१ - राजहंस
बाकावर एकटा तो
मागे गरीब बसतो
तरी राजहंस आहे
श्रेष्ठ बुद्धीत असतो
२ - शहामृग
आहे पंख भव्य दिव्य
नाही उडताच येत
देती दिलासा हे पाय
धावण्यास बळ देत
३ - गिधाड
तोंड वेंगाडती सारे
नाव ऐकताच माझे
स्वच्छ ठेवी परिसर
अरे मित्र आम्ही तुझे
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
जगण्याचं गाणं करणारी जगावसं वाटायला लावणारी नाती आपल्याकडे साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी हक्काचा कोणीतरी आहे असा खोल दिलासा देणारी नाती आई, मुलगी, सासू-सून, नणंद भावजय, बहिणी बहिणी आजी नात, अशीही भावभावनांचे अनेक पदर रचणारी नाती रक्ताच्या नात्यांबरोबरच आयुष्यभर पुरतील अशी ही नाती भेटतात.
आयुष्याच्या मध्यान्ही, संध्याछाया झाकोळण्याआधी
कधी वाटतं थांबावं, बसावं घडीभर निवांत
आठवणींच्या रेशीमघड्या पसराव्या अलगद उलगडत
सावलीला आठवणींचा पदर नि घ्यावी क्षणभर उसंत
वळवावी नजर दूर मागे, मनाला रग लागेपर्यंत
शिरावं मनाच्या पडवीतून भूतकाळाच्या माजघरात
उघडावी कवाडं सारी, आजीबाईंच्या कपाटागत
धुंडाळावे भ्रमिष्टागत ते सारे क्षण, काने-कोपरे
जगाव्या, हुंगाव्या गतस्मृती, होऊन जिवंत क्षण सारे
धुडकावून वर्तमानाचे सारे सावध पोलादी पहारे
त्या लहानमोठ्या आठवणींनी उठवावे अंगभर शहारे
अनुभवावा तो जुनाट श्वास मिटल्या पापण्यांमधूनी
उष्ण निश्वासासंगतीने पाघळावी स्निग्धता डोळ्यांकडांनी
जगता न येतो भूतकाळ, क्षण होतात हे निसरडे
आकंठ डोहात डुंबूनही, रहातो आपण कोरडे कोरडे
चुटपुटतो जीव धापा टाकत उसासतो वेड्यागत
उगा मन रहातं हिंदकळत दगड टाकल्या पाण्यागत
तो ओढाळ-ओढाळ वास अजूनही येतो
दाटून येतात कढ, श्वास घुसमटून जातो
मन होतं वेडंपिसं सांडलेले क्षण वेचता वेचता
लगबगतो जीव पाठी फिरता-फिरता
तेवढ्यातही फुटतात कोंब, मनाच्या गाभ्याला
क्षणिक का असो, उमलतेही पालवी मनाला
आठवणींच्या काळोख्या कप्प्याकप्प्याला आहे काचेचे दार
अंधुकसे दिसतात चेहरे सारे पण होता नाही येत पार
जाणवतात बंद दाराआडचे निश्वास नि दूरवर खोल हुंकार
घुमतात परिचित आभास नि परावर्तित होणारी गाज
दूर पहाता दिसतात लुकलुकताना माणुसकीचे दिवे
काळोखाचा होतो निचरा, प्रकटतात आठवणींचे थवे
धुसर चेहेऱ्याच्या बऱ्याच आठवणी करतात एकदम गलका
आतुरतेने, आकांताने देतात दारावर वारंवार धडका
दिसते रांगणारी गोंडसता ते दुडदुडणारी दांगटगर्दी
मस्तीखोर बेशिस्तीपासून ते शिस्तपूर्ण कवायती
दाराआडून डोकावतो मग गोबरा एक चेहेरा
सवय लागेस्तोवर शाळेचा कंटाळा करणारा
आईचा सोडताना पदर, डोळे भरुन येणारा
उगा कौतुकाला आसुसलेला हळवा निरागसपणा
झरझरतो काळ जलद चलचित्रागत डोळ्यांसमोर
जाणवतो हात तुमचा आयुष्यचित्राच्या रेखेरेखेवर
धाकाच्या धपाट्यापासून ते जिवाच्या जिव्हाळ्यापर्यंत
पाठी लागलेल्या शिस्तीपासून पाठ राखणाऱ्या आश्वस्त मिठीपर्यंत
जगण्याच्या सुरवातीपासून ते जग जिंकायच्या इर्षेपर्यंत
काळजातल्या ओलाव्यापासून नजरेतल्या निखाऱ्यापर्यंत
लोखंडाच्या परीसस्पर्शाच्या ध्येयप्रक्रियेच्या पूर्ततेपर्यंत
जागतात आठवणी, बापुडा जीव आसुसतो क्षणाक्षणाला
आपुलकीच्या ओढाळपणाला, मायेच्या वर्षावाला
आभाळाच्या छायेला नि सांभाळणाऱ्या सावलीला
चांदोमामाच्या सोबतीने, तिन्हीसांजेच्या दीपज्योतीला
आयुष्याच्या प्रगतीला होती जिद्द तुमच्या ध्येयाची
वळून पहावं जेव्हा, पाठराखण तुमच्या सावलीची
स्वप्नांना घेऊन उशाशी, आम्ही घरटी आभाळात केली
भावनेची गुंतवणूक तुमची, क्षितीजे आमची विस्तारित गेली
साठाव्या आठवणी, या आठवाव्या साठवणी
कराव्या हळूवार गोळा, नयनांच्या रांजणी
बनवावी दोन ओतीव, गाळीव त्यांची टिपं
असावी जी दाट, नात्याहूनही नीट
यावी त्यांना गूढ, सागराची अथांगता
ध्रुवाहूनही अढळ मिळावी चिरंतनता
रहावी तेवत ती शिल्पं कृतकृत्य
बनून दीपस्तंभ दोन्ही डोळ्यांत
- यतीन सामंत
स्वातंत्र्यदिनी मातृभूचे आक्रंदन
घामेजले शरीर, भडका दिशांत झाला
दूषित भूमी झाली, वारा विषारी झाला
तोडुनी वृक्षराई, डोंगर उजाड केला
निसर्ग कोपूनिया दुष्काळ माथी आला
स्वातंत्र्यतेज आमुचे, सारे दूषित झाले
आम्हीच हे स्वहस्ते, ऐसे अघोर केले
ऐशा कुकर्मी आज,जनताच त्रस्त सारी
स्वातंत्र्य हे कशाचे? ना संपली गुलामी
सारे विषारी अन्न,भाजीत विष मिळते
पाणी नदीतले ही, सारे अशुद्ध झाले
ही स्वैरता अघोरी, कैसा विकास झाला
स्वातंत्र्य भोगताना, हा सर्व घात झाला
संस्कारहीनतेसी, येथे मिळे प्रतिष्ठा
ढोंगीच तज्ञ बनती, तज्ञां मिळे उपेक्षा
सेंद्रिय नासवोनी, करतात रोज हत्या
ही लादली गुलामी,कैसी स्वतंत्र जनता
ही आजची अवस्था नाही उगाच झाली
सात्विक वारशाची आम्हीच हानी केली
स्वातंत्र्य गर्जताना, स्वार्थां जतन केले
आम्हीच मातृभूला, ऐसे उजाड केले
स्वैराचारी जमते जनता
एकच त्यांचा असतो गलका
मोफत सारे द्या द्या म्हणती
धोंडे मारत दंगे करती
कर्जे घेऊनी फेड न करती
स्वैराचारे व्यसने करती
राष्ट्रहिताचा विचार सोडूनी
संविधान हे सहजी मोडिती
जनसेवेची करूनी चेष्टा
उपभोगिती जे सदैव सत्ता
निवृत्तीचे वेतन घेती
पुन्हा पुन्हा जरी निवडून येती
या स्वैरतेस आज देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
तोंडात एक भाषा, पोटात देशद्रोह
राष्ट्रास तोडणारे , ऐसे अभद्र भाव
निसर्ग आणि भूमी,केली उजाड ऐशा
ढोंगीजनांस आता, देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
रचनाकार : देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने.
मोबाईल : ९८८१३७३५८५
श्री हनुमान जन्मकथा वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना १ रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी २ शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा ३ शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे ४ हनुमंताची जन्मकथा आनंद होई सांगता चितीं समाधान देता तुमच्या ठायीं ५ अंजनी एक वानरी भक्ती तिची शिवावरी रात्रंदिनी भजन करी सदाशिवाचे ६ प्रभू भक्तीचा भूकेला पावन होई भक्ताला लक्ष देई शंकेला भक्तांच्या ७ भक्तीचा महिमा थोर सर्वांसी उघडे द्वार असेल नर अथवा वानर कुणासही पावत असे ८ अंजनीची पाहून भक्ति शिव प्रसन्न होती आशिर्वाद तिजला देती विश्वनाथे ९ अंजनी होती वानरी इच्छा ती करी तुम्ही यावे उदरीं लाभावा प्रभू सहवास १०
अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती
तयांना मृत्यूची वाटे भीति....।।धृ।।
गरिबीत जगती कित्येक,
भ्रांत पाडे ती भाकरी एक
जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति....१,
आरोग्याला धक्का बसतां
शरिर जर्जर होवूनी जातां
देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति....२,
समाज रचना बघा कशी,
लौकिक जाई तो राही उपाशी
कुणी न दाखवी सहानुभूती, तयांना मृत्यूची वाटे भीति...३,
प्रवास करिता वाहनातूनी
अपघात शंका येई मनी
अवलंबून जे दुजावरती, तयांना मृत्यूची वाटे भीती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
धावपळीचे जीवन सारे,
मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता,
दिसून येतो त्यातील अंत ।।१।।
चैतन्यमयी जीवन असूनी,
चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील,
मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।
थांबत नसते कधीही जीवन,
अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चीर निद्रा,
विश्रांती ही भास मनीचा ।।३।।
थकून जाई शरिर जेंव्हां,
प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,
घेई आसरा पुन्हा दुजाचा ।।४।।
आत्मा देखील थकून जाता,
परमात्म्याशी विलीन इच्छितो
चैतन्यातूनी विश्रांतीचा
‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नाती- गोती कसली,?करती कशी रक्तबंबाळ,
जीव'च नाही, आत्माही,
होती सारेच घायाळ,--!!!
कुठले मित्र,कसले सखे,
कशाशी खातात मित्रत्व,
स्वार्थ भांडणे वाद ,---
एवढीच जगण्याची तत्वं,--!!!
कसली नीती कशाची मत्ता,
एक दुसऱ्याचा गिरवी कित्ता, खरेपणाची बूंजच नसता, असत्याचीच इथे सर्व सत्ता,--!!!
माझी पोळी, तुझेच तूप,
नव्हे, तुझी पोळी तुझेच तूप,
झाले माझेच ते,तू कितीही खप,
तू खोटा, बाप खोटा,जरा जप,--!!
कोणता भाऊ कोण बहीण-?
कोण भार्या,कोण विहीण,
नणंद, जावा, भावजया,
हरेक भासे विषारी नागीण,--!!!
कसले घर अन् कसले घरपण,
परस्परांवर तुटून पडती,
विसरुन आपुले पुरते बालपण,
विसरुन सगळी नाती,--!!!
आखाडाच तो घर कसले,
करुन टाकती त्याचे रणांगण,
पैसा जोडी, पैसा तोडी,
सत्तालोलूप मानव खोडी,
कामना, लालसा, ईर्ष्या
घालती माणुसकीला बेडी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
वा झुरळा,
खबरदार जर पंख फुलवोनी जाशील पुढे,
मुडदा पाडीन तुझा गधड्या
हा मी मर्द मराठ्याचा वंशज असे
म्यान न करातले का तुला हे दिसे
दचकलो पाहून तुला मी न कीटका
मारुनच तुला मी टाकीन उसासे ॥
क्षुद्रा जरी चावला होतास मला,
तरी शूर वीर मी न तुला चावलो
धर्मयुद्ध खेळीन शर्थीचे मी
हा पहा तलवार आणण्या चाललो ॥
असेल रंग तुझ्यासारखा तिचा
पण गंजली म्हणून म्हणू नको
भ्यायलो तुला मी, समजून
विकट असा हासू नको ॥
-यतीन सामंत
देहमनाचा आनंद औरची, नसे तयाला दुजी कल्पना ।
जीवनामधले मिळता सारे, उरे न तेथे कसली तुलना ।।
आनंदाचा घट भरूनी हा, तन मन देयी पिण्यासाठी ।
आनंदाला नसे सीमा मग, अनेक घट अन् अनेक पाठी ।।
एक घटातूनी आनंद मिळता, दुजे घट हे जाती विसरूनी ।
अनेक घटांतील आनंद हा, लूटाल कसा तृप्त होवूनी ।।
दुजामध्ये समरस होवूनी, लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा ।
‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो, आनंद घटाचा भव्य पसारा ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti