खिळ्यांचे जगही असेच असते,
चुकांमधून सुधारत असते !
लहान खिळ्यांना चुका म्हणतात,
चुकता चुका खिळे होतात !
चुकांचे सुद्धा किती प्रकार,
टेकस, छोटेखिळे विविध आकार !
लहान खिळ्यांना चुका म्हणण्याचे कारण काय?
खिळे बनवितांना चुका झाल्या काय?
चुकल्या चुका, नादावले खिळे,
चुका आणि खिळ्यांच्या नशिबी हातोडे !
रुसल्या चुका, रुसले खिळे,
लाकडात शिरण्या नाही रुचे !
किती वर्ष असे लपून राहायचे?
मुक्त श्वास घेण्या कधी बाहेरे यायचे?
आमचे जीवन असेच सरायचे,
चाकोरीच्या बाहेर कधीच नाही जायचे !
हातोड्यांचे घाव सोसतो आम्हीं,
स्वत:चा कार्यभाग उरकता तुम्हीं !
-- जगदीश पटवर्धन
शोषून शोषून जमविता,
झुरुन झुरुन मरुन जाता
पैशांनी भरलेल्या पिशव्या
फाटून जातील
हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र
तुमची आसवे पुसण्यासाठी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा....
घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये
दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे .
चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह
आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे
वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील
मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील .
कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील .
मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो !
कुंभवाले लाडू हवा असताना अनवधानाने कडबोळ चावायला सुरवात करतील .
मीनवाले कायम गोंधळात, यांचा नक्की काय घ्यायचं हे ठरेपर्यंत मेषेच्या चार चकल्या फस्त झालेल्या असतात !
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता
गरगर गरगर फिरवू चरखा
दीन जना जो देईल तनखा।।धृ।।
चरख्याचा हा मंजुळ नाद
दशदिशांतुनी घालीत साद
स्वदेशी खादीचा जणू प्रसाद
परसत्तेचा सोडवी विळखा
गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।।
निघती भरभर कोमल धागे
सुबक गुंफुनी विणुया तागे
देश आपुला न राहील मागे
करी निर्भय हा पाठीराखा
गरगर गरगर फिरवू चरखा।।२।।
कवच स्वदेशी निर्भयतेचे
शस्त्र हाती हे संघटनेचे
गीत मुखीचे स्वातंत्र्याचे
जयभारत हा घोषही ऐका
गरगर गरगर फिरवू चरखा ।। ३ ।।
-स्व. सौ. गंगूताई वैद्य
मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई
धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी
प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी
निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी
दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने
घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने
निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो
पाणी दिसले तुझ्या नयनी दु:खाने जेंव्हा हळहळलो
अनंत ऋणे करुनी ठेवसी तुच माझ्या शिरावरी अशक्य आहे तेच फेडणे ह्याच जन्मी तरी
मात्रत्वाचे ऋण फेडण्या असे वाटते, माताच व्हावे
पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी सेवा करण्या मजला मिळावे.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कुठे नाही स्वरूप देवा,
बघायला मिळत आम्हा,
काळीज नमते तुज पाहता,
चराचरातील या घटका, ---
निसर्ग मज वाटतो,
तुझेच रुप देवा,
तिथेच आम्ही तुला मानतो,
स्वरूप कोणते का असे बा,
ना तू कुठल्या देवळा,
ना कुठल्या मंदिरी,
प्रत्येकाच्या हृदयी
बसशी,असशी तू हरी,----
प्रेम, माया, ममता,
आपुलकी, जिव्हाळा,
कुठे तू नसशी
फक्त सांग मज गा ,---!!!!
माणुसकी जे जपती,
त्यांच्या मनोमनी तू ,
दया करुणा अहिंसा,
दाखवीत प्रगटशी तू,--!!!.
अनोळखी हात करता,
निरपेक्ष ती सहाय्यता,
बापुड्या दीन -दुबळ्या,
जिवांचा तू रक्षण कर्ता,--!!!
संकटात कोण पुढे येई,
कोण देईल अमोल दिलासा,
कोण आपला हात देई,
असता कुठली अवघड वेळा,--!!!
वैविध्य अन् वैचित्र्य ,
पाहुनी माणूस चकित होई,
कोण नेई शेवटास,
जिंकता जरी कुठली लढाई,--!!!
नीतिमत्तेची चाड नसता,
कोण ओढे फटकारे,
आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली भारती बिर्जे डिग्गीकर यांची हि कविता
होवो भारत आत्मनिर्भर नवी जागो इथे प्रेरणा
सांगे गर्जून लोकनायक असे देण्या नवी चेतना
आहे काय म्हणायचे? कुठून या येतात संकल्पना ?
आता पूर्ण अशक्यही परतणे कोशामध्ये त्या जुन्या
आला निर्मम काळ एक असला आक्रित हे आगळे
सारी मानवजात बंद कसल्या कैदेत ते ना कळे
येते संकट शक्यता नवनव्या घेऊन त्याच्यासवे
सांगे हा कृतिशील नायक, नवे रणसूत्र हा ऐकवे
या भूमीतच नांदली विकसली ऊर्जा तपोसाध्य ती
पूर्वापारचं आत्मतत्त्व जपणारी ही जुनी संस्कृती
सारे तेच प्रमेयसाधन नव्या संकल्पकार्यास्तव
आता एक करू पुनश्च प्रण की लाभो नवे वैभव
आम्ही निर्मल विश्वभाव धरला आहे जरी अंतरी
आधी उद्यमशीलताच जपणे जी स्वावलंबी करी..
आता आकळतो चिरंतन असा संदर्भ भाष्यातला
सायासाविण बंध एक जुळतो विश्वासवे आपला..
- भारती बिर्जे डिग्गीकर
आस राहते सतत मनी, मिळत नसते त्याचेसाठी
प्रयत्न सारे होत असती, हाती नाही ते मिळविण्यापोटी....१,
प्रयत्नात तो आनंद होता, धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें, जिद्द मनाची आणिक हेका....२,
यश मिळते जेंव्हां पदरी, धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशीले, त्यातील उर्मी निघून जाते....३,
यशांत नाही आनंद तेवढा, मिळविण्यात जो दिसून येई
कांहींतरी ते मिळवायचे, याच विचारी रमून जाई....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मनामध्ये पडघम सतत वाजतच रहातात
काळजाचे करावे कान तेव्हा ऐकू येतात
उमटतात त्यात मनाच्या गाभाऱ्यातले नाद
खोलवरुन येणारी आपल्या अंतराची साद
आयुष्याच्या वाटेवरले काही फुललेले श्वास
काळीजकुपीत जपलेले एकले एकले निश्वास्
एकमेकांवरचा असलेला गाढासा विश्वास
आसपास असण्याचा मग असेना का आभास
कधी राहते गुंजत विचारांची निःशब्द गाज
उलगडत कधी शब्दांत गुरफटलेली लाज
थिरकत थिरकत येणाऱ्या तरलतेचे लहरी ताल
गुणगुणारे, धुसफुसणारे, आसुसलेले आपले हाल
येतात मोहरवत उत्फुल्लतेचे प्रसन्न झंकार
कधी तुटत झिणझिणणारी वेदनांची तार
अंतरीच्या डोहात खोल साधून एकांतवास
आपला आपल्यातच विरघळण्याचा असतो हा प्रवास
- यतीन सामंत
Copyright © 2025 | Marathisrushti