(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • जीवन मृत्यू खेळ

    सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं

    सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,

    भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,

    काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,

    अविरत चालू लपंडाव तो, जगण्या मरण्याचा

    शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,

    खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,

    खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • बालपणीची भांडणें

    मजेदार वाटत असती, भावंडांची बघून भांडणें
    'मला पाहीजे जास्त', हेच मुख्य मागणें

    इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार
    दांत ओठ खाऊनी, रागव्यक्त होणार

    क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें
    दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें

    राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं
    स्वार्थतेचा अभाव दिसे, शत्रु येथे नसे कुणी

    बालपणीच्या प्रेमामध्यें, थोडे भांडणें परवडते
    चव येण्या पदार्थाला, तिखटमिठ लागते

    लहान असतां भांडून घ्या, तेच वय भांडणाचे
    मोठे होऊन आठवाल, रम्य दिवस ते बालपणाचे


    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आंस मनांतरिची

    लोचनात, माझिया
    तुझी ती निरागसता
    डोळेच तुझे बोलती
    तुलाच आठविताना.

    तुझ्याच अस्तित्वाचे
    भास आज जगताना
    सर्वत्र तुझ्याच खुणा
    जोजविती स्पंदनांना.

    दुरत्वाचेच दुःख अंतरी
    समजाविते आसवांना
    अव्यक्त भाव निरागस
    स्वप्नी तुलाच पाहताना

    तू असावेस या जीवनी
    साराच जन्म भोगताना
    ही आंस मनांतरी होती
    पण काय झाले कळेना

    वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544906

    रचना क्र. १०२.

    ४ - ४ - २०२२.

  • मोहरली ही अवनी

    ग्रीष्माच्या काहिलीने
    आसमंत तप्त झाला
    अति उष्णतेने धारित्रीस
    कासावीस करून गेला ।। 1 ।।
    भेगाळलेल्या जमिनी आणि
    बंद पडलेली मोट
    नाही आला पाऊस
    तर कसं भरेल पोट? ।। 2 ।।
    प्रत्येक जण प्रतीक्षेत
    कधी येईल पाऊस
    डोळ्यांतून पाणी येईपर्यंत
    नको वाट बघायला लावूस ।। 3 ।।
    पाण्याविना तडफडत होते
    पशू, पक्षी, मानव
    मग तो प्रासाद असो, इमारत असो,
    शिवार असो वा अंगण ।। 4 ।।
    गोठ्यात, जंगलात, चारा छावणीत
    हंबरत होती गुरं ढोरं
    निढळावर हात ठेवून बळीराजा
    पावसाची करत होता आर्जवं ।। 5 ।।
    इंद्राला रिझवण्यासाठी मोर
    नाचत होते विसरून सारे भान
    कोकीळ, पावश्या हाकारत होते
    मेघांना, गाऊन सुंदर गान ।। 6 ।।
    इंद्रदेवापर्यंत पोहोचल्या
    लाखो मनांच्या आर्त हाका
    वरुण राजाला धाडलं त्यानं
    घेऊन ढगांच्या खूप साऱ्या लड्या।। 7 ।।
    वाऱ्याला सोबत घेवून ढगांचे पुंजके
    बागडू लागले आभाळभर
    कुठं दाट कुठं विरळ
    सैरावैरा धावाधाव माळरानावर ।। 8 ।।
    विद्युल्लता पण सामील झाली
    खेळायला पाठ शिवणीचा डाव
    मग त्यांच्याही आनंदाला
    राहिला नाही ठाव ।। 9 ।।
    ढगुल्यांचा आणि विजुडीचा
    खेळ आला रंगात
    डफ-मृदंगाची जुगलबंदी
    जमली जणू नभांगणात ।। 10 ।।
    तहानलेली धरित्री आणि
    तिची सारी लेकरं
    पाहु लागली आभाळाकडे
    विस्फारून त्यांची नेत्रं ।। 11 ।।
    ढग कुजबुजले एकमेकांशी
    हिरवे डोंगर अन् झाडे
    दिसतील आपल्याला जिथं जिथं
    बरसुया आपण फक्त तिथं तिथं ।। 12 ।।
    बाकीच्या ओसाड प्रदेशाचं काय?
    तिथंही चालू आहे आत्महत्यांचे सत्र
    पाण्याविना
    ते पण झालेत गलितगात्र ।। 13 ।।
    चूक तर माणसांचीच आहे
    वागावे लागेल सक्त
    झाडे तोडून त्यांनीच तर केले
    धरणीला या उजाड आणि रिक्त ।। 14 ।।
    आता पावसाची मागणी करण्याचा
    त्यांना राहिला नाही हक्क
    त्यांच्याच पापाची शिक्षा मिळणार त्यांना
    त्यासाठीच आहेत ते पात्र ।। 15 ।।
    ढग झुकले थोडे खाली
    झाले थोडे दक्ष
    झाडांसाठी मानवांनी खोदलेल्या
    खड्डयांकडे गेले त्यांचे लक्ष ।। 16 ।।
    गावोगावी गावकऱ्यांनी
    खोदले होते असंख्य चर
    स्वच्छ करून ठेवल्या होत्या
    कोरड्या विहिरी आणि हातपंप ।। 17 ।।
    दारोदारी वाढवली होती
    हजारो छोटी छोटी रोपं
    मोठे विलक्षण आणि
    आश्वासक होते ते दृश्य ।। 18 ।।
    लहानथोरांची चालली होती लगबग
    यावर्षी एकच होते सर्वांचे लक्ष्य
    केला होता त्यांनी संकल्प
    लावण्याचा कोटी कोटी वृक्ष ।। 19 ।।
    हे पाहून आनंदाने मग
    ढगांनी केली खूप दाटी
    विजुताईच्या हातावर दिली
    जोरदार टाळी ।। 20 ।।
    आसमंतात वाजू लागला नगारा
    सुटला भन्नाट वारा
    होवू लागला ढगांचा गडगडाट
    अन विजांचा लखलखाट ।। 21 ।।
    बरसू लागल्या मग मेघांच्या
    झिम्माड सरीवर सरी
    थेंबांच्या टिपऱ्या वाजू लागल्या अंगणी
    क्षणात पावसाने भिजली सारी धरित्री ।। 22 ।।
    पावसाचा होताच धुवांधार वर्षाव
    दरवळला तो मृदगंध आसमंतात
    ओढे, नाले, नद्या, चर
    आणि भरले सारे तलाव काठोकाठ ।। 23 ।।
    कळून आली मानवाला
    त्याची मोठ्ठी चूक
    झाडे लावा झाडे जगवा
    पाणी जिरवा, पाणी वाचवा
    मंत्र अंगिकारला अचुक ।। 24 ।।
    मोहरली ही अवनी
    मग आनंदाने पानोपानी
    सज्ज झाली नेसावयाला
    हिरवी पैठणी......हिरवी पैठणी......।। 25 ।।
    -- मी सदाफुली
    @ ✍️ संध्या प्रकाश बापट
  • देह – एक महान वस्ती

    सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक ।

    प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।।

    सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना ।

    शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।।

    अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे 'पुरूष' ।

    'पुरू' म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे 'ईश ।।

    अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी ।

    विधात्याची वास्तूकला, अप्रतीम अजोड ठरे खरी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • गृहनिर्माण संस्था आणि भांडवल उभारणी

    सहकारी संस्थांना आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. तर गृहनिर्माण संस्थां कशाप्रकारे भांडवल उभारणी करू शकतात हे आपण आज या लेखातून समजून घेणार आहोत.

  • ६ – गणरायाचा विलसे नृत्यविहार

    मृदंग घुमतो , घुंगुरनादीं वीणेचा झंकार

    नगराजावर गणरायाचा विलसे नृत्यविहार ।।

    खलनिर्मूलन विघ्ननिवारण पळभर ठेवुन मागे

    श्रीगणनायक बह्मांडाचा-पालक नाचूं लागे

    पदन्यासातुन युगभाग्या करि जागृत जगताधार ।।

    नाचतसे वक्रतुंड , नाचे अंग अंग त्याचें

    नाचतात पद, भुजा नाचती , विशाल तन नाचे

    नयनांमधुनी उल्हासाचा नर्तन-आविष्कार ।।

    सुपासारखे कान नाचती, पुष्ट नाचते सोंड

    ओठ नाचती, गाल नाचती, झुलत नाचते दोंद

    पीतांबर उत्तरीय गिरक्या घेती गोलाकार ।।

    शंख, दंत-क्षत, पाश, गदा, शर, परशू, अंकुश, शूल,

    बाहुबंध, मुद्रिका, गळ्यातिल नाचे फूल-न्-फूल

    कर्णभूषणें, मेखला नि रक्तिम-रत्नांचा हार ।।

    -

    वरदहस्त-स्थित लोंबीसह मोदक-पात्रें उदंड

    भाळीं गंध नि देहीं चंदन-उटी नाचती थंड

    मुगुट नाचतो माथीं, नाचे दाट केशसंभार ।।

    भान हरपुनी मग्न नर्तनीं सरस्वतीचा पती

    स्वत:स विसरुन नाचत गण, मूषक-वाहन संगती

    क्षणाक्षणाला करत अलंकृत नवनव नृत्यप्रकार ।।

    नाचत पानें, पुष्प, लता, तृण, तरू, नद्या, निर्झरऽ

    भू, सिंधू, पशु-पक्षि मत्स्य , रवि-शशि तारे अंबरऽ

    सप्तलोक-दशदिशातुनी ओंकार घेइ आकार ।।

    करतो नर्तन गिरिजानंदन सदाशिवाचा पुत्र

    पाहत राही जगत् अचंबित, थांबत दिवस नि रात्र

    दर्शन अनादि-अनंत यांचें हर्षद अपरंपार ।।

    अनुभव असा अलौकिक हा, अस्तित्वच होई झंकृत

    जागतसे शब्दांच्याही पलिकडला नाद-अनाहत

    नाचे जेव्हां ब्रह्म निर्गुणी, बनुन सगुण-साकार ।।

    - - -

    नगराज : हिमालय पर्वत

    -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • चादर कायेवर लपेटून धुक्याची

    (एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद)

    चादर कायेवर लपेटून,धुक्याची,
    पायवाटेची सैर करावी,
    थेंब स्पर्शती पायांना अनवाणी,
    जाणीवही ती सुखावह किती,--!!
    निळे-गहिरे स्वैर तरंग,
    हृदयाला जेव्हा छेदती,
    असेच आपुले गुपित एखादे,
    ते कसे उलगडती,--!
    केसांच्या बटांना स्पर्शून,
    झुळूक जाते एखादी,
    आपल्या प्रेमाची जाणीव,
    देऊन जाते ना कधी,--!!!
    दूरवर उभ्या झाडांवर,
    पक्षी कूजन करिती,
    हृदयाला ताजेतवाने,
    करुन सोडती अगदी,
    शिवाय मोसम हा असा,
    थंडी त्यात गुलाबी,
    यात काळीज हरवून,
    प्रेमपूजा करतो तसा,--!!!!
    ( गुलजार)

    हिमगौरी कर्वे©

  • ऋणानुबंध

    ठाऊक नव्हते कालपावतो

    नांव तुझे आणि गांवही

    क्षणांत जुळले अचानक परि

    नाते आपुले जीवनप्रवाही

  • पुनर्जन्म

    संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
    आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।

    फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
    त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।

    उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
    वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।

    कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
    वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।

    आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
    शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।

    भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
    बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।

    कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
    नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।

    ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
    पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०