सध्या सगळ्यांचे स्टेटस रंगीत दिसतात,
पण आयुष्य मात्र काळं-पांढरंच असतं.
चेहऱ्यावर हसू, डोळ्यांत स्वप्नांची झळाळी,
मनात मात्र दडलेली असते वेदनांची कहाणी.
फिल्टर लावून क्षण सुंदर करता येतात,
पण नशिबावर फिल्टर कधीच लावता येत नाही.
क्षणभराच्या पोस्टला हजारो लाईक्स मिळतात,
पण दुःखाच्या क्षणी हात मोजकेच पुढे येतात.
दिसतं सगळं उजळ, आकर्षक, झगमगणारं,
पण वास्तव मात्र शांत, कठीण आणि संघर्षमय असतं.
रंग पडद्यावर नाही, तर माणुसकीत असतात.
खरी श्रीमंती पैशात नाही, तर नात्यांत असते.
म्हणून स्टेटस रंगवण्यापेक्षा मन रंगवा,
दिखावा मिरवण्यापेक्षा माणुसकी जपा.
कारण...
स्टेटसचे रंग काही क्षणांचे असतात,
पण चांगल्या कर्मांचे रंग आयुष्यभर टिकतात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान ,
मातेहूनही ती मोठी,
भाषा देतसे अधिक वेलांटी,!
ती आहे सृजनांत ,
सर्वांची काळी आई,
तिच्या कुशीतून जन्म घेतो,
आपण सारे, पक्षी, प्राणी, --!
ती करते जसे संगोपन,
जिवांचे नित्य जतन,
म्हणूनच तिला रोज करावा,
नेमाने आपण प्रणाम,---!
काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
जीवनातील संजीवनी,
तिच्याविना सृष्टी निर्जीव,--!
जोडीदार आभाळाची,
विशाल त्यांचा संसार
लेकुरे उदंड जाहली,
गोकुळ सगळा परिवार,--!
माती पोटी जन्मते बीज,
आणि विशाल वृक्ष होती,
कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
हीच बिजे मातीत रुजती,--!
फळे-फुले रसरशीत,
कधी पिकून पडती,
त्यातूनच पुन्हा जन्मती
मातीतून परत वरती,--!
मानवी शरीर पार्थिव,
मातीतच शेवट अंत,
तिच्यातून असे जन्म,
तिच्यात एकरूप परत,---!!
© हिमगौरी कर्वे.
जराशी फुंकर जखमेवरली
जराशाने मिळे दिलासा
कुणीतरी हवेच असली
बेगडी तर सहवास नकोसा
नाती अपुली जमा करावी
धन दौलतिची चिंता कशाला
जिवाभावाची मैत्र जुळावी
स्वार्थ विचारही नको वाऱ्याला
प्रेम भुकेली आहेत सारी
जिव्हाळ्याचे सूर जीवाला
ऐकून घ्यावे कधी श्रोत्यापरी
तेव्हढ्यानेही सुख मनाला
असोत कमी नि अधिक काही
कुणीही नाही पुर्ण जगाला
वाटून घेऊ जे जे ठायी
नेऊ आनंदे पूर्णत्वाला!!
-- वर्षा कदम.
जीवन काय आहे,
मला जे वाटत असे,
ते समजून घ्या तुम्हीं,
प्रभूमय ते कसे ।।१।।
मृत्यूचा तो विचार,
कधी न येई मनी,
मृत्यू आहे निश्चित,
माहित हे असूनी ।।२।।
भीती आम्हां देहाची,
कारण ते नाशवंत,
न वाटे मरूत आम्ही,
आत्मा असूनी भगवंत ।।३।।
आत्मा आहेची अमर,
मरणाची नसे भीती,
जी भीती वाटते,
ती असते देहाची ।।४।।
आत्मा नसे कुणी,
तो तर प्रभूच आहे,
साकारलेला सर्वत्र,
बाहेर व अंतरी राहे ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई
सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१
दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२
चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण
यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३
पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हातीं
प्रयत्नाची दिशा बदलतां, जुळून सहजच सारे येती...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।
आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,
घ्याहो निरखूनी ।।१।।
भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,
घ्याहो निरखूनी ।।२।।
ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,
घ्याहो निरखूनी ।।३।।
आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,
घ्याहो निरखूनी ।।४।।
सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,
घ्याहो निरखूनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
१८-०९१२८३
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
आज एक टेम्पो दिसला,
धुळीत हरवलेला, गोंगाटात विरलेला…
आत मात्र शांत बसले होते,
मूर्तीरूपी विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम.
धूळ खाली बसली, रस्ता पुन्हा शांत झाला,
पण मनातला गोंगाट वाढतच राहिला.
मी अजूनही तिथेच उभा होतो,
जिथे देव “जात” होता…
आणि माणूस “राहत” होता.
रिकामा, थोडा हरवलेला.
एक विचार हळूच आत शिरला,
आपण देवाला कुठे नेत होतो?
मंदिरात… की पुन्हा एकदा
आपल्या सोयीच्या चौकटीत बंद करायला?
त्या मूर्तींनी काहीच मागितलं नव्हतं,
ना फुलं, ना नारळ, ना मोठी आरती…
फक्त एक साधा, निरागस भाव,
जो आपण कधीच दिलाच नाही.
आपण त्यांना उचललं, सजवलं, बसवलं…
पण कधी त्यांच्यासारखं जगण्याचा
एक क्षण तरी जगलो का?
ज्ञानेश्वरांच्या ओठांवरचं शांत स्मित
आज जणू विचारत होतं.
“तुम्ही आम्हाला वाचता,
पण स्वतःला का नाही?”
तुकारामांचा आवाज
कुठेतरी हरवून परत येत होता.
“नाम घेताय, पण मन हरवलंय,
देव शोधताय, पण माणूस हरवलाय…”
रखुमाईच्या मायेचा स्पर्श
आज जाणवला…
पण त्या स्पर्शातही एक वेदना होती.
“माझ्या लेकरांनो,
तुम्ही इतके दूर कसे झालात स्वतःपासून?”
आणि विठ्ठल…
तो अजूनही उभाच आहे,
काळाच्या पल्याड, भावाच्या प्रतीक्षेत…
पण आज पहिल्यांदाच असं वाटलं,
तो वाट पाहत नाहीये आपली,
तो वाट पाहतोय
आपण “माणूस” होण्याची…
टेम्पो गेला, मूर्ती पोहोचल्या,
उद्या पुन्हा आरती होईल, घंटा वाजतील…
पण जर मनात दिवा पेटलाच नाही,
तर त्या प्रकाशाचं काय?
आणि शेवटी एक सत्य
हळूच डोळ्यात पाणी आणून गेलं...
देव कधीच हलत नाही…
हलतो तो फक्त आपला विश्वास,
आणि हरवतं ते फक्त,
आपलं “माणूसपण”…
कदाचित म्हणूनच आज
मूर्ती प्रवास करत होत्या…
आणि देव मात्र
आपल्या आत कुठेतरी
एकटा, शांत, आपली
वाट बघत होता…
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
मी प्रेमात पडलो
की फक्त कविता लिहतो
पप्रेमाच्या नशेत...
नशा उतरल्यावर
तिच्या प्रेमाची
त्या एकदा वाचून बघतो...
तेव्हा मला कळत
मी नशेतही
बराच शुद्धीत असतो...
माझा प्रेमभंग
झाल्यावरही
मी फक्त कविताच लिहतो...
पण तेव्हा मी
पूर्ण शुद्धीत असतो...
माझ्या कविता
सतत वाचणाऱ्यानां
माझं प्रेमात पडणं
कधीच कळत नाही
पण माझा प्रेमभंग
मात्र लगेच कळतो...
माझ्या कविता
तिला कळतात
पण वळत नाहीत
म्हणून मी लिहतो...
ती कवितेत
भिजत राहते
मी कवितांचा पाऊस
पाडत राहतो...
कवी - निलेश बामणे ( बी डी एन )
आघात होवूनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे
संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य तो ठरत असे...१,
दु:खाची ती चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई
कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई....३,
दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी
प्रेमभाव तो अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी...३,
तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती
दु:खाचे ते वार झेलूनी, रक्षण त्याचे सदैव करिती.....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
क्षणक्षण येते तुझीच आठवण
देवा सत्य तुची ब्रह्मांडी दिगंतर
जगव्यवहारी मी जगत रहातो
त्या जगण्यावीण नाही गत्यंतर
जगता जगताच कळूनी चुकते
आणि मीच येतो त्वरी भानावर
दिल्या घेतल्याचेच हे जग सारे
अनुभवांती उलगडती प्रीतपदर
सुख दुःख जन्मता सदा सोबती
भाळी प्रारब्धाचे भोगणे निरंतर
हा जन्म विवेकी जगण्यासाठी
खुणगाठ मनी माझिया निरंतर
मुक्तीमोक्ष जरी कुतार्थ जीवन
भगवंता मी तुज स्मरतो निरंतर
*********
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१९
४/१२/ २०२२
Copyright © 2025 | Marathisrushti