(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • करून बघ !

    फुलेल नातं तुझं माझं
    करून बघ एक उपाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!

    तोलू नकोस ताजव्यात
    आल्या गेल्या क्षणांना
    काठावरच बसून रहा
    सोडून फक्त पाण्यात पाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!१

    माझ्या मनात तूच आहेस
    चाचपडणं सोडून दे
    खदखदतंय मनात जे
    अलगद त्यावर धरेल साय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!२

    मोजु नकोस वळणं वेडी
    घालु नकोस अवघड कोडी
    वळून बघ तुझ्यामागे
    पाऊल माझं पडत जाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!३

    ………. मी मानसी

  • समस्त दारू पिणार्‍यांना सादर अर्पण

    ।। विषय जरी दारु असला तरी !
    ।। कविता सुंदर आहे न घेणाऱ्यालाही हसवेल !

    ।। पिऊन थोडी चढणार असेल
    ।। तरच पिण्याला अर्थ आहे
    ।। एवढी ढोसून चढणार नसेल
    ।। तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

    ।। मी तसा श्रध्दावान
    ।। श्रावण नेहमी पाळतो
    ।। श्रावणात फक्त दारू पितो
    ।। नॉनव्हेज मात्र टाळतो

    ।। ज्याची जागा त्याला द्यावी
    ।। भलती चूक करू नये
    ।। पिताना फक्त पीत रहावं
    ।। चकण्यानं पोट भरू नये

    ।। वेळच्या वेळी आपण ओळखावी
    ।। आपली आपली आणिबाणी
    ।। लाज सगळी सोडुन देऊन
    ।। ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

    ।। पिऊन तर्र झाल्यानंतर
    ।। काय खातोय ते कळत नाही
    ।। खाल्ल्यानंतर बिलामधली
    ।। टोटल कधी जुळत नाही

    ।। अशीही वेळ असते जेंव्हा
    ।। कोणीच आपला नसतो
    ।। म्हणून आपण प्यायला जातो
    ।। तर नेमका ड्राय डे असतो

    ।। असं उगीच लोकांना वाटतं
    ।। की दुःख दारूत बुडून जातं
    ।। दुःख असतं हलकं हलकं
    ।। अल्कोहोलसोबत उडून जातं!

    ।। एकदा प्यायला बसल्यानंतर
    ।। तुझं-माझं करू नये
    ।। तुझी काय, माझी काय
    ।। नशा कधी सरू नये

    ।। तुला जायचंच असेल तर निघून जा ,
    ।। जाण्यासाठी भांडू नकोस
    ।। प्यायची नसेल तर पिऊ नको ,
    ।। पण दारू अशी सांडू नकोस

    ।। स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
    ।। बर्फ नको, सोडा नको
    ।। उंच आभाळी उडण्यासाठी
    ।।पंख हवे... घोडा नको !

    ।। फॉरीन लिकर कितीही प्यावी
    ।। काही केल्या चढत नाही
    ।। देशी आपली थोडीशीच प्यावी
    ।। दोन दोन दिवस उतरत नाही

    ।। पिणं असतं आगळा उत्सव
    ।। त्याचा उरूस होऊ नये
    ।। प्यायला नंतर आपला कधी
    ।। वकार युनूस होऊ नये

    ।। घरी बसून दारू प्यायचे
    ।। खूप सारे फायदे असतात
    ।। हॉटेलमधे, बिल भरायचे
    ।। काटेकोर कायदे असतात

    ।। आम्ही कधीच दारूमधे
    ।। दुःख आमचं बुडवत नाही
    ।। दारू नेहमी शुध्दच ठेवतो
    ।। भेसळ आम्हाला आवडत नाही

    ।। हवा तसा मी चालतो आहे
    ।। कोण म्हणतंय ' जातोय तोल ?
    ।। माझ्या मित्रा, माझ्या इतकी
    ।। पचवून दाखव, नंतर बोल!

    ।। प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
    ।। काही ' न ' पिणारे मित्र
    ।। पार्टीनंतर आपल्याला
    ।। आपल्या घरी नेणारे मित्र

    ।। पिणाऱ्यांनी समाजाचा
    ।। कुठलाच कायदा पाळू नये
    ।। जेंव्हा, जिथे, जशी वाटेल
    ।। प्यायचा मोह टाळू नये

    ।। ग्लासी लागेल ते ढोसत असतो
    ।। पानी लागेल ते चरत असतो
    ।। जेंव्हा माझं बिल कोणी
    ।। दुसराच माणूस भरत असतो

    ।। काय होतंय, कुठे होतंय
    ।। काही केल्या कळत नाही
    ।। एकदातरी वेळ अशी
    ।। पिणाऱ्यांना टळत नाही

    ।। प्रत्येकानंच आपला आपला
    ।। जसा घ्यायचा असतो श्वास
    ।। तसा प्रत्येकानं आपला
    ।। सांभाळायचा असतो ग्लास....

    ।। समस्त दारू पिणा-यांना सादर अर्पण

  • तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता

    आपलं कधी असं ठरलं नव्हतं
    आपण बोलताना
    हा असा अमुक अमुक विषय काढू
    तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
    हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
    घेऊया का चर्चेस
    हा एक इतका महत्वाचा विषय आहे
    तू तुझे विचार ऐकव
    आणि मग मी माझे मत मांडते
    मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
    एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
    आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
    हे आज आठवलं म्हणजे मग
    आताशा माझ्या लक्षात येतंय की
    फक्त मीच तर बोलायचे...
    मी बोलायचे आणि तू ऐकायचास
    असही नाहीच म्हणू शकत मी
    मी बोलायचे आणि मला तू ऐकत
    असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
    मी बोलायचे
    काही जुन्या आठवणी निघायच्या
    काही आवडती गाणी सांगायचे
    मी आजूबाजूच्या
    प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
    मला पडलेल्या स्वप्नांवर
    माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
    तू काय केले पाहिजेस सांगायचे
    तू आज कसा छान दिसतोस हे देखील
    बोलूनच सांगायचे
    आपण भेटलो ना की मी बोलायचे
    उधानलेल्या पावसाने
    उधानलेले पाणी जणू
    तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
    आणि ...
    माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
    तू हसायचास..
    मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
    तू खळाळून हसलास की
    तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
    माझं बोलणं उडवून लावलंस
    तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
    मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
    हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
    असही मी विचारलंच नाही तुला कधी
    पण आज ....
    प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
    या तुझ्या एका प्रश्नासरशी
    तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
    'नाहीच बोलणार मी आता'
    आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
    असो.....

    ©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
    १८/०८/२०१८

  • अवघे ब्रह्म

    विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
    जय हरि पांडुरंग विठ्ठल
    कनवाळू माय ब्रह्मांडाची
    सावळा जगजेठी विठ्ठल

    दंगुनी आषाढ़ी कार्तिकी
    नाचतो वाळवंटी विठ्ठल
    पदन्यास तो वैष्णवांचा
    ध्यास पाऊलांना विठ्ठल

    गरजता टाळमृदंग चिपळी
    नाद घुमतो विठ्ठल विठ्ठल
    नेत्री पाझरते रुपड़े सावळे
    श्वासाश्वासात भास विठ्ठल

    नाही कुठे अंतरी भेदभाव
    द्वैतअद्वैत एकरूप विठ्ठल
    सुखदुःखाचेच परिमार्जन
    अवघे ब्रह्म साक्षात विठ्ठल

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १५५.

    २५ - ६ - २०२२.

  • प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

    बागेतील तारका

  • प्रेम कविता

    शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या,
    आनंदी राहा संसारात तुझ्या,
    जीवनातले सारे सुख माझे तुला,
    दुःख सारे तुझे देशील मला,
    शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या,
    आनंदी राहा संसारात तुझ्या,
    येतील क्षण आनंदाचे जेव्हा,
    हसत राहशील नेहीप्रमाणे तेव्हा,
    येतील क्षण दुःखाचे जेव्हा,
    तातडीची निरोप देशील मला,
    तुझ्याकडच दुःख घेऊन सारे,
    सोबतीला घेईन सूर्य ,चंद्र ,तारे
    शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या,
    आनंदी राहा संसारात तुझ्या,
    आठवणी आपल्या हेच माझं देणं,
    तुझ्याकडून मला काहीच नको घेणं,
    जपली ज्यांनी नाती,
    सुख त्याच्या हाती,
    शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या,
    आनंदी राहा संसारात तुझ्या,
    जीवनातले सारे सुख माझे तुला,
    दुःख सारे तुझे देशील मला,
    शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या,
    आनंदी राहा संसारात तुझ्या.
    -- सचिन निकाळजे
  • वणवा

    आताच दिस आला
    लगा मिटला मिटला
    कसं राहू कसं सहु
    जीव विटला विटला
    किती राबू घाम काढू
    सोलवटू या अंगाला
    परी दिसना कुठंचं
    एक सबूद ही ओला
    पेरू काय अन कुठं
    ओलं नाही ढेकळाला
    सारं कातळ कातळ
    पाझर नाही रं मुळाला
    वणव्यात लाही लाही
    नाही जाळं शरीराला
    करपून काळीज ह्ये
    गेलं मातीला मातीला
    असे सरतील दिस
    ओलं डोळं रातच्याला
    मुकं मुकं सारं जिणं
    सरलं सारं उद्याच्याला!!
    -- वर्षा कदम.
  • छत्रपती शिवाजी महाराज

    छत्रपती शिवाजी महाराज

    विचारावे कोणी मला

    आणि मी सांगावे

    माझा आदर्श कोण ?

    छत्रपती शिवाजी महाराज

    आणखी कोण ?

    इतिहासातील आवडती तुझी

    थोर व्यक्ती कोण ?

    देवतुल्य शिवराय आणखी कोण ?

    इतिहास भिनलाय

    माझ्या नसानसात

    मराठ्यांच्या शौर्याचा

    त्यांच्या चातुर्याचा आणि

    धर्मावरील प्रेमाचा...

    शिवराय नसते तर ?

    मी ही नसतो नाही ?

    हा प्रश्न नाही तर

    एक विचार आहे...

    महाराष्टाला ज्याने

    अस्मिता दिली

    हिंदुत्वाला ज्याने

    संजीवनी दिली

    हिंदूंना ज्याने

    अभिमान दिला

    ते माझे राजे

    छत्रपती शिवाजी महाराज...

    मी त्यांना रोज मनात स्मरावे

    हृदयात जपावे आणि

    वर्तनात उतरून दाखवावे

    त्यांच्या जयंती दिनी

    फक्त करावी याची उजळणी...

    हीच आहे माझी त्यांच्या

    पवित्र चरणी

    पुष्पांजली...

    कवी - निलेश बामणे

  • जखमांचे वण

    किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.

    एकच गोष्ट सतत कानी पडत होती.

    उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.

    भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..

    आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.

    एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.

    मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.

    खेळणें, कुदणें, उड्या मारणें,

    त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.

    पण सांगा रडून कुणाला ?

    कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...

    निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे

    आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.

    भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.

    न भरून कसे चालायचे ?

    मस्तीची रग, खेळातील धडपड आणि

    स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.

    सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.

    * * *

    ... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.

    किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !

    विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.

    हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.

    मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.

    कितीतरी लहान मोठ्या आकाराची.

    ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.

    प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.

    कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.

    पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.

    शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.

    नेत होते भूतकाळांत.

    जो होता निश्चित आणि उपभोगलेला.

    त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • चोखोबा’ माझा गणपती!

    गणपति’ ही देवता सर्वच संतांनी पूजनीय मानलेली आहे. जवळपास सर्वच संतांनी गणेशवंदना केलेली दिसते. पण गणपती आणि संत हा अनुबंध अनेक अर्थांनी विशेष वाटतो. केवळ संतांची गणेश वंदना पाहून नव्हे, तर संत आणि गणपती यांच्यामधील अद्वैताचं नातं प्रतीत होतं म्हणून.