मकर संक्रांत,दिवस सुर्य संक्रमणाचा।।
पतंग प्रेमींचा, नभातल्या पतंगोत्सवाचा।।
व्रत वैकल्यांचा,सुगड्याचं वाण लावण्याचा।।
सण संक्रांतीचा,हिरवा चुडा सुहासनीचा।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
कां व्हावे निवृत्त मी ? कुणी सांगतो म्हणूनी
निसर्गालाच सांगू द्या वय झाले समजूनी
कार्यक्षमता माझ्या मधली मोजमाप हे कुणी करावे ?
विकलांग होईल केंव्हा शरीर निसर्गालाच हे ठरवूं द्यावे
सहजची जगतो ऐंशी वर्षे संसार सागरी पोहता पोहता
स्थिरावले मन विचार करुनीं निवृत्तीची जाणीव येता
सर्वासंगे जगता जगता शेवटचा तो श्वास ठरु दे
हासत खेळत आनंदाने ह्या जगाचा निरोप घेऊं दे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नितळ लोचनी नीरव शांत चराचर..
ब्रह्ममुहूर्ती ऐकू येते सागराची गाज..
एकांती उसळते आर्त भावनांचे गुज..
बिलगता पवन , रुणझुण ती प्रीतीची..।। १ ।।
माहोल , सारा सर्वांतरा दीपविणारा..
प्राचीवरी अलवार उमले बिंब केशरी..
प्रतिबिंब लालगे ते लाघवी मनोहर..
ऐकू येते सुरावट मंगलमयी प्रीतीची..।। २।।
महाकाय , अथांग महासागर हृदयी..
भावनांच्याच बेभान लाटा गगनभेदी..
निरवतेत , घोंगावती अंतरी गतस्मृती..
उलघाल विकल मनी निष्पाप प्रीतीची..।। ३ ।।
खुणावते जीवा ती अवीट सागरमाया..
किनारी साक्ष , रुतल्या प्रीतपाऊलांची..
भरती , ओहोटीतही , प्रतीक्षेत किनारा..
आसक्ती स्पंदना , केवळ तव प्रीतीची.।। ४ ।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र.४२.
दिनांक:- १७ - ३ - २०२१.
हे शशिधरा तूं प्रेमळ सखा साऱ्या विश्वाचा
सौंदर्याचे प्रतिक असूनी राजा तूं नभाचा
लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी काजळ लावी तुला
काही वेडे त्यास समजती तू डागाळला
डाग कसला तुम्ही मानतां प्रेमामध्ये तो
दोन मनांतील पवित्र नाते हे आम्हीं विसरतो
समजूं शकतो नीती बंधन समाज रचनेचे
बळजबरीच्या कृत्यास तुम्ही म्हणावे पापाचे
गुरू पत्नीशीं प्रेम करिता लौकिक गेला तो
दोघांची साथ ती मिळतां गुन्हा कसा होतो ?
एक दिशेने प्रेम साधतां अर्धवट राही
दोघांमधली मनाची ओढ ती समाधान देई
'नीती मार्गे' कुणी म्हणतील चंद्रकृत्य चुकले
प्रेमाच्या परि अथांग सागरी तळांत ते बुडाले
डॉ. डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,
या परि अनुभव दुजा कोणता ।
सत्य समजण्या कामी न येई,
तेथ कुणाची कल्पकता ।।१।।
धगधगणारे अंगारे हे,
जाळती काळीज ।
शब्दांचे फुंकार घालूनी,
येईल कधी का समज ।।२।।
मर्मा वरती घाव बसता,
सत्य येते उफाळूनी ।
चेहऱ्यावरले रंग निराळे,
हलके हलके जाती मिटूनी ।।३।।
त्या दुःखीताला जाणीव असते,
जीवनामधली निराशा कशी ।
झेप घेवूनी समरस होतो,
इतर जणांच्या काळजाशी ।।४।।
सुख दु:खातील दु:ख अधिक ते,
पदोपदी जे दिसून येई ।
दु:खीतांचे अश्रू पुसण्या,
दु:खी अनुभवी धाव घेई ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
चिंता हा शब्द आणि त्याबरोबरीनं येणारा त्याचा अर्थ यांचा अनुभव घेतला नसेल असा माणूस शोधूनही सापडायचा नाही. काळजी, तणाव हे शब्दही समान अनुभूती देणारे. चिंतामुक्त जीवन ही काय मग केवळ एक कल्पना आहे का? की तशी असायला हवी अशी निव्वळ इच्छा, स्वप्न? चिंता, काळजी ही नेहमीच तापदायक, त्रासदायक असते का? की या अवस्थेतूनही प्रेरणा मिळते, बळ मिळते?
दिवा होता छोटासा, एक मजकडे
इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे
तळांत होती योजना, तेल सांठवण्याची
शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची
छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन
मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी
देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे
प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे
केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं
व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती
ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं
तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कधी खेळकर तर कधी चिंतातुर..
कधी आनंदी तर कधी उदासीन..
अनाकलनीय हुरहूर ही विलक्षण..
तरीही , उमलते हळुहळु जीवन..।।१।।
कालचक्र सृष्टीचे , अखंड अविरत..
तांडव , पंचमहाभूतांचे ऋतूऋतून..
स्पंदनांतुनी , सुखदुःखांचे ओघळ..
ऋणानुबंधी ! सारे संचिती जीवन..।।२।।
प्रीतभावनां ! अंकुर मानवतेचा..
प्रीतीविना कां दुजे असते जीवन..
ब्रह्मानंदी ! केवळ स्पर्श प्रीतीचा..
कृपावंती मोक्षदा , कृतार्थ जीवन..।।३।।
भाग्यवंतांच्याच , मनहृदयावरती..
अलवार प्रीतिचेच अविरत सिंचन..
ब्रम्हांडी! ही लाघवी साक्ष लोचनी..
हर्षोत्सवात ! रंगुनी जाते जीवन..।।४।।
© वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना:- क्र. ४०
दिनांक:- १५ - ३ - २०२१.
Copyright © 2025 | Marathisrushti