आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 30, 2015
कालपर्यंत
पावसाच्या एका सरीसाठी
डोळे आभाळाकडे लागले होते.
आज मात्र त्याच सरींच्या रौद्र रूपाने
मनात भीतीचं वादळ उठलं आहे.
आयुष्य इतकंच शिकवतं
अभाव दुःख देतो,
पण अतिरेकही सुख हिरावून घेतो.
जिथे "पुरेसं" थांबतं,
तिथेच समाधान फुलतं.
जिथे हव्यास वाढतो,
तिथे आनंद हरवत जातो.
भाकरी पुरेशी असेल,
तर ती अमृताहून गोड लागते.
छप्पर पुरेसं असेल,
तर पावसाचं गाणंसुद्धा मधुर वाटतं.
श्रीमंती म्हणजे
अफाट संपत्ती नव्हे.
"आहे ते पुरेसं आहे,"
असं मनापासून म्हणता येणं
हीच माणसाची खरी श्रीमंती आहे.
कारण...
अति पाऊस पूर आणतो,
अति ऊन दुष्काळ घडवतो.
निसर्ग असो वा आयुष्य
"पुरेसं" हाच सुखाचा खरा समतोल असतो.
ज्याला पुरेसं कळलं,
त्याला समाधान लाभलं.
आणि ज्याला समाधान लाभलं,
त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 14, 2026
शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद ते वारे....१
तोच अचानक तेथे, चिमणी एक ती आली
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला....३
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे
तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’....६
केवीलवाणी बघूनी, भूतदया ही आली
काय हवे तिजला, या अवचित वेळी....७
जेंव्हां बसे माळावरी, ओरड वाढत होती
हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती....८
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो...९
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला..१०
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य
चिव चिवणारी पिल्ले, होती त्याचे लक्ष्य....११
चाहूल माझी लागता, सावध परि झाला
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला...१२
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी....१३
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली...१४
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती....१५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 24, 2017
किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
पण सांगा रडून कुणाला ?
कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.
भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.
न भरून कसे चालायचे ?
मस्तीची रग, खेळातील धडपड आणि
स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
* * *
... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !
विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.
कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
नेत होते भूतकाळांत.
जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 1, 2016
खोलीमध्ये कोंडूनी मांजर, हाती घेई काठी ।
मारून टाकण्यासाठी तीला, लागला तो पाठी ।।
अतिशय भीत्री असूनी ती, जीवासाठी पळे ।
हतबल होता पळून जाण्या, मार्ग तो ना मिळे ।।
उपाय नसता हाती कांहीं, चमत्कार घडे ।
सर्व शक्तीनी त्याच्यावरती, तुटून ती पडे ।।
उडी मारूनी नरडे धरले, दोन्ही पंजानी ।
मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी ।।
प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली ।
अवचित वेळ पडता दिसे, बाहेर आलेली ।।
मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचावासाठी ।
जीवनासाठी झगडत रहा, शिकवण ही त्याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 28, 2016
जगी भेटली माणसे
अनभिज्ञ ती सारी...
जोडली नाती
निराशाच पदरी...
नव्हता जिव्हाळा
भावशून्य सारी...
नाही कुणी कुणाचे
छळे सत्य जिव्हारी...
जखमांचे झिरपणे
नि:शब्द वाहते अंतरी...
असले कसले जगणे
प्रीत उदास हृदयांतरी...
हा कल्लोळ असह्य
भावनांचे रुदन भीतरी...
रचना क्र ७०
१०/७/२०२३
- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
July 28, 2023
महात्मा गांधींना गोरगरिबांविषयी अतिशय आपुलकी व जिव्हाळा होता, आपल्या प्रत्येक कृतीमधून गरिबाविषयीचा कळवळा ते व्यक्त करीत असता. गांधीजींच्या आश्रमात एक तरुण डॉक्टर सेवक होता. तो परदेशातही जाऊन आला होता. मात्र महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होऊन तो त्यांच्या आश्रमात आला होता. आश्रमात येणाऱ्या रुग्णांवर तो गांधीजींच्या सल्ल्याने निसर्ग उपचार करीत असे.
एकदा सकाळीच आश्रमात एक आजारी महिला उपचार घेण्यासाठी आली. आजारपणामुळे तिला खूपच अशक्तपणा आला होता. महात्मा गांधी त्या डॉक्टरला म्हणाले की, या महिलेला कडूनिंबांची पाने खाऊ घाला! तसेच तिला ताक घ्यायला द्या. काही दिवसांनी ती बरी होईल. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे महिलेला कडुनिंबाची पाने व ताक द्यायला सांगितले. दुपारी गांधीजी व डॉक्टरांची पुन्हा भेट झाली. त्या वेळी गांधीजींनी त्या डॉक्टरला त्या महिलेला कडूनिंबाची पाने व ताक दिले का हे विचारले. त्यावर डॉक्टरने हो, तिला घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे तिने घेतली असेल असे सांगितले. त्यावर गांधीजी त्याला म्हणाले, घेतले असेल म्हणजे? तुम्ही तिला ते स्वतः दिले नाहीत काय? त्यावर डॉक्टरने नकारार्थी मान हलविली.
गांधीजी त्याला म्हणाले की, केवळ औषध घ्या एवढेच सांगणे हे डॉक्टराचे काम नसते तर ते घेतले की नाही हे पाहणेही डॉक्टरांची जबाबदारी असते. त्यानंतर गांधीजी स्वत: आश्रमात फिरले व त्या महिलेला त्यांनी शोधून काढले व तिची विचारपूस केली. त्या वेळी ती महिला म्हणाली की, ग्लासभर ताक घ्यायला देखील माझ्याजवळ पैसे नाहीत. त्या महिलेचे दारिद्रय पाहून गांधीजींना खूप वाईट वाटले. त्यांनी त्या महिलेला आश्रमात ठेवून घेण्याबाबत संबंधितांना सांगितले व त्या डॉक्टरलाही तिच्यावर जातीने देखरेख करून रोज सांगितलेले औषध देण्यास सांगितले. काही दिवसांनी ती महिला खडखडीत बरी होऊन आश्रमातून आपल्या घरी गेली.
December 31, 2017
डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो,
वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो ।।१।।
भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण,
घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण ।।२।।
फुलांमधला रस शोषतां, फुलपाखरू नाचते,
झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते ।।३।।
आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला,
अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला ।।४।।
खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते,
ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते ।।५।।
सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ,
सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 20, 2013
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।
एक एक पाकळी
लहानशी कळी
जाई उमलून
फूल त्याचे बनून
सुगंधी टपोरे फूल
कांही वेळ राहील
कोमेजून जाई
देऊनी रुप बीजाचे
परत अंकूरण होई
दुजा एका झाडाचे ।।१।।
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
एक एक पाऊल
टाकते मुल
वाढते हसून
बनते यौवन
एटदार तो दहधारी
कांही काळाची उभारी
देह होई विलीन
पेटवूनी दिवे वंशाचे
होई अवतरण
नव्या एका मानवाचे ।।२।।
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 2, 2017
येत्या १५/२० वर्षात एक पिढी हे जग सोडून जाणार आहे ! कटू पण खरेच सांगत आहे…..
July 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti