(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रिकेट

    क्रिकेट 

  • सहज तू म्हणालास विसरुन तू सार जा

    सहज तू म्हणालास
    विसरुन तू सार जा,
    बहर होता तो एक
    मनातून मिटून सगळं टाक..
    सहज सार विसर म्हणलं
    तरी विसरता येत नाही,
    मनाच्या तारा छेडल्या तू
    आता आठवणी मिटत नाही..
    बहर तर सगळ्यांचा असतो
    पान,फुलं,अगदी निसर्गही बहरतो,
    स्त्री मनावर फुंकर मारता मात्र
    कहर तो जरा मन कल्लोळ होतो..
    सहज सोप्प तुला वाटतं तरी
    स्त्री असते मुळात हळवी,
    गुंतून जाते ती अबोल जेव्हा
    तेव्हा न दिसते तिला कुठली भीती..
    अंतर मन मग ओल बावरं
    त्यात प्रत्येक स्त्री मोहरते,
    पुरुष म्हणतो विसर सार तू
    तेव्हा स्त्री त्याला कळलेली नसते..
    गुंतल्या जातात मुग्ध भावना
    एका वळणावर स्त्री पुरुष येता,
    आकर्षण हे दोघांत युगानयुगे असते
    न चालतात मग इथे कुठल्या मात्रा..
    सगळं काही विसरलं तरी
    अस्तित्व पुसलं जातं नाही,
    तू पुरुष अन मी स्त्री फरक
    हाच तो मिटला जातं नाही..
    आड वाटेवर वाटा अचानक
    वाकड्या साऱ्या एकदा होतात,
    स्त्री आणि पुरुषाला एकत्र आणून
    वाटा मात्र वेड्यावाकड्या होतात..
    नसतं इतकं सोप्प मग स्त्रीला
    गुंतलेल्या भावनेतून बाहेर येणं,
    पडझड तिच्या मनाची होते
    काहूर तिच्या अतरंगी अलगद वेढतं..
    समजल्या नाही स्त्री भावना
    तरी अबोध हळवी ती होते,
    व्याकुळ होतात काही आठवणी
    त्यात अंतरंगी तिचीच होळी पेटते..
    मन नसेल तो माणूस नसतो
    भावना नसेल तर तो भाव नसतो,
    स्त्री नसेल तर ती जाणीव नसते
    पुरुषाला स्त्रीची सल कळतं नसते..
    सोडवता येतं नसेल तर
    गुंताच कुठला सोडू नये,
    आणि मन मोहरलं कुणात
    तर भाव व्याकुळ होऊ नये..
    पुरुष जेव्हा स्त्री जन्म घेईल
    तेव्हा कळतील साऱ्या स्त्री भावना,
    न विसरते स्त्री मग काही भावना
    निसर्गतः असतात कोमल तिच्या जाणिवा..
    देवाने बनविले स्त्री आणि पुरुष
    मोहरतात दोघांच्या नाजूक भावना,
    परी स्त्री तुटते तडाख्यात त्या वाऱ्याच्या
    पुरुष राहतो किनाऱ्यावर आल्हाद जरासा..
    नकळत स्त्री गुंतून जरा जाते
    पुरुषात अलवार वेल्हाळ होते,
    माहीत असते समोर वादळ आहे
    तरी आल्हाद स्वतःला झोकून देते..
    भावनांचा मोहक खेळ हा मग
    प्रत्येकजण एकदातरी खेळतो,
    कुणी गंधित अत्तरात गंधाळतं
    तर कुणाच्या भावनांचा दगड होतो..
    -- स्वाती ठोंबरे.
  • व्हॅलेंटाईन डे… दिवस प्रेमाचा…

    व्हॅलेंटाईन डे दिवस प्रेमाचा
    प्रेमाच्या दिवशी प्रेमानेच साजरा करण्याचा...
    हा दिवस म्हणजे त्याचा स्मृतीदिन
    ज्याने आपल्या प्रेयसीला आपल्या रक्ताने
    विक्रम केला पन्नास हजार शब्दांचे
    प्रेमपत्र लिहिण्याचा...

    तो विक्रम आता कधिही मोडणार नाही
    कारण कोणताही प्रियकर यापुढे
    आपल्या प्रेयसीवर पाचशे शब्दही
    लिहू शकणार नाही...कारण

    त्याने विक्रम केला आहे फक्त
    तिच्या देहात गुंतण्याचा...

    जगभरात हा दिवस आहे प्रत्येकाचे
    प्रत्येकावरील प्रेम व्यक्त करण्याचा...

    आपल्या देशात मात्र हा दिवस आहे
    प्रेमाचाच दिवस करण्याचा...

    प्रेम सर्वव्यापी आहे पण आज
    प्रेमाची व्याख्या मात्र संकुचित झालेली आहे
    माणसाच्या मनासारखी !
    त्यामुळे हा दिवस त्यानेच साजरा करावा
    ज्याला खरा अर्थ माहीत आहे प्रेमाचा...

    प्रेम गुलाबी आहे हेच लक्षात ठेवावे प्रत्येकाने !
    ह्या दिवशी त्याला रंग देऊ नये रक्ताचा...
    प्रेम हे फक्त देण्यासाठी असते
    ते ओरबडण्यासाठी नसते...
    दिवस हे लक्षात घेण्याचा...
    हा दिवस आहे आपल्या प्रेमावर
    प्रेमाने निदान चार शब्द लिहिण्याचा...

    या दिवशी गुलाबी रंगात रंगण्यात
    काहीच वाईट नाही
    फक्त गरज आहे ती आपल्या हृद्यातील
    गुलाबी रंग नव्याने शोधण्याचा...

    या दिवशी प्रेम व्यक्त करा
    पण प्रेमाने प्रेमाशी !
    ते स्विकारणे न स्विकारणे
    प्रेमावर सोडा प्रेमाने !
    धडा देत निस्वार्थीपणाचा...

    या प्रेमाच्या दिवशी सर्वानाच
    आपले प्रेम मिळत नाही पण
    तरीही हा दिवस हक्क हेरावून घेत नाही
    कोणाचा कोणावर प्रेम करण्याचा...

    हा दिवस कित्येक प्रेमी जिवांना
    उर्जा देतो पुढचे कित्येक दिवस
    प्रेमात रंगण्याची आणि आदेश देतो
    प्रेम समजून घेण्याचा...

    या दिवशी मला माझे प्रेम
    कधीच मिळाले नाही
    म्हणून काय झाले...
    मला अधिकार तर मिळाला
    जगावर प्रेम करण्याचा...
    ©कवी- निलेश दत्ताराम बामणे ( एन.डी.)

  • वीर बालक

    मुक्तछंद

    उगवतिचा सुर्य
    मज वाटतो एक गेंद
    टोलवावा उंच नभात
    हीच प्रबळ मनिषा मनात
    सागर किनारी
    प्रभातवेळी उगवतो हा पुर्वेला
    भल्या भल्यांना मोहवितो
    खट्याळ आहे जरा
    चित्रकार येती जाती
    असंख्य चित्र रेखाटती;
    मधेच येई छाया चित्रकारही
    छबी खेचतो हजारदा

    प्रेमी युगले इथेच येती
    गुज मनीचे सांगण्यास
    प्रेमाच्या आणा भाका देती
    तुझ्याच साक्षीने दिनकरा

    साधूसंतही कितीक येती
    येती ज्येष्ठ फिरावया
    मला बाकी एकच ठावे
    तुझ्यासवे मिळावे खेळावया
    ही बघ वेगे वाळूतली पावले
    सरकती माझी पुढे पुढे
    ताकद माझी तुला दावतो
    चल भिरकावणार तुला
    उंच उंच आणिक उंच

    अस्तित्व तुझे नगण्य वाटे
    बळ माझे वाढले
    दिवस व्हावा म्हणुन तुला

    आज माफ मीच केले....

    करू नकोस गमजा वृथा
    मी साहसी वीर बालक
    नाही नमणार कुणापुढे
    कुणापुढे

    सौ.माणिक (रुबी)

  • दोन मनें द्या प्रभू

    दोन मनें द्या प्रभू
    आपल्याला इच्छा आहे
    प्रभू तुमच्या नामस्मरणाची
    परंतू ऐकून घ्या
    कहाणी आमच्या अडचणींची ।।

    नाम घ्यावे मुखीं
    रात्रंदिनीं एकचित्ताने
    सार्थक होईल तेव्हां
    आमची तप:साधने ।।

    परि संसार पाठी,
    लावला आहेस तूं
    गुरफटल्यामुळें त्यांत
    साध्य न होई हेतू ।।

    मला पाहिजे दोन्हीं
    संसारात राहून ईश्वर
    एकात गुंततां मन
    दुसरे न होई साकार ।।

    दे मजला प्रभू
    मनाची एक जोडी
    संसारांत राहून मी
    घेईन प्रभूत गोडी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तीन चारोळ्या…

    १ - राजहंस

    बाकावर एकटा तो
    मागे गरीब बसतो
    तरी राजहंस आहे
    श्रेष्ठ बुद्धीत असतो

    २ - शहामृग

    आहे पंख भव्य दिव्य
    नाही उडताच येत
    देती दिलासा हे पाय
    धावण्यास बळ देत

    ३ - गिधाड

    तोंड वेंगाडती सारे
    नाव ऐकताच माझे
    स्वच्छ ठेवी परिसर
    अरे मित्र आम्ही तुझे

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • साक्ष भगवंती

    सुरम्य सप्तरंगलेले जीवन
    फुले, पाने, काटेही संगती
    शब्दभावनां! वैखरीवरती
    कृपाच! आगळी भगवंती

    सुखदुःख,वेदनांचे मोहोळ
    भावनांतुनी गुंतलेली प्रीती
    सत्य! हेची मर्म जीवनाचे
    हृद्य वास्तव, सदैव सांगाती

    मनाचा कोंडमारा जीवघेणा
    घुसमट मौनी, छळे एकांती
    भळभळणाऱ्या, दग्ध वेदनां
    तरीही सोबती सांत्वनी प्रीती

    प्रवास श्वासांचा, थांबा मृत्यू
    कालचक्राचा अदृश्य चालक
    ललाटीचे अलिखित भाकीत
    साक्ष! हीच कृपाळु भगवंती

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १०.

    १० - १ - २०२२.

  • पाखरांची शाळा

    पाखरांची शाळा भरे पिपळावरती
    चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ! ॥१॥

    उतरते ऊन, जाते टळूनी दुपार
    पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ॥२॥

    बाराखड्या काय आई, घोकति अंगणी?
    उजळणी म्हणती का जमूनी रंगणी? ॥३॥

    तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
    भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत ! ॥४॥

    खेळकर मुले, नको कराया अभ्यास
    परीक्षेत का न आई व्हायची नापास? ॥५॥

    लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत
    मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ॥६॥

    पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
    गळकी न शाळा यांची, भिजती सगळे ! ॥७॥

    रविवारी, सणवारी आमुच्यासारखी
    यांना नाही सुटी, भली मोडली खोड की ! ॥८॥

    यांच्याहून आम्ही आई ! शहाणे, नव्हे का?
    गप्प शाळेमधी, कधीं धरितो न हेका ॥९॥

    होतो पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
    मौज काय सांगू? मिळे सुट्टीही शाळेस ! ॥ १०॥

  • शारदेस विनंती

    हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।

    लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।

    दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।

    कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।

    दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।

    उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।

    तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।

    पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।

    जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।

    अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जादूगार तूं देवा

    जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
    आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार ।।धृ।।

    ढग काळे काळे
    जमवितोस सगळे
    गर्जती वादळे
    कडाडूनी विजा, पर्जन्य होई भयंकर ।।१।।

    जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
    आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

    तळपते ऊन
    दग्ध होई जीवन
    जाई वाळून
    तेज वाढूनी सूर्याचे, दाह करी फार ।।२।।

    जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
    आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

    कड्याक्याची थंडी
    भरुनी हुडहुडी
    देहाला सिकूडी
    गाठूनी जाती, ज्याना नसे घर ।।३।।

    जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
    आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

    सुख तुंची देतो
    दुःख तूंची देतो
    लक्ष्य तूं वेधतो
    चमत्काराविणा कसे, आस्तित्व भासणार ।।४।।

    जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
    आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com