पुस्तकांच्या वनात शब्दांचा खजिना शोधतात,
कुंचला अन् लेखणीद्वारे पंचरत्न लुटतात,
अनुभवाची शिदोरी कव्यरुपी माळेत गुंफतात,
म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात !
कईक प्रश्नतर यांच्या गजल व चारोळी नेच सुटतात,
छोट्याश्या लेखातून हिरे मोती लखलखतात,
पॉलिश करण्यासाठी हे पुन्हा साहित्यच वाचतात,
म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात!
नकळत मानवी हृदयावर अक्षर रत्नांची झालर घालतात,
रोजच्या रटाळ दिनक्रमातुन चार शब्द पाचू विणतात,
साहित्य शृंगाराला सर्वस्व बहाल करतात,
खरंच आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात !
– श्वेता काशिनाथ संकपाळ.
काय आणि कसे बोलतो,
त्यांना माहीत नव्हते,
सहजपणे सुचणारे,
संभाषण ते असते ।।१।।
शिक्षण नव्हते कांहीं,
अभ्यासाचा तो अभाव,
परि मौलिक शब्दांनी,
दुजावरी पडे प्रभाव ।।२।।
जे कांहीं वदती थोडे,
अनुभवी सारे वाटे,
या आत्म्याच्या बोलामध्ये,
ईश्वरी सत्य उमटे ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १
चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २
वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३
मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला
स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४
दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५
प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६
राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७
दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८
तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९
वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०
फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११
आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता
धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज
मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी
त्या दु:खीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी
सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हे शशिधरा तूं प्रेमळ सखा साऱ्या विश्वाचा
सौंदर्याचे प्रतिक असूनी राजा तूं नभाचा
लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी काजळ लावी तुला
काही वेडे त्यास समजती तू डागाळला
डाग कसला तुम्ही मानतां प्रेमामध्ये तो
दोन मनांतील पवित्र नाते हे आम्हीं विसरतो
समजूं शकतो नीती बंधन समाज रचनेचे
बळजबरीच्या कृत्यास तुम्ही म्हणावे पापाचे
गुरू पत्नीशीं प्रेम करिता लौकिक गेला तो
दोघांची साथ ती मिळतां गुन्हा कसा होतो ?
एक दिशेने प्रेम साधतां अर्धवट राही
दोघांमधली मनाची ओढ ती समाधान देई
'नीती मार्गे' कुणी म्हणतील चंद्रकृत्य चुकले
प्रेमाच्या परि अथांग सागरी तळांत ते बुडाले
डॉ. डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली.
हसते बोलते बाबा
अचानक शांत झोपले
नियतीची क्रूर चेष्टा ती...
मी त्या विधात्याला कोसले
आठवणींचे मडके
हाती जड झाले होते
सिद्धार्थाचे दूःख तेंव्हा
पहिल्यांदा समजले होते
जिवंतपणी विचारलं नाही
ते हवे नको बघत होते
प्रेमाचे अगदी जवळचे
घरचे कार्य समजत होते
सर्वजण धीर देत होते
माझे डोळे पुसत होते
माझे जड डोके मात्र
बाबांचा खांदा शोधत होते
धुराच्या आडोश्यात
मूद्दामच उभा राहिलो
न थांबणाऱ्या आसवांना
पापण्यात लपवू लागलो
एका मरणाचा सोहळा तो
सर्व जण पूजत होते
जिवनाचा थारोळा बघण्यास
मन माझे धजत नव्हते
चितेभोवती फिरत होतो
फूटके मडके सांडवत होतो
मूक्या भावनांचे सांत्वन
माझे मीच करत होतो
उघड्या माझ्या अंगावरून
पाणी घळघळत होते
दूःखाने जणू माझे
काळीजच भळभळत होते
निरंकार अश्या दृष्टीने
चितेकडे पहात होतो
संपत चालले होते ते मरण
आणि मी मात्र जळत होतो.
डॉ. सुभाष कटकदौंड
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
विसरून जा भूतकाळ तो, नजर ठेवूनी भविष्यावरी,
वर्तमानी राहून प्रवाही, जीवन सारे यशस्वी करी....१,
व्यर्थ होतील प्रयत्न तुझे, उगाळता गत आठवणी,
खीळ पडेल उत्साहाते, अपयश आले हे जाणूनी...२,
ज्ञान जगाचे मिळूनी तुला, जन्म जहाला आजच खरा
अनुभवी नव बालक तूं, वाहून नेई जीवन धुरा...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti