(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फॅशन

    प्रेम करुन लग्न करणं

    आज जुनं झालंय

    लग्नापूर्वी पोर काढणं

    आज फॅशन झालंय

    झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं

    आज जुनं झालंय

    कपडयासाठी अंग उघडं ठेवणं

    आज फॅशन झालंय

    बापापुढं पोरानं नम्र राहणं

    आज जुनं झालंय

    पोरासंगे बापानं बिअर पिणं

    आज फॅशन झालंय

    पोरीसंगे आईनं देवळात जाणं

    आज जुनं झालंय

    आईसंग पोरीनं डिस्कोत जाणं

    आज फॅशन झालंय

    आई बाबा आजी आजोबा

    आज जुनं झालंय

    मॉम डॅड ग्रॅंडफा ग्रँडफा ग्रॅंडमॉ

    आज फॅशन झालंय

    डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं

    आज जुनं झालंय

    कंबरेच सोडून डोक्याला बांधणं

    आज फॅशन झालंय

    जपण्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं

    आज जुनं झालंय

    विरोधात संस्कृतीच्या बबाल करणं

    आज फॅशन झालंय

    © कवी – निलेश बामणे ( एन.डी. )

  • का रमाकृष्ण ना कोणी वदले ?

    का रमाकृष्ण ना कोणी वदले?.....

    राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले
    हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले .....

    ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले
    रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले ....

    तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले
    मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी वाट पाहुनी थकले .....

    तुझी संपूर्ण मी होऊनही, अपूर्ण काहीसे राहीले
    संगम मनाने केला मनाशी, तरी मनोरमा नाही बनले ....

    स्वर गुणगुणनारी ती, बासरी एकदाच तिच्याशी हसले
    जे तुला कधी न कळले, ते सारेच तिने जाणिले ....

    हरि बनुनी येउनी जा, एकदा रमेचे होऊनी जा
    जाता जाता वृंदावनात, रमाला राधा बनवूनी जा ....

    -- स्वाती पवार

  • दुर्बल मन नको

    सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति
    वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती ।।१।।

    विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली
    समजोनी जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।

    मनाची सबलता हेच शक्तीचे मापन
    काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।

    सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी
    जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • लावण्यखणी भूलोकीची!

    लावण्यखणी ती भूलोकीची
    निसर्गसखी कोकण दुहिता
    रंगबावरी लाजलाजरी
    इहलोकीची सुंदर कविता!

    नागमोडी कितीक वळणे
    खट्याळतेने वाट अडविती
    पायघड्या अन् घाली सुंदर
    लाल देखणी कोकणमाती

    डोंगर माथ्यावरून खाली
    अल्लड झरे झेपावत येती
    पदन्यास ऐकून तयांचा
    वेडी होते कोकण धरती!

    समुद्र वैभव कोकणातले
    भुरळ घाली मना-मनाला
    पहाटवेळी शांत किनारा
    देई विसावा जिवाशिवाला!

    बहर हिरवा झाडे हिरवी
    पाचूचे हिरवे अंगण
    देवाजीने दिला कोकणा
    असीम अद्भुत निसर्ग आंदण!

    - गौरी कुलकर्णी, मुंबई

  • वर्षा स्नान

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • रामाची व्याकूळता

    सीतेकरीता व्याकुळ झाला

    अवतारी चक्रपाणी,

    अजब ही रामप्रभू कहाणी ।।धृ।।

    पत्नीहट्ट त्याला सांगे,

    कांचनमृग शोभेल अंगे,

    मृगयेच्या तो गेला मागे

    प्रसंग घेई रावण साधूनी ।।१।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    रावण नेई पळवूनी सीता

    दिसेना रामा कोठे आता

    तरुवेलींना पुसत होता

    वाहत होते अश्रू नयनीं ।।२।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    वाणी ज्याच्या शक्ती शिवाची

    ह्रदयामाजी दया सागराची

    त्यालाही दिसे नियती खेची

    सामान्यतेच्या मापी तोलूनी ।।३।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • मूलमंत्र सुखाचा

    निरपेक्ष, निस्वार्थी जीवन
    मुलमंत्र परमानंदी सुखाचा

    जे घडते, ती प्रभुची ईच्छा
    करू नये, संताप जीवाचा

    स्वेच्छेने, जगु द्यावे सकला
    जगणे अधिकार प्रत्येकाचा

    अटकाव, बंधनांचा नसावा
    हाच विवेकी मार्ग शांततेचा

    मन:शांती! केवळ तडजोड
    नसावा संघर्ष वादविवादाचा

    सूत्र, मौनं सर्वार्थ साधनम
    मुलमंत्र! हाची धागा सुखाचा

    सर्वांशी सदा सुखानंदी रहावे
    मनी रुजावा मुलमंत्र सुखाचा

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ४७.

    १४ - २ - २०२२.

  • मिटलेलं पान

    तुटलेल्या नात्यांचे
    जरतारी पदर
    त्या ना मायेची उब
    प्रेमाची कदर
    गाठीगाठीत फक्त
    बोचरे आठव
    कशास मिरवायचे?
    भरजरी पाटव !……… १

    तो पाठीवर हात अन
    डोळ्यात पाणी
    ते तुडुंबलेलं मन
    श्वासात गाणी
    क्षणाक्षणाने दिलं
    जीवनाचं दान
    उघडेल का कोणी ते?
    मिटलेलं पान !………… २

    .....मी मानसी

  • चुकीचे तर्क

    मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता
    विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१,

    तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते
    वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२,

    वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला
    त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३,

    बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले
    मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जीवन ध्येय

    प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी
    कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा १

    जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो
    विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी २

    मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन
    अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे ३

    कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक
    त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची ४

    सत्य परिस्थिती ऐसी, कुणी न जाणले प्रभूसी
    सर्वांची चालना तर्कासी, प्रभूच्या अस्तित्वाविषयी ५

    फक्त एकमुखी वाच्यता, असे ती सर्वता
    महान शक्ती असता, ह्या ब्रह्मांडामध्ये ६

    सर्वांनी जाणले एक, ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक
    त्याच ऊर्जेचे हे प्रतीक, सारे विश्वमंडळ ७

    कुणा नाही दुजा भाव, समजोनी त्या शक्तीची ठेव
    ज्ञानी देती नाव, निरनिराळी त्या शक्तीसी ८

    कुणी म्हणती राम, कुणी म्हणे रहीम
    कुणी संबोधती गौतम, येशू असे कुणाचा ९

    परी तत्व नसे वेगळे, नावे होत निरनिराळे
    सामान्यास ते न कळे, हीच खरी शोकांतिका १०

    सारे जीवन निघून जाई, परी त्या शक्तीचा बोध न होई
    विश्लेषण करीत राही, त्याच्या अस्तित्वाविषयी ११

    जाणावी ती शक्ती, रूप आकार त्यास नसती
    शक्ति समजोनी करावी भक्ती, आदर भाव ठेवून १२

    मानवजन्म श्रेष्ठ ठरविला, विशेष बुद्धी मिळून त्याला
    विचार शक्ती उपजण्याला, मानवामध्ये १३

    बहूत झाले विद्वान, कर्तव्य करूनी मिळवी मान
    मानव जातीची ती शान, ह्या संसारी १४

    मार्ग निरनिराळे दाखवी, सारे मिळती एक ध्येयी
    सर्वार्पण त्या शक्ती होई, ध्येय मिळतां जीवनाचे १५

    विचार करा मनाशी, आपले वैर आपणाशी
    नसते केव्हां प्रभूशी, हेच मूळ दु:खाचे १६

    वाद नसतो ध्येयापरी, चर्चा असे मार्गापरी
    हीच मानव निर्मिती खरी, सर्व सुख दु:खाची १७

    तथा कथित पंडित, सामान्यांत विद्वान होत
    ज्ञान त्यांचे थोडेसे जास्त, बहुजनां पेक्षा १८

    वापरूनी ज्ञान शक्ती, सामान्य जनांस वाकविती
    आपले अस्तित्व स्थापती, प्रभू शक्तीशी विसरून १९

    तर्क शक्ती थोर, आहे चा नाही करणार
    नाही ना आहे म्हणणार, ज्ञानाचा खेळ करूनी २०

    मार्गाचे करूनी भेद, करीत राही वाद
    जीवन करी बरबाद, विसरूनी ध्येयासी २१

    ध्येय असे महान, मार्ग हे साधन
    साधनास साध्य समजोन वाया जाई आयुष्य २२

    साध्य नका समजू साधनासी, ठेवा विश्वास साध्यासी
    कोणत्याही साधनाने जातासी, साधका प्राप्त होई ध्येय साध्य २३

    निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन, ज्ञान शक्ती वापरून
    स्वअस्तीत्व ठेवण्या टिकवून, केले असे २४

    अस्तित्वाची भावना मोठी, प्रत्येक झगडतो त्यासाठी
    आयुष्य खर्ची त्या पोटी, सकळ ज्ञान २५

    न कळे त्यास देवपण, भांडण्यास जाई विसरून
    आयुष्य मातीमोल, करून टाकीत असे २६

    विसरूनी जा सर्व भेद, मिटवून टाका वादविवाद
    लहान मोठ्याचा संवाद, नष्ट करा त्वरीत २७

    सारेच आहेत छोटे, कुणी नसती मोठे
    हे केवळ आपपासातील तंटे, मानवनिर्मित असती २८

    जात धर्म होत अनेक, हे मानव निर्मित प्रतिक
    सर्व मार्गाचे ध्येय एक, न कळे अज्ञानामुळे २९

    म्हणून जाणावा ईश, सार्थकी लावा आयुष्य
    जात धर्माचे पाश, सोडून घ्यावे ३०

    महान शक्ती तीच ईश्वर, दुसरा नसे कोणी वर
    आपणच देतो त्यासी आकार, सगुण रुप देवूनी ३१

    मानवता हाच धर्म खरा, आपसातील भेद विसरा
    प्रभू देई तयाना आसरा, जीवन सुखी करण्या ३२

    दुसऱ्याची दु:खे जाणा, त्यांच्या सुखात आनंद माना
    प्रभू अंश त्यासी म्हणा, हीच जीवनाची गुरू किल्ली ३३

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com