न पोंहचे झेप विचारांची, टिपण्या त्याचेच सौंदर्य
अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता, शोधण्या तयासी मन जाय
थवेच्या थवे उडत जातां, पक्षी दिसती आकाशीं
विहंगम ते दृष्य भासे, आनंदूनी टाकती मनासी
बघतां संथ नदीकडे, लय लागूनी जात असे
प्रचंड बघूनी धबधबा, चकीत सारे होत असे
ऐटदार तो मयुर पक्षीं, आकर्षक ते नृत्य दाखवी
सप्तरंगाचे इंद्रधनुष्य, काळजाचा ठाव घेई
निसर्गातील प्रत्येक अंगी, भरलाआहे सौंदर्य ठेवा
आंस राहते लागून मनीं, कलाकार श्रेष्ठ तो जाणावा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
राऊळी, गाभारी
नयन मी मिटलेले
अंतरंग उजळलेले
भक्तीप्रीतीत रंगलेले ।।१।।
रूपडे निळेसावळे
कृपासिंधू, कृपाळू
ओढ नित्य अनावर
भान माझे हरपलेले ।।२।।
क्षणक्षण पुण्यपावन
भक्तीत रंगगंधलेला
ध्यानमग्न मीराराधा
कृष्णरूप तेजाळलेले ।।३।।
रूप लडिवाळ लाघवी
अंतरी साक्ष दयाघनाची
निरांजनी दिपवी ज्योत
श्वास सारे सुखावलेले ।।४।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७९
१८ - ६ - २०२१.
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नदीकाठच्या कपारीमध्ये,
बेडूक बसला दबा धरूनी,
उडणाऱ्या माशीवरते,
लक्ष सारे केंद्रीत करूनी ।।१।।
नजीक येऊनी त्या माशीचे,
भक्ष त्याने करूनी टाकले,
परि दुर्दैव त्याचे बघा कसे,
सर्पानेही त्यास पकडले ।।२।।
बेडूक गिळूनी सर्प चालला,
हलके हलके वनामधूनी,
झेप मारूनी आकाशी नेले,
घारीने त्याला चोंचित धरूनी ।।३।।
'भक्ष्य बनने' दुजा करीता,
मृत्यूची ही चालते श्रृखंला,
जनक असता तोच सर्वांचा,
गमंत येई त्या खेळाला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप,
माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तूप !!
हाड् म्हटलं की, कुत्रा तरी निघून जातो,
माणूस मात्र कुत्रं बनून, शेपूट हलवित राहतो!!१!!
सांगते जरा ऐका, नका......!!
तुझं तू माझं मी, असं फक्तं मुखाने बोलतो,
डोळ्यांआड दुसऱ्या ताटात जिभाळ गाळीत डोकावतो!!२!!
सांगते जरा ऐका, नका......!!
परके आले पुढ्यात, तत्त्व प्रदर्शन मांडतो,
वेळ आली स्वत:ची की झटकन धुळ झाडतो!!३!!
सांगते जरा ऐका, नका......!!
म्हणतो खाते मांजर, डोळे मिटून लोणी,
मी मज्जा मारताना, पाहू नये हो कोणी!!४!!
सांगते जरा ऐका, नका......!!
चटक मटक लोणचं हवं, रोजच्या ताटाला नवं,
भुलवून म्हणे "तुझ्या-माझ्या संसाराला अजून काय हवं?"!!५!!
सांगते जरा ऐका, नका......!!
हौस मज्जा मस्ती दररोज हवी बासणीला,
मेहनतीच्या वेळी राहती, चटपटीत कारणं याच्या वस्तीला!!६!!
सांगते जरा ऐका, नका......!!
आवर नाही स्वत:स, तोच म्हणतो हो सावर,
तुझ्या आधी भरून घेतो, माझी सोन्याची घागर !!७!!
सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप,
माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तुप!!
-- श्वेता संकपाळ
काल जे असते
तसे आज नसते
प्रेमात पण तसेच असते
असे का त्याला उत्तरच
नसते फक्त फरक लक्षात
घ्यायचा असते निमुटपणे
तरच सारे काही सुरळीत होते.....
प्रेम प्रेम रहाते
नाहीतर
काही खरे नसते......
जसे भांड्याला भांडे लागते
तसे प्रेमाला प्रेम ' लागते '....
-- सतीश चाफेकर.
बड्या धेंड्याचा देहान्त जाहला,
राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला,
जनसागर अवघा शोकसागरात बुडाला
अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला
का कोण जाणे कुणास कसला
पत्ताच नव्हता शोक कशाला?
शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले
तरीही राजमहाल अपुरे पडले
हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले
तरी बरेच काहीसे अजूनी उरले
एकाकी तू असा निजलास का रे
कुणी न तुजला वारस का रे
शोक न कुणाचा, पाठिंब्याचा
हुद्याचा वा मुद्याचा
एकही न कसले फूल बिचारे
तुजवर पडले; काय अरेरे!!
अहा रे त्याचे जीवनही प्यारे, मरणही न्यारे
तूच अभागी मग असा कसा रे
तुला सजविले, मरणही बिचारे
प्रमाद एकच घडला तवहाती रे
असशील वेचले, देशासाठी प्राणा रे
कधी न इच्छिलेस तू अभाग्या
मोल तुझे अधिकार हुद्यात रे
हो जागाही नगण्य तुझ्या चिरनिद्रेतून
हसतमुखाने; आश्चर्य लपवून
हो सामील या मिरवणुकीत
जबरदस्तीच्या तीनतेराच्या दुखवट्यात
हा दोष न कुणाच्या माथी रे
देश अपुला हुद्दासत्ताक रे
तुला न मिळावा हा मान उपेक्षिता
फुका खपलास भूमिसाठी या करंट्या
जरी न केले त्याने काही देशासाठी रे
हुद्दा त्याचा होता फार मोठा रे
असता जर तो तुझ्याही जवळी
तो मान मग तुलाही मिळता रे
अनमोल तुझ्या कार्यापेक्षा
होता विचार हुद्याचा तुझ्या रे
हुद्याचा तो मान वेड्या रे
तुझा न् माझा नव्हता रे
घडले दोन मृत्यू: मात्र एक फरकाचा
होता एक व्यक्तीचा दुसरा मात्र हुद्याचा
-यतीन सामंत
उपास तापास करुनी,शिणवित होतो देहाला
भजन पूजन करुनी,पूजीत होतो देवाला
कथा किर्तनें ऐकूनी,पुराण मी जाणिले
माळ जप जपूनी,प्रभू नामस्मरण केले
वेचूनी सुमनें सुंदर,वाही प्रभूचे चरणीं
फुलांचे गुंफूनी हार,अर्पण केले कंठमणीं
जाऊनी तीर्थ यात्रेत,दर्शन घेतले तीर्थांचे
प्रसिद्ध देवालयांत,चरण स्पर्षिले मूर्तीचे
मनामध्यें ठेऊन शांती,मूल्यमापन केले जीवनाचे
कांहीं न मिळाले हातीं,व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे
संसारातील प्रेम व राग,ह्यातच मन गुरफटले
कर्तव्यातील एक भाग,प्रभू भक्तीसी संबोधले
परमार्थ आणि संसार,भिन्न नाहींत दोन
प्रभूचाच आहे संसार,मनी तूं हे जाण
कर्म फळ आशा,बाळगूं नको मनीं
तेंव्हा न येईल निराशा,कर्म करिता क्षणीं
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू ,
तो तर केवळ एक थेंब
ब्रम्हांड सारे मोठा सिंधू ,--!!!
असे असता गर्व करी,
नको इतका अहंकार करी,
हातात नाही काही तरी,
उगीचच मिशीवर ताव मारी,--!!
मेंदू केवढा, बुद्धी केवढी,
आचार-विचार मात्र वेगळे, संस्कारांच्या नावाखाली,
पोकळ बढाया मारती सगळे,--!
हातात नाहीत पुढचे क्षण ,
काय घडेल त्याचा नेमच नाही, जन्मामुळे दुःखे भोगती,
म्हणत आता येऊ दे मरण,--!!!
जन्ममरणाचा फेरा चुकवत,
का कधी कोण आला - गेला,-?
प्रारब्धाच्या अगम्य चरकांत,
जो तो चिरडला गेला,
निघून जातो जीवनरस,
राहतात फक्त चिपाडे,
क्रूर केवढे नशीब म्हणावे,
त्याला पुन्हा चरकातूनच काढे,--!!
कसला अहम अन् कसली गुर्मी
साध्या जगण्याचीही नसे हमी, ज्याला त्याला अहंकार नासवी, माणसा जाण आपली कमी--!!
© हिमगौरी कर्वे
Copyright © 2025 | Marathisrushti