एकदा कवेत घे,
संपवून सारा अबोला,
जीव तुझ्यासाठी राजा,
बघ, कसानुसा झाला,--!!!
स्पर्श तुझा होता सखयां,
सर्व दु:खे नमून जातील,
अडचणींचे डोंगर सारे,
क्षणार्धात ते वितळतील,
बाहूंत तुझ्या वेड्या जिवां,
कधी मिळेल रे आसरां,--!!!!
ओढ वाटे सारखीच,
छळते मज रात्रंदिवसा,
तू येतां, जवळी परंतू,
मिठीत घेते आभाळां,--!!!
प्रितीच्या रंगी रंगता,
तुझ्याच रंगात रंगते,
होऊन वेडिपिशी कशी,
हात नकळत देते हातां,--!!!
माझी मी नसते,
तुझ्याबरोबरी असतां,
भानही हरपून जाते,
तव समीप राहतां,--!!!
रंगतदार तुझी साथ,
मोह तिचा माझ्या जिवां,
परोपरीने वाट पाहते,
उन्हात थंडगार विसावा,--!!!!
हिमगौरी कर्वे
खारेपणा हा अंगी असतां,
कोण खाईल केवळ मीठ,
परि पदार्थाला चव येई,
मिसळत असता तेच नीट ।।१।।
जीवन सारे खडतर ते,
भासते मिठासम मजला,
केवळ जीवन बघता तुम्हीं,
पेलणें अवघड सर्वाला ।।२।।
तेच जीवन सुसह्य होई,
‘आनंदात’ जेंव्हां मिसळते,
हर घडीच्या प्रसंगामध्ये,
समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
जीवनभर घासुन घेतल्यावर
आता म्हणता चंदन आहे |
दूर व्हा दष़्टांनो, तुम्हाला
माझं वंदन आहे || १ ||
आता नाही मला कधी
चंदन व्हायचं |
सहाणच होईन बरी
मला नाही झिजायचं || २ ||
एक एक पान काढलंत
फांदी सहित ओरबाडून |
व़क्ष झाला पर्णहिन तेव्हा
चित्र काढता रेखाटून || ३ ||
आता कुठला राग नाही
लोभ नाही उरला |
स्थानक येण्याआधीच माझा
प्रवास होता सरला || ४ ||
-- चंदाराणी कोंडाळकर
ज्याचे चिंतन आम्ही करतो
तोच 'शिव' चिंतन करतो
स्वानुभवे चिंतन करुनी
चिंतनशक्ति दाखवितो
जीवनाचे सारे सार्थक
लपले असते चिंतनात
चिंतन करुनी ईश्वराचे
त्यांच्यात एकरुप होण्यात
सारे ब्रह्मांड तोच असूनी
अंश रुपाने आम्ही असतो
जेव्हां विसरे बाह्य जगाला
तेव्हांच तयांत सामावतो
चिंतन असे निश्चीत मार्ग
प्रभूजवळ तो जाण्याचा
लय लागूनी ध्यान लागतां
ईश्वरमय होण्याचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००५०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
मरणाची भिती नाही जगणे कठीण झाले
मोकळ्या या घरात सगळे अबोल झाले ।
मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली
आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली ।
हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे
त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे ।
जाता चार दिवस दूर माझी अशी अवस्था होई
जाशील खरोखर दूर तर मग माझे काय होई ।
जगणे तुझ्याविना ही जाणीवही असह्य आहे
निरोप तुझ्याआधी घ्यावा हेच सुखकर आहे ।
-- सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
दि. ६ आक्टोंबर २०१८
वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
विशाल आपुले पंख फैलावुनी,
उंच उंच आभाळी उडावे,
मनसोक्त रमतगमत दूरवरी, विहरत --विहरत गात जावे,--||१||
नको कुठले ताणतणाव,
नकोच कुठल्या चिंता,
भोवती निळा आसमंत,
मेघ सारे नि विद्युल्लता,--||२||
वाटले तर वृक्षांवर बसुनी,
निवांत करावी फक्त टेहळणी, स्वातंत्र्य फक्त राहावे जपत,
नको कोणाचीच मनधरणी,--||३||
अपमान, मानभंग, दुःखे,
कोणीच नको करायाला,--
नातीगोती टोचती सारी,
अवघ्या मानवजातीला,--||४||
आपल्या दिलाचा मीच राजा, काळवेळ कसले बंधन नसे, एकमेकात लढून सारखे ,
गुंता वाढवणेही नसे,--||५||
निळ्या आभाळात बागडत, मुक्तपणे वर वर जावे,
पैसा सत्ता प्रतिष्ठा सोडुनी,
पक्षीजगातील आनंद लुटावे,--||६||
गोड फळे झाडांवरची,
तृप्त होत खात राहावे,
माणसांना चिडवत चिडवत, फांदीवरती उंच बसावे,--||७||
हिरव्या हिरव्या धरेवरी,
स्वैर सगळे सुख लुटावे,
धुंदीतच राहून आपल्या शेवटी इथेच आपुले प्राण सोडावे,--||८||
हिमगौरी कर्वे ©
आम्हास नाही तमा,
संपत्तीची अन सत्तेची
जोपासली आहेत आम्ही,
नाती निष्ठेची अन् भक्तीची
शिवरायांचा जाज्वल्य अभिमान,
पाहिला अन् अनुभवलाही
म्हणूनच आमच्यातही आम्ही जसाच्या तसा
भिनवलाही अन् जपलाही
कुलदैवतांच्या कृपेने आणि बुद्धीच्या जोरावर
आम्ही अनेक अवघड गणिते
सोडविली
सत्तेची, राजेशाहीची धुरा
आम्हीही सांभाळली
इतिहास घडविला आम्ही
तेजस्वी लेखणीने आणि तलवारीनेही
विविधरंगी कलांनी
जीवनेही रंगविली आम्ही
आमचे शौर्य, स्वाभिमान, बुद्धीमत्ता
आणि हो आमची खाद्यसंस्कृती
सारेच कसे भारदस्त,
आणि आगळेवेगळे मस्त !
काय वर्णावी चव
खिचडीची
बिरठ्याची अन् कोलंबीच्या
आजही चवीने मजा लुटतो आम्ही
निनाव्याची अन् कानवल्यांची !
आम्हास अभिमान आहे
आमच्या जातीचा अन् मातीचा
आमचे अस्तित्व अबाधित आहेच
हा दावा आहे आम्हा कायस्थांचा !
हा दावा आहे आम्हा कायस्थांचा !!
सौ. मृणाल महागांवकर, महाड
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ /
उंच मारुनी भरारी
पोहंचला चंद्रावरी
दाही दिशा संचारी
नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
फुलांतील सुवास
फळांतील मधुर रस
पक्षांचा रम्य सहवास
नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
नदीतील संथता
ओढ्यातील चपळता
धबधब्यातील प्रचंडता
रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध ३
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
शरिराची योजना
गुंतागुंतीची रचना
श्रेष्ठत्व दिले ज्ञाना
भावना व विचार यांचा, निर्माण केला वाद ४
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
तुझ्या शोधांतील झेप
क्षणिक सुखाची झोप
परि करी निसर्गा ताप
नको करुं तूं, ईश्वरी दयेचा प्रवाह बंद ५
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti