व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता
गरगर गरगर फिरवू चरखा
दीन जना जो देईल तनखा।।धृ।।
चरख्याचा हा मंजुळ नाद
दशदिशांतुनी घालीत साद
स्वदेशी खादीचा जणू प्रसाद
परसत्तेचा सोडवी विळखा
गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।।
निघती भरभर कोमल धागे
सुबक गुंफुनी विणुया तागे
देश आपुला न राहील मागे
करी निर्भय हा पाठीराखा
गरगर गरगर फिरवू चरखा।।२।।
कवच स्वदेशी निर्भयतेचे
शस्त्र हाती हे संघटनेचे
गीत मुखीचे स्वातंत्र्याचे
जयभारत हा घोषही ऐका
गरगर गरगर फिरवू चरखा ।। ३ ।।
-स्व. सौ. गंगूताई वैद्य
December 18, 2023
गर्दित रोज दिसतात ओळखीचे चेहरे
अगदी निर्विकार जणु ओळखच नाही
न बोलणे, न हसणे, न मान डोलविणे
जणु कुणीच एकमेका पाहिलेच नाही
मग्न असती सारेच आपुल्या विचारात
इथे कुणाचे कुणाला काही पडले नाही
स्वतःच्या सुखासाठीच जो तो जगतो
अन्य कुणाचा विचार मना शिवत नाही
मी भला, माझे भले नको कुणी दूसरे
आता नाते सहृदयी कुठेच उरले नाही
भावनां शुष्क कोरडया, रुक्ष नाती सारी
आता ओलावा अंतरीचा दिसतच नाही
संवादाविण कां ? जीव हा सुखात जगतो
सांगावे कसे कुणास हेच कळतच नाही
***********
--वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१६
१/१२/२०२२
December 13, 2022
आली मांगल्याची दीपदिवाळी
सुखसौख्याला सजवित आली
उत्सवांचा राजा, सण दिवाळी
दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली...
स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला
जणु वसुंधराच तारांगण जाहली
दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत
अमंगळ सारित मांगल्या आली...
सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी
अंगणी संस्कारांची सडारांगोळी
तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने
दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली...
वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी
बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची
पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली
चैतन्या! सजवित मढ़वित आली...
वि.ग.सातपुते.( भावकवी )
( 976654908 )
रचना क्र. २७०
२४/१०/२०२२
October 30, 2022
माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार,
अर्पित जातो ते, प्रभू चरणांवर....१,
राम नाम जपत, कुणी एक येतात
घटकाभरासाठी, विश्रांती ते घेतात....२,
रोज देती मजला, ओंजळभर फूले
कोणत्या बागेतली, कधी न सांगीतले....३,
त्यांच्याच सांगण्याने, हार मी गुंफीतो
बघतात कौतुकें कसा मी अर्पितो....४,
फूलांची ओंजळ ती नव्हे, शब्दांचा ठेवा,
कवितेच्या रचनी, उपयोगी पडावा....५,
शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो
विषय तो मिळूनी, काव्य मी रचीतो....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 1, 2018
जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना ।
कांहीं तरी मागत होते, हात जोडूनी चरणा ।।
दयावान ती आहे समजता, गर्दी होते तिजपाशीं ।
कधी न दिले काहींहीं तिजला, मग ही मागणी कशी ? ।।
जावू नका दर्शनास तिच्या, रिक्त अशा त्या हाताने ।
तिला पाहिजे ताट पूजेचे, भरलेले भक्ती भावाने ।।
व्यर्थ होवून जाती ते श्रम, भक्तीभावाच्या अभावी ।
उभे आयुष्य वाऱ्या करूनी, हाती काही न येई ।।
मानव रूप देऊनी तिजला, धनादी वस्तू अर्पिती ।
पूजाविधींचा थाट करूनी, मोठेपणा दर्शविती ।।
भक्तीची ती भुकेली असूनी, काही न लागे तिजला ।
केवळ तुमचे भाव जाणूनी, सर्वच मिळेल तुम्हाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 17, 2016
वात्सल्य, प्रीत, लळा, जिव्हाळा
या भावनांचे आज अर्थ बदललेले
उरि न उरली माया ममता ममत्व
ओढ, आस्था आपलेपण विरलेले
निर्जीवी, पोकळ ते भावबंध सारे
नातेच रक्ताचे, मृगजळी तरंगलेले
इथे कुणीच कुणाचे कधीच नसती
सत्य विदारक जगी पचनी पडलेले
स्वसुखात जगणे उलघाल स्पंदनी
स्वास्थ्य सारे मनामनांचे हरविलेले
कलियुगाची रिती, स्वार्थी विकारी
नात्यातील, प्रेमच सर्वत्र मालवलेले
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २९३
१६/११/२०२२
November 21, 2022
सारखा संघर्ष करत करत,
अंतर्मन तुटून जाई,
सुखाचे भरभरून समुद्र
मग भले मिळोत कितीही,---
किती त्याला अर्थ नाही,--?
अशा जीवनात अर्थच नाही,--?
पाण्यावाचून कोरडे, पडत,
पीक सारखे गळत राही,
मग पडत राहिला पाऊस,
किती त्याला अर्थ नाही,--?
अशा जगण्याला अर्थ नाही,--?
किती मोठा असे परिवार,
करत असेल जर दुःखी,
हे असले कसले संबंध,--?
करती मने दूषित वारंवार ,--
त्यांच्यात काही अर्थच नाही,
अशा जीवना, अर्थ नाही,-!!!
रोज छोटे-छोटे आनंदक्षण,
हातून निसटून जाती ,---
त्यांच्यासाठी तरसत तरसत,
मग प्रतीक्षा सुखाची नित्य,---
करत बसण्यात अर्थ नाही,
अशा जगण्यालाच अर्थ नाही,--!!!
कोणी कडू बोलून बोलून,
मन पुरते घायाळ होई,
मग नंतर गोड बोलून ,
आहे का उपयोग काही,--?
कोणता अर्थ त्यात राही,-?
खरंच त्यात अर्थ नाही,--!!!
सुखसाधने असून खूप,
नेमके सतरा रोग शरीरी,
मग त्या सुविधा अगणित,
किंमत ना त्यांना काही,
असूनही काही उपयोग नाही,
अशा जगण्याला अर्थ नाही,
अशा जगण्याला अर्थच नाही,--!
हिमगौरी कर्वे.©
September 2, 2019
विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
दिवस हे चालले असे
ऋतु हे प्रसवती जसे
श्वास हे जगता जगता
आंसवे ही झरतात कां?.
जल जीवनी वाहिले असे
मनभाव सारे विरले जसे
निर्माल्य सहज होता होता
भावतरंग मनी जागतात?
दैवयोगे, मनप्रीत उमलता
मूकमनभाव गुंतता गुंतता
प्रीतसुगंध दरवळता दरवळता
भावकळ्या तू तोडल्यास कां?
विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११९.
१८ - ४ - २०२२
May 3, 2022
रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति ।
व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति....१,
आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं ।
कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी...२,
विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते ।
क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते...३,
सद्गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला ।
रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 27, 2017
दूर लोटते ही माती, म्हणून का खिन्न होशी?
तुझी माझी वाटचाल दूर नक्षत्रांच्या देशी
राजहंसाचे कौतुक बगळ्यांनी का करावे?
तुझ्या-माझ्या डोळ्यातील इथे परकेच रावे
स्वर्गभूमीची ही स्वप्ने धरेवरी परदेशी
दीड वितीचे हे जग म्हणायचे ते म्हणू दे
चार काचमण्यांसाठी ऊर फाटेतो धावुदे
नाते आपले जडले आगळ्याच प्राक्तनाशी
तिथे अमृताचा चंद्र रोज चांदणे सांडतो
कल्पवृक्षाच्या तळाशी जीव थोडा विसावतो
लीन होऊनिया येते दुःखसुध्दा उंबऱ्याशी !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 26, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti