(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • मनातले पडघम

    मनामध्ये पडघम सतत वाजतच रहातात
    काळजाचे करावे कान तेव्हा ऐकू येतात

    उमटतात त्यात मनाच्या गाभाऱ्यातले नाद
    खोलवरुन येणारी आपल्या अंतराची साद

    आयुष्याच्या वाटेवरले काही फुललेले श्वास
    काळीजकुपीत जपलेले एकले एकले निश्वास्
    एकमेकांवरचा असलेला गाढासा विश्वास
    आसपास असण्याचा मग असेना का आभास

    कधी राहते गुंजत विचारांची निःशब्द गाज
    उलगडत कधी शब्दांत गुरफटलेली लाज

    थिरकत थिरकत येणाऱ्या तरलतेचे लहरी ताल
    गुणगुणारे, धुसफुसणारे, आसुसलेले आपले हाल

    येतात मोहरवत उत्फुल्लतेचे प्रसन्न झंकार
    कधी तुटत झिणझिणणारी वेदनांची तार

    अंतरीच्या डोहात खोल साधून एकांतवास
    आपला आपल्यातच विरघळण्याचा असतो हा प्रवास

    - यतीन सामंत

  • आधुनिकता

    नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते
    आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते

    ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते
    प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते

    मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी
    परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं

    मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार
    ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • स्फूर्ती दाता

    तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य

    समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य १

    तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती

    प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती २

    कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी

    मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी ३

    हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी

    दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही ४

    गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी

    स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी ५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आता

    आता स्वतःसाठीही थोडेसे जगू या
    आज थोडे या जगाला विसरु या
    हृदयावरी या कोरलेली प्रश्नचिन्हे
    आज ती हलक्या हातांनी रे पुसू या
    घेत गेलो दुःख कोणाचे कुणाचे
    आज अपुल्याही व्यथेला सावरु या
    सोसल्या ज्या वेदनाही लपवूनी
    एकमेकांना तरी त्या दाखवू या
    प्रौढत्व माथी घेऊनी जे हरवले
    कोवळेपण जाईचे ते भोगू या
    खूप जळलो पाहुनी तम भोवती
    आज थोडे चांदणेही पांघरु या
    वाट ही ना संपली अजुनी तरी
    काढण्या काटे पढीचे थांबू या
    आयुष्य जगला का कुणी प्रश्नांविना?
    समजाऊनी हे एकमेकांना; हसू या !

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

  • नेहमीच मज हे दयाघना

    मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते,
    नेहमीच मज हे दयाघना,--!!!

    लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता,
    संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,--!!

    तरीही माणूसपण असते,
    एखाद्या सज्जन हृदयात,
    माणुसकीचे महत्व जाणे,
    कितीही असेल संकटात,--!!!

    असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती,
    हेच प्रेम असे त्याचे,
    जगण्याची विशाल उक्ती,--!!!

    मुके प्राणी वृक्षलता,
    सारेच त्यापुढे झुकतात,
    प्रेमळ बाळकडू मिळतां,
    अधिक जीवन जगतात,--!!!

    याच माणसात आढळते,
    परमेश्वरावर अढळ भक्ती,
    तीच तारक बनते,
    जीवन सुसह्य सरतेशेवटी,---!!!

    करुणा भाके तो भक्त,
    लीन दीन ईश्वरापुढे,
    जगाच्या कल्याणाकरिता,
    ज्ञानेश्वरही घालती साकडे,--!!!!

    हिमगौरी कर्वे
    ©

  • लोकशाहीच्या नावाने चांगभलं…!!

    मतदान हा लोकशाहीचा उत्सव... चार दिवसांचा... त्या साठी आपले गावातील संबंध खराब करु नयेत, कर्ज काढून खर्च करू नये... हे सांगण्याचा प्रयत्न....

    `आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप'चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना


    गावोगावी वेशीवर
    लोकशाहीचा नगारा
    गल्लीच्या कुशीवर
    भाऊबंदकी नजारा...
    जातीपातीची वाटणी
    गोळाबेरीज मांडली
    गावएकीची चटणी
    सत्तेपायी वाटली...
    गोंधळ जागवला
    स्वार्थी कुरघोडीने
    अख्खा गाव नागवला
    रात्री अफाट खर्चाने...
    क्षणांचे राजकारण
    भिंती घातल्या मनात
    भाऊ भाऊ करीती रण
    कोण किती तें पाण्यात..
    बॅलेटचे मतदान
    बुलेटने ठरु लागलें
    गावोगावी अन्नदान
    मदिरापान झडू लागले...
    आली आली लोकशाही
    गाव नशेने झिंगला
    कुणा एका पाटलाने
    आपला मळा विकला...
    अमाप खर्च करून
    लोकप्रतिनिधी जिंकला
    विकासाच्या नावा वरुन
    बेल भंडारा उधळला...
    यासाठी का दिले भावा
    संविधान भिमाने...?
    मतदान घ्यावे भावा
    आप आपल्या सत्कर्माने...!!
    -- रघू देशपांडे
    नांदेड
  • पैलतीर

    आला आला आला आला
    आला पैलतीर ।
    चला चला चला आता
    गावु हरिनाम आले हरिद्वार ।। धृ ।।
    त्रिभुवनी केवळ एक सत्य
    एकची हरिनाम ।
    मनुजा मोहमाया मृगजळ सारे
    येथे नाही कुठे राम ।
    जीव हा चालता, बोलता
    झणी जाईल सोडुनी दूरदूर ।। १ ।।
    जीवनी सारे सुख दुणावे,
    दुःख ते उणावे ।
    जगता जगता सकला जगवुनी
    नित्य रामनाम घ्यावे ।
    नाम भजता भजता हरिनाम
    अंती भेटावा कृपाळू हरिहर ।। धृ ।।
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ७७.
    ११ - ३ - २०२२.
  • लाडकी चांदणी

  • चोरी कृष्णाने केली दंड हि कृष्णाला मिळाला

    न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. 'करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत'. जे घडले ते भगवंताच्या इच्छेने. शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु. मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या चोरीची शिक्षा भगवंताला मिळाली पाहिजे मला नाही.
    न्यायाधीश म्हणाले, पेंद्या मग बोलव तुझ्या कृष्णाला. विचार तुझ्या कृत्याची शिक्षा भोगायला तो तैयार आहे का? पेंद्या उतरला, साहेब मी चोरी केली नाही. भगवंताने केली आहे. भगवंत नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीला येतात, ते गजेंद्रच्या मदतीला आले होते, माझ्या मदतीला का नाही येणार. न्यायाधीश म्हणाले पेंद्या एक वेळ तू म्हणतो म्हणून मान्य करतो, पण कृष्णाला इथे बोलावणार कसे, तो तर स्वर्गात राहतो, तिथे समन पाठविता येत नाही.
    पेंद्या त्यावर म्हणाला, साहेब भगवंताच्या नावानी पुकारा करा बघ कसा धावत येईल आपल्या भक्ताच्या मदतीला. कोर्टाने भगवंताच्या नावानी पुकारा केला, भगवंत हाजीर हो. काय आश्चर्य, भगवंत साक्षात न्यायाधीश महोदया समोर उठे ठाकले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही भगवंत आहात, सर्वज्ञाती आहात. पेंद्या म्हणतो, चोरी तुम्ही केली, चोरीच्या गुन्ह्याची सजा हि तुम्हाला मिळाली पाहिजे. पेंद्याचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? भगवंत हसत म्हणाले, मला गुन्हा स्वीकार आहे. न्यायाधीश म्हणाले, चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा पाठीवर ५० कोडे मारण्याची आहे. नाईलाजाने मला ती शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल. भगवंत म्हणाले, मी निराकार अविनाशी आहे, माझे हे जे रूप तुम्ही बघत आहात, आभासी आहे. माझ्या,आभासी शरीरावर कुणी कोडे मारले तर तो कोडा माझ्या शरीरातून आरपार होऊन मारणार्यालाच लागण्याची शक्यता आहे. सत्य हेच मला कुठला हि दंड देणे शक्य नाही. न्यायधीश महोदय म्हणाले, कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी चोराला दंड देणे गरजेचे, अन्यथा राज्यात अराजकता माजेल. आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला दंड कसा देऊ. भगवंत हसत म्हणाले, मी सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या देहात माझे वास्तव्य आहे. जे भक्त मला आपले चांगले कर्मफळ मला समर्पित करतात. त्या चांगल्या कर्मांचे फळ मी भक्तांच्या देहाच्या माध्यमाने भोगतो. माझ्या इच्छेने पेंद्याने चोरी केली. चोरीचे कर्मफळ हि मला अर्पित केले. चोरीच्या कर्माचे फळ मी पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगणार आहे. तुम्ही पेंद्याच्या शरीराला कोडे मारण्याचे आदेश द्या, कोडे त्याला लागतील, कष्ट मला होईल. भगवंताचे म्हणणे ऐकताच हातवारे करत पेंद्या जोरात ओरडला, भगवंता हि तर चक्क फसवणूक आहे. तुला कर्मफळ अर्पित करण्याचा फायदा काय. पण भगवंत केंव्हाच अदृश्य झाले होते.
    न्यायाधीश महोदयाने शिक्षा सुनावली. भगवंतानी चोरीचा गुन्हा कबूल केला. ते हि शिक्षा पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगतील. पेंद्याला ५० कोडे मारले जावे.
    बेचारा पेंद्या त्याची चतुराई, काही कामी आली नाही. गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली.

  • परमार्थ व संसार आहेत एकच

    उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला
    भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला ।।१।।

    कथा किर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले
    माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले ।।२।।

    वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं
    फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं ।।३।।

    जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे
    प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे ।।४।।

    मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे
    कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे ।।५।।

    संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले
    कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले ।।६।।

    परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन
    प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण ।।७।।

    कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं
    तेंव्हा न येईल निराशा, कर्म करिता क्षणीं ।।८।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०