(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एकदा कवेत घे

    एकदा कवेत घे,
    संपवून सारा अबोला,
    जीव तुझ्यासाठी राजा,
    बघ, कसानुसा झाला,--!!!
    स्पर्श तुझा होता सखयां,
    सर्व दु:खे नमून जातील,
    अडचणींचे डोंगर सारे,
    क्षणार्धात ते वितळतील,
    बाहूंत तुझ्या वेड्या जिवां,
    कधी मिळेल रे आसरां,--!!!!
    ओढ वाटे सारखीच,
    छळते मज रात्रंदिवसा,
    तू येतां, जवळी परंतू,
    मिठीत घेते आभाळां,--!!!
    प्रितीच्या रंगी रंगता,
    तुझ्याच रंगात रंगते,
    होऊन वेडिपिशी कशी,
    हात नकळत देते हातां,--!!!
    माझी मी नसते,
    तुझ्याबरोबरी असतां,
    भानही हरपून जाते,
    तव समीप राहतां,--!!!
    रंगतदार तुझी साथ,
    मोह तिचा माझ्या जिवां,
    परोपरीने वाट पाहते,
    उन्हात थंडगार विसावा,--!!!!

    हिमगौरी कर्वे

  • श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

    विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
    चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग

    नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
    परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते

    अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
    विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी

    सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
    आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार

    आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
    लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे

    कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
    जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कोण जिंकलं…..!

    युद्ध संपलं…
    शत्रूवर विजय मिळाला…
    सगळीकडे फटाके… जल्लोष…
    चार दिवस सगळेच 'विजयोत्सव' साजरा करतील…
    नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील –
    "हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!"
    ...आणि त्या यशाचं भांडवल करून
    निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील!
    आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही......!

    पण...
    तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात...
    वृद्ध आई वडील–
    डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन....
    विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली
    दुचीत बसलेली आई......
    अन् सोललेल्या खावंदावर शहादत मलम लेपुन,
    शून्यात नजर लावून बसलेले वडील.......!

    एक अनाथ मुलगा –
    बाबांच्या कुशीत खेळण्यासाठी रडतोय,
    तळमळतोय.....
    आईला वारंवार विचारतोय....
    "बाबा कधी घरी येणार ...!"
    "मला त्यांच्या कुशीत खेळायचं" म्हणतोय.....
    पण ती कुशी तर आता फक्त आठवणीतच उरली आहे...

    ...आणि ती,
    ती वीरपत्नी –
    जिचं कुंकू उजडलंय...
    भकास जिनगीचे चटके अंगावर सहन करत....
    ती जिवंत मरण जगते आहे,
    कधीही न भरावं असं दुःख घेऊन...

    आपण?
    आपणही चार दिवसात त्यांना विसरून जाऊ,
    फेसबुकवर "जय जवान" लिहून पुढची पोस्ट पाहू...!

    पण एक प्रश्न तसाच उरतोच...
    हो, त्यांनी मातृभूमी वाचवली…
    ते लढले आपल्यासाठी....
    त्यांनी शौर्यही गाजवलं…
    ...पण
    " कोण जिंकलं हो ?"

    ©गोडाती बबनराव काळे, लातूर
    9405807079

  • तुझ्यासाठी

    कवितेच्या तलम पडद्याआडून
    माझ्या भावना तुला सागतात
    माझ्या विरहव्यथा
    शकुंतलेची व्यथा सांगावी
    दुष्यंताला तिच्या सखींनी तशी
    क्वचित दुर्लक्षिल्यासारखं
    क्वचित दाद देत तू म्हणतोस
    वा ।’
    आणि निघून जातोन
    कसं सांगू तुला कवितेतून?
    माझ्या कविता तुझ्यासाठी असतात!

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

  • आकांत

    विखुरल्या त्या वाटा साऱ्या,
    भावनेचाही झाला अंत,
    अंधत्व आले, दिशा हरवल्या,
    ना उरली हृदयास मनाची खंत !!

    दुःखाने पायघड्या अंथरल्या ,
    अश्रूंनी खारे गालिचे पांघरले ,
    किर्र किर्र त्या काजव्यांसारखे,
    अंधाऱ्या रात्रीत तांडव माजले !!

    विटले धागे सुखी नात्याचे,
    आकांत करुनी निष्ठुरले मन,
    भासत होते मृगजळ ते सुखाचे ,
    उरले हाती सुतकी जीवन !!

    -- श्र्वेता संकपाळ.

    "आकांत"(०८-१२-२०१८)

  • पुण्यस्रोत

    निसर्ग हा हिरवळलेला
    पुण्यस्रोत शुभ्र जलाचा....

    दरीदरीतुनी झेपावतो
    उंच धबधबा डोंगरीचा....

    निळ्यानिळ्या अंबरी
    धुसर पांघर धुक्याचा....

    रंग कोवळे सप्तरंगले
    धुंद सुगंध मृदगंधाचा....

    सांजाळल्या सांजवेळी
    पापणीत भास तृप्तीचा....

    समोर वाहते कृष्णामाई
    साक्षात्कार जणू गंगौघाचा....

    रचना क्र. ९२
    ३१/७/२०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908

  • फुगडी

  • तुझे तुलाच अर्पण !

    तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी ।
    उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी ।।१।।

    वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो ।
    सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो ।।२।।

    अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो ।
    जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो ।।३।।

    विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक ।
    दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित असे एक ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आत्म गुरू

    गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार

    सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां १

    वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी

    मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां २

    न कळला ईश I न उमगले आयुष्य

    दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे ३

    अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट

    प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता दाखवी ४

    तैसा गुरू तुमचा I पडदा फाडी अज्ञानाचा

    मार्ग दाखवी जीवनाचा । आनंद मिळण्यासाठी ५

    गुरूविना नाही ज्ञान I दूर करी तुमचे अज्ञान

    ज्ञान ज्योत देई पेटून । तुमच्या ज्ञानदिपाची ६

    ओळखावा आत्माराम I जाणावा ज्ञानराम

    समजावे मनोराम I आपल्या देहातील ७

    गुरू असता देहमंदिरी I कां फिरतोस दारोदारी

    करावी श्रद्धा प्रभूवरी I आत्म गुरूसी जाणोनी ८

    गुरू भेटणे कठीण I जाणील त्यासी कोण

    जवळी तुमच्या असून I कां शोधतासी ९

    तुमचा गुरू अंतर्मनी I महत्व त्याचे जानोणी

    घ्यावे त्यास ओळखूनी । हेची तुमचे यश १०

    जाणावे आत्मज्ञान I करावे स्वचिंतन

    तोच गुरू असून । उद्धारूनी नेई ११

    ज्याचा गुरू त्याचे जवळ I मग का दवडसी वेळ

    शोधण्यास जाई काळ I निरर्थक १२

    आयुष्य आहे थोडे I चित्त द्यावे प्रभूकडे

    जीवनाचे उकलेल कोडे I त्याच्या आशिर्वादे १३

    जीवनाचे मर्म I जाणावे हा धर्म

    त्याचप्रमाणे करावे कर्म I आयुष्य सार्थकी होणेसी १४

    गुरूसी करावे वश I समजोनी त्यास ईश

    घ्यावा त्याचा उपदेश I जीवनाचा १५

    एकदा अंतर गुरू लाभता I उपदेश त्याचा मिळता

    मार्गदर्शन सतत होता I तुमच्या जीवनाचे १६

    श्रेष्ठ गुरू अंतरीचा I परि विवेक पाहीजे मनाचा

    सराव करावा एकाग्रतेचा I उपदेश त्याचा घेण्या १७

    अंतरज्ञान मिळे कठीण I करावे लागते बहुत चिंतन

    श्रद्धा प्रभूवर ठेवून I ध्यान करावे १८

    एकाग्रतेचे चिंतन I लागता प्रभूध्यान

    विचार रहीत करावे मन I प्रकाश पडेल अंतरमनी १९

    आंतरमनातील प्रकाश I चेतना देईल सावकाश

    आनंदी करील आयुष्य I गुरू बनोनी तुमचा २०

    रोज करावे ध्यान I मनी एकाग्र भाव आणून

    जाता बाह्य जगाला विसरून I नियमाने २१

    योगाचे आसते सामर्थ्य I जीवनाचा दाखवी अर्थ

    न जाई प्रयत्न व्यर्थ I विश्वास ठेवावा प्रभूवर २२

    गुरू तुमच्या अंतरी I शोधता त्यासी बाहेरी

    हिच शोकांतिका खरी I तुमच्या जीवनाची २३

    सारे जीवन वाया जाई I जीवन तत्व ध्यानी न येई

    पश्चातापूनी उपयोग नाही I शेवटचे क्षणी २४

    चार दिवसांचे जीवन I सार्थकी लागावे म्हणून

    पाया त्याचा आत्मज्ञान I समजोनी घ्यावा २५

    संशय मनी न यावा I ध्यानयोग सिद्ध करावा

    तोच आपुला गुरू समजावा । अंतरात्मा २६

    गुरू नसतो कुणी व्यक्ती I अंतर्मनातील ती शक्ती

    आत्मा त्यास संबोधती । विद्वान जन २७

    जागृत अंतरात्मा । तोच होय परमात्मा

    श्रम न येई कामा । शोधता देहाबाहेरी २८

    तुमचा गुरू तुमचेपाशी । परी तुम्ही वाट चुकलासी

    जाणोनी घ्यावे गुरूसी । आत्मचिंतनाने २९

    प्रत्येक ती व्यक्ती । तिच्यातील सुप्त शक्ती

    सूचना देत असती । जिवन मार्गाच्या ३०

    जागृती आसवे चित्ती । चेतवावी सुप्त शक्ती

    मार्ग तयांना दिसती । ज्ञान प्रकाशाने ३१

    एकाग्र ज्याचे मन । न होत चुका त्याचे कडून

    संसार सागर जाय पोहून, केव्हांही ३२

    असावा आत्मविश्वास । मिळेल त्यासी यश

    मदत करी ईश । तयांना

    आत्मबल महान । मार्ग त्यासी दिसून

    यश करी संपादून । जीवनाचे ३४

    इच्छा तेथे मार्ग असती । अंतरगुरू मार्ग दाखविती

    श्रद्धा ठेवावी त्याचे वरती । ध्येय गाठण्यासाठी ३५

    आपण चुका करिती । दोष प्रभूसी देती

    नशीबास नावे ठेवती । अज्ञानामुळे ३६

    निर्णयाचे बहूत क्षण । सुख - दु:खे त्यावरी अवलंबून

    जीवन होई कठीण । चूक तुमची घडता ३७

    चूक होते विचारांची । परिस्थिती जाणण्याची

    चाहूल न येती संकटाची । तुम्हांसी ३८

    भावना आणि विचार । यांची मर्यादा असणार

    नियती तिला न कळणार । हाच आहे निसर्ग ३९

    आपण जगतो विचाराने । आपल्यातील भावनेने

    परंतु जगावे आत्मज्ञानाने । हाच यशाचा मार्ग ४०

    आत्म्याचे सामर्थ्य श्रेष्ठ । त्यास कळे इष्ट

    अंश प्रभूचा स्पष्ट । असे तो एक ४१

    म्हणून जाणावे आत्मज्ञान । जावे त्यास शरण

    अंशात्मक परमात्मा समजून । चिंतन करावे त्याचे ४२

    निर्णय कधी न चुकती । जेव्हां तो आत्मा देती

    योग्य निर्णय आनंदती । तुम्हां लागी ४३

    आत्मज्ञान हाचगुरू । सुप्त शक्ती जागृत करू

    निर्णय त्याचे शिरी धरू । हाच करावा संकल्प ४४

    एकाग्र होता मन । लागेल तुमचे ध्यान

    निर्णय तोच देईन । तुमच्यातील सुप्त शक्ती ४५

    प्रसंग येता तुमचे वरी । एकाग्र चित्ती विचारी

    आत्मगुरू निर्णय करी । तुमचे साठी ४६

    आत्म्त्याचा निर्णय । समाधान देय

    चुका न होय । कधीही ४७

    जीवानाचे सार । समजता ईश्वर

    आत्मज्ञान गुरूवर । विश्वास ठेवावा ४८

    आत्मज्ञान गुरू । चिंतन त्याचे करू

    मार्ग तोच धरू I जीवन यशासाठी ४९

    आत्मज्ञान असे महान II घ्यावे समजोनI सर्वांनी ५०

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • होळीत जाळा दुष्ट भाव

    एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//

    ऐष आरामांत राहून देह झाला मलीन

    शरीर सुखासाठी करती नाना खटपटी

    आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१//

    मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी

    राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार

    टाकता मलीनता मनाची पेटलेल्या होळीकडे, घे धांव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //२//

    विसरुनी चाललो मानवता प्रत्येक बघतो स्वार्थता

    विश्वासाचे आपले नाते विसरुन गेले सारे ते

    निस्वार्थी बुद्धीने आतां जाणा इतर मनाचे ठाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //३//

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०