प्रभूची लीला न्यारी
विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी
हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो
आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो
कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान
त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन
विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक
कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक
चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी
कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी
प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता
असे ती सर्वता
महान शक्ति असता
त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक
'अपूर्व शक्ती' ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक
सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव
समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव
निरनिराळे त्या शक्तीसी ।।८।।
कुणी म्हणती राम
कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम
येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे
नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे
हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई
परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही
त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ती
रुप आकार त्यासी नसती
शक्ती समजोनी करावी भक्ती
आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला
विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उमजण्याला
सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान
कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान
ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी
सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई
ध्येय मिळतां जीवनी ।।१५।।
विचार करा मनाशी
वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी
हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी
चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी
सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित
विद्वान सामान्यात
बहूजनांपेक्षां
ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ती
सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती
विसरुन प्रभू शक्तीसी ।।१९।।
तर्क शक्ती थोर
“आहे चा नाही” करणार
“नाहीं ला आहे” पटविणार,
करुनी ज्ञानाचा खेळ ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद
वाद करीत राही
जीवन करी बरबाद
विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय हे साध्य,
मार्ग हे साधन
वाया जाई आयुष्य
माध्यम साधन समजून ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी
ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने
साधका प्राप्त साध्य होई ।।२३।।
अनेक मार्गाचे प्रयोजन
ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व
ठेवण्या टिकवून ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी
प्रत्येक झगडतो त्यासाठीं
सकळजन आयुष्य
खर्ची त्या पोटी ।।२५।।
न कळे त्यास देवपण
भांडण्यांत जाई विसरुन
टाकी आयुष्य
मातीमोल करुन ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद
मिटवा वादविवाद
नष्ट करा त्वरीत
लहान मोठ्यांचा संवाद ।।२७।।
न कुणी मोठे न लहान
सारेच आहे समान
असती सारे मानवनिर्मित
घ्या सारे समजून ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक
हे मानवनिर्मीत प्रतिक
न कळे अज्ञाना
सर्व मार्गाचे ध्येय एक ।।२९।।
मानव शक्ती तीच ईश्वर
दुसरा नसे कोणी वर
सगुण रुप देऊनी
आपणची देतो त्यासी आकार ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा
आपसातील भेद विसरा
जीवन सुखी करण्या
प्रभू देई तयांना आसरा ।।३१।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला
सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला...१
मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे,
वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे...२,
आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे
जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे...३,
खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत
बाह्य जगी शोधत असतां दुःख तुमचे हातीं लागते...४,
दुःख असे अंवती भंवती, सुख तुमच्या अंतर्यामीं
बाह्य जगातील सुख परि कधीं न येती तुमचे कामीं....५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे
कळवळली भारत माता तुझ्या नावाने रडते आहे.।।1।।
हाती तुझ्या जोर पोलादाचा
रक्तात उसळणारा तुफान आहे
आज जागा झाला नाहीस
तर तुझ्या घरी उद्या स्मशान आहे.
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।2।।
रोजचेचं व्हाटस अप फेसबुकचे जगणे
आता तुला शोभणार नाही
काळजी असेल ना भारत मातेची
तर घे हाती बंदुक आणि हो सीमेवरचा शिपाई
किती दिवस तुला मिंदेगिरीचे जगणे जमणार आहे
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।3।।
मार चपराक भ्रष्टांच्या कानाखाली
कारण तूच आहेस उद्याच्या भारताचा वाली..
घरासाठी लढतोस रोज आता देशासाठी लढ
झोपचे सोंग घेणा-या आता तरी डोळे उघड
आज जागा झाला नाहीस तर जीवन संपणार आहे.
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।4।।
मी ओरडून काय सांगू, तुला ही तुझे दुख कळते आहे
भारतमातेच्या आक्रोशाने तुझे ही ऊर जळते आहे.
तु रडशील आज, पण तुझ्या अश्रूंना किंमत राहणार नाही.
रक्त सांड पुन्हा स्वातंत्र्यासाठी
मग भारत माता ही देईल तुझ्या बलिदानाची ग्वाही
हेच माझे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।5।।
-- अमोल उंबरकर
मैत्री आपली की आपण मैत्रीचे उदाहरण?
तू हसावं, मी त्यात विरावं,
आनंदाच्या ओघात, मी मिठीत तुझ्या शिरावं,
मी मिठीत येताना, हलकीच एक खोड करावी,
तू खोट खोट रागवताना, ती गमतीत रुपांतर व्हावी…
तू आणि तुझा चेहरा, त्यात फक्त तू असावी,
तुझ्याव्यतिरिक्त मला त्यात माझी झलक दिसावी…
तू आणि मी कधी एकमेकांचे होऊन गेलो कळलच नाही,
भान जगाचे विसरून गेलो, एकटेपण उरलेच नाही…
तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू,
कधी आई तर कधी तिचे लेकरू,
खूप सुरक्षित वाटतं मला तूझ्या मिठीत,
म्हणूनच हक्काने शिरते तूझ्या कुशीत,
थकलेल्या या जीवाला , मिळतो त्यात विसावा,
तूझ्या डोळ्यात दोस्तीचा अथांग सागर दिसावा…
हसलीस ना? अशीच हसत रहा,
हेच तर हवं आहे मला,
आता उमगलं त्या गहन प्रश्नाचं उत्तर,
का आहे “मैत्री” सगळ्यांत बेहतर…
अशी आहे आपली ही निखळ मैत्री,
कधी माझ्यामध्ये तू, कधी तुझ्यामध्ये मी….
– श्वेता संकपाळ
सारेच आहे प्रभूमय,
अणूपासून ब्रह्मांड होय...१,
ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,
सर्वत्र व्यापले आकाश,
न जाणती त्याचे पाश, ....३,
वायूचा होवून संचार,
जीव जंतू जगविणार....४
वायू असे शक्तीचे रूप,
पेटवी तो प्राणदिप....५,
प्राण आपल्या अंतरी,
तोच असे रूप ईश्वरी....६
जसे शिव आणि शक्ती,
तसे प्राण व वायू असती...७,
बाहेरची वायू शक्ती,
अंतरिच्या प्राणास भेटती....८,
जाता दोन्ही एक होवूनी,
चेतना मिळते जीवनी...९
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चंचल मन हे चंचल धारा, पंख पसरीत उडे भरारा ।
झेप घेवूनी उलटी सुलटी, लक्ष तयाचे चमकत तारा ।।
लुकलुकणारे तारे अगणित, नभांग सारे प्रसन्न चित्त ।
ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती, झोके घेते सहज अविरत ।।
वेळ क्षणाचा पुरतो त्याला, टिचक्या टपल्या मारीत गेले ।
आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले ।।
कोठून येते त्याला शक्ती, सटकून जाण्याची ही युक्ती ।
अन्न पाणी हे कसे घेई ते, पचनी सारे कसे पडते ।।
हटवादी हे असे केवढे, नको तिथेची जाय बापडे ।
देहाला त्या भोग देऊनी, भोग भोगण्या लावी तेवढे ।।
स्वैराचारी बंध मुक्त ते, देहावरती राज्य करीते ।
अवचित मिळता संत महात्मा, बंधनात ते अडकून पडते ।।
राज्य उलटते सारे आता, मनावरती ताबा बसता ।
माया जाते हारून जेथे, ब्रह्मरूप ते सारे होता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गर्द आणि इतर व्यसनांच्या मी पूर्ण आहारी गेलो होतो व आता माझी घरातील पैश्यांची मागणी वाढली होती , ती प्रत्येक वेळी पूर्ण होणे शक्यच नव्हते तेव्हा मग घरात छोट्या मोठ्या चोऱ्या सुरु झाल्या वडील पक्षाघातातून बरे होऊन आले होते आणि पुन्हा त्यांनी कामावर जाणे सुरु केले होते मात्र ते जरा विसरभोळे झाले होते त्याचा फायदा घेऊन मी त्यांच्या पाकिटातून पैसे गुपचूप काढत असे ,
एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आज यमुनेचा उर,किती भरुनी आला,
आनंदाने पाण्या तिच्या,
पूर भरतीचा आला,--!!!
गोकुळातील नंदकिशोर,
मदतीस तिच्या धावला,
कालिया -- मर्दनाने,
गोकुळीचा त्राता झाला,--!!!
गोकुळ तिचे सर्वस्व असता,
बाल कान्हा तारक झाला,
भितीने तिची काया थरथरता कृष्णस्पर्शे, जीव कृतार्थ झाला-!
गोकुळावरील संकट केवढे,
गोपगोपिकांवर जीवघेणे,
गारठून भीतीने गेले, कृष्णावताराने वाचवले,--!!!
लहानगे ते पुढे धावतां,
बेचैनी येईल त्यांच्या चित्ता,
पुढे उभे ते, आव्हानच संकटा,
मात देत त्या अजस्त्र फण्या,--!!!
यमुनेचे काळीज कापले,
लेकरू जेव्हा उभे ठाकले, ललकारून सामोरी गेले,
डोळा भीती उमटे त्यांच्या,--!!!
थयथयाट शिरावर करतां,
कृष्ण निवांत उभा राहिला,
अवतारआभाळाएवढा,
थक्क त्या सर्वांनी पाहिला,--!!!
सहजच दुर्जनाचा अंत केला,
रंग बदलला यमुनेचा,
कालिंदी नाव तिचे पडता, चेहरामोहराच तिचा बदलला,--!!!
हिमगौरी कर्वे©
आमचं अन्न, आमची माती
आमचं धान्य, आमची शेती
कळेनाच कोणालासुद्धा
कुठून कोठे जाती !
-
आमच्या विहिरी, आमच्या सरिता,
आमचे निर्झर अन् सरोवरें
पडतिल कधि कोरडेठाक हे,
कोणां ना ठाऊकच रे !
-
वितळतील कां नद्या हिमाच्या
चढेल वरवर सागर-पाणी ?
बुडतिल कां काठाची शहरें ?
विचार हृदयीं कंपन आणी !
-
‘घडलें नाहीं असें आजवर
म्हणुनच, ना घडणार उद्याही’,
व्यर्थच आहे सें बोलणें
घटित उद्या कळणारच नाहीं !
-
ज़रा बघा रे होउन जागे,
भूमातेच्या नयनीं पाणी,
‘मला वाचवा’, भिक्षा मागे,
‘तऽरच टिकेल मनुष्यप्राणी’ !
*
आपली माणसं, आपली नाती
हलवुन उठवूया सर्वांना
पिढ्या-उद्याच्या ज़गण्यांसाठी
जिवंत ठेवूं पर्यावरणा .
- सुभाष स. नाईक
Copyright © 2025 | Marathisrushti