अर्थेचा लाविती अनर्थ ही अनर्थात अर्थ शोधिती माकड वानर मानवजात ही
असामान्यता मानिती डरकाळी फोडिता तयाला शेर इ काश्मिर म्हणती
आणि तमाने लाभ मारिता गर्दभ पदी स्थापिती कशी ही उलटी जनता रिती ।।१।।
नरेचि केला नारयण जगी दांभिक जन फसती नारायण न वसे जगी या नाते आकाशी
परंतु जेव्हा येता लग्ना स्वसुता सौदामिनी जातो कोठे विश्वभाव हा जातीतच बुडूनी
अशी ही उलटी जनता रिती ।।२।।
प्रत्येकाने आपआपुले कार्य करावे खरे त्यातच देशोद्धारण वसे
हरेक सांगे सांगे संगी सांगे त्याचा संगी परंतु रचवी कागदपत्रे त्यांची हो ना जंगी
प्रत्येक जाणतो कर्तव्य पराचे स्वहिताचे अधिकार असा हा लग्नाचा संसार ।।३।।
मी एक त्यातला असे मी जाणतो सर्व हे ठसे पण अगतिकता ही असे
मग मीही हसतो मजला संसार जगाचा सजला ।।४।।
--- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
कांपू नकोस धरणीमाते ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।। धृ ।।
जागो जागी अत्याचार सर्वत्र दिसे भ्रष्टाचार
वाढले भयंकर अनाचार
गरीब जनता त्रस्त होऊनी जाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।१।।
रक्षण नाही स्त्रियांचे प्रमाण वाढले बलात्काराचे
प्रकार घडती विनयभंगाचे
हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।२।।
लुट लुट संपत्तीची जाळपोळ घरदारांची
खून पाडती अनेकांचे
प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।३।।
गीतेमध्ये दिले वचन अर्जुनासी प्रभूचे तोंडून
प्रभूचे होईल पुनरागमन
अत्याचार वाढता जगाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।४।।
शब्द आपला पाळूनी येईल तो अवतार घेउनी
सुखी करील दु:ख नाशूनी
विश्वास ठेवा गीतेतील शब्दाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।५।।
ठेवा निर्मळ देह आणि मन पवित्रतेचे करा वातावरण
टाळू नका ह्या स्वागत संधीते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
मातृभू तुझ्या करता,
सर्वस्वाचे देतो दान,
रक्षणासाठी केवळ तुझ्या,
सज्ज माझे पंचप्राण,---!!!
कितीतरी बघ आजवर,
झाले तुझसाठी अर्पित,
बिमोड करून शत्रूचा,
निनाद तुझा गर्जत,---!!!
भारत माते तुझी माती,
आम्हा प्रिय प्राणाहून,---
"पाईक" आहोत तुझे आम्ही,
त्रिवार वंदन तुजसी करुन---!!!
वाचवू आम्ही तुला,
करुन जिवाची कुरवंडी,
तीच खरी तुझी सेवा,
बांधल्या आम्ही खुणगाठी,---!!!
हिम्मत जर कोणी,
करेल माईचा लाल,
वचने तुला आमुची,
दाखवू त्याला माती,---!!!
ध्येय श्रेयस प्रेयस सगळे,
कडेकोट तुझीच निगराणी
निर्भय निडर निर्धास्त असावे,
हीच तुला एक विनवणी,---!!!
किती आले किती गेले,
तुझा घास बळकावण्यां,
परास्त होऊन परत फिरले,
मायदेशी तोंड लपवण्या,---!!
आपली धर्मसंस्कृती कधीही,
आम्ही सोडली नाही,
तुझेच संस्कार मनी,
काढावा किंतु सर्वांनी,---!!!
चांगल्याची चांगले आम्ही,
वाईटांशी बनू कर्दनकाळ,
जगानेही ध्यानी ठेवावे,
देशसेवक इथले हर बाळ,--!!!
माता वाट्याला कुणाच्या,
कधीच गेली नाही,
जो येईल तिच्या मार्गी,
त्याची कधीच खैर नाही,---!!!
हिमगौरी कर्वे.©
कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
नुसत्या नजरा भिडल्या म्हणून प्रेम होत नाही,
मनाने मनाला अलगद स्पर्श केला की प्रेम फुलतं.
रोज हजारो चेहरे समोरून जातात,
पण एकच चेहरा डोळ्यांत कायमचा विसावतो.
असंख्य आवाज कानावर येतात,
पण एकाच हाकेने हृदय धडधडू लागतं.
अंतर कितीही वाढलं तरी,
आठवणींचा धागा कधी तुटत नाही.
वेळ कितीही बदलली तरी,
मनातील ओढ कधी कमी होत नाही.
रागातही काळजी असते,
अबोलपणातही प्रेम दडलं असतं.
स्वार्थाच्या पलीकडे जपणं,
प्रत्येक दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं,
आणि प्रत्येक श्वासात तिची चाहूल लागणं,
यालाच खरं प्रेम म्हणतात.
कारण...
प्रेम म्हणजे फक्त "मी तुझ्यावर प्रेम करतो" एवढंच नसतं,
प्रेम म्हणजे "तू आनंदी असावीस" ही मनापासूनची प्रार्थना असते.
म्हणूनच...
कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
छान चाललंय सगळं आपलं,
फक्त थोडंसं वातावरण तापलं,
गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं,
हळूच स्मृतींच गाठोड मापलं…
इतभर सुख गोड मानलेलं,
पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं,
सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं,
गुपीत तरी कोणी जाणलेलं?
झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं ,
आयुष्य भूरर्कन निघून गेलं,
रेसलींगच्या या वाटेवरती,
नेहमी भेटलं सारख्यास वारखं…
तूं तू – मी मी करता करता,
नात्यांचा धागा झीजुन गेला,
आपलेपणाचा काळा शालू,
माणुसकीने पांघरलेला……
– श्वेता संकपाळ (१७-०७-२०१८)
दिलास जन्म मानवी
देवा! काय याचू मी
कृपाळू, तूची दाता
तुलाच काय मागू मी...।।
दिलेस, तू सारे काही
तृप्त, तृप्त कृतार्थ मी
सर्वार्थी तुझ्यात रमता
सांगनां काय मागू मी...।।
अनंता! तूच कृपाळू
तव छायेत नित्य मी
नांदतोस मनहृदयी
देवा! काय मागू मी...।।
तव अदृश्य परिस्पर्शी
सुखावतो अंर्तआत्मा
अमृतयोग अमरत्वाचा
चिरंजीव हा जीवात्मा..।।
– वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२२
१/९ /२०२२
किती तो मोह
आता तरी आवर
गरजेचं खरं काय
याचा करूया विचार
आधीची पिढी
मानी समाधान खरं
पोटापुरत जगणं
आपलं आपण बरं
एक पिळा दोरीवर
दुसरा जोड अंगावर
ठेवणीतले एखाद पातळ
खणात नसे गच्च अडगळ
नसे कधी अतिरिक्त ताण
न ऋतू बदलता वरचेवर आजार
तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न
बाळसे असे कायम अंगावर
टेकता पाठ शांत निज येई
नसे सोस अधिक मनोरंजन सुमार
पिंगळा वेळी आपसूक जाग येई
प्रसन्नचित्ती दिवसाचा हरएक प्रहर
अगदी तसे आता जगणे अशक्य
मान्य! तरी घेऊ त्यातील सार
घरातील, मनातील नकोनकोसे
मोठ्या मनाने करूया हद्दपार
वस्तू, वास्तू, धन अन माणसं
सारेच येथे आहे नश्वर
आला क्षण खऱ्या आनंदात जगूया
तेव्हाचं होईल जीवन सुकर!!
--वर्षा कदम.
दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।।
येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।।
आज अशी तु उडुनी पाखरा पंख तुझे पसरले काळ चालला त्यास पकडण्या झेपावित चालेपरंतु तुझिया नेत्रा येईल जळ जेव्हा डवरून टाक अश्रू हे झोळी माझ्या जा तर उडून फिरुन
-- जयंत वैद्य
पहाटेच्या दवात भिजलेली एक वाट,
क्षितिजापर्यंत पसरलेली नामाची प्रभात.
खांद्यावर भगवी पताका, ओठी विठ्ठलनाम,
पाऊलोपाऊली उमलत जाते जीवनाचे गूढ धाम.
ही वाट केवळ पंढरीकडे वळत नाही,
ती माणसाला माणसाशी जोडत राहते.
हातात हात, नजरेत विश्वास,
मनामनांतील अंतर हळू हळू कमी होतं जाते.
टाळांच्या नादात केवळ लय नसते,
ती काळजाच्या ठोक्यांची भाषा असते.
मृदंगाच्या प्रत्येक स्पंदनातून
संतविचारांचा नवा सूर जन्म घेतो.
इथे पुस्तकांची पाने उघडत नाहीत,
उघडतात अंतःकरणाची कवाडे.
इथे अक्षरांपेक्षा माणसे वाचावी लागतात,
आणि शब्दांपेक्षा अश्रू समजून घ्यावे लागतात.
पायांवरील फोड सांगतात कष्टाचे सौंदर्य,
घामाचे थेंब शिकवतात संयमाचे ऐश्वर्य.
दुःखाच्या वाटेवर चालतानाच
सुखाचा अर्थ उलगडत जातो.
दिंडीत चालताना जातपात नाहीशी होते,
अहंकार धुळीत मिसळतो.
उरते फक्त एकच ओळख
"मी वारकरी... विठ्ठल माझा."
चंद्रभागेच्या वाळूत
काळही क्षणभर नतमस्तक होतो.
विटेवरच्या सावळ्या मूर्तीकडे पाहताना
डोळे भरून येतात,
आणि अंतर्मनात प्रकाश उगवतो.
वारी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ
अनुभव हा गुरु,
जीवन हे पाठ्यपुस्तक,
भक्ती ही परीक्षा,
आणि पदवी मिळते माणूस झाल्याची.
जो ही वाट एकदा मनापासून चालतो,
तो पंढरीहून कधीच पूर्वीसारखा परतत नाही.
त्याच्या पावलांनी अंतर जिंकलेले नसते,
त्याच्या अंतःकरणाने विश्व कवटाळलेले असते.
विठ्ठल भेटतो विटेवर नव्हे,
तर माणसाच्या माणूसपणात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti