योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एका हिंदी कवितेचा अनुवाद,थोडे काही शब्द घालून माझे,--!!!
सोडून आले आहे मी सगळे,
आपल्यात घडलेले सारे,
माझे तुझे सारे किस्से,
खरंच मी सोडून आले,
रडले डोळे माझे,
अगदी हमसाहमशी,
तुझ्याच फक्त घरापाशी,
सोडून आले सगळे,
रुसणं, रागावणं, मनवणं
मुद्दाम जिद्दीने भेटणं,
अशा कित्येक स्मृती,
सोडून आले तुझ्या दाराशी,-!!!
एकत्र घालवलेले रम्य क्षण, डोळ्यात साठवलेले,
अशा सगळ्या रात्री,
सोडल्या तुझ्या दाराशी, --!!!!
अगदी अगदी बेवारशी,
जिथे सुखाचे आभाळ,
येऊन सामावत होते,
तिथे त्याला पेलणारे ,
हातच मी सोडून आले,
तुझ्या दाराशी बेवांरशी,---!!!!
त्यात काही विजाही,
येऊन भेटायच्या मला,
त्यावेळी होणारी सुखाची बरसात, सोडून आले मी तुझ्या दाराशी,--!!
मिलनाच्या वाटेवरच,
विरहाचे होते चटके,
एका अनामिक भितीने,
आसुसलेपण त्या प्रेमातले,
सोडून आले तुझ्या दाराशी,--!!!
तुझ्या दाराशी,---!!!!!
हिमगौरी कर्वे.©
सूर्य चालला अस्ताला
सगळं चैतन्य बरोबर घेऊन
प्रकाशही बरोबर घेऊन
माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ?
मनापासून शोक सारी माणसं करत असतील का?
असंच सगळ चैतन्य प्रकाश
बरोबर घेऊन तो जातो
पण केवळ आठवणीत मागे उरतो
मागे उरतो.
सौ. झेलम संजय टिपणीस
अलिबाग
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!
इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!
मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"
काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !
तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!
साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!
उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!
भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
- मंगेश पाडगांवकर मराठी कविता
संवाद सारा हरवला आता
कुणा कुणासाठी वेळ नाही
धडपड फक्त जगण्यासाठी
जीवाला कुठेच शांती नाही...
जन्मदात्यांचे स्पर्श बोलके
ते सुख कधी विसरलो नाही
रुजले बीजांकुर संस्कारांचे
विद्रोह मनास शिवला नाही.
आज संवेदनाच निर्जीवी
सहृदयता, उरलीच नाही
अतृप्त, हे श्वास अशाश्वत
दुजे वास्तव जगती नाही.
कालचक्र गतिमान अविरत
कुठे थांबावे कळतच नाही
जगव्यवहार स्वार्थात गुंतले
आपुलेपण ते उरलेही नाही.
रचना क्र. ६८-८-७-२०२३
- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
व्यवहार जगती चाले
सारे बोनसाय जाहले
रक्ताचे नाते ओलसर
आज पार गोठुनी गेले
अंतरीचे वात्सल्यप्रेमही
आज पहा निष्ठुर जाहले
प्रेमाचे घरकुलही मोठे
घर छोटे कौलारू जाहले
देव्हाऱ्यातील देवही सारे
घरोघरी, विभक्त जाहले
अंगणीचे झाड़ नारळाचे
आज पहा कुंडित लागले
प्रीतभाव ते महासागरी
छोट्या जलाशयी गुंतले
नाही कधीच बदलली धरा
ऋतुचक्र अजुनही चालले
नाही बदलली जलधारा
तिथेच तृप्तती तहानलेले
वृक्षही देती नित्य साऊली
तिथेच विसावती श्रमलेले
अंतर्मुख हो रे महामानवा
पंचभूतही, नाही बदलले
सत्यार्थ एकची जीवनाचा
येता,जाता रे हात मोकळे
कुठली प्रीती कुठली भक्ती
मन भौतिक सुखात गुंतलेले
नाती इथली सारी व्यवहारी
बीजांकुर बोनसायी रुजलेले
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १७०
१७ - ७ - २०२२
दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची
मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची...१,
शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला
आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला...२,
शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता
अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti