दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी
जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी
आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती
लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती
पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे
मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे
सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी
जगत् जेता नांव कमवूनी, जाईन माझ्या देश दरबारी,
काय करशील नंतर तू गे? प्रश्न विचारी तो साधू जन
"शांत राहण्या प्रयत्न करित, अखेरचा मी काळ घालविन”
मिस्कीलतेने साधू विचारी, मी तर आजच शांत आहे
धडपड सारी करूनी एवढी, माझ्याच मार्गे तुम्ही जाए
ध्येय विसरूनी सारे आपण, धावत असतो वेड्या परी
प्रभू मिलनाचे कार्य खरे, ते मनास जागविते केंव्हां तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।
दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?
निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।
फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?
चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।
आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।
देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।
हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षकवर्गांच्या मनामध्ये एकच काहूर माजलेला असतो ते म्हणजे बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली. अर्थहीन संहिता, चुकीची मांडणी पद्धत अशा गोष्टींमुळे काही चित्रपट एक आठवडा सुद्धा सिनेगृहात चालत नाहीत. भारतीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि कलेचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट मूळ तत्वांना विसरून विनाशाकडे वाटचाल करीत आहेत.चित्रपट पाहताना काय घ्यावे आणि काय नाही याबद्दल सजग राहणे आमची आणि तुमची जबाबदारी आहे.
सांजवेळ ही मनोहर
स्मरणगंधलेले अंबर
सुरम्य क्षितिज केशरी
अस्ताचे लाघवी झुंबर
उजळता तिन्हीसांजा
वृंदावनी ज्योत सुंदर
क्षण शांत सुखविती
संस्कारी दर्शन सुंदर
अगम्य प्रकाश मंदमंद
मांगल्याचे भाव सुंदर
गाभारी प्रभा निर्मली
सात्विक साक्षात्कार
पुण्यप्रदी तिन्हीसांजा
समाधिस्त आत्मसुंदर
लोचनी उद्याची प्रभात
भूपाळी हरि श्यामसुंदर
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२८३
३/११/२०२२
बाल वय
कष्टमय
ढिगाऱ्यात
झुरतय
माय जाते
कामावर
तिच्या मागे
जाई पोर
वितभर
या पोटाची
चिंता असे
या आईची
कष्टकरी
गाळी घाम
तेव्हा मिळे
थोडा दाम
गरिबाची
रित न्यारी
जगण्याची
ओढ भारी
जिथे तिथे
खडकहे
विरंगुळा
लेकीस हे
दगडात
आनंदी ती
बघताच
सुन्न मती
-- सौ.माणिक शुरजोशी
असा एकटाच
जीव श्रमलेलेला
असह्य वेदनां
श्वास कोंडलेला
अंतरी कोलाहल
अश्रु ओघळलेला
उद्वेग भावनांचा
विचार बावरलेला
मन दिशाहीन
आव्हान विवेकाला
कसे सावरावे
अशांत मनाला
भौतिक सुखाचीच
आसक्ती जीवाला
निर्मळ सुखसौख्यदा
त्यजीता षडरिपुला
सांज रेंगाळलेली
माहोल गहिवरलेला
अंती लोचनी
सारा गोतावळा....
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १९९
१४/८/२०२२
खारेपणा हा अंगी असतां,
कोण खाईल केवळ मीठ,
परि पदार्थाला चव येई,
मिसळत असता तेच नीट ।।१।।
जीवन सारे खडतर ते,
भासते मिठासम मजला,
केवळ जीवन बघता तुम्हीं,
पेलणें अवघड सर्वाला ।।२।।
तेच जीवन सुसह्य होई,
‘आनंदात’ जेंव्हां मिसळते,
हर घडीच्या प्रसंगामध्ये,
समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो
त्या मागे माणूस धावतच राहतो
अपेक्षांचा ओघ वाहवत असतो
कुठेतरी विश्राम द्यायचा असतो
आणि ...........
इथच चुकतं,नव्वद टक्के मार्कस् मिळाले
आई म्हणे बाळा
थोडा अभ्यास केला असतास तर......
तर नक्कीच वाढले असते टक्के
पाच लाखाचं पॅकेज
अमुक कंपनी जास्त देईल पॅकेज
तृप्ती नाहीच........
अपेक्षांचा नाही.....
तृप्तीचा डोंगर वाढू दे
प्रयत्न सोडू नको रे,
अपेक्षा ठेव रे,
पण मिळालेल्या यशास
तुच्छ लेखू नको रे
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार
शिकला सवरला परि न जाणला संसार
पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी
घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी
वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता
कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता
सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची
व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti