दलदल होता चिखल मातीची,
पाय जाती खोलांत,
प्रयत्न व्यर्थ जाऊनी ,
न होई त्यावर मात ।।१।।
सावध होऊनी प्रथम पाऊली,
टाळावे संकट,
मध्यभागी शिरल्यानंतर,
दिसत नाही वाट ।।२।।
मोह मायेची दलदल असती,
सदैव भोवताली,
चुकूनी पडतां पाऊल ,
खेचला जातो खाली ।।३।।
जागृतपणाचा अभाव असतां,
गुरफूटत जातो,
मोहमायेच्या आकर्षक गुणाला,
बळी तोच पडतो ।।४।।
वेगवान जीवन प्रवाही,
खिळ बसे मोहाने,
क्षणीक सुखाच्या मागे जातां,
दु:खी होई जीवने ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
माझा गं बाळ राजा, पाळणी खेळतसे
पैंजण वाजतसे, त्याच्या पायात छमछमा ।
माझा गं बाळ राजा, घरात रांगतसे
मनगटी रूततसे, त्याच्या हाताला सांभाळा ।
माझा गं बाळ राजा, पाऊल टाकतसे
सोनसरी चमकतसे, त्याच्या गळ्यात चमचमा ।
माझा गं बाळ राजा, दुडूदुडू धावतसे
साखळी रूळतसे, त्याच्या कमरेत रुणझुणा ।
माझा गं बाळ राजा, भुकेचा हळूवार
भरवते खीर, त्याला वाटीत चांदीच्या ।
माझा गं बाळ राजा, निजेचा अल्वार
करू नका गलबला, त्याला जोजवा लवकर ।
शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप
पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती
कौशल्य पणास लावून केला मी गणपती ।।१।।
मुर्ती बनली सुरेख आनंद देई मनां
दाम मिळेल ठिक हीच आली भावना ।।२।।
घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत
कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।।
बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत
कंटाळून नेऊन दिला गणपती मी शाळेत ।।४।।
भरले होते भव्य प्रदर्शन हस्तकला कौशल्याचे
नवल वाटले गणपती बघून दालनातील सुरवातीचे ।।५।।
चकीत झालो जाणूनी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
गणपतीच्या भव्यतेनी मिळवीला हा अधिकार ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
भरवशाची घेऊन शिदोरी, पाऊलवाट चालत होता ।
कुणीतरी आहे मार्गदर्शक, यापरी अजाण होता ।। १
बरसत होती दया त्याची, जात असता एक मार्गानी ।
आत्मविश्वास डळमळला, बघूनी वाटेमधल्या अडचणी ।। २
संशय घेता त्याचे वरती, राग येई त्याच कारणें ।
विश्वासाला बसतां धक्का, आवडेल कसे त्यास राहणे ।। ३
ओढून घेई मृत्युचि आपला, अकारण तो त्यास दुराऊनी ।
जागृत होता पुनरपि विश्वास, संशय जाई दूर पळूनी ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील
बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,
नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा
मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,
अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी
सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,
काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो
वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,
शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो
भाविकामधील अज्ञानाचा, उपयोग करूनी घेतो
पूजेमधल्या विधी करिता, आग्रह त्यांचा चालत असे
भक्तीरसाचे महत्त्व असूनी, त्याच्यांत त्यांना रस नसे
व्यवहारीपणाचे रूप आणूनी, बाजारी वृत्ति दाखविती
धर्माचे नाव लावूनी, भोळ्या भक्तांना लुटत असती
पुरोहित असा असावा, धर्माची करि उकलन
भक्तीमार्गाच्या वाटसरूंना, योग्य मार्ग देयी दाखवून
प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें, चिंतन करण्या सांगावे
चंचल मनास प्रभू भजनीं, एकाग्र करण्या शिकवावे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)
एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।। १
मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।। २
तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।। ३
कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने ।। ४
भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप काय असते ।। ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कितीही सारी धडपड करशी
लाचार ठरतो अखेरी
जाण माणसा मर्यादा तव
आपल्या जीवनी परी ... ।।
क्षणाक्षणाला अवलंबूनी
जीवन असे तुझे सारे
पतंगा परि उडत राहते
जसे सुटत असे वारे... ।।
निसर्गाच्याच दये वरती
जागत राहतो सदैव
कृतघ्न असूनी मनाचा तूं
विसरून जातो ती ठेव... ।।
निसर्गाच्या मदती वाचूनी
जगणे शक्य नसे तुजला
जीवन कर्में करीत असतां
आठवित जा त्या प्रभूला... ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti