दिसे किनारा, निवता वारा
तेवती संध्यादीप काही
आता, आस उरली नाही ॥
पूर्वायुष्य या पुसत्या रेषा
नव्या धुक्यात अशा विराव्या
ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही
आता आस उरली नाही ॥ १ ॥
न जगताच जे जगले
जीवन, त्यातच मन उबले
थरथर मनीची शरीरी उतरुन राही
आता आस उरली नाही ॥ ३ ॥
भयाणतेच्या सीमेवरी
वास्तवता वास्तव्य करी
जीवन झाले चोथा, रस उरला नाही
आता आस उरली नाही.
-- यतीन सामंत
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।
निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे ।
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।
वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी ।
आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी ।
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भाकरी साठी वणवण
फिरलो दाही दिशा
चंद्र -तारे चमकती डोळ्यासमोर
अशी झाली माझी दशा
-- सौ. माणिक दिलीप शूरजोशी
दु:खे आणि वेदना,
जीवना,तुझे दुसरे नाव,
माणूस हरून जातो,
जेव्हा घेतसे तुझा ठांव,
आपुले परके होती,
परके म्हणती आपुले,
या सगळ्यात सारखे,
भरडत जातो चांगले,--!!!
जीव किती जखमी होतो,
प्रेमाचा नसता लवलेश,
मानसिक यातना भोगतो,
अगणित असती क्लेश,--!!!
दात आहेत, चणे नसती,
चणे असती, दात नाहीत,
अशांत कोण घांस घेई,
कोण फडशा जातो पाडीत,--!!!
विचारताना साधे काही,
कोणी अंगावरी येते,
शब्द बोलतां पुढे-मागे,
अर्थाचा अनर्थ करीते,
द्यावा हात पुढे जाऊन,
तो झिडकारला जातो,
वास्तवाच्या अग्निदाहांत,
मनपक्षी कसा होरपळतो,-?
माझे सुख, तुझे दु:ख,
तुझे दु:ख ते माझे सुख,
का असे विपरीत होते,
नियतीच्या पटावर साऱ्या,
उलटेच का सगळे घडते,--!!!
प्रश्न राहती अनुत्तरीत,
उत्तरेही बनतील गहन,
या आवर्तातच मात्र,
घायाळ होई अंतर्मन,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
जीवन काय आहे मला जे वाटत असे
ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ....१
मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी
मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी...२
भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत
न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत....३
आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती
जी भीती वाटते ती देहाची असती....४
आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे
साकारलेला सर्वत्र बाहेर व अंतरी राहे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अंगवळणी पडल्या दुःखवेदनां
सभोती निर्विकार सुख संवेदना
सारेच आपुले सख्ये सखेसोयरे
परी दुर्मिळ झाल्या प्रीतभावनां....
भास शुष्कतेचे, संपली मृदुलता
गोठले प्रेम, प्रीती कवटाळतानां
हरविला प्रीतवात्सल्य जिव्हाळा
हाच शाप कां? जन्म भोगतानां....
अंमल हाच कलियुगाचाच सारा
वाटते, भोग प्रारब्धाचे भोगतानां
युगायुगांचा हा दुर्लभ जन्म मानवी
तिथे कुठली सुखदा वात्सल्याविना....
रचना क्र. ९९
८/८/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
ध्येयपूर्तीच्या पथातील आम्ही तीन शिलेदार टाकुनी आपुली धनदौलत ही सोडूनी घरदार
मार्गी येती संकट अगणित तुडवीत गेलो दूर तोडुनि आगुचे बंध रेशमी गंगार्पणी पार
चालत चालत चाल चाललो । निशीदिनी ध्येयपथी अंतिम होता तुझी भेट पण झालो स्थिर जगती
स्थापुन आपुले दोन जिवांचे घरकुल सुंदर छान खेळत बसलो सारीपटी या दिनरात्रीचे गान
कुठे हरवले परंतु माझे जिगरदोस्त दोन पुढे पुढे ते तसेच गेले रात्रीचे उचलुनी वाण
स्मृती गंधाच्या याच शलाका जाळीत जाती जीवा आज तडफडे जीव तयास्तव तृणवत मम ठेवा
-- जयंत वैद्य
चिंब भिजल्या आभाळातून
पाऊस अविरत रिमझीमतो
टपटपणाऱ्या थेंबांमधुनी
सुगंध मातीचा दरवरळतो
भिरभिरणाऱ्या वाऱ्यामधुनी
मेघांचे तोरण हलते
नितळ ओल्या क्षितिजावरती
वीज रुपेरी चमचमते
घनघोर भरुनी आभाळ असा
पाऊस कितीदा तरी कोसळतो
परी मनास भिजवून जाईल ऐसा
वळीव एकदाच येतो...
---आनंद
दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना
जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना,
जळत असते तेल, देवूनी प्रकाश सारा
आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा
बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते
आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते
कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी
गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti