भंग पावले पाहीजे स्वप्न माझे रातचे
तोडणे स्वप्न श्रृंखला नसे मानवी हातचे ।।
शिथिल गात्र बनती जाता निद्रेच्या आधीन
उघडले जाते मग विचारांचे दालन ।।
किती काळ भरारी घेई निश्चीत नसे कांही
विचार चक्र थांबता स्वप्न दोष तो जाई ।।
रात किड्यानो जागवा स्वप्नावस्थे मधूनी
कुकुट कोकीळा येई मदतीसाठी धावूनी ।।
वाऱ्याची थंड झुळुक पुलकीत देहा करी
उषा राणीचे प्रयत्न यशस्वी सदैव ठरी ।।
प्रयत्न करितो निसर्ग निद्रावस्था मोडण्याचा
स्वप्नाचा दोष काढूनी निरोगी बनविण्याचा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
खोटंच का विकलं जातं, हातोहात?
अन खऱ्यालाच का गुंडाळलं जातं बासनात?
किती द्याव्यात परीक्षा खऱ्याने
खऱ्यापणाच्या?
आणि किती उडवाव्यात चिंध्या
असत्याने सत्यपणाच्या?
खोटंच का विराजमान होतंय
आत्मसन्मानाची गळचेपी करून
फाटक्या तुटक्या सिंहासनावर?
खऱ्यालाच का सोसावे लागतात
हाल दारोदार?
बाजार खोट्याचाच बहरलेला दिसतोय विक्षिप्तपणे सर्वत्र
अन खऱ्यालाच घरघर लागलेली
दिसतेय गळलित गलीतगात्र.
खोट्याची सत्ता लौकिक
तर खऱ्याची सत्ता आहे अलौकिक.
सर्व शक्यतांचे सिद्धांत मोडीत काढून
उसळी मारून वर येते ते सत्य असते
आणि काळाच्या जजमेंटल ओघात
मोडीत निघते ते असत्य असते.
खोट्याला तर जगात अनेक मालक पालक असतात
खऱ्याचा मालकच काळ असतो
खोट्याचे मालक पालक काळाच्या ओघात अस्तित्वहीन
होत जातात,संपून जातात,मिटतात,उन्मळून पडतात, तहस नहस होतात
खऱ्याला पाठबळच काळाचे असते
खरं काळासोबत चालते, किंवा काळाच्याही पुढे धावते
ते काळाच्या अनंत प्रवाहासोबत चकाकते, उजाडते,दिशा देते,चांगले काही पेरते
Copyright:- कवी सुभाष पवार
मराठीसृष्टीच्या फेसबुक पेजवरुन
सारेच आहेत दुबळे
कुणाते नसे शक्ति
वेळ येतां दुर्बल ठरे
जे सबळ समजती ।।१।।
विचार मनी येतां
दुसरा शक्तिशाली
समजोनी जावे तेव्हां
हार तुमची झाली ।।२।।
मनाची सबलता
हेच शक्तीचे मापन
काय कामाचा देह
दुर्बल असतां मन ।।३।।
सुदृढ देह व मन
यांची मिळून जोडी
जीवनातील यश
तुमच्या पदरीं पाडी ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे
रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?
निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं
निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं
केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य
आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य
मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें
निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एक होती शाळा
शाळेत होता फळा
फळ्यासमोर मुले बसत
असेच रोज वर्ग भरत
शाळेचे एक होते मैदान
चाले तिथे रोज घमासान
खेळांचे मग डाव भरत
दिवसा मागून दिवस सरत
बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी
रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी
आता कसली शाळा
आणि कसले मैदान
कोरोना च्या धाका पाई
मुले झालीत हैराण
हात धु , मास्क घाल, हेच रोज ऐकू येतं
अन मोबाईल हाती घेऊन, युद्ध त्यांचे सुरू होतं.
-- भैय्यानंद वसंत बागुल.
मानव देह देवूनी ईश्वरा, उपकार केले मजवरती
सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती...१,
कर्म दिले तू मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे
उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे...२,
मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई ते प्रभूसेवेने
परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने...३,
एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देयी तू मजला
संधी देवूनी तव सेवेची, सहवास मिळवा हर घडीला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वेदना विपन्नावस्थेची सारी भोगूनी झाली..
तरीही प्रारब्धयोगे सारे सुखऐश्वर्य लाभले..
तरीही जीव हा मोहपाशात कां ? गुंतलेला..
वाटते जीवा ! बरेच काही अजूनही राहिले..।।..१
सांग मना , आज तुज जवळ काय नाही..
तुज श्रेष्ठ विवेकी जन्म लाभला मानवाचा..
वात्सल्यप्रीतीच्या सरोवरी तुडुंब रे डुंबला..
अनंत जन्मांचे हे भाग्य अलौकिक आगळे..।।..२
आज जीवात्म्यावर मंडरते रे सांज केशरी..
आत्माही भाळला श्रीरंगी मंजुळ वेणूवरती..
जीव आता मुक्तीच्या त्या विरक्त वाटेवरती..
तरी कां भासते जगायचे बरेच काही राहिले..।।..३
जन्मासंगेच मृत्यू , हेच सुर्यप्रकाशी सत्य..
त्या सत्याची दोरी त्या अनामीकाच्या हाती..
युगायुगांची पराधिनता ही तुझीच रे मानवा..
हव्यास कशाला अजुन काही जगायचे राहिले..।।..४
©️ वि.ग.सातपुते..(भावकवी)
9766534908
रचना क्र.५१/ २-४-२०२१
एक होती अनु
फुलासारखी जणू
डोळे फिरवी गर्र गर्र
पाऊल टाकी भरभर
तिला लागली भूक
गडू दिला एक
बघितला रिकामा गडू
तिला आले रडूं
आईने दुध भरले
कांठोकांठ ओतले
तिला हवय जास्त
दूध आहे मस्त
रडरड रडली
आदळ आपट केली
सांडूनी गेला गडू
पाठींत बसला मात्र धम्मक लाडू
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।।
हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।।
दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।।
सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।।
आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।।
ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।।
' घेणे ' सारे आपल्यासाठीं । करीत जीवन घालविले ।।
' देण्या ' मधल्या आनंदाला । मन सदा वंचित राहिले ।।४।।
सुधारुन घे आतां तरी । अनुभवाने चूक आपली ।।
उर्वरित वर्षे जाऊं दे । त्यागवृत्ती मध्यें सगळी ।।५।।
भोगातले सुख कसे ते । क्षणांत येई क्षणांत जाई ।।
त्यागातील समाधान परि । उशीरा लाभून सदैव राही ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
प्रेमिकांचे गीत गाऊं
आनंदात न्हाऊ //धृ//
बागेमधल्या फुलानीं
सुगंध आणिला वनीं
फुलपाखरासमान गंधशोषित जाऊ //१//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
कोकिळ गाते आम्रवनीं
कुहू ss कुहू ss स्वर काढूनी
नक्कल करण्या तिची उंच लकेरी घेऊं //२//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
श्रावणाच्या पडती सरी
अंग भिजते थोडे परि
सप्तरंगाचे इंद्रधनुष्य आकाशांत पाहूं //३//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
निरभ्र आहे आकाश
पौर्णिमेचा पडे प्रकाश
एक दिलानें एक सुराने नाचत ताल धरूं //४//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti