(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • ऊर्जेचा करा योग्य उपयोग

    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
    शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता ।।धृ।।

    बागेतील फुले सुंदर
    फुलपाखरांचे रंग बहारदार
    मोहक इंद्र धनुष्याकार
    निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता ।।१।।
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

    भजन पुजन प्रभूचे
    भक्ति-भाव मनाचे
    उपवास करी देहशुद्धीचे
    तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता ।।२।।
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

    गरिबासी मदतीचा भाव
    दुःखितांसाठीं प्रेमळ स्वभाव
    घ्या इतरांच्या मनाचे ठाव
    मिळवा कल्याण करुनी, त्यांच्यात समाधानता ।।३।।
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

    धनसंपत्ती गंगाजळ
    मोहमोयांचे जाळ
    षड्-रिपू विकार सकळ
    विवेक बुद्धीने नष्ट करा, ही मनाची मलिनता ।।४।।
    खर्च करावी ऊर्जा आपली योग्य कामांकरिता

    सर्वत्र आहे प्रभू संचार
    अणूरेणूत झाला साकार
    ब्रह्मांडही त्याचा आकार
    विलीन व्हा ईश्वरी तत्वांत, त्यास सर्व अर्पिता ।।५।।
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • सु्र्य-चंद्राचा लपंडाव

    बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें ।
    पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।।

    युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे ।
    भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।।

    मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई ।
    लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।।

    संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी ।
    परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी ।।

    लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता ।
    नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता ।।

    विश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई ।
    पुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०b
    bknagapurkar@gmail.com

  • सदैव नामस्मरण

    प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।

    ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।

    चमत्कार दिसून आला एके दिवशी ।

    राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।

    विज्ञानाने उकल केली या घटनेची ।

    खात्री करिता सत्यता पटली याची ।।

    चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।

    त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।

    शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।

    शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।

    जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।

    शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।

    हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।

    निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।

    सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।

    रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५९

  • मित्र

    मित्र'
    मात्र ध्वनि नाही,
    मात्र शब्द नाही
    तो एक अर्थ आहे,
    आणि अर्थच नाही तर
    एक भावार्थ आहे,

    जो वाचला जाऊ शकत नाही
    जो ऐकला जाऊ शकत नाही
    जो केवळ समजला जाऊ शकतो,

    काय ती पूजेतील फक्त एक घंटी आहे?
    का तो फक्त अंगाऱ्याचा एक रंग आहे?
    नाही
    तो अनेक तुकड्यात विभागून सुद्धा
    एकसंध आहे,
    जे सार्थक करतात
    माझ्या अस्तित्वाला !!!

    त्या तुकड्यातील सारांश घेत
    मी भविष्याचा शोध घेत
    वाटचाल करीत आहे,
    कारण
    ते पुन्हा देतील चंद्र ताऱ्यातील संगीत
    ते पुन्हा भरतील चित्रात रंग
    पुन्हा मिळेल ती संजीवनी
    जी मना मनाला जोडेल,

    याच साठी मित्र
    'मित्र' मात्र ध्वनि नाही,
    मात्र शब्द नाही
    तो एक अर्थ आहे,
    आणि अर्थच नाही तर
    एक भावार्थ आहे !!!

    *****

    मूळ हिंदी कविता-
    रेखा राजवंशी, सिडनी ऑस्ट्रेलिया
    Rekha Rajvanshi

    मराठी अनुवाद-
    विजय नगरकर
    vpnagarkar@gmail.com

  • सत्संग

    मला एकटे, जगण्याचा सराव नाही
    जीवनाचा अर्थ अजुनी कळला नाही

    सर्वांच्या, बोटास धरुनी मी चाललो
    तोल सांभाळणे अजुनी जमले नाही

    भोगले भाळीचे, सारेच दिव्य होते
    ऋण! जन्मदात्यांचे विसरलो नाही

    हात संस्कारांचे लाभले सदा तारणारे
    त्या स्पर्शाला! कधीही भुललो नाही

    श्रमलो भिजलो साऱ्या ऋतुचक्रातुनी
    वेदनांची, कधीच फिकीर केली नाही

    वर्दळ सुखदुःखांची अविश्रांत जीवनी
    जगतांना, मी कधीच कुरकुरलो नाही

    शिकवण! ठेविले अनंते तैसेची रहावे
    उमजुनी सारे, जगण्यास टाळले नाही

    फुलुनी, उमलावे, गंधुनीया दरवळावे
    या सद्गुणां, अजूनही विसरलो नाही

    भाग्यवन्त! मजसी लाभला सत्संग
    त्या सत्संगा, कदापि मी भुललो नाही

    -- वि.ग.सातपुते ( भावकवी)

    9766544908

    १५ - १ - २०२२.

  • स्वप्न दोष

    भंग पावले पाहीजे स्वप्न माझे रातचे ।
    तोडणे स्वप्न श्रृंखला नसे मानवी हातचे ।।

    शिथिल गात्र बनती जाता निद्रेच्या आधीन ।
    उघडले जाते मग विचारांचे दालन ।।

    किती काळ भरारी घेई निश्चीत नसे कांही ।
    विचार चक्र थांबता स्वप्न दोष तो जाई ।।

    रात किड्यानो जागवा स्वप्नावस्थे मधूनी ।
    कुकुट कोकीळा येई मदतीसाठी धावूनी ।।

    वाऱ्याची थंड झुळुक पुलकीत देहा करी ।
    उषा राणीचे प्रयत्न यशस्वी सदैव ठरी ।।

    प्रयत्न करितो निसर्ग निद्रावस्था मोडण्याचा
    स्वप्नाचा दोष काढूनी निरोगी बनविण्याचा ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कोण ती स्फूर्ती देवता ?

    मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे ।

    कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती ।।

    अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो ।

    शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी ।।

    सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी ।

    असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती ।।

    तळमळ आता एक लागली, जाणून घ्यावी शक्ती आगळी ।

    अर्पीन माझे प्राण त्याला, स्फूर्ती देवता जो मज झाला ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • महिला दिन साजरा होतो

    महिला दिन साजरा होतो..
    पण महिला होतात व्यक्त मनातून,बोलतात अंतरातून, मोकळ्या होतात सहजतेतून ???
    खरच महिला दिन साजरा होतो का शुभेच्छा देऊन ???
    तिच्या मूक वेदनेची हळवी सल
    की निःशब्द भावनांची जखम
    तिच्या हास्यमागे करुण दुःख
    की हसऱ्या डोळ्यांत दुःखद ओल
    तिच्या अव्यक्त मनात असंख्य काहूर
    की तिच्या खोट्या आनंदात दुःखी चाहूल
    सहन करतीये ती आज वर्षानुवर्षे अंतरातून
    स्त्री आहे भारतीय होतात संस्कार
    तिच्यावर मग लहानपणापासून
    मनाच्या तळात साचलं काही तर भाव
    विरतात तिचे नाजूक निःशब्द बंधात..

    -- स्वाती ठोंबरे.

  • गंभीर बनू नका

    फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.

  • मैत्रभाव

    मी सवंगड्यां सोबती राहतो
    जीवनी, सुखसागरी डुंबतो

    विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना
    वैफल्यातही सुखानंदी जगतो

    शैशवी, आठव सारे खट्याळ
    मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो

    मित्र भेटीस, मी आसुसलेला
    गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो

    जरी हरविले क्षण सारे यौवनी
    अंतरी, निज शैशवात जगतो

    मित्रांसोबती, नशा यौवनाची
    निडर, निवांत तृप्ततेत जगतो

    जीवास नाही कुठलीच चिंता
    हसुनी, हसवत नित्य जगतो

    मी आज उभा, पसरुनीया बाहु
    स्वानंदा! मुक्त उधळीत जगतो

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८१.

    १४ - ३ - २०२२.