वर्षानुवर्षे आम्ही संघर्षच करतोय
पुढाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवतोय ----
उद्योग धंद्यावर मंदीचे सावट
आहे त्याच रोजगारात घट
हाताला काम नाही
बेकारांचा आकडा फुगतोय
वास्तवाचं भान हरवलेला तरुण
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
दोन कोटी रोजगाराचा शब्द
मेघा भरतीवर टळतोय --------
दुनियेचा पोशिंदा
मुठीने पेरून रास उभारतो
विस्कटता पुन्हा सावरतो
भाव मिळेल औन्दा
सोन्याचं पीक कवडीमोल विकतोय
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
हमीभावाचा शब्द
कर्जमाफीवर टळतोय -------
जातीधर्माचा नामानिराळा
सारेच एकीने वसती
इतिहास आहे साक्षी
सारेच इमान मातीशी राखती
सर्व धर्म समभावाचा मानस
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
साऱ्यांच्या विकासाचा शब्द
आरक्षणावर टळतोय -------
लिंक रोड समृद्धी महामार्ग
मेट्रोचा गवगवा
डोईवर घागर घशाला कोरड
भर पावसाळ्यातही तहानलेला
थेंबा थेंबा साठी आरड
टँकरची वाट पाहणारा
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
जलयुक्त शिवाराचा शब्द
दुष्काळावर टळतोय --------
कर्ज बुडव्यांना पळवाट
जगाच्या पाठीवर कुठेही वहिवाट
गरिबास आट
नुसत्या जाहिरातीचा घाट
भांडवलासाठी कौशल्य झिजवतोय
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
पंधरा लाखाचा शब्द
चुनावी जुमला म्हणून टळतोय ------
वासनांध भर दिवसा
देहाची लक्तरे ओरबाडतो
फाशीची शिक्षा होणाराही
दिरंगाईमुळे सुटतो
न्याया पुढे नथमस्तक देह
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
सुरक्षतेचा शब्द
चौकीदारावर टळतोय --------
सळसळत्या रक्ताला
शिवरायांचे वरदान
जन्म महाराष्ट्राच्या मातीतला
जगण्याचा अभिमान
सागरी तटही आसलावूनी
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
शिव स्मारकाचा शब्द
आराखड्यावर टळतोय ---------
-- असलम अंबर शेख
सय माहेराची येते
मन झुलते झुलते
क्षणात माहेरी जाते
मी तिथेच रमते।।१।।
आहे प्रेमाचे आगर
तिथे मायेचा सागर
घडे प्रितीचा जागर
हा बंधू भगिनीत।।२।।
हे केवड्याचे कणीस
सुगंध रातराणीस
बकुळ माळे वेणीस
परसदार खास।।३।।
मित्र मैत्रिणींचा मेळा
जमतो ना वेळोवेळा
झिम्मा फुगडीही खेळा
हा मैत्रीचा सोहळा।।४।।
आई माझी सुगरण
करी पुरण वरण
मिळे स्वादिष्ट भोजन
अगत्याचे योजन।।५।।
आठव साऱ्या साऱ्याची
मनी पिंगा घालायाची
अडसर संसाराची
ओढ ही माहेराची।।६।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही,
विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी ...१
विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला
ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२
चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा,
शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३
एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती
एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती...४
चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं
मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटी...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
कान्हा तू माझाच ना
तुझीच मीरा
मोहन शाम
हृदयातला हीरा
दिनरात भजन
हे राधेशाम
कृष्णभक्तित
लिन हे माझे नाम
मी भक्त गिरिधारी
तद्रुप झाली
मी नाही दुजी
तुझ्या मंदीरी आली
देता विषाचा प्याला
अमृत भासे
त्यातही तुच
हेच मनात ठासे
रिचवला मी प्याला
तुच दिसला
माझाच तुरे
प्राण तुला दिधला
प्राण तुला दिधला
-- सौ. माणिक (रुबी)
नाशिक
संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।
जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।
जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।
नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।
मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।
मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।
पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।
मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।
विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।
बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
वृत्त :- मानसी
लगावली :- गागालगा लगागा गालगा लगागा*
आगीत पेटलेले गाव पाहिले मी
चोरास साथ देण्या साव पाहिले मी
++++++++++++++++++
गावात श्वापदांची वाढली मुजोरी
डोळ्यात पेटलेले भाव पाहिले मी
+++++++++++++++++++
भूकेजला कसा आत्ताच गाव माझा
धान्यास फेकणारे राव पाहिले मी
++++++++++++++++++
हास्यात आज होते दु:ख गोठलेले
ह्रदयात लपवलेले घाव पाहिले मी
+++++++++++++++++++
थाटात आज होते गावचे पुढारी
जोषात हारणारे डाव पाहिले मी
++++++++++++++++++
भूकेस शरण गेली आज माय कोणी
ओट्यात दडवलेले पाव पाहिले मी
++++++++++++++++++
© जयवंत वानखडे,कोरपना
राहू केतुनो सोडून द्या तुम्ही, मगरमिठीतून चंद्राला
बघा बघा ह्या प्रथ्वीवरती, काय तो हा: हा: कार मजला
प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो, सौंदर्याचा मुकुटमणी
झाकळला सारा नभात हा, म्हणती त्यास गिळला कुणी
आत्मा जाता सोडून देहा, उरे न कांही मागे
चंद्र चांदणे नभात नसता, सौंदर्याची मिटतील अंगे
सौंदर्यातची बघतो सारे, जगण्यासाठी सौंदर्य हवे
विश्वचक्र हे फिरत रहाण्या चंद्राचे आस्तित्व सतत हवे
नष्ट होतील जीवजीवाणू, आनंद त्यांचा जाईल विरुनी
बलिदानाच्या पुण्याईने परि सुटेल चंद्र मगरमिठीतून
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कुठले हमीभाव आणि कोणतं आरक्षण,
आम्ही करत असतो फक्त स्वार्थाचं रक्षण.
मूर्ख आंदोलकांचं नेतेपद स्वीकारायचं
आणि मंत्रिपद मिळताच आंदोलनांना
शवागारात रवाना करायचं.
नेतेगिरी करण्याची आमची हीच पध्दत आहे,
एक लाल दिव्याची गाडी, बाकी सब कुछ झूठ है !
श्रीकांत पोहनकर
-- 98226 98100
shrikantpohankar@gmail.com.
प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते.
तू माळल्या बकुळीचा गंध
अंतरात दरवळतो अजुनही
आली कित्येक बेधुंद वादळे
स्मरण तुझे अंतरी अजुनही
सारेसारे आजही तसेच आहे
मी न काही भुललो अजुनही
जिथे जिथे जाते नजर माझी
तुझेच ते ध्यासभास अजुनही
तूच रुजलिस अशी हृदयांतरी
स्पंदनी चैतन्य तुझेच अजुनही
********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०३
२४/११/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti