिरीवर युद्ध जिंकता येणार नाहीच, पण अजून थोडा वेळ युद्ध चाललं तर आहे तेवढं राज्य सुद्धा हातातुन जाईल त्यामुळे आता आदिलशहा बरोबर सलाह करावा वेळ येईल तेव्हा आदिलशहाला बघुन घेऊ' असा पोक्त सल्ला उधोजींना अष्टप्रधान मंडळाकडून मिळाला.
मोठ्या कष्टाने आणि दुःखी अंतकरणाने आई भवानीला साक्षी ठेऊन उधोजी राजांनी सल्ला मनावर घेतला कारण पुनवडी, वसई, वऱ्हाड, विदर्भ येथील सगळ्या किल्ल्यांना शत्रू गिळंकृत करून बसला होता. पुन्हा उभं रहायचं असेल तर आत्ता जगणं महत्वाचे होते." बचेंगे तो और लडेंगे" म्हणणारा दत्ताजी त्यांना आठवला आणि .................
सालीना चाळीस हजार होन उत्पन्न असलेली साष्टीची बेटं उधोजी राजांना आणि खानदेश वऱ्हाड बारा मावळासह तीन लाख होनांचा प्रदेश आदिलशहाला या बोलीवर शके १९७८ साली तह यशस्वी पार पडला."
रडत राऊत बखर
तुषार दामगुडे
( खोटा इतिहासकार )
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटीड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आपल्यामुळे मिळणारं सुख मोठं का खर्चल्यामुळे मिळणारं हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युरल, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही!! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमावावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही.
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो.
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर', आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!
Copyright © 2025 | Marathisrushti