(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तो

    त्याच्या चांगुलपणावर
    ती पूर्ण हरते,
    स्त्री कमी की पुरुष अधिक
    ह्याची व्याख्या तिला न कळते..

    तिच्या समजण्याच्या बाहेर
    त्याचा चांगुलपणा तिला कळतो,
    स्त्री पेक्षा पुरुष जास्त
    कणखर नक्कीच असतो..

    तिच्या पेक्षा तो
    जास्त सरस तिला जाणवतो,
    तिच्या अस्तित्वाच मूल्य तेव्हा
    तिला नकळत बोचतं..

    त्याच्या अव्यकतेत
    तिच्या चुका तिला कळतात,
    अबोल पणात त्याच्या
    तिच्या भावना कोमेजतात..

    ती स्त्री आणि तो पुरुष
    हाच मोठा फरक असतो,
    मन दोघांना असतं पण
    फरक दोघांच्या भावनेत असतो..

    त्याला समजतांना ती
    कमी नक्कीच पडते,
    कुठेच कमी नाही तो हीच
    का पुरुष असण्याची व्याख्या असते..

    अल्लड वागते ती
    तो समज दाखवतो,
    कळतं असते तिला ते
    पण तीच स्त्रीच मन असतं..

    निसर्गतः पुरुष कणखर
    नक्कीच असतो,
    तिला तो समजतो
    पण तीच मन कोमल असतं..

    स्त्री च्या नाजूक भावनेत
    तो जरा अलिप्त असतो,
    ती स्त्री आणि तो पुरुष
    हाच फरक तो असतो..

    स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण..
    दोघांच्यात शाररीक, भावनिक, मानसिक
    फरक असतो..
    दोघांना भावना आणि मन असतं,
    पण स्त्री च मन कोमल व्यक्त..
    तर पुरुषाच मन अव्यक्त काहीसं असतं..
    निसर्गतः बदल दोघांत असतो..
    त्याच्या पुरुष पणाच्या व्याख्येत तो
    बरोबर असतो..
    पुरुषांना पण तरल भावना जाणवतात..
    मनाच्या नाजूक तारा कळतात..
    मग ह्या कवितेत तिला म्हणजे स्त्रीला
    भावलेला, कळलेला पुरुष शब्दबद्ध केला आहे...

    © स्वाती ठोंबरे

  • वाह्यात रुबाईयात

    ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता
    क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां
    चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी
    कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ?

    फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको
    अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’
    ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें –
    ‘चालेल मज पेद्रू कुणीही, फक्त तूं मजला नको’ ।।

    मन तिचें वळवायला युक्ती अशी मी काढली
    रोज तिजला काव्यमय मी प्रेमपत्रें धाडली
    शेवटी फळलीच की गंधित गुलाबी शृंखला
    दूत वरला पोरिनें, जो पोचवी पत्रें तिला !

    होऊनिया आतूर मी गेलो तिला भेटायला
    तात्काळ दरवाजा तिनें लावून की हो घेतला
    लावला होता तिनें कां, टाळण्यांसाठी मला ?
    लावला होता तिनें, कवटाळण्यांसाठी मला !!

    जातांच मी, ती मजकडे आतूर होउन धावली
    लागलिच मजला मिठी सर्वांसमोरच मारली
    चुंबनें कांहीं भराभर वर्षवी ती मजवरी
    गोड मोठी तीन वर्षांची असे ती छोकरी !

    हात त्यानें लावला सर्वांपुढे अंगा तिच्या
    लागला सोडूं निर्‍या त्या सुंदरीच्या साडिच्या
    तो ज़रा ना लाजला, तीही मुळी ना लाजली
    स्टाफ तो शोरूममधला, ती “डमी” काचेतली ।।

    आंत ती जातांच, आतुर तिजकडे तो धावला
    लागलिच लगटुन, तिच्या पदरास झोंबूं लागला
    हर्षली तीही, तयाला थांबवी नच मुळिच ती
    पाळला-कुत्रा असे तो सुंदरीला प्रिय अती ।।

    दिसतसे कित्येक वेळां ती मला टीव्हीवरी
    प्रथम कुतुहल, ध्यास नंतर लागला मज अंतरीं
    राहवेना, पोचलो स्टुडिओमधे मी टीव्हीच्या
    समजलें, टीव्हीतली माशी असे अगदी खरी !

    शांत रात्रीं सुंदरी ती दिसतसे कधिकधि मला
    धाडसानें एकदा मी ‘जवळ ये’ म्हटलें तिला
    हांसली, आली पुढे, मी रूप जवळुन पाहिलें
    घाम फुटला दरदरुन मज, बघुन उलटी पावलें ।।

    - सुभाष स. नाईक

  • मन हिंदोळा

    आली भाऊबीज आली गं...
    दिवाळी सरत आली गं
    माहेरा जायची घाई गं
    कशी मी आवरू बाई गं
    उंबऱ्यात येरझारा गं
    भाऊ येई बोलावाया गं
    नवीच मी इथे आले गं
    सोडून कसं तिथ राहू गं
    हुरहूर जिवा लागे गं
    ओढ मायेची ओढे गं
    माझ्याविना ही तुळशी गं
    पोरकी होऊन सुकेल गं
    तिथून इथे आले गं
    इथली सावली झाले गं
    पाय जड हा झाला गं
    संसार नाही सुटे गं !!
    -- वर्षा कदम.
  • राधा – कृष्ण – सोल मेट्स

    काळजांचे गुंफीत धागे, प्रीत आपुली जडे,
    कृष्णावर राधा भाळे,
    गोकुळास किती वावडे,--!!!

    सोडून मी आले ,
    सारे घरदार अन् बाळे,
    सोडला संसार सारा,
    प्रेम केले रांगडे,--!!!

    कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत,
    तन मन माझे अनावृत्त,
    अनयाला ही जणू सोडले,
    हरीशी जेव्हा झाले अद्वैत,--!!!

    मन, काळीज, अंतर, हृदय,
    सारे काही त्यास दिले,
    आता, नाही काही उरले,
    आत्म्याने आत्म्यास वरले,--!!

    *तन का म्हणू ,ही तर वस्त्रे,
    शृंगारात भिडती शरीरे,
    प्रणय-लीलांचे खेळ सारे ,
    भासती जगास सारे*,--!!!

    परमात्माच हृदयात नांदे,
    मुरलीधराचे गारुड हे,
    परमात्म्याची पत्नी असे,
    जी माझ्या आत्मी वसे,--!!;

    लग्न माझे आहे लागले,
    संसारात नाही अडकणे, अलौकिकाचे हे खेळ सारे,--
    संसार मोहपाशांचे खेळणे ,--!!

    एकात्मतेची ओढ वेगळी,
    कृष्ण राधेची दुनिया आगळी,
    प्रणय - शृंगारातही नसते,
    कधी कुठे बळ वासनेचे,--!!!

    © हिमगौरी कर्वे

  • अशी कविता येते

    कृष्णासम ही नटखट अवखळ..
    लाघवी कवीता हळूच पाऊली येते..
    मयुरपिसी मखमली मृदुल करांनी..
    अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ..।।१।।

    कदंब तरुच्या साऊलीत या
    साक्षात बीज प्रतिभेचे फूलते...
    शब्दफुलांच्या , वटवृक्षावर
    भावगंधले गीत कोकिळा गाते...।।२।।

    कालिंदीच्या ! डोहातूनी त्या
    लय , ताल सप्तसुरांची येते...
    राधे ! बघ सामोरी कृष्णमुरारी
    धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते...।।३।।

    शब्दशब्द मनी भाव उमलता
    वास्तव ! हॄदयातूनी ओघळते
    रसिक मनांच्या गाभाऱ्यातुनी
    सोज्वळतेचे रूप ! गंधाळूनी जाते...।।४।।

    © वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना :- क्र..३९

    दिनांक :- १४-३-२०२१.

  • निसर्गाचे मार्ग

    आखून देतो निसर्ग सदा,
    मार्ग जीवनाचे ।
    त्या वाटेवरी चालत रहा,
    आवाहन त्याचे ।।१।।

    चालत राहती जे जे कुणी,
    त्यावरी विसंबूनी ।
    यशस्वी होती तेच जीवनी,
    समाधान लाभूनी ।।२।।

    कर्ता समजूनी काही काही,
    अहंकारी होती ।
    सुख- दु:खाच्या चक्रामध्ये,
    तेच सापडती ।।३।।

    भटकत जाती भिन्न मार्ग,
    काही कळापरि ।
    परिस्थितीचे चटके बसता,
    येती वाटेवरी ।।४।।

    हिशोबातील तफावत ही,
    दु:खाचे कारण ।
    नजीक जाता आखल्या मार्गी,
    सुखी होई जीवन ।।५।।


    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आधार

    वेलींना तो आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि
    बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी

    नष्ट करिल तो तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता
    सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता

    वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या तो आधार पोकळ
    स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अवमूल्यन

    उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
    क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,

    धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
    दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,

    धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
    कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,

    अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
    अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • निरोगी देही नामस्मरण

    निरोगी असतां तुम्ही,
    नामस्मरण करा प्रभूचे,
    ठेवू नका उद्या करीता,
    महत्व जाणा वेळेचे ।।१।।

    शरिराच्या नसता व्याधी,
    राहू शकता आनंदी,
    आनंदातच होऊ शकते,
    चित्त एकाग्र ते ।।२।।

    व्याधीने जरजर होता ,
    चित्त होई अस्थीर,
    स्थिरतेतत दडला ईश्वर,
    जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अटळ सत्य

    लाभले , भोगले सारेच वैभव..
    उगाच कशाला हव्यास आता..
    येता जाता , बंद रिकाम्या मुठी..
    दृष्टांत हा जगी जगता जगता..।।..१

    जीवन , खेळ कठपुतळीचा..
    नाचवितो सर्वां तो अनामिक..
    दोर सारेच फक्त त्याच्या हाती..
    स्मरावे , त्याला जगता जगता..।।..२

    जन्मा सोबती सावलीच मृत्यू..
    अंती , हेच अटळ सत्य सृष्टीचे..
    जगी येणे मोकळे जाणे मोकळे..
    आसक्ती , जीवा कशाला आता..।।..३

    क्षणक्षण आनंदाने झेलीत जावे..
    सद्विवेकाचे , भान अंतरी जपुनी..
    मना मनाला नित्य सांधित जावे..
    प्रीतभावनांना उधळता उधळता..।।..४

    लडिवाळ वेल्हाळ हास्य लाघवी..
    स्पर्श रेशमी अलवार कुरवळणारे..
    दाहक , दुःख वेदनांना शमविणारे..
    लाभावे या जगती जगता जगता..।।..५

    ©️वि.ग.सातपुते ( भावकवी)
    ? *9766544908*

    रचना क्र. ७४ / १० - ६ - २०२१