अंतरी रूप पाझरते
स्मरण नेत्री ओघळते...
सांग ! कसे विसरावे
मनआभाळ ते दाटते...
श्रावण, प्रीतबरसला
लाघव ते रिमझिमते...
मृदगंधलेली, सुगंधा
गगना भारूनी जाते...
व्योमात कृष्णसावळा
ब्रह्मात, पावरी घुमते...
लडिवाळ नाद मधुरम
मनी भक्तीप्रीत प्रसवते...
हेच भाग्य साक्षात्कारी
जन्मोजन्मी, सुखावते...
ती राधा अन ती मीरा
आत्माच समर्पूनी जाते...
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.१९१
८/८/२०२२
सुखसमृद्धीचे रांजण
भोगण्यासही पायबंदी
क्षण विकलांग पांगळे
शब्दभावनां जायबंदी
संसारी, सारी तृप्तता
धागे सारे ऋणानुबंधी
परी फुकाचा विसंवाद
सुसंवाद तो भोगवादी
विवेकबुद्धी इथे जगावे
भाळीचे प्रारब्ध भोगावे
विनासक्त डुंबावे जीवनी
सुखाच्या, तुडुंब रांजणी
स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल
शब्दसुखदा मात्र दुर्मिळ
अर्थ न उमजे जीवनाचा
व्यर्थ! सौख्याचा रांजण
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ९.
९ - १ - २०२२.
रे चंद्रा तू कसा दिसतो,
अवचित ह्या वेळीं,
भास्कराच्या ह्या साम्राज्यीं,
दूर अशा त्या स्थळीं ।।१।।
कोठे आहेत असंख्य सैनिक,
जे तुला साथ देती,
कां असा तूं एकटाच आहे,
दिवसा आकाशांती ।।२।।
शांत असूनी तुझा स्वभाव,
फिरे त्याच्या राज्यांत,
एकटाच बघूनी तुजला,
लक्ष्य न जाई त्यात ।।३।।
कडक स्वभाव तो भास्कराचा,
नियमानें चालतो,
चुकून देखील तुझ्या राज्यीं,
कधी येत नसतो ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आहे ती लहान परि किर्ती महान,
छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।।
आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी,
लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।।
शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे
बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।३।।
कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची,
कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर ।।४।।
शिक्षक झाले कुणी केले सर्वा शहाणे,
ज्ञान मार्ग अनेक शाळाच त्याचा पाया एक ।।५।।
आईसम प्रेम करतो आपल्या शाळेवरी,
जो कोण घडला ह्याची उकल शाळाच करी ।।६।।
जन्म देते आई परी शाळा घडवी जीवन,
कधीही न फिटे ह्या जन्मी तिचे ऋण ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तुझ्या प्रेमात पडण्यापूर्वीही मी
जगत होतो आनंदात
तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी
जगत आहे भ्रमात
कळत नाही माझेच मला मी
काय पाहतोय स्वप्नात
उगाच विचार करतो आता मी
आध्यात्मचा भौतिक जगात
माझे सारे जग आता मी
पुन्हा नव्याने पाहतोय
कित्येक वर्षानंतर नव्याने मी
तुझ्या प्रेमात पडतोय
माझा मलाच आता मी
पुन्हा नव्याने शोधतोय
प्रेमाच्या मृगजळास आता मी
काय नव्याने फसतोय
कवी - निलेश बामणे ( बी डी एन )
कुठून आले हे निळे पाखरू,
पाहून त्याला वाटे उल्हास, निसर्गाचा महिमा, जादू ,
ही तर रंगांची आरास,--!!!
झुलत्या फांदीवर बसतां, पुढेमागे ते बघा झुले,
देखणे वाटे, नजर फिरता,
रंग पांच त्यात मुरलेले,--!!!
इवलेसे, मुठीत मावेल,
जीव तरी केवढासा,
लकलक डोळे, छोटे शेपूट तपकिरी रंग त्याचा,--!!!
चटकन हेरे सावज,
नजर भिरभिरत बघे,
खुट्टट आवाज होता ,
बनते एकदम सावध,--!!!
पाठीवर निळा रंग पहा,
पंखांवर पांढरट पट्टे ,
आखीव रेखीव कसे ते,
आहेत कोणी चितारलेले,?--
मानेवर केशरट झालर,
त्यातून काढे चिमणे डोके,
कडेकडेने हिरवी मखमल,
डोकी पिवळा तुरा शोभे,--!!
कारागिरी पाहून उठावदार,
निसर्गा प्रणाम पुन्हा एकवार,
किती मोठा तू चित्रकार,
जाणीव ठेव मानवा थोर,--!!!
हिमगौरी कर्वे.©
खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला परि न जाणला संसार ।।
पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।
वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।
सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची ।।
व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
परमेश्वर अगाध । त्याच्या शक्तीचा नसे वाद ।।
मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक ।।
नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।।
प्रभु निराकार । निर्गुण असुनी होई साकार ।।
आस्तिक प्रभु मानती । नास्तिक समजती शक्ति ।।
ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।।
ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।।
वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।।
धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक ।।
हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।।
झगडे मार्गासाठीं । ध्येय मात्र विसरती ।।
धर्मासाठीं भांडण । मुर्ख त्याहूनी कोण ।।
भांडतो करवंटीसाठी । विसरुनी खोबरे वाटी ।।
होता अतिरेकी । बनती सर्व दुःखी ।।
वाद करती विद्वान । सामान्यांस विचारी कोण
समजून घ्यावे सर्व धर्म । हेच मावतेचे मर्म ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
पाऊलोपाऊल चालत जाते,
मनामधली एक वारी,
ना टाळ, ना मृदुंग हाती,
तरी भक्तीची गोड तयारी.
रस्ता नाही धुळीचा येथे,
ना दिंडींची गर्दी भारी,
अंतर्मनाच्या शांत वाटेवर,
अखंड सुरू ईश्वराची वारी.
सुख-दुःखांचे डोंगर ओलांडत,
आशा-निराशेच्या पलीकडे सारी,
प्रत्येक श्वासात नाम गुंजते,
हीच खरी जीवनवारी.
अहंकाराचे ओझे टाकून,
प्रेमाची घेऊन शिदोरी,
करुणा, श्रद्धा, सत्य सोबती,
नेते आत्म्याला प्रभूच्या दारी.
कधी अश्रूंनी पाऊल भिजते,
कधी आनंदाची फुले फुलती,
तरी न थांबे हा अंतःप्रवास,
ओढ लागलेली पंढरीची न्यारी.
शेवट नसतो या प्रवासाला,
ना थांबे कधी ही स्वारी,
ईश्वर भेटतो अंतःकरणी,
जेव्हा पूर्ण होते मनाची वारी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti