(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • जिणे (वृद्धत्वाची  व्यथा)

    एक होता कप
    एक होती बशी
    दोघांची जमली गट्टी खाशी
    पांढरा शुभ्र त्यांचा
    रंग चमकदार
    त्यावर नाजूक फुलांची
    नक्षी झोकदार
    दिसायचे ऐटदार
    आणि आकार डौलदार
    सकाळ-संध्याकाळ
    गोड किणकिण चालायची फार
    कपाने ओतायचा
    बशीत चहा सुगंधी
    तिने हळूहळू प्यायची
    साधायची संधी
    एक दिवशी फुटली बशी
    झाले तिचे तुकडे
    कपाचा ही कान तुटला गेले त्याचे रुपडे
    बशीचे तुकडे
    दिले फेकून
    कपाला ही दिले
    अडगळीत भिरकावून
    एक दिवस आले
    एक पाहुणे
    त्यांना दाढीसाठी हवे
    गरम पाणी म्हणे
    अडगळीतून काढला का
    दिले त्यात पाणी भरून
    पाहुण्याने केली दाढी घोटून
    आरशात पाहिले रूप न्याहाळून
    कपाचे जिणे झाले केविलवाणे
    कुठे सुगंधी चहा कुठे हे लाजिरवाणी जिणे?

    -- विनायक अत्रे.

  • अबोला

    मज अजुन नाही कळले
    मी तुझ्यात कसा गुंतलो

    ज्या क्षणी तुज पाहिले
    मी तुझ्यात हरवुन गेलो

    न कधीच व्यक्त जाहलो
    तुजला निरखित राहिलो

    तुही मनीचे जाणले होते
    मी मनांत समजूनी गेलो

    घायाळ, होताच कटाक्षी
    तव काळजात विरघळलो

    जे घडले ते ते घडूनी गेले
    स्मृतींना उलगडित राहिलो

    रुतला अंतरी तव अबोला
    मी मना समजवित राहिलो

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२२८

    ७/९/ २०२२

  • काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात

    काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात
    कळत नाही निःशब्द घाव कधी बसतात
    कुणी येत अवचित वसंत पालवी लेऊन
    आयुष्यात स्थिरावत अलगद सावली बनून
    मन भरुन झालं की भावनांचा खेळ होतो
    कोण मग हलकेच अंतरी रडवून जातो
    इथे तिथे शब्दांचे फटकारे सारे बसतात
    स्त्रीला संयमाचे धडे सहज मिळतात
    कुणी आयुष्य अलगद व्यापून जातं
    आईचं बोलणं शब्दांत शहाण करुन जातं
    शब्दांचे बाण जिव्हारी फटकन लागतात
    चुकलेल्या वाख्येत मनाला घाव बसतात
    शब्दांचा खेळ सारा रोज बोथट करतो
    रोज नव्याने घाव आल्हाद होत जातो
    अश्रूनाही फारशी किंमत उरत नसते
    माणस माणसांना वापरुन धार बोथट होते
    टाईमपास हा कधी कधी शिकवून जातो
    कळ्यांचा भाव फुलांना न कळतो
    सहज कुणी आयुष्यात येऊन जातं
    विखुरलेले रंग विस्कटून आल्हाद जातं
    विश्वासात अविश्वास सहज खपून जातो
    माणूस माणसाला बोलून तोडून टाकतो
    निःशब्द मन अलवार हरवून जातं
    त्यालाही माहीत नसतं खेळ मनाचा उरतं
    अशी कशी बोच एकाकी मग रुतते
    कोण दुःखी होतो तर कोणाचे मन हर्षते
    भावविश्वात प्रेम कुणावर करु नये
    गुंतल मन अलवार तर मोहात रुतु नये
    शब्दांचे घाव कुणी मनावर सहज करतात
    असे कसे अश्रू अंतःकरण रडवून जातात
    आईच्या वात्सल्यात ऊब मायेची असते
    कोण हलकेच रडवून आयुष्य मिटून जाते
    संथ पाण्यात सायंकाळ केशरी भिजते
    जीव लावला अंतरी तर सल कातरी बोचते
    -- स्वाती ठोंबरे.
  • तन मनातील तफावत

    देह मनातील, तफावत दिसून येते ।

    चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,

    चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।

    जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

    परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।

    शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

    दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।

    परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

    विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।

    विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मी एकटी, मी एकाकी

    अरे, एव्हाना ती यायला हवी होती !
    अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती !

    ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात.
    आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात.

    सुरू होते पूजा अर्चना
    आणि सरस्वतीची आराधना.

    मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट.
    खाऊ झालाच समजा सफाचाट.

    कधी कधी ऐकू येतो गलका.
    माझ्या कानांना मस्त बसतो दणका.

    थोड्या वेळाने परतायची वेळ होते.
    आमचं मन खट्टू होते.

    मी पुन्हा एकदा नव्याने उजळणी करते.
    आणखी एक आवर्तन पूर्ण होते.

    उद्याच्या पुनर्भेटीचा संकल्प ठरतो
    आणि सुर्य पश्चिमेला मावळतो.

    पण आता सगळं सुनसान आहे.
    सर्वत्र स्मशानकळा आली आहे.

    सगळीकडे जमली आहेत कोळीष्टके.
    सगळे आयत, चौरस झाले आहेत ओकेबोके.

    इकडे आणि तिकडे जमले आहेत धुळीचे थर.
    माणसाचा कुठे उरला आहे इकडे वावर.

    त्यामुळेच मनात काहूर उठलंय
    की ती आता कधीच येणार नाहीत की काय ?

    कधीची उभी आहे मी निष्पर्ण वृक्षासारखी.
    मी एकटी, मी एकाकी.

    प्रत्येक गावा गावातील शाळा.
    प्रत्येक शहरा शहरातील शाळा.

    -- शरद दिवेकर
    कल्याण
    70457 30570

  • खरी संक्रात

    आज संक्रातीचा गोड सण
    शुभेच्छांसाठी आला ताईचा फोन
    सांगे खुशाली अन मोकळे करे मन
    जिवाभावाच्या गोडव्याचा सण
    आज संक्रातीचा गोड सण
    सांगे ती केलीत घरी, किती पंचपक्वान्न
    सुग्रास ताटभरुन आहे इथे अन्न
    सोबतीला आहे पुरण नि वरण
    आज संक्रातीचा गोड सण
    विचारे आता खुशाली भाच्याला पण
    सांग म्हणे काय छान जेवलास जेवण
    केलेस का नवे कपडे, भरलं का मन
    आज संक्रांतीचा गोड सण
    भाचा म्हणे,हो मावशी सगळं छान छान
    पोटभर जेवलो तरी भरलं नाही मन
    तिळगुळाच्या लाडवाने झालाय छान सण
    आज संक्रातीचा गोड सण
    आई पाही लेकाकडे भरून आलं मन
    अर्ध्या भाकरी ने सगळ्यांचं झालंय जेवण
    तरी सांगे मावशीला छान झालाय सण
    आज संक्रातीचा गोड सण
    समजून चालायचं असंच आहे जीवन
    तिळा तिळाने वाढवायचं मनाचं मोठेपण
    तेव्हाच होईल खरा संक्रातीचा गोड सण!
    -- वर्षा कदम.
  • कृष्णछाया

    मी जगतोच, तसा एकांती
    आभाळ मनाचे येते भरुनी

    झरती निष्पाप भाव अंतरी
    अतरंग भक्तीत जाते दंगुनी

    अस्ताचली, भावरंग केशरी
    त्यावरी कृष्णछाया सांत्वनी

    जणु भासते समोर सावळा
    कृतार्थी तृप्तता या लोचनी

    झुळझुळते माय गंगायमुना
    पावन तुषारी जातो भिजूनी

    एकांती प्रहर सारे आत्मरंगी
    कृपावंता स्मरत राहू जीवनी

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८४.

    १७ - ३ - २०२२.

  • कविते-बिवितेसाठी?

    घर -दार
    ऑफिस- बिफीस
    पोरं-सोरं
    लोकल -बिकल
    रीक्षा -बिक्षा
    रोज दिवसभर
    जा- ये

    पुन्हा

    तसंच
    ये -जा
    लोकल- बिकल
    परत -फिरत
    घर -बार
    जेवण- खावण
    जीवन -बिवन
    चालत राहतं

    वेळ कुठे
    कविते-बिवितेसाठी?
    ती तर
    सतत--सोबत

    पाठी- पाठी

    मुखी -ओठी///

    # कौशल

    श्रीकांत पेटकर

    ९७६९२१३९१३

  • १० वर्ष

    १० वर्ष आईची.. पुढली
    १० बाबांची.

    १० दिली नवऱ्याला..

    १० दिली मुलांना..
    सर्वार्थाने केवळ त्यांची.

    आता मात्र मुक्त हो...
    ही १० स्व:तःची...

    वाच, नाच, मौज कर...
    हवे ते ते स्वैर कर.

    पुढील १० आहेत मग
    त्याच्या-आपल्या तब्येतीची...

    त्या पुढील १० वानप्रस्थ...
    संसारातून निवृतिची.

    म्हणून म्हणते...

    हीच १० वर्षे फक्त तुझी
    नाहीत दुसऱ्या कुणाची
    सूनेच्या संसारातही
    नाक न खुपसण्यायची

    आताच मस्त जगून घे
    खळखळून हसून घे
    प्रेमात पड स्वतःच्याच
    लाड कर स्वतःचेच
    स्वतःवरच रुसून घे
    नवऱ्याला मार काखोटीला
    जग सारे फिरुन घे

    देव करो तुला मिळावी
    १० वर्षे स्वैर सुखाची.

    देव करो तुला कळो
    महती स्वत:च्या एका क्षणाची....

  • आधार

    वेलींना आधार होता,
    वृक्ष वाटला दणकट परि
    बुंधा ज्याचा किडूनी गेला,
    कोसळणार मग कधीतरी

    नष्ट करिल तरूवेलींना,
    धरणीवरती आडवा होता
    सौंदर्य दिले लताफूलांनी,
    सारे कांहीं विसरूनी जाता

    वेलींनो आणि झुडपानों,
    सोडूनी घ्या आधार पोकळ
    स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,
    स्वावलंबनाचे टाका पाऊल

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com