घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या
रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।।
चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं
क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।।
प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली
श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।।
चौकशी करतां कृष्ण बदले कहानी एका भक्ताची
हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।।
वेडा समजोनी त्यासी दगड होते मारीत
हरिनाम नाही सोडले वाहात असूनी रक्त ।।५।।
धावलो होतो त्याचेसाठीं करण्या त्याला मदत
परि लहू बघूनी अंगावरती दगड घेतला हातात ।।६।।
समर्थ झाला आता तो रक्षण करण्या स्वतःचे
हरिनाम सोडता मुखातून कारण नव्हते मदतीचे ।।७।।
ही झाला छोटी कहाणी सांगे जीवनाची तत्वे
सर्वस्व अर्पिता प्रभूसी विश्वास ठेवा त्याते ।।८।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
का असे जगणे होते,भलतेच कधी जीवघेणे,
वेदनांचे उठती टाहो,
आक्रंदनांचे तीव्र हिंदोळे,
सहावे कुठवर, सोडून द्यावे,
जखमी घायाळपण लपवावे,
कोण त्राता, कोण करविता,
संभ्रमी सारे जीव पडावे,
अगदी अनाकलनीय ना,
आपल्या आयुष्याचे कोडे ,
त्यातून कशी केव्हा सुटका, प्रारब्धाचेच खेळ सारे,--!!!
संयम, नि संतुलन किती,
जागोजागी का दाखवावे,
माणूस म्हणून जगणे मग,
शेवट यंत्रवतच"" बनावे, ---
कुठे जातात सगळ्या,
भावना,अन् संवेदना,
जसे या जीवनारण्यी,
ठेचकाळतच फक्त हिंडावे,
माया ममता प्रेम आस्था,
वागणे का असे नसावे,
उथळ, स्वार्थी वरपांगी,
पुरते आयुष्य असेच जावे,--?
लावावा जीव कुणाला,
पदरी येते फक्त फसवणे, तोंडावरती गोड बोलती,
प्रत्यक्षात काही वेगळे,--!!!
ताणतणांवा सीमा नसे ,
दुनिया कशी वेगळे टोचे,
जखमा आणखी खोलत,
वर मीठ चोळण्यां काहीसे, समस्यांना सीमा नसतां,
दोष तरी कुणाला द्यावा,-?
हेच आपले प्राक्तन म्हणत,
--- आहे तेच स्वीकारावे,--!!!
© हिमगौरी कर्वे.
(चाल : पारंपारिक गरबा / डांडियाची )
नृत्य गोपगोपींचें , धुंद सुरूं रास
वृंदावन लोटलें शरद-उत्सवास ।।
केशकलापीं गोपी माळती फुलें
वेण्यांचा संच दाट लांबवर झुले
चंपक, जुइ, मोगरा, दरवळे सुवास ।।
वस्त्रांतुन एकएक रंग उधळती
इंद्रधनू आज जणूं लक्ष उजळती
मांडियली रूपयौवनाची आरास ।।
गोलगोल नरनारीचक्र हें फिरे
झुलत डुलत नृत्य लांबवक्र हें फिरे
तालबद्ध मृदु मृदंग दास करि पदांस ।।
टाळ्यांचा टिपर्यांचा नाद धुंद हा
विसरें निजभान पुरें सर्व वृंद हा
लुप्त या घटीस सर्व चिंता-भय-त्रास ।।
आज हर्षसागरात हृदय डुंबतें
मोदाच्या वारूवर गगन चुंबतें
मनिं भुवनीं उल्हासच करितसे निवास ।।
एकसाथ खालीवर श्वास होतसे
एकरूप सारे , आभास होतसे
वेगळेपणा न उरे आज शतमनांस ।।
रासनृत्य नाचे आनंदकंदही
राधाही धुंद, रंगला मुकुंदही
ओठांवर मंदमधुर स्मित करी विलास ।।
नृत्यसमाधीस दिव्य, शक्य न बाधा
राधामय कान्हा , कान्हामय राधा
स्वर्गातिल सौख्य मिळे दोन प्रियजनांस ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com /
www.snehalatanaik.com
-- विनोद
रुजविता बियाणें
अंकूर फुटती
असतील दाणे जसे
तेच उगवती
पेरता आनंद
आनंदचि मिळे
प्रेमाची बियाणें
प्रेम आणी सगळे
शिवीगाळ करुनी
आदर येई कसा
शत्रुत्त्वासंगे नसे
मैत्रीचा ठसा
घृणा दाखवूनी
कसे येई प्रेम
क्रोधाच्या मोलाचे
शांती नसे दाम
पेरावे तसें उगवतें
नियम हा निसर्गाचा
सुख दुःखाला कारण
स्वभाव ज्याचा त्याचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे?
मीही नाही रे पाहिलं
आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे
त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे
कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे
अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण
क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते
हरवतो तो न जाणो किती दिवस.
अगदी अगदी दडून बसतो
अवचित मग कधी कुठेतरी पुन्हा गवसतो कुठे बरं
गाभाऱ्यात मंद मंद समईसोबत दरवळत असतो
जीवाची शिवाशी भेट ठरवत असतो
कधीतरी कणकण होऊन ओंजळीतही उतरतो
पण निर्माता मात्र अजून देखिलाच नाही
चंदन एक अलौकिक परिमळ
नित्य नव्या जाणीवांसह पुन्हा पुन्हा भेटत राहतो
स्पर्शाविना तुझा सुगंध आसमंत भरून उरतो
चंदना एकदा तरी चांदण्यात तू मला कडकडून भेट
रंध्रातून श्वासात उतरून मीच होऊदे चंदनाचे बेट!!
-- वर्षा कदम.
कोणते दुःख तुला छळते
अकारण कां व्यथित होते ।।धृ।।
प्रेमळ छत्र पित्याचे असतां
गेले जीवन तुझे बागडतां
लाड पुरविले आईने तव
शिकवीत असतां आनंदी भाव
आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते
बांधून घेतां राखी हातीं
आश्वासन तुजला मिळती
पाठीराखा भाऊ असूनी
येईल तुजसाठीं धावूनी
कसली शंका मनांत येते ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते
संसार भरला सुख-दुःखानी
घे शिरावर तुझ्याच समजूनी
जीवन मार्गी होता बदल
नको होऊस वेडे चंचल
सावध असूं दे चित्र तुझे ते ।।३।। अकारण तूं कां व्यथित होते
नाते गोते वाढवीत जावे
सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
छत्राखालती होती आजवर
छत्रचि बनावे तूं इतःपर
संस्काराचे मधूर फळ येते ।।४।। अकारण तूं कां व्यथित होते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ऊर्जा शोषत असतां पाणी
उकलन बिंदूवर येते
पाण्याचे रुप बदलूनी
बाष्प त्यांतून निघूं लागते
एक सिमा असे निसर्गाची
स्थित्यंतर जेव्हां घडते
एक स्थीति जावून पूर्ण
दुजामध्ये ती मिळून जाते
तपोबलाची ऊर्जा देखील
प्रभूमय ते सारे करिते
परमबिंदूचा क्षण येतां
साक्षात्कार तुम्हां घडविते
तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं
ईश्वरमय होऊन जाता
सारे परि ते तेव्हांच घडते
परम बींदूला जेव्हां पोहंचता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अन्नपूर्णा दारातून म्हणाली
भाकरी दे माई |
मी म्हणाले भाकरी नाही
ब्रेड देवू कां बाई ||१||
ती म्हणाली भाकरीची चव
ब्रेडला येणार नाही |
मला मात्र भाकरी करायला
वेळच नाही ||२||
एन्जॉयमेंट मधून मला
खरं सवडच नाही |
ब्रेडपेक्षा भाकरी मला
परवडत नाही ||३||
रागावू नकोस तू
जा पुढच्या दारी
हीच रीत बघशील तू
सध्या घरोघरी ||४||
अन्नपूर्णा म्हणाली
बरंय मी येते-
त्याक्षणी झाले माझे
भरले घर रिते ||५||
Copyright © 2025 | Marathisrushti