आता एका झोपेची आस लागून राहिली,
डोळ्यांच्या काठाशी रात्र थांबून राहिली.
विचारांचे वादळ अजूनही शांत नाही,
मनाच्या आभाळी ढगांची गर्दी दाटून राहिली.
दिवसभराच्या जखमा शब्दांत मावत नाहीत,
मूक वेदना उशाशी अलगद बसून राहिली.
चांदण्यांनी खूप समजावलं या मनाला,
पण तुझ्या आठवणींची चाहूल जागून राहिली.
आता एका झोपेची आस लागून राहिली,
थकलेल्या श्वासांची वाट पाहत राहिली.
कधीतरी येईल निवांत स्वप्नांची सर,
तोवर ही रात्र माझ्याशी बोलत राहिली.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे
कळवळली भारत माता तुझ्या नावाने रडते आहे.।।1।।
हाती तुझ्या जोर पोलादाचा
रक्तात उसळणारा तुफान आहे
आज जागा झाला नाहीस
तर तुझ्या घरी उद्या स्मशान आहे.
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।2।।
रोजचेचं व्हाटस अप फेसबुकचे जगणे
आता तुला शोभणार नाही
काळजी असेल ना भारत मातेची
तर घे हाती बंदुक आणि हो सीमेवरचा शिपाई
किती दिवस तुला मिंदेगिरीचे जगणे जमणार आहे
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।3।।
मार चपराक भ्रष्टांच्या कानाखाली
कारण तूच आहेस उद्याच्या भारताचा वाली..
घरासाठी लढतोस रोज आता देशासाठी लढ
झोपचे सोंग घेणा-या आता तरी डोळे उघड
आज जागा झाला नाहीस तर जीवन संपणार आहे.
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।4।।
मी ओरडून काय सांगू, तुला ही तुझे दुख कळते आहे
भारतमातेच्या आक्रोशाने तुझे ही ऊर जळते आहे.
तु रडशील आज, पण तुझ्या अश्रूंना किंमत राहणार नाही.
रक्त सांड पुन्हा स्वातंत्र्यासाठी
मग भारत माता ही देईल तुझ्या बलिदानाची ग्वाही
हेच माझे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।5।।
-- अमोल उंबरकर
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि
जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी
भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं
भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी
भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा
परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा
शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक
कवि मनाशीं 'स्व' भावांचे करी जुळवणूक
कविते वरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे
खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला.
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला.
"उंदीर कुठे पार्क करू ?
लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे,
आराम करू दे त्याला"
"तू पण ना देवा, कुठल्या
जगात राहतोस.?
मर्सिडीजच्या जमान्यात
सुद्धा उंदरावरून फिरतोस.?
मर्सिडीज नाही, निदान
nano तरी घेऊन टाक.
तमाम देव मंडळींमध्ये
थोडा भाव खाऊन टाक.
इतक्या मागण्या पुरवताना
जीव माझा जातो.
भक्तांना खुश करेपर्यत खूप खूप दमतो
काय करू आता माझ्याने manage होत नाही.
पूर्वीसारखी थोडक्यात
माणसे खुशही होत नाहीत.
immigration च्या requests ने system झालीये hang.
तरीदेखील संपत नाही
भक्तांची रांग.
चार-आठ आणे देऊन
काय काय मागतात.
माझ्याकडच्या files
नुसत्या वाढतच राहतात.
माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation.
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution.
M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे ?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे ?
असं कर बाप्पा एक Call Center टाक.
तुझ्या साऱ्या दूतांना एक-
एक region देऊन टाक.
बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको.
परत जाऊन कुणाला,
दमलो म्हणायला नको.
माझ्या साऱ्या युक्त्यांनी
बाप्पा खुश झाला.
एक वर देतो बक्षीस, माग
हवं ते म्हणाला".
CEO ची position, Townhouse ची ownership.
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship".
मी हसलो उगाच, "म्हटलं
खरंच देशील का सांग ?
अरे मागून तर बघ,
थोडी देणार आहे टांग ?
पारिजातकाच्या
सड्यामध्ये हरवलेलं अंगण
हवं.
सोडून जाता येणार नाही,
असं एक तरी बंधन हवं.
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.
प्रत्येकाच्या मनात थोडा
मायेचा शिडकाव.
देशील आणून मला माझी हरवलेली नाती ?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती ?
इंग्रजाळलेल्या पोरांना
थोडं संस्कृतीचं लेणं.
आई-बापाचं कधीही न
फिटणारं देणं ?
कर्कश्श वाटला तरी हवा
ढोल-ताशांचा गजर.
भांडणारा असला तरी
चालेल, पण हवा आहे शेजार.
यंत्रवत होत चाललेल्या
माणसाला थोडं आयुष्याचं
भान.
देशील का रे देवा, यातलं
एक तरी दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही,
बाप्पा नुसता सोंडेमागून
हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा,
"सुखी रहा" म्हणाला. . . . .
मिट्ट काळोख
इथे आसपास
दिसेना कुठे वाट
होतात नको ते भास
वाटते जणू
थांबले नकळत श्वास
ऐकू येतात आता
हृदयाचे ठोके खास
सोबतीला फक्त
किर्रर्र शांत अधिवास
स्थिर नाही चित्त
फक्त भीतीचा आभास
अशात येई हाक सख्या
घेई मन तुझा ध्यास
तिरीप आली उजेडाची
मज येई तुझा तोच सुवास
सोबत किती गरजेची
हे जाणवले, लागली आस
नकोते अंधारे एकलेपण
उजळुया चल मधुमास!!
--वर्षा कदम.
काल रात्री गणपती
स्वप्नात माझ्या आला होता
सोंडेनेच डोळे पुसत
गा-हाणे त्याचे सांगत होता
गणेशचतुर्थीचा जणू
धसकाच त्याने घेतला
अनंतचतुर्दशीची वाट
केव्हापासून पाहू लागला
संयोजकांना हवी
देणगीच्या नावे खंडणी
चार आण्याचा गणपती
बारा आण्याची मांडणी
किडनॅप केल्यासारखे मला
तोंड झाकून आणले
कसे आणले, कुठे नेले
काहीच नाही कळले
भजन सेवेसाठी
भजनी मंडळ आले
ऐकायला ते अन मी सोडून
संयोजकही नाही थांबले
ऑर्केस्ट्राच्या रात्री
मला झोप आवरेना
'वन्स मोअर' करता करता
कुणीच आवरते घेईना
'ऐका दाजीबा', काँटा लगाची
शिसारी मला आली
रुचिपालट म्हणून एकाने
लावणीची कॅसेट लावली
आधीच माझे कान मोठे
त्यात स्टिरिओ जोर करतोय
कानठिळया बसून बसून
बहिरा व्हायचाच राहिलोय
विसर्जनाच्या मिरवणुकीत
हाल माझे सांगवेना
स्पिकर वाजंत्रीच्या मागे
मला कुणीच पाहीना
उठून पळावे म्हटले तर
चौघानी पकडून ठेवलेले
अंधार नको कुठे म्हणून
लख्ख लाईट लावलेले
विसर्जनाच्या वेळी मात्र
मन भरून- नव्हे घाबरून गेले
कारण 'पुढच्या वर्षी यायचं'
आमंत्रण सर्वांनीच दिले
आता मात्र मी असाच
'आईकडे' जाणार आहे
नवरात्रात तिनं यावं की नाही
विचार करायला सांगणार आहे
कुणाबद्दल माझी तक्रार नाही
टिळकांना मात्र मी शोधतोय
जनजागरणाची त्यांची कल्पना काय असावी ?
यावर सध्या विचार करतोय
Forwarded Post from Whatsapp
तिच्या आणि त्याच्या
संबंधात कधीही ट्विस्ट
दिसला नाही...
दूरच्या डोगरासारखे
सर्व काही मस्त दिसत होते
डोगराजवळ गेले की
सर्व खाज-खळगे दिसतात
चढ-उतार दिसतो
तसेच त्या दोघांचे होते बहुतेक
मनात विचार आला ..
मला काय गरज त्या
डोगराजवळ जायची
पण एकदा डोगरच
समोर आला आणि
अपरिहार्यपणे ट्विस्ट दिसला
सगळ्यांचे असेच असते
म्हणून डोगराजवळ जाणे
शक्यतो टाळावे कारण...
कधीकधी आपणच त्या
डोगराचा भाग होतो....
-- सतीश चाफेकर.
प्रस्थापितांनो मी तुमच्या विरुद्ध आहे
मला माहीत आहे,
साहेबाला न पटणाऱ्या त्या अंधश्रद्धा बनतात
साहेबाला रुचणाऱ्याच गोष्टी विज्ञाननिष्ठ असतात
कदाचित साहेबाचे बूटही विज्ञाननिष्ठ असावेत
कारण ते चाटण्यात प्रस्थापितांचा पुढारलेपणा असतो
म्हणूनच मी अंधश्रद्धाळू आहे
कारण साहेबाची लाचारी मला जमत नाही
'पिंजऱ्यातील' पुढारलेपण मला भावत नाही
मी मागासलेला आहे, कारण-
माझ्या पूर्वजांचा मला यथायोग्य अभिमान आहे
माझ्या हृदयातील कोरीव लेण्यांचं नाव शिवाजी आहे
माझ्या देशातून गंगा वाहते याचा मी गर्व करतो
माफ करा प्रस्थापितांनो
तुमच्या 'पुढारलेल्या' वाटेने मला चालता येत नाही
कारण- त्या वाटेवर होणारं अस्मितेचं वस्त्रहरण
मी पाहू शकत नाही
त्या वाटेवरच्या स्वाभिमानशून्यतेच्या छायेला मी भितो
त्या वाटेवरची लाचारीची लक्तरे मला झेपत नाहीत.
मला ठाऊक आहे
माझ्या मागासलेपणाची तुम्हाला लाज वाटते.
पण, तुम्हाला ठाऊक नसेल- प्रस्थापितांनो,
तुमच्या पुढारलेपणाची मी कीव करतो
देहरुपी घराचा अस्मितेचा पाया उखडून टाकून
त्यावर पुढारलेपणाचा कळस चढवण्याचा
मूर्खपणा मी करत नाही
माझ्या कंठातल्या मराठीचं अस्तित्व हिमालयाएवढं आहे
तुमच्या बंदिस्त पुढारलेपणात ते सामावणारं नाही
प्रस्थापित पुढारकांनो तुम्हीही मराठीकडे येऊ नका
कारण तिच्या केवळ संसर्गाने,
तुमचं तकलादू पुढारलेपण वितळून जाईल
मराठी अस्मितेचा आवेग तुम्हाला सहन होणार नाही
सह्याद्रीचा कडा चढताना कदाचित तुम्हाला दम लागेल
नि स्वाभिमानागत घातक चीज तुमच्या मनात घर करेल
जी बाळगणं आज तुमच्या ताकदी बाहेरचं आहे
तेव्हा प्रस्थापितांनो,
तुम्ही स्वस्थपणे साहेबाचे बूट चघळत बसा
कारण ते विज्ञाननिष्ठ आहेत
सोडून द्या माझा नाद, कारण,
संस्कृतीचा अभिमान बाळगणारा मी एक मागासलेला वेडा आहे
असे बिचकू बिलकूल नका,
संस्कृती अस्मिता, उदात्तता यांचं गुंडाळलेलं गाठोडं
बिनधास्तपणे माझ्याकडे सोपवून
नि:शंकपणे पुढारलेपणात बंदिस्त व्हा
साहेबाचे बूट तुमचीच वाट पहात आहेत-
त्यांचा योग्य तो आदर राखा
संस्कृती सांभाळायला मी आहेच, विश्वासू माणूस गंगेच्या काठावर
अनादिपासून अनंतापर्यंत, असाच
गाठोड्याची आठवण झालीच कधी तर जरुर या
मी आहे तिथेच असणार आहे
अखेर प्रत्येकाला कुणीतरी मैलाचा दगड हवाच असतो
मी मागासलेलाच रहाणार कारण,
या मागासलेपणाचा मला जबरदस्त अभिमान आहे
हीच तर माझी जीवनमूल्यं आहेत
पण लक्षात घ्या;
तुमचं गाठोडं सांभाळण्यासाठी तुम्ही गहाण टाकलेला
तुमचा स्वाभिमान, तुमची अस्मिता मात्र
मी तुम्हाला परत करणार नाही
कारण, तेच माझं एकमेव खाद्य आहे- मागासलेपणाचं
-- यतीन सामंत
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
फापट पसारा आवरून सारा ,
आता सुटसुटीत व्हायचं आहे !
याच्या साठी त्याच्या साठी ,
हे हवं , ते हवं
इथे तिथे - जाईन जिथे ,
तिथलं काही नवं नवं
हव्या हव्या चा हव्यास आता
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,
बॅग हलकी स्वतः पुरती
आता फक्त ठेवायची आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
अपेक्षांच्या ओझ्याखाली
आजवर त्रस्त होतो
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये
काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो
काय राहिलं, कुठे ठेवलं
आठवून आठवून पाहत होतो
त्या त्या वेळी ठीक होतं
आता गरज सरली आहे,
कुठे काय ठेवलंय ते ते
आता विसरून जायच आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
खूप जणांनी खूप दिलं
सुख दुखाःचं भान दिलं
आपण कमी पडलो याचं
शल्य आता विसरायचं आहे !
मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
आत बाहेर काही नको
आत फक्त एक कप्पा,
जना - मनात एकच साथी
सृष्टी करता एकच देवबाप्पा !
सुंदर त्याच्या निर्मिती ला
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत
अलगद उठून जायचं आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
-- आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
किती, कसे, कुठे शोधू तुला
अशी कुठे? तूं हरवुनी गेली...
लोचनी रूप तुझेच लाघवी
पापणी, नित्य पाणावलेली...
प्रतीक्षेत हरविले दिन ते सारे
क्षितिजी सांजाळ थबकलेली...
निलांबरी, मोहोळ आठवांचे
निमिषात तूंच उठवूनी गेली...
हे सारे, आज कसे विसरावे
अशी कुठे गं तूच हरवून गेली..
प्रीतिवीण कां? जगणे असते
धुंद श्वासात, गंधाळते बकुळी
शीणलो तरी वाटते तुला पहावे
सांजाळलेल्या या कातरवेळी
रचना क्र. ११२
२२/८/२०२३
- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Copyright © 2025 | Marathisrushti