ईश्वराचा वास कोठे, प्रश्न नेहमी पडतो,
फुलांफुलांतील सुगंध,
मग त्याचे उत्तर देतो,--!!!
आकार फुलांचे विविध,
सुबक आणखी नाजूक,
एक नाही दुसऱ्यासारखे,
कोण त्यांना रेखितो,--!!!
पानांचे रंग निरखून पहा,
छटाही त्यांच्या निरनिराळ्या,
कोण त्यांना असे रंगवे,
रंगारी त्यांचा कुठला हा,--!!!
फुलती कळी जवळून पहा,
पाकळी पाकळी उमले,
कोण त्यांचा जन्मदाता,
आतून कोण त्यांना घडवे,--!!!
एक फळ नसते दुसऱ्यासारखे,
चव, रंग, आकार, नि दिसणे,
कोण त्यांची रूपरेषा आखे,
कोण बनवतो त्यांना बरे,--!!!
एक एक झाड असे निराळे,
लता वेली वृक्ष झुडुपे,
कोण त्यांची आखणी करतो,
कोण त्यांना मातीत पेरे,--!!!
अन्नपाणी, सूर्यप्रकाश,
कोण त्यांना पुरवतो, मातीतुनी प्रत्येक घटक,
ते सांगा,कसे शोषतो,
झाड इतुके सहनशील,
कोण त्यांना तसे बनवे,
घाव घातला कोणी जरी,
ते आपले बाहू फैलावे,
बी रुजते आपोआप,
कोंब त्यातूनच घडतो,
बी चे रूपांतर कसे,
कोण त्याचे रहस्य दडवतो,--?!!
कोंबाला फुटती धुमारे,
एकेक पान येऊ लागे, -
एका पानासमअसंख्य पाने,
कोण त्यांना जागा देतो,--!!!
किमया सारी निसर्गाची, विज्ञाननिष्ठ म्हणे, पण,
सृष्टी निसर्गाची आई,
तिलाही जन्मा घाले कोण,--???
. हिमगौरी कर्वे
©
हिंदी साहित्यातील सुप्रसिध्द कवि स्व. धूमिल ( सुधाकर पांडे) यांची सुप्रसिध्द कविता मोची या रचनेचा मराठी अनुवाद वाचकां पुढे सादर करीत आहे.
( मुळ नांव- सुदामा पांडेय, उपनाम धूमिल जन्म स्थानखेवली, जिला वाराणसी, उत्तरप्रदेशकुछ
प्रमुख रचना- संसद से सड़क तक (1972), कल सुनना मुझे, सुदामा पाण्डे का प्रजातंत्र (1983)विविध कल सुनना मुझे काव्य संग्रहा करीता 1979 साली साहित्य अकादमी पुरस्कार)
**********
रापी चालवताना
त्याने माझ्याकडे क्षणभर वर खाली पाहिले
आणि दयनीय स्वरात
तो हसत म्हणाला -
'बाबुजी, खर सांगू - माझ्या नजरेत
कोणी छोटा नाही
कोणी मोठा नाही
माझ्या दृष्टीने प्रत्येक माणूस एक जोडी चप्पल आहे.
जो माझ्या समोर
दुरुस्ती करीता उभा आहे.
आणि मुख्य गोष्ट म्हणजे
तो आपल्या जागी कोणीही असो.
जसा आहे, ज्या ठिकाणी आहे.
आजकाल, कोणीही व्यक्ती चपलेच्या मापाबाहेर नाही.
तरी सुध्दा माझे लक्ष असते की
व्यावसायिक हात व फाटलेल्या चपलेच्या मध्ये
कोठे ना कोठे एक साधारण माणुस आहे
ज्याच्यावर टाके पडतात
जो चपलेच्या बाहेर डोकावणा-या अंगठयाची जखम
छातीवर घाव सोसत सहन करतो.
येथे नानाविध चपला येतात
आणि माणसाला निरनिराळया आपआपल्या पसंती दाखवतात.
सर्वांचा आप आपला चेहरा आहे.
आपआपली शैली आहे.
उदाहरणार्थ- एक चप्पल आहे
चप्पल काय ती एक ठिगळांची थैली आहे
जिला एक चेहरा वापरतो
जो देवीच्या व्रणाने भरलेला आहे.
विश्वास दर्शक हसण्यामध्ये
टेलिफोन खांबावर अडकलेली पतंग आहे.
जी फडफड आवाज करीत आहे
'बाबुजी या चपलेवर पैसे व्यर्थ का उधळता?' ,
मी हे बोलु इच्छितो परंतु
माझ्या आतुन एक आवाज येतो-
काय मानुस आहे?
आपल्या जातीवर थुंकतो आहेस,
तुम्ही विश्वास ठेवा त्या क्षणी मी
ठिगळाप्रमाणे मी डोळे शिवुन घेतो
आणि संकटात पडलेल्या माणसाची
मोठ्या मुश्कीलीने सुटका करतो,
एक चप्पल अशी आहे
जी गुंफून एक माणुस निघतो सफरीवर ,
तो हुशार नाही वेळेचा ताबेदार नाही
त्याच्या डोळ्यात लालच भरलेली आहे
हातात त्याच्या घड्याळ आहे
त्याला कोठे जायचे नाही परंतु
चेह-यावर त्याच्या गडबड आहे
तो कोणी व्यापारी आहे किंवा दलाल
परंतु उध्दट असा कि हिटलरचा नातु आहे
इथे बांध,तिथे काप, इथे ठोक तिथे पिट
चांगले घास,असे चमकवं, चपलेचा आरसा बनवं
ओफ्फ किती उकाडा आहे!
रुमालाने हवा घेत तो हवामानावर संतापतो
सडकेवर येणा-या जाणा-यावर
वानराप्रमाणे टवकारुन पाहतो
यावर कडी म्हणजे घंटाभर काम करुन
मजुरी देताना साफ नाटक करतो
सज्जन लोकांना लुटता का ? असे डाफरत तो
काही नाणी फिरकावतो व
पुढे निघून जातो.
अचानक दचकत तो सडकेवर धावतो
आणि मार्गस्थ होतो.
व्यवसायावर जेव्हा घाव पडतो
तेव्हा कोठेतरी एक चोर खिळा
दबा धरुन वेळ मिळताच
अंगठ्यात रुततो.
याचा अर्थ असा नाही की माझा
गैरसमज झालेला आहे.
प्रत्येक क्षणी मला असे वाटते की
चप्पल व व्यवसायाच्या दरम्यान
कोठेतरी एक साधारण माणुस असतो
ज्याच्यावर टाके पडतात
जो चपलेच्या बाहेर डोकावणा-या बोटाची जखम
छातीवर हातोड्याचे घाव सोसत सहन करतो,
आणि बाबुजी, खरे सत्य हेच आहे की
जिवंत राहण्यासाठी खरा तर्क नसेल तर
रामनाम विकून या वेश्यांची दलाली करुन
रोजीरोटी कमावण्यात काहीच फरक नाही
आणि हेच ते ठिकाण आहे जिथे
प्रत्येक माणुस आपला धंदा सोडून
गर्दीत उजळणारा हिस्सा बनतो
सगळ्या लोकाप्रमाणे
भाषा त्याला चावते
मौसम सतावतात
आता तुम्ही त्या वसंताकडे पहा.-
हा दिवसा धाग्याप्रमाणे ताणतो
झाडावरील लाल लाल हजारो पानांच्या टोकाला
उन्हात शिजवण्यासाठी लटकावतो,
खरे सांगतो त्या समयी
रापीची मुठ हातात सांभाळणे
फार मुश्कील बनते
डोळे कोठे जातात तर हात कोठे तरी चालतो
मन त्रासलेल्या बालकाप्रमाणे
कामावर परतण्यास इंकार करते
वाटते की चमड्याच्या सज्जनतेमागे
एखादे जंगल आहे
जो माणसावर
झाडामागून वार करतो
आणि हे धक्कादायक नव्हे तर विचार
करण्या योग्य गोष्ट आहे,
परंतु जो जीवनाला पुस्तकांनी मापतो
जो सत्य आणि अनुभवाच्या दरम्यान
हत्येच्या क्षणी डरपोक आहे
तो मोठ्या सहजपणे म्हणू शकतो
यार तु मोची नव्हे तर शायर आहेस
जो विचार करतो की आग
सर्वांना जाळते, सत्य सर्वांच्या पलीकडे आहे
काही आहेत ज्यांना शब्द गवसले आहेत.
काही आहेत जे अक्षरांसमोर आंधळे आहेत
ते प्रत्येक अन्याय चुपचाप सहन करतात
आणि पोटाच्या आगीसमोर डरपोक बनतात.
जेव्हा मी हे जाणतो की-
"नकाराने व्याप्त एक आरोळी "
आणि "एक समजुतदार मौन"
दोघांचा मतलब एक आहे
भविष्य घडवण्यासाठी 'मौन' व 'आरोळी'
आप आपल्या जागी एक प्रकारे
आप आपले कर्तव्य बजावीत असतात.
-- विजय प्रभाकर नगरकर
कोण भोंगळा,कोण वंगळा,
कुणी कुणाला हिन लेखे,
माळेमध्ये एकशे आठ मनी,
एकशे नववा कुठं बसे....!!!
गोड कडुनिंब,रेशमी बाभळी,
आम्रवृक्षाला कोण पुसे,
अनैतीक मितही नैतीक बनती,
डोळ्यापुढे जेंव्हा सत्ता दिसे....!!!
विचारधारा, विवेक विवेक,
राततुनं तं,बापय नं दिसे,
विवेक,विचार,विकास,प्रकाश
सत्तेपुढे ते उणे असे..!!!
आधी धर्म मग जाती पाती,
पाहुणे राव्हुणेबी ईथे चालती,
विवेक लपतोय निबीडं अंधारी
लबाडं ढोंगी थयथय करती...!!!
सत्तासुंदरी बनली बंदरी ,
मदारीचं मदारी,चोहिकडे,
छाताडावरं पाय ठेऊनी,
थयथय नाचतं,खेळ चले...!!!
उठ गड्या तु जाग झोपेतुनी
फेक झुगारूनी पाश गुलामी
समता,बंधुता,विवेक,जागवूनं,
नव्या युगाला दे सलामी......!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
परतून येणे हे खूप गरजेचे आहे.
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार ।।धृ।।
ढग काळे काळे
जमवितोस सगळे
गर्जती वादळे
कडाडूनी विजा, पर्जन्य होई भयंकर ।।१।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
तळपते ऊन
दग्ध होई जीवन
जाई वाळून
तेज वाढूनी सूर्याचे, दाह करी फार ।।२।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
कड्याक्याची थंडी
भरुनी हुडहुडी
देहाला सिकूडी
गारठूनी जाती, ज्याना नसे घर ।।३।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
सुख तुंची देतो
दुःख तूंची देतो
लक्ष्य तूं वेधतो
चमत्काराविणा कसे, आस्तित्व भासणार ।।४।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो
जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते
बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी
त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी
धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो
सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे
मात करूनी विचारावरती सुप्त गुण हे विजयी होती
गुणधर्म ही ईश्वरी योजना घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ठरविक वेळ, ठरविक जागा, बरेच महिने असे चालले होते.. अचानक दिसेनासे झाले.
आपल्या हिमतीवर उभे रहाण्यापासून ते xxला लावून पळण्यापर्यंत पायांचा मानवी जीवनात भक्कम पाया आहे. गोष्टींना पाय फुटून त्या नाहीशा होणे किंवा तोंडात पाय (Foot in mouth) घालण्यापर्यंत आपण ऐकलं आहे, पण पायाला तोंड फुटलेलं अजून ऐकिवात नाही म्हणून हा प्रपंच!
पाळण्यातले इवले इवले पाय नाचरे
निखळ, नितळ निष्पापसे मखमली गोबरे
निवांत शांत, भाबडे पहुडले बहुतसे सारे
कुणी विधीदर्शित जागृत मापती नक्षत्र तारे
नकळत वळत, रांगत दुडदुडणारे वारे
मायेच्या हाताने घेत वळण गोजिरे
शाळाशिस्तीत, स्पर्धेच्या धास्तीत धाव धावरे
नादात काही, हौसेत तालात थिरकत सितारे
हळव्या आळिताने घेतले लाजरे फेरे
परतवत आठवणी, करुन आसवांचे निचरे
कोऱ्या पदराआड, ओलांडत अनोळखी उंबरे
नव्या आशेचे, नव्या धरेवर पाऊल ठरे
कुणी स्वयंभू वाट आपली वेगळी मळणारे
निर्धारित काही ध्येयापायी पेलत रोष सारे
निर्विचार, भुईभार ते सोडत आळस सुस्कारे
वक्र वळणी काही दूषितकर्मी विघातक निखारे
दिशाहीन कुणी फरफटणारे दुर्देवी फेरे
उरले सारे नेटके आपण, प्रपंच रेटणारे
माध्यान्ही राबत, रापरापत, चिंताग्रस्त म्हातारे
वाहून ओझे आयुष्याचे वाकलेले बिचारे
थकले भागले, सुरकुतलेले कापरे कातरे
कातरवेळी चाहूल घेत, वेशीवर घुटमळणारे
ओढाळ ओढीने आप्तांच्या, उगा थबकणारे
उपेक्षेच्या उन्हात काही आपल्याच घरी उपरे
वेध लागले, जडावलेले विसावण्या आतुर रे
-यतीन सामंत
आस राहते सतत मनी, मिळत नसते त्याचेसाठी
प्रयत्न सारे होत असती, हाती नाही ते मिळविण्यापोटी....१,
प्रयत्नात तो आनंद होता, धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें, जिद्द मनाची आणिक हेका....२,
यश मिळते जेंव्हां पदरी, धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशीले, त्यातील उर्मी निघून जाते....३,
यशांत नाही आनंद तेवढा, मिळविण्यात जो दिसून येई
कांहींतरी ते मिळवायचे, याच विचारी रमून जाई....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
खोटंच का विकलं जातं, हातोहात?
अन खऱ्यालाच का गुंडाळलं जातं बासनात?
किती द्याव्यात परीक्षा खऱ्याने
खऱ्यापणाच्या?
आणि किती उडवाव्यात चिंध्या
असत्याने सत्यपणाच्या?
खोटंच का विराजमान होतंय
आत्मसन्मानाची गळचेपी करून
फाटक्या तुटक्या सिंहासनावर?
खऱ्यालाच का सोसावे लागतात
हाल दारोदार?
बाजार खोट्याचाच बहरलेला दिसतोय विक्षिप्तपणे सर्वत्र
अन खऱ्यालाच घरघर लागलेली
दिसतेय गळलित गलीतगात्र.
खोट्याची सत्ता लौकिक
तर खऱ्याची सत्ता आहे अलौकिक.
सर्व शक्यतांचे सिद्धांत मोडीत काढून
उसळी मारून वर येते ते सत्य असते
आणि काळाच्या जजमेंटल ओघात
मोडीत निघते ते असत्य असते.
खोट्याला तर जगात अनेक मालक पालक असतात
खऱ्याचा मालकच काळ असतो
खोट्याचे मालक पालक काळाच्या ओघात अस्तित्वहीन
होत जातात,संपून जातात,मिटतात,उन्मळून पडतात, तहस नहस होतात
खऱ्याला पाठबळच काळाचे असते
खरं काळासोबत चालते, किंवा काळाच्याही पुढे धावते
ते काळाच्या अनंत प्रवाहासोबत चकाकते, उजाडते,दिशा देते,चांगले काही पेरते
Copyright:- कवी सुभाष पवार
मराठीसृष्टीच्या फेसबुक पेजवरुन
Copyright © 2025 | Marathisrushti