शब्दांच्या मायावी सागरात
मुक्त पणे विहरावे...
उपहासाच्या लाटांना
हलकेच शिताफीने चुकवावे
अंतर्मनी विश्वासाचा
रहावा कायम खोलावा
विरहाचा खोल भोवरा...
अलगद पणे चुकवावा
आनंदाच्या तुषारांनी
रोमांचित होउन उठावे
अपमानाचे ते शिंतोडे...
अलगद पुसून काढावे
उन्मादाच्या फेसाळ बुडबुड्यास
व्यर्थ हवा नाही द्यायची
अहंकाराच्या दगडाची ठेच...
तटस्थ पणे चुकवायची
कौतुकाच्या वर्षावांनी
हर खुन बहकुन नाही जायचं
वादळी आरोपांच्या कणांनी
घायाळ नाही व्हायचं
दुःखाच्या ओल्या वाटांवर
जरा सावरुन चालायचं...
वैफल्याच्या शेवाळावरुन
घसरून नाही पडायचं
संतापाच्या त्या महापुरानं
विध्वंस न करता सरावे
अन् भावनांच्या धबधब्याने
जख्मी न होता पडावे
मुक्त बेधुंद वाहताना
वसा शिस्तीचा नाही सोडायचा
काठावरचा मायेचा ओलावा...
नाही कधी वाळु द्यायचा
मनातील कपटाचा
सद्-भावनांनी निचरा व्हावा
अंतरी सदैव प्रेमाचा
निर्मळ झरा वाहत रहावा...
- डॉ. सुभाष कटकदौंड
जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली
चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली
जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे
अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे
विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता
बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता
असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी
नशीबाला परी दोष न देता, चालत राहा एकाग्रतेनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कारूण्यामधूनी उगम पावला आद्य काव्याचा झरा
वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे, मानाचा मुजरा....१,
गमविले नाही व्यर्थ प्राण ते, व्याध बाणा पोटीं
टिळा लावला काव्यश्वरीने, मानाने तुझ्या ललाटी...२,
हृदयस्पर्शी जी घटना घडली, तडफड तव होता
कंठ दाटूनी शब्द उमटले, पद्य रूप घेता....३,
उगम पावता काव्य गंगा ही, वाहू लागली भूलोकी
वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका, अशांचे आली मुखी....४,
काव्य प्रवाह हा सतत वाहे, किती जणांच्या शब्दामधूनी
अंशरूपाने काव्यश्वरी ही, बरसे व्यक्त होवूनी...५.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नतमस्तक मी जन्मोजन्मी त्याच्या चरणावरी झोपेतही मी गातो आणि स्मरतोही गणपती…गणपती…गणपती…
जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं
विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।
बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना
देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।
काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती
परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।
प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी
पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले
करण्यास तव जवळीक, कामास तेच आले
जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम
उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म
भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी
पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी
भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन
नाचत गांत राहिली, केले तुझ पावन
दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले
त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले
सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी
भावनेची ज्योत पेटतां, कदर तुच करिसी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ओळीने चालल्या
बगळ्यांच्या रांगा
हा निरोप अमुचा
त्या ढगांना सांगा
तहान लागली
धरतीच्या लेका
थेंब पावसाचे
जमिनीत टाका
पुरे झाली आता
दुष्काळाची सजा
पाषाणहृदयी तू
होऊ नको राजा
झाडांना दे पाणी
जनावरांना चारा
धान्याची बरकत
जीवांना निवारा
ओळीने चालल्या...
-- © विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
सं. ९४२१४४२९९५
मनराधेने जवळी बसावे
कर हे धरुनी जीवा पुसावे...
असते असले भाग्य कुणाचे
मम भाळी ते उमलुनी यावे...
स्पर्श मयुरी प्रीत रुजवीतो
रुजता प्रीती जीवन फुलावे...
बकुळीचा गंध गंधाळता
हुंगता हुंगता भुलुनी जावे...
जीवनी, सत्यप्रीत निरंतर
दिगंतरी त्या प्रीतीत जगावे..
अद्भुत अंतरंगी सावळबाधा
मनराधेने त्या रंगात नहावे..
रचना क्र. ७२
१४/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Copyright © 2025 | Marathisrushti