दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली...१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते...२,
निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ...३,
स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य सहज होत...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लोंबकळलेल्या खाली शेपट्या,
पिल्लू मौज करे कशी,---?
शोधक बुद्धी, चौकस नजर,
अफलातून फळते अशी,--!!
युक्ती,शक्ती, बुद्धी,
जिवाला आहे देणगी,
सदुपयोगाने करा किमया,
मौजेने जगा,ही वानगी,---!!
दिसे पिल्लू छोटेसे,
तरी मस्त आहे कल्पनाशक्ती,
आरामात कसे झोके घेई,
दुनियाच भासे त्यास छोटी,---!!
डोळे मिचकावत, पिल्लू बघते
आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे,
भरभरून लुटेन आनंद मी,
सोडवेन निसर्गाचे अनवट कोडे,!
©️ हिमगौरी कर्वे.
कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ?
मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ?
खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ?
ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ?
पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ?
पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?
सारे कळूनी वळत नसते, तत्व हे जाणून घ्याल कां ?
उपयोग करूनी ज्ञानाचा, जीवन चांगले कराल कां ?
सारे आहे प्रभूचे समजून, शांत चित्ताने जगाल कां ?
दया क्षमा शांती हे गुण, अंगी आपुल्या बाणाल कां ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ज्येष्ठत्वे आता फक्त तडजोड करावी
आपुल्याच मनाची समजूत घालावी
चूक की बरोबर, व्यर्थची वादविवाद
अंतरी संघर्षाविना मन:शांती लाभावी
आता जगती जन्मताच सारेच सर्वज्ञ
इथे कलियुगाचे निर्बंधी दृष्टांत वाजवी
भौतिक सुखाचा सभोवार मुक्त संचार
आपण स्वतःलाच अंती मुरड घालावी
या युगी संस्कारांची, नित्य पायमल्ली
हीच जीवनाचीच, जगरहाटी वास्तवी
उमजुनी सारे,जगाशी तडजोड करावी
सोडुनीया हटवादा, मन:शांती भोगावी
या जन्मी नाती सारी निर्मळ ऋणानुबंधी
भाग्ययोगे ! सावरणारी सकलां लाभावी
जन्म मानवी अनेक जन्मांचीच पुण्यदा
जगता वृद्धत्वे अंती मोक्षमुक्ती लाभावी
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१३२
६ - १० - २०२१.
हिशोबाची वही घेवूनी बसलो,
हिशोब करण्यासाठीं ।
जमाखार्च तो करित होतो,
जीवनाच्या सरत्या काठीं ।।
घोड दौड ती चालूं असतां,
सुख दु:खानी भरले क्षण ।
प्रसंग कांहीं असेही गेले,
सदैव त्याची राही आठवण ।।
कष्ट करूनी जे कमविले,
थोडे धन या देहाकरिता ।
उपयोग नव्हता त्याचा कांहीं,
जग सोडूनी देह जाता ।।
कधी काळचा निवांतपणा,
घालविला दुजाच्या सेवेत ।
पुण्य राहिले शिल्लकीमध्ये,
वाटते तेवढेच हिशोब वहीत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चाललो होतो मित्रासह सहल करण्या एके दिनीं
आनंदाच्या जल्लोषात आम्हीं गात होतो सुंदर गाणीं १
वेगामध्यें चालली असतां आमची गाडी एका दिशेने
लक्ष्य आमचे खेचले गेले अवचित एका घटनेने २
चपळाईनें चालला होता काळसर्प तो रस्त्यातूनी
क्षणांत त्याचे तुकडे झाले रस्त्यावरी पडला मरूनी ३
काय झाले कुणास ठाऊक सर्व मंडळी हळहळली
जीव घेणाऱ्या प्राण्यालाही सहानुभूती ती लाभली ४
अंत:करणीं दया भाव तो असतो ईश्ररी गुणधर्म
जीवमात्रीं वसला असूनी निर्मितो आपसातील प्रेम ५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नयन मनोहर, संध्येसम गं
आरशात चेहरा बघतां,
किती असेच चेहरे दिसती, मुखवट्यांचे जग हे,
अवतीभोवती कसे नाचती,--!!!
लागत नाही मुळीच पत्ता,
अशावेळी विलक्षण फसगत,
होत जाते,केवळ फरपट,
तडफड होते मैत्री करतां,,-!!!
कोण कुठला आहे तो,
पक्के ठाऊकही नसते,
तरी नवांगताची पण ओढ,
अनावर की असते,--!!!
त्याच मोहाच्या क्षणी,
घ्यावे आपण आवरते,
करती खूप साखरपेरणी,
गोड गोड बोलती मुखवटे--!!!
अनुभव कडू-गोड देतो,
वर जिवाची होते लागणी,
असा भोवरा तो बघा,
माणूस खोल खोल जातो,--!!!
मैत्रीच्या गुंत्यांमध्ये,
गटांगळ्या खात राहतो,--!!!
वर हात देण्या न कुणी,
होते दारुण अवस्था,
कशी जिवाची होते तगमग,
कुठे जाऊ, काय करू आता,--!!!
सगळ्यात असून कशातच नसणे,
--- हे तत्त्व फक्त ठेवावे,
गोड बोलण्यावर फक्त,
उदासीन की राहावे,--!!!
वागणे" तटस्थ म्हणुनी,
अशावेळी, कामी येते,
प्रतिक्रियाच कुठली नसता,
क्रिया अर्थहीन ठरते,--;;!
मुखवटे पांघरूनी जगात,
असे कितीक भेटती,
दुर्दैवाने कधीकधी ,
जवळचेही यात मोडती,--;;!
नाते असूनही ते नसणे,
ताप देते किती जिवा,
नात्यांचा अर्थ कधी,
लागतो केवळ दुरावा,--!!!
असे अंतर सांभाळणे,
मुखवटाच तो पांघरुनी,
जीव लावावयाचाच नाही,
ठरवावे ठाम ठरवावे मनी,--!!!
कसा लागावयाचा निभाव, आपल्या प्रांजळ जिवाचा, बुडत्याचा पाय खोल,
आणखी खोलच जायचा,--!!!
© हिमगौरी कर्वे.
वाणी मधूनी शब्द निघाला,कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे,वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या,सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी,किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन,हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले,स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ,वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन,रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे,तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे,घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी,आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी,पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर,जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई,हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti