
पहाटेच डोकावले
खिडकीतून आत
आणि म्हणे, " उठताय ना sss
उठाsss सुप्रभातsss...!"
दिसभर उकाडा हा
कुणासही सोसवेना
त्यावर फुंखर म्हणून का
केशरी चंद्राच्या दुधाळ चांदण्यांची शितलता...
आश्विन पोर्णिमेसी वाढली निरभ्रता,सवे पिठूर चांदण्यांची मोहीनी मनाला....
अंबाबाईचा उत्सव जोडीला भुलाबाईचा जागर
शिव-पार्वतिचा संगम...
झाला दिवस लहान,आता होई रात्र महान
त्या रात्रीला ओवाळण्यास
दिपावली आली सत्वर...
शरदाचे हे दिवस सुगीचे
शेतकरी राजा
सुखी शय्येवरी आरामात निजे....
सौ.माणिक
(रुबी)
कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती
गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें
कसा आला नशिबी निराशा मनी येते
अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले
लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले
मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे
नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे
केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब
भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ
खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने
नीच मनाचा असून मी पचविले ते हसण्याने
टिपून ठेवला नंबर त्याचा एका कागदावरी
कोटाच्या खिशांत ठेवले तिकीट जपून भारी
निकाल वाचूनी नाचू लागतो आनंदाने पुरता
लाखाचे ते बक्षिस लागूनी लाखोपती बनता
धावत गेलो ऑफिसातूनी तिकीट घेण्या घरी
कोट नव्हता दिसत तेथे रोजच्या जागेवरी
इतर कपड्यामध्ये टाकला धूण्या परीटाकडे
धावत सुटलो नदीवरती शोधण्या तो तिकडे
सुकवलेल्या कपड्यातूनी कोट काढला
तुकडे बघूनी त्या तिकीटाचे मुर्च्छा आली मला
खरय़ा शिक्क्यासम चालले नशिबही वेगाने
खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चिव् चिव् करित बोलतां
तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना
देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून
येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे
असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी
तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता
धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या
शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी
प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली
कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील
भाव दाखविणारी
चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे
मानव जातीला
व्यर्थ बडबड करुन सारी
वाहूनी तो गेला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पूर्णपणें मज पटले आतां
कविता कुणी करवून घेतो
कोण असेल तो माहित नाहीं
मजकडून तो लिहून घेतो
घ्यानी मनीं कांहींही नसतां
विषय एकदम समोर येतो
भाव तयांचे जागृत होऊन
शब्द फुले ती गुंफून जातो
एका शब्दानंतर दुसरे
आणि तिसरे, लगेच चौथे
शब्दांची ती भरुनी ओंजळ
माझ्या पदरीं कुणी टाकतो
गुंफण करुनी हार बनता
त्याजकडे मी बघत असे
फक्त प्रभूचे नाम घेऊनी
अर्पण त्याला करीत असे
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे,
मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे !
आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे,
रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे !
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील?
समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील !
कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने
शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील !
अवर्षणग्रस्तांना ‘अमृता’चे आमिष दाखविले,
बिचारे ‘जलाचे’ दोनथेंब पिऊन जगले !
‘अमृत’ प्राशनाने अमरत्व मिळतं म्हणतात,
‘अमृता’ ऐवजी नशिबी दगडगोटेच आले !
बळीराजा सगळ्या बाजूने गांजला आहे,
अमुतापेक्षा विषाला जवळ करत आहे !
बळीराजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
वसुंधरेवरील जालामृतात आहे !
वसुंधरेवर पहिले ‘अमृत’ सिंचन
परमेश्वराने केले !
सागराच्या पाण्याचे ढगात रुपपांतर करून
वसुंधरेवर सर्वत्र ‘अमृत’ बरसले !
-- जगदीश पटवर्धन
एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने
तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं
मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत
भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
उतरला ईश्वर धरेवरी
सगुणरूप धारलें परब्रह्मानें पंढरपुरीं ।।
वैकुंठींचा प्रभु नारायण
करतो जो विश्वाचें पालन,
कलियुगात म्हणती विठ्ठल, तो हरी असे द्वापरीं ।।
क्षीरसागरा मागे ठेवुन
शेषनाग-मंचकास त्यागुन
नसे गरुडही, उभा एकला तिष्ठत विटेवरी ।।
क्षेत्र पंढरी जरि इवलेसें,
हरिस्पर्शें झगमगलें ऐसे –
जैसी स्वर्गामधें शोभते नगरी अलकापुरी ।।
कृतार्थता ही आम्हां मोठी
ब्रह्म अवतरे आम्हांसाठी
इथेंच थांबुन युगेंयुगें, उद्धरी जगा श्रीहरी ।।
- - -
- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
लहानपणी रात्र कशी
अगदी लवकर यायची
थकलेल्या मला कशी
पटकन निजवायची.
कळु लागले तशी
रात्र ही शांत झाली
तिला मला जणु
स्वतःची ओळख मिळाली.
तरूण झालो तेंव्हा
रात्र कशी रोमांचित होई
रातराणीच्या वासानं
ती धुंद होउन गाई.
संसाराच्या धावपळीत
चैन रात्रीची हरपली
काळजीने ग्रस्त रात्र
उशीराने झोपू लागली.
स्वप्नाळु रात्र फार काळ
नाही स्वप्नात रमली
वास्तवाच्या जाणीवेने
दचकून वारंवार उठली.
कोसळण्याऱ्या दूःखानी
रात्र जरी पूरती भिजली
मायेची चादर घेऊन
मला गुरफटून झोपली.
कधी रात्र विनाकारण
माझी चिंता करते
मलाही नाही झोपू देत
आणि स्वतः उगाच जागते.
आजकाल रात्र पूर्वीसारखी
वाटत नाही खुशीत
येत नाही जवळ आणि
घेत नाही मला कुशीत.
माहित आहे मला, रात्र
चिरःकाल टिकणार आहे
केंव्हा तरी कायमच झोपुन
मी तिला मुकणार आहे.
- डॉ.सुभाष कटकदौंड
Copyright © 2025 | Marathisrushti