लोचनातुनी ओघळता मौन तुझे
प्रीत अर्थवाही अश्रुतुनी पाझरते
तूं ही अशीच अबोली सुंदर मुग्धा
तुला शोधण्या ही नजर भिरभीरते
ग्रहगोलांच्या अवकाशी भास तुझे
संध्याछायेत तुझेच रूप ओसंडते
मनगवाक्षी कवडसेच तव प्रीतीचे
अंतरंग माझे भावस्पर्शी दरवळते
जन्मोजन्मीचे नाते ऋणानुबंधी
मनांतराला अलवार कुरवाळीते
अशीच सुंदर मौनी प्रीत लाघवी
या श्वासाला शांत जगवित रहाते
*********
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
(9766544908)
रचना क्र. 321
6/11/2022
December 17, 2022
गजल आहे की कविता आहे
गुंफलेल्या शब्दांची माळ आहे !!
राग आहे की ताल आहे
सूर शब्दांची धमाल आहे !!
देव आहे की भक्त आहे
आरोळीतला मृदंग टाळ आहे !!
मी आहे की तू आहे
डोक्यावर ठेवलेली झाल आहे !!
आवाज आहे की सुर आहे
एक गळ्यातला स्वर आहे !!
रक्ताची आहे की भावनांची आहे
जी आहे ती अस्सल आहे !!
-- विश्वनाथ शिरढोणकर
इंदूर, म.प्र
July 13, 2023
हे भूत संशयाचे छळते कसे मनाला ।
करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।।
एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे ।
डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।।
गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा ।
कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।।
येता मनी संशय आपलाच ज्या घडीला ।
शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 6, 2017
तूच माझा चंद्र,
अन् तूच चांदण्यांची संगत, तुझ्याशिवाय प्रीतीला रे,
येईल का पुन्हा रंगत,
रात्र आहे चमचमती,
हवेत सुटला गारवा ,---
तुझ्यावाचून फुलत नाही,
येथील रातराणीचा ताटवा,
रात्र असे देखणी,--
हर एक चांदणी भाळते,
निकट जाण्या चंद्राच्या,
त्यांच्यातच होड लागते,
इथे धरेवर मी,
तुझ्यासाठी तरसते,
तुझ्या नावाचा चंद्र ,
माझ्या भाळी रेखिते,
विरहार्त समुद्री,अशा
सदैव माझे बुडणे,
नेहमीचेच आहे तुझे,
किनारी शांत उभे ठाकणे,
तूंच आता वाचवणारा,
देशील का मज हात,
तेव्हाच थांबू शकेल,
नयनातील अखंड बरसात,--!!!
हिमगौरी कर्वे.©
February 15, 2019
घर -दार
ऑफिस- बिफीस
पोरं-सोरं
लोकल -बिकल
रीक्षा -बिक्षा
रोज दिवसभर
जा- ये
पुन्हा
तसंच
ये -जा
लोकल- बिकल
परत -फिरत
घर -बार
जेवण- खावण
जीवन -बिवन
चालत राहतं
वेळ कुठे
कविते-बिवितेसाठी?
ती तर
सतत--सोबत
पाठी- पाठी
मुखी -ओठी///
# कौशल
श्रीकांत पेटकर
९७६९२१३९१३
February 27, 2019
ये अदुबाळा ये लडिवाळा
माझ्या प्राजक्ताच्या फुला
आसुसतो मी, आतुरतो मी
तुझ्या गोड, बोबड्या बोला
लावतात लळा मला
तुझ्या लडिवाळ लीला
पाहून तुझा गोजिरवाणा चाळा
ओंजारण्या तुला, गोंजारण्या तुला
उचंबळून येतो जीवाचा जिव्हाळा
नाजूक साजूक मोहक क्षणांचा
या भरवावा आनंदमेळा
उधळावे आयुष्याचे संचित
त्यावरुन ओवाळून गोळा
- यतीन सामंत
September 6, 2022
आयुष्य हे रणांगणातून पळ काढायचं नसतं….
November 15, 2013
शब्दसागर! दान सरस्वतीचे
उमलते निष्पाप हृदयांतरात
आभाळ! सारे प्रीतभावनांचे
विरघळे, अलवार भावप्रीतीत
मनगर्भी! काहूर, संवेदनांचे
मी शोधतो, सुगंधा स्पंदनात
माळीता, हृद्य क्षणाक्षणांना
मंत्रमुग्ध! प्रीतभाव अंतरात
तव स्मरणी, भावस्पर्श रेशमी
गात्रागात्रातुनी, ओसंडते प्रीत
गगनी मी भुलावे अन तू लपावे
खेळ, आगळा चालला अविरत
तो मोगरा, गुलाब, बकुळ, चाफा
दरवळतो धुंद अजुनही अंतरात
भावप्रीतिच्याच, महाकाय लाटा
गुंफितो मी अलवार भावशब्दात
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४७.
१० - १२ - २०२१.
December 15, 2021
सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
तरणे वा बुडणे,
जगेल तो त्या क्षणी,
ज्याला माहित पोहणे ।।१।।
पोहणे जगणे कला असूनी,
अनुभव हा शिकवूनी जातो,
जागरुकतेने कसे जगता,
यशही त्याला तसेच देतो ।।२।।
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
कष्ट लागती महान,
परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
सारे देतो मिळवून ।।३।।
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
निसर्ग शिकवी क्षणोक्षणी,
सतर्कतेने वेचून घ्यावे,
दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।
बोल सारे अनुभवाचे,
त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
अर्थ सांगतो कुणीतरी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 23, 2021
बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.
कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?
उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.
एरवी बघताक्षणीच फस्त होणारे पिठलं भात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतय सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.
कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.
कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.
भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.
चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते... !!!
June 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti