करते वाणी गुणवर्णन शिवगौरीतनयाचें
सुखात वा दु:खात मुखीं शुभनाम गणेशाचें ।।
चाचपडत ठेचाळत हें जीवन गेलें वाया
आतुर झालो व्याकुळलो मी तुजला भेटाया
काया-वाचा-मनें सुरूं आवर्तन नामांचें ।।
सिद्धी-प्रसिद्धीआस नको, कटिबद्ध तुला ध्याया
सिद्धीविनायका ये मज अध्यात्मबुद्धि द्याया
वृद्धिंगत होतील जीवनीं क्षण आनंदाचे ।।
शोध संपु दे, गणपतिराया, मजपुढती येई
अंत:चक्षू उघडुन आत्मज्ञानबोध देई
करी प्रबोधन, गजवदना, आ अजाण बालाचें ।।
व्याप्त मना हेरंब करितसे, तिथें न अन्यदुजें
गजाननाच्या दीप्तीपुढती सारें विश्व खुजें
करिल मोरया लुप्त पटल मायासंमोहाचें ।।
- - -
- सुभाष स. नाईक
आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे
रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?
निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं
निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं
केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य
आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य
मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें
निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा
कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा...१
घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ
क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२
सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते
आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते....३
पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी
वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे राहतील विविध आठवणी....४
हाच हिशोब जीवनाचा, दुजा वाचतो इथेच पाढा
इतरांसाठी जगता जेव्हां, सार्थकी होतो आयुष्य लढा...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
घड्याळ होते भिंतीवरती
टिक टिक करुन चाले
सतत दिसली चाल काट्यांची
एकाच दिशेने हाले
धावत होता एक तुरु तरु
दुजा हळूच धांवे
छोटा जाड्या मंद असून
पळणे ना ठावे
पळत असती पुढे पुढे
समज देती काळ-वेळेचा
किती राहील शिलकीमध्ये
प्रवास आपुला जीवनाचा
जीवन चक्रापरि फिरती
घड्याळ्यामधले सारे काटे
जाणीव करुन देती सतत
आपण कोठे अन् जीवन कोठे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
भोग प्रारब्धाचे सदा सोबती
त्याचीच, सारी सत्ता आहे
सुखद, दुःखद, वेदनांचा
दाता, त्राता स्वामीच आहे
नि:शब्दी, सारेच भोगावे
तेव्हडे आपुल्या हाती आहे
कधी सुखाचा माहोल सारा
कधी दुःखाची साऊली आहे
कधी, क्षण असह्य वेदनांचे
मनांतरासी, छळणारे आहे
उमजुनीया, सदा सावरावे
हेच खरे मानवी जीवन आहे
सदा,शरण जावे दयाघनाला
तोच, केवळ तारणारा आहे
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ६१
२८ - २ - २०२२.
आज मागे वळून पाहताना मला उमगतेय की
मला माझं अस्तित्व नाही... किंबहुना नव्हतेच कधीही
कारण मी अंश आहे- तुमचाच वंश आहे
तुमचाच मी भाग आहे- थोडा आईचा थोडा माझ्या पप्पांचा
मग इतक्या उशिरा का या जाणीवांची जाण यावी
अर्ध आयुष्य उलटल्यावर- स्पंदने का तीव्र व्हावी
शक्तींच्या माझ्या उगम तुम्ही नि स्त्रोतही माझ्या न्यूनत्वाला
निर्मीती तुमचीच मी; भास माझ्या आकृतीला नि रंग आहे प्रकृतीला .
अश्रू माझ्या अपयशाचे नि दुदुंभीही यशाची तुमचीच आहे
वेदना-संवेदनांना आपल्या तारही तर एकच आहे
आयुष्याच्या खडतर चढणीवर होता मला तुमच्या बोटांचा आधार
माझ्या वाढल्या हातांनी मग का न जपावा आता तुमचा उतार
मला माझा ध्यास आहे, ध्येय आहे, आशा नि महत्वाकांक्षाही
पण अभिलाषा त्या यशोशिखरांची मला यत्किंचितही नाही
जेथे हाक तुमची मला ऐकू येणार नाही
जमलंच तर आभाळात झेपावण्याचं वेड मला जरुर असावं
पण इतकंही नाही की सावलीला तुम्हा झाकायचं धाडस व्हावं
छातीचा कोट उभारला तुम्ही डेरेदार वृक्षाच्या निष्ठांनी
जपली उभारी उमलत्या मनांची रणरणत्या मध्यान्ही
मग त्या थकल्या भागल्या पारंब्यांना तजेला शिंपडावया
आमच्या मायेचा ओलावा आतूर का नसावा!
हुडहुडल्या शाखा जर, हळूवार शाल का आम्ही न पांघरावी
विसावण्यास त्यांना निवांत आमच्या खांद्यांचा निवारा
वावरण्यास अन् ऐसपैस का नसावा मनाचा गाभारा
रचल्या होत्या उन्हांत तुम्ही विटा घराच्या या वेड्यासाठी
त्या श्रमांची झाली लेणी बनून काळजातल्या मर्मबंधांच्या नर्म गाठी
वाटते तुम्ही विसावे अन् धराव्या आम्ही कमानी सावलीला
आपुलकीची लावू बिछायत पखरुन स्नेहाचा सौम्य परिमळ
चित्तवृत्तींच्या करुन वाती, उजळावी प्रसन्न संध्याकाळ
आठवणींचे उठवावे मोहोळ, नेमक्या टिचक्या मारुन
फुलवावा चहुअंगी मोहोर, स्पंदनांना साक्षी ठेवून
ओंजळीत साठवावे, निसटते क्षण, आयुष्यभर हुंगण्यासाठी
उचंबळत्या भावनांत भिजावे, करावे बंदिस्त आवेगाची घालून मिठी
संध्याछायांनाही करावे मोहक, लोभसवाणं
वीणेच्या हृदय छेडणाऱ्या झंकाराप्रमाण॑
झुंजुमुंजुचा घेत कानोसा, करीत जयकार रामाचा
निश्चिंत व्हावे शांत सोबतीने दूरच्या चंद्राच्या
ज्यांनी शिंपली माती आपली उभं आयुष्य खर्ची घालून
त्यांना जीवनवृक्षाची करावी बहाल किमान काही फुले मनापासून
कधी वाटतं उधळाव्या आपल्या आयुष्याच्या करुन कगाठी
लख्ख उजळावे त्यांनी क्षण दोन क्षण केवळ तुमच्यासाठी
अज्ञानापासून ते अज्ञाताच्या प्रवासापर्यंत, अविरत
एका मानवाची आपल्या मनुला कृतकृत्य कृतज्ञता ॥
-अंत:करणपूर्वक
--यतीन सामंत
सत्य, दृष्टांत हरिहराचा
शब्द निःशब्द भावनांचे
लोचनीच फक्त साठवावे
रूप, अतर्क्य नियंत्याचे.....
गवाक्षी कवडसे नारायणी
तिमिरीही भाव प्रसन्नतेचे
उघड़ता कवाड़े अंत:चक्षु
ओंजळी शब्द सरस्वतीचे
द्वैत अद्वैताचे मिलन सुंदर
तृप्ततादात्म्य मुग्ध पावरीचे
स्पंदनी झरावी पुण्यपुण्यदा
भाग्य, मंत्रमुग्धी कृतार्थतेचे....
मीत्व व्यर्थची सोडूनी द्यावे
अर्थ ! उमजावे सात्विकतेचे
निर्मोही मैत्रतत्व उरी रुजावे
स्मरावे नित्य नाम भगवंताचे....
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १९६
११/८/२०२२
कळावे लोभ असावा ,पत्र मी केले पुरे
कळेल ना खरोखरी , पत्ता कुठचा लिहावा बरे ?
सगळेच गुंग मोबाइलवरी ..मेसेज आणि कॉलवर
मी अडाणी अजून चिपकून ..जुन्याच पत्र चिट्ठीवर
शब्द लेकराचे जपून ठेवले ....वाचते,हात लावते पुन्हा पुन्हा
घड्या करुनी सांभाळते ....त्यात माझा दिसे कान्हा
स्पर्श अक्षरांचा जणू लेकराला थोपटते मी
झोपतो बाळ आन स्वप्न पाहत झोपते मी
केवढा होता सहारा पत्राचा ...छान वेळ वाट बघण्यातही
आता तर विसरलाच पत्ता घराचा ..गावचा पोस्टमनही
मोबाईलवर थरथर म्हणुनी बोलणेही होतेच कट
खरे तर नातसुनांना ..वाटते माझी का कटकट
खोटेपणा, फसवेगिरी ..दिसतेच या यंत्रात मला
खास वेळ काढून लिही रे लेकरा एक पत्र मला /
-- श्रीकांत पेटकर
Copyright © 2025 | Marathisrushti