दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,
गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,
खेच बसता वाढत गेला, होता गुंता
उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,
दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,
वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,
दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
थोडेसेच जेवण का असेना
मेष आवडीने खाणार..
गरम, चमचमीत पदार्थांवर
यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।
वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते..
लोणची-पापडासारखे पदार्थही
अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।
कधी मारुनी मिटक्या,
कधी नन्नाचा चाले पाढा..
मिथुनाचे कौतुक मधाळ
तर टीका कडवट काढा.. ।।३।।
'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
कर्केचे होते पूर्ण जेवण..
रुचकर पण थंड अन्नही हे
कसे पटकन करतात सेवन? ।।४।।
राजस जेवणाच्या सिंहेचा
केवढा राजेशाही थाट..
थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।
'कमी-जास्त नाही ना?'
याची उगाच बाळगून भीती..
इतरांकडे पाहून ठरते
कन्येची जेवायची नीती.. ।।६।।
भात-भाजी-आमटीबरोबर
पचतील तेवढ्याच पोळ्या..
अशा संतुलित आहारानंतर
तूळ खाते पाचक गोळ्या.. ।।७।।
काही Missing आहे का
कधी कळतही नाही..
साधे नेहमीचेच जेवण
पण वृश्चिकेला रुचत नाही.. ।।८।।
कधी पटपट-झटपट जेवण
तर कधी अगदीच वेळकाढू..
धनू काढत नाही जेवताना खोड्या
पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।
ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा..
गपगुमानं जेवतो मकर
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।
निश्चित वेळ जेवणाची
पार्टी असो वा एखादे लग्न..
कुंभेची चिकित्सक वृत्ती
नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।
कधी-कुठेही जमते
मीनेची खाण्याशी गट्टी..
पोटभर खाताना घेतात
'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।
माहोल हा प्रसन्नतेचा
तृप्त! कृतार्थ लोचने
आभाळ सप्तरंगलेले
ब्रह्माण्ड! सारे देखणे।
मनांतरी, मीरा! राधा!
कृष्ण! कृष्ण! अंतरी
हृदयांतरी, माधुर्यभक्ती
मंत्रमुग्ध! नाद सुस्वरी।
निरभ्र! या निलांबरी
लपंडाव, भास्कराचा
साक्षी! लोभस निसर्ग
खेळ हाच दयाघनाचा।
रूप! निरागस निर्मल
भाव! मधुरम मधुरम
नेत्री कनवाळू कैवल्य
मुक्ती मोक्षाचा सागर।
सांजआभाळ, तुष्टलेले
मेघ आठवांचेच लोचनी
भास! सोज्ज्वळ हृदयी
ब्रह्मानंदी सोहळा जीवनी।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५५.
१७ - १२ - २०२१.
ताई गुणाची माझी छकुली,
“झोका दे दादा' म्हणून लागली,
संभाळ ताई ! फांदी वाकली,
दोन्ही दोरांना गच्च आवळी,
जोजोगेजोजो ।॥१॥।
आयुसागरी आल्या लहरी,
ताई तरंगे नोका त्यावरी,
कुंतलध्वजा फडफड करी,
पायाचे वल्हे हाण सत्वरी,
जो जो गे जोजो ॥॥२॥।
वायु सिंधूला भरती आली,
नौका हालते वरती खाली,
परकर-शिडांची त्रेधा उडाली, .
शाब्बास ताई ! माझी सानुली
जोजोगेजोजो ॥1३।।
देवदयेचे झाड थोरले,
भक्ति प्रीतीचे दोर बांधले
मोक्ष प्राप्तीचा झोका हा बाळे ।
आनंद देवो तुला वेल्हाळे !
जोजोगेजोजो ।॥४॥|
मी पाऊल पाऊल हळुच निघालो
संध्येच्या अनवट वेळी
तरू-तरुंवर पसरत होती
क्षितिजावरची सांज सावळी
मी बघता वळून मागे
दूर दिव्यांचा चमके लोलक
मी सांधून घेतो सुटले धागे
चांदण्यात भिजले मोहक
पाऊलवाटा निजल्या होत्या
आठवणींची होती सोबत
वेचून मोती गतकाळाचे मग
पूर्वेला पाऊल पडते अलगद...
-- आनंद
आता काय बोलायाचे
आता काय ऐकायाचे
घडणारे ते घडूनी जाते
सारे समजून घ्यावयाचे
तडजोडित, मन:शांती
शल्य कुणास सांगायाचे
स्वप्नी आठवांचे मोहोळ
सांगा ? कसे थोपवायचे
ऋणानुबंध गतजन्मांचे
सारे सावरित जगायाचे
मैत्र! निर्मोही सावरणारे
तेच सदा अंतरी जपायचे
मुक्तिचाच ध्यास जीवाला
हरिनामात सुखी रमायचे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०४
२५/११/२०२२
भगवान श्रीकृष्ण
जीवनात अचानक कधी
असा क्षण येतो ।
सारे स्तब्ध नीरव शांत होते ।
ब्रम्हांड गोठल्याचा भास होतो ।
साऱ्याच संवेदना संपुष्टात येतात ।
उरतात फक्त निर्विकार स्पंदने ।
हा जन्म अन मृत्यु मधील
अंतीम थांबा असतो ।
हाच शून्यावस्थेतील अचेतन
अखेरचा जीवन सूर्यास्त ।
जो शाश्वत मृत्यु, अंत!
जीवनातील अंतीम अटळ कटुसत्य ।
जन्मताच मृत्युचही वरदान
भगवंताच दान असतं ।
प्रत्येक जीवाला लाभलेलं असतं ।
सर्वानाच स्विकारावच लागतं ।
यालाच जीवन असं म्हणतात!
म्हणून प्रत्येकानं सतर्कतेंन
विवेके आत्ममुख व्हावं ।
सातत्यानं सत्कर्म करत रहावं!
सहृदयतेने निर्मळ निर्व्याज
निर्मोही प्रेम करीत मने जपावीत!
त्यामुळे आत्मानंद होतो!
त्या अनामिकचे स्मरण ठेवावे!
ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे!
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.११८
१७ - ४ - २०२२
आज मन आनंदले,
सुखाच्याही पा--र गेले,
भंवसागरी तरणे खासे,
आता सोपे वाटले,--!!!
दुनियादारी निभावणे,
असते किती कठीण,
तरीही तावून-सुलाखणे,
सहजी कसे जमले,--!!!
मनमोर थुई थुई नाचे,
पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!
खंबीर,धीरगंभीर राहणे,
तटस्थभूमिका निभावावी,
येऊ देत वारे--वादळे,
मात्र एक झुंज द्यावी,--!
तुझ्यापेक्षा मी सरस,
म्हणत त्यांन भिडावे,
संकटांचे सतत घोर,
जिवामुळी लावू न घ्यावे
एक दत्तगुरु पाठीराखे,
राहावे निर्धास्त लेकराने, गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
आपुले दुःख सांगावे,--!!!
ते असतां मागे,
त्यांची जाणीव ठेवावी,
एक त्यांचे स्मरण,
सारी दुनिया विसरावी,--!!!
आनंदाच्याही डोही बुडावे,
ओलेत्याने राहावे कोरडे,
पाणी जाताना नाकी तोंडी,
दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!
हिमगौरी कर्वे.©
नव्हतो कधीही चित्रकार, परि छंद लागला
रंगाच्या त्या छटा पसरवितां, मौज वाटे मनाला...१,
रंग किमया बदण्या नव्हता, मार्गदर्शक कुणी
गुरुविना राहते ज्ञान अपूरे, याची खंत मनी...२
नदिकाठच्या पर्वत शिखरी, विषण्ण चित्त गेलो
मन रमविण्या कुंचली घेवून, चित्र काढू लागलो...३
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, रंग छटा शिकवी
गुरू सापडला चित्र कलेतील, हाच तो निवावी....४
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti