वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
Shabdaraanjan.blogspot.in
देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,
झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।
जाई जेव्हां मंदिरी,
घेतां प्रभू दर्शन,
आनंदानें नाचते,
हर्षित चंचल मन,
नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।
नदीनाले धबधबा,
उंच उंच वृक्ष वेली,
कोकीळ गाती, मोर नाचे,
इंद्रधनुष्याच्या खाली,
रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।
दु:खी – कष्टी दुबळा,
दीनवाणा दिसे,
प्रभूच्याच आज्ञेने,
भोग भोगीत असे,
जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com


-- कवी : तुळजाप्रसाद धानोरकर
आम्ही साहित्यिक
प्रिय बहीण,
तुझं आणि माझं नातं तसंच आहे,
जसं रेशीमबंध तु आज बांधलेस,
घट्ट,थोडंस सैल,आणि आपुलकीचं...
------------------------------------------
◆आज मुद्दाम लिहावच लागलं...
-----------------------------------------
आपलं हे नातं कधी बेगडी होऊ देऊ नकोस इतकंच...
तुझ्या सुखात पुढे पुढे करणारे
जर तुझ्या दुःखात दडून बसले
तर तु समजून घे कि त्या नात्याला फार भारीचं
आणि चमचम असं बेगड लागलंय,
पण तुला ती नाती कोणती आहेत
हे मात्र ओळखावं लागेल.
मी तशी आशा कधीच करणार नाही
कि तुला दुःख यावं पण परिस्थितीने कधी तशी वेळ ओढवून आणली तर,तुझ्या दुःखाच्या लक्ष्मण रेषेला आधाराला आधी समोर मीच राहील...
तुही प्रत्येक वेळेला तुझी वेडी माया घेऊन
आलीसच कि माझ्यासाठी.
तुझ्या सुखात नसलो तरी
दुःखात आधी समोर मीच राहीन
तु फक्त जाणीव ठेव बाळा...
वचन तुला..!
तुझाच भाऊराया
- © तुळजाप्रसाद धानोरकर
विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा
आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१
दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं
आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२
वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला
क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३
उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी
विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४
एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे
जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सप्तसुरांचा जसा गंधार राजा
सण दिवाळी , हा सणांचा राजा
अविवेकाची विझवीत काजळी
आनंददीप उजळीत सुखदा आली ।।१।।
स्वर्ग ! त्रैलोक्याचा जणू अवतरला
दिप नभांगणीचेच सजवीत धरेवरी
अमंगळा सारुनी महन्मंगला आली
उधळीत आनंदाला दीपावली आली ।।२।।
क्षण क्षण , अत्तरी सुगंधात नाहला
प्रीतवात्सल्ये ओवाळीली निरांजने
दारी , अंगणी रंगली सडा रांगोळी
दीवाळी ऐश्वर्यसुखदा घेऊनी आली ।।३।।
वसुबारस , धनतेरस ,नरकचतुर्दशी
पाडवा , लक्ष्मीपूजन , भाऊबीजेची
पंचूकली ! दिपावलीची आनंदघनी
परंपरंगत , सुखदा तेजोमयी आली ।।४।।
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४१
२ - ११ - २०२१.
मी पाऊल पाऊल हळुच निघालो
संध्येच्या अनवट वेळी
तरू-तरुंवर पसरत होती
क्षितिजावरची सांज सावळी
मी बघता वळून मागे
दूर दिव्यांचा चमके लोलक
मी सांधून घेतो सुटले धागे
चांदण्यात भिजले मोहक
पाऊलवाटा निजल्या होत्या
आठवणींची होती सोबत
वेचून मोती गतकाळाचे मग
पूर्वेला पाऊल पडते अलगद...
-- आनंद
बलसागर भारत होवो ।
विश्वात शोभूनी राहो । धृ. !।
हे कंकण करि बांधियले ।
जनसेवे जीवन दिधले ।
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले ।
मी सिद्ध मरायाला हो ।
बलसागर भारत होवो ।।१।।
वैभवी देश चढवीन ।
सर्वस्व त्यास अर्पीन ।
हा तिमिर घोर संहारीन ।
या बंधू सहाय्याला हो ।
बलसागर भारत होवो ।।२॥।
हातात हात घेऊन ।
हृदयास हृदय जोडून ।
ऐक्याचा मंत्र जपून ।
या कार्य करायाला हो ।
बलसागर भारत होवो ।।३।।
करि दिव्य पताका घेऊ ।
प्रिय भारत गीते गाऊ ।
विश्वा पराक्रम दावू ।
ही माय निजपदा लाहो ।
बलसागर भारत होवो ॥४॥।
याउठा करु हो शर्थ ।
संपादु दिव्य पुरुषार्थ ।
जीवन हे ना तरि व्यर्थ ।
भाग्यसूर्य तळपत राहो ।
बलसागर भारत होवो ॥५॥।
ही माय थोर होईल ।
वैभवे दिव्य शोभेल ।
जगतास शांति देईल ।
तो सोन्याचा दिन येवो ।
बलसागर भारत होवो ॥६।।
एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने
तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं
मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत
भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar”gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti