आपलं कधी असं ठरलं नव्हतं
आपण बोलताना
हा असा अमुक अमुक विषय काढू
तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
घेऊया का चर्चेस
हा एक इतका महत्वाचा विषय आहे
तू तुझे विचार ऐकव
आणि मग मी माझे मत मांडते
मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
हे आज आठवलं म्हणजे मग
आताशा माझ्या लक्षात येतंय की
फक्त मीच तर बोलायचे...
मी बोलायचे आणि तू ऐकायचास
असही नाहीच म्हणू शकत मी
मी बोलायचे आणि मला तू ऐकत
असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
मी बोलायचे
काही जुन्या आठवणी निघायच्या
काही आवडती गाणी सांगायचे
मी आजूबाजूच्या
प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
मला पडलेल्या स्वप्नांवर
माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
तू काय केले पाहिजेस सांगायचे
तू आज कसा छान दिसतोस हे देखील
बोलूनच सांगायचे
आपण भेटलो ना की मी बोलायचे
उधानलेल्या पावसाने
उधानलेले पाणी जणू
तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
आणि ...
माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
तू हसायचास..
मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
तू खळाळून हसलास की
तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
माझं बोलणं उडवून लावलंस
तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
असही मी विचारलंच नाही तुला कधी
पण आज ....
प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
या तुझ्या एका प्रश्नासरशी
तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
'नाहीच बोलणार मी आता'
आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
असो.....
©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०८/२०१८
असाच एखादा क्षण येतो |
सर्वस्व सारं घेऊन जातो |
थोडसं काही ठेऊन जातो |
त्याचंच नाव स्मत़ी असतं || १ ||
अशीच एखादी झुळुक येते |
स्वत:मध्ये सामावून घेते |
मध्येच दूर सरसावते |
त्याच नाव मिलन असतं || २ ||
अशीच एखादी सर येते |
तालावर ती नाच करते |
श़ंगाराने भिजवून जाते |
त्यालाच नाव प्रिती असतं || ३ ||
असाच एखादा काळ येतो |
सारं काही नष्ट करतो |
क्षणींच भंगण बनवितो |
त्याला कोणतं नांव असतं ? || ४ ||
-- चंदाराणी कोंडाळकर
तप्त सळई स्पर्ष करीतां , चटका देई शरीराला ।
सुप्त अशी औष्णिक शक्ति, आस्तित्व दाखवी त्या वेळेला ।।
वीजा चमकूनी गर्जती मेघ, लख्ख उजेड सारते काळोख ।
प्रकाश नि ध्वनीच्या लहरी, आस्तित्वाची दाखवी झलक ।।
साधी असे तार तांब्याची, झटका देई विद्युत असतां ।
विद्युत शक्तीचा परिणाम, जाणवी देहा प्रवेश करतां ।।
झाडावरले पडता फळ, भूमी घेई खेचूनी त्याला ।
गुरुत्वाकर्षण शक्ति ही, झलक दाखविते जगाला ।।
ईश्वर अस्तित्व भासे, अशाच शक्तीरुपानें ।
अद्दष्य असुनी परिणाम, दाखवी सुप्त गुणानें ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
देवानेच आपल्याला फसवलं आहे,
हे वाक्य माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
वेगवेगळ्या आवाजात उमटलं…
लहानपणी...
आईच्या कुशीत झोपताना वाटायचं,
जग खूप सुरक्षित आहे,
देव म्हणजे गोष्टीतला राजा,
जो शेवटी सगळं ठीक करतो…
पण पहिल्यांदा जेव्हा हरवलं एखादं खेळणं,
किंवा तुटली एखादी मैत्री.
तेव्हा कळलं,
“गोष्ट संपली तरी सगळं ठीक होतंच असं नाही…"
किशोरवयात...
स्वप्नांना पंख फुटले होते,
आकाश स्वतःचं वाटत होतं,
पण पहिल्याच अपयशाने
ते पंख जळाले…
रात्री उशिरा देवाला विचारलं,
"मी एवढं मनापासून मागितलं होतं,
मग का नाही दिलंस?"
उत्तर आलंच नाही…
तेव्हाच पहिल्यांदा वाटलं,
देवानेच आपल्याला फसवलं आहे…
तरुणपणात...
प्रेमावर विश्वास ठेवला,
एखाद्या माणसात देव पाहिला…
पण जेव्हा तोच माणूस दूर गेला,
हातातून हात सोडून.
तेव्हा समजलं,
देव कधी कधी माणसांच्या रूपात
आपल्याला तोडतो…
मध्यमवयात...
जबाबदाऱ्या, कर्जं, अपेक्षा,
सगळं पेलताना स्वतःच हरवून गेलो,
आरशात पाहिलं तर
ओळखीचे चेहरेही अनोळखी वाटले…
देवाला विचारलं
"हीच का माझी वाट?"
तो पुन्हा शांत…
आणि ती शांतता
सगळ्यात मोठी फसवणूक वाटली…
वृद्धावस्थेत...
हात थरथरू लागले,
पावलं मंदावली,
आणि आयुष्य मागे वळून पाहताना
एक प्रश्न कायम उरला,
"खरंच, देवानेच आपल्याला फसवलं का?"
कदाचित...
फसवणूक ही त्याची नव्हतीच,
आपणच स्वप्नांना कायमस्वरूपी समजलं,
आपणच नात्यांना शाश्वत मानलं,
आणि अपेक्षांना देवाचं वचन समजलं…
तो तर फक्त उभा होता,
आपल्या प्रत्येक पडण्यात.
प्रत्येक अश्रूमध्ये,
प्रत्येक तुटण्यात…
देवानेच आपल्याला फसवलं आहे,
हे वाक्य अजूनही मनात येतं.
पण आता त्यात राग नाही,
फक्त एक थकलेली जाणीव आहे.
की कदाचित,
देव फसवत नाही…
तो फक्त आपल्याला
सत्याच्या इतकं जवळ नेतो,
की आपलेच भ्रम आपल्याला
फसवणूक वाटायला लागतात…
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
भावनांचा पूर ओसरला, किनारा राहिला नाही,
मनातल्या त्या माणसाचा ठाव आता कुठेच नाही.
शब्द सारे बोललो मी, अर्थ सारे मूक झाले,
ओठ होते समोर तरी, एकही संवाद नाही.
फूल होते कालपर्यंत, गंध होता श्वासभरचा,
आज त्या नात्यावरी विश्वासाचा थेंब नाही.
रोज थोडे तुटत गेलो, रोज थोडे विझत गेलो,
घाव देणाऱ्यालाही माझ्या वेदनेचा बोध नाही.
डोळ्यांमध्ये पावसांचे ढग दाटून उभेच होते,
हास्य ओठी ठेवले तरी आसवांना वाट नाही.
जखम जेव्हा मनास झाली, औषधांनी काय व्हावे?
मनच जेथे दूर गेले, त्या विरहाला अंत नाही.
सोडताना हात माझा, एकदाही वळून पाहिलं?
एवढ्याशा प्रश्नाचंही आजवर उत्तर नाही.
जपले ज्याला जीवापाड, तोच परका होत गेला,
मनातून जो उतरला, परत त्याचा ठाव नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
बकुळीची ओंजळभर फुले,
तू देतां हातांत,--
विसरून आपुले भान सारे,
उभी राहिले अंगणात,--!!
सुवास त्यांचा आसमंती,
जरी ती असती ओंजळीत,
बाहेरील जगाहून अधिक,
दरवळ उरला माझ्या मनात,--!!!
चोरटी ती भेट आठवे,
लज्जेचे पांघरूण भोवती, संकोचांचे किती कब्जे,
आज स्मृती मनी खेळती,--!!!
तू हाती हात घेता ,
मी जशी फूल झाले ,
पाकळीगत नाजूक,
बहरून कशी उठले,--!!!
लज्जेचा पडदा मध्येही,
तोही अगदी अवगुंठला,
मान खाली झुकवत ,
अंगठा मी मातीत घासला,--!!!
जवळ तू येता कसा,
हातही जणू थरथरला,
बिनधास्त रांगडेपणा,
पाहुनी जीव भांबावला,--!!!
बावरल्या मना सावरता,
जवळीक तुझी हवी वाटे,
दूर जात,येता जवळी,
एकरूपतेचे आपले नाते,--!!!
सुगंधभारल्या बकूळ फुलांचा, वाटा मजसी तू दिला,
हृदयाचे बकुळफूल करत,
प्रेम- सुगंध मी वाटला,--!!!
बकुळीची फुले सानुली सानुली, आता आहेत सुरकुतलेली,---
दरवळ अजून कायम त्यांचा, प्रेमरंगीच खरी रंगलेली,--!!!
हिमगौरी कर्वे.©
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषन करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता असे ती सर्वता
महान शक्ति असता त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक 'अपूर्व शक्ति' ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव निरनिराळे त्या शक्तिसी ।।८।।
कुणी म्हणती राम कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ति रुप आकार त्यासी नसती
शक्ति समजोनी करावी भक्ति आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ति उमजण्याला सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई ध्येय मिळतां जीवनाचे ।।१५।।
विचार करा मनाशी वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित सामान्यात विद्वान होत
ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त बहूजनांपेक्षां ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ति सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती प्रभू शक्तिसी विसरुन ।।१९।।
तर्क शक्ति थोर आहे चा नाही करणार
नाहीं ला आहे म्हणणार ज्ञानाचा खेळ करुनी ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद करीत राही वाद
जीवन करी बरबाद विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय असे महान मार्ग हे साधन
साधनास साध्य समजून वाया जाई आयुष्य ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने गेल्यासी साधका प्राप्त होई साध्य ।।२३।।
निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून केले असे ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी प्रत्येक झगडतो त्यासाठीं
आयुष्य खर्ची त्या पोटी सकळजन ।।२५।।
न कळे त्यास देवपण भांडण्यांत जाई विसरुन
आयुष्य मातीमोल करुन टाकीत असे ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद मिटवा वादविवाद
लहान मोठ्यांचा संवाद नष्ट करा त्वरीत ।।२७।।
सारेच आहे समान न कुणी मोठे न लहान
घ्या सारे समजून असती सारे मानवनिर्मित ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक हे मानवनिर्मीत प्रतिक
सर्व मार्गाचे ध्येय एक न कळे अज्ञानामुळे ।।२९।।
मानव शक्ति तीच ईश्वर दुसरा नसे कोणी वर
आपणची देतो त्यासी आकार सगुण रुप देऊनी ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा आपसातील भेद विसरा
प्रभू देई तयाना आसरा जीवन सुखी करण्या ।।३१।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नकार देत होती माझ्या प्रेमाला,
बघून, मी आहे एक बेकार
जळत होते, जळत होते
तिच्या विणा माझे शरिर
सर्व शांत झाले आता,
फायर ब्रिगेड नोकरी मिळता
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रिमझिमत्या पावसात
माझ्या गर्द केसात मोगरा माळताना
तू दाखवलीस स्वप्नं...
रुणझुणत्या चुड्याची
भरजरी शालूच्या स्पर्शाची
पराक्रमी राजपुत्रानं
नजर करावं गुलबकावलीचं फूल
हळव्या राजकन्येला
तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली
तुझी शपथ, तेव्हा वाटलं
पायतळी मंझिल आली !
आणि मग -
हातीच्या गुलाबाची
पाकळी पाकळी पडावी गळून..
तसे क्षण गेले निसटून
नि कसली अगम्य ओढ
मनात राहिली दाटून?
चालत्या पावलांना मी विचारते,
"तुम्हाला काय हवंय बाबांनो?'
कालचा मोगरीचा गंध
तस्सा ताजा --टवटवीत...
की पूर्ती झालेली सारी स्वप्ने.....
की त्याही पलिकडचं काही... अरुप.... अनाम..
जे काय तेही नक्की कळत नाही.....
साऱ्याच सुखाचा असा अर्थ शोधत राहिलास
तर हाय हृदया !
तुझ्या अतृप्तीला सीमा नाही।
तुझ्या अतृप्तीला. सीमा नाही !!
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
शौर्य,ध्येर्य ,कर्तव्यनिष्ठा
हीच प्रभू श्री रामांची ओळख
कौशल्यापुत्र प्रभू श्री राम
दशरथ नंदन प्रभू श्री राम
सत्य,धर्म, सद्गुणांचे प्रतीक
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम
भगवान विष्णूचा सातवा अवतार
सद्गुण,करुणेचे प्रतीक प्रभू श्री राम
कौशल्यापोटी जन्म घेतला
अयोध्यापती श्री राम जन्मला
चैत्र मासातील शुक्ल पक्षाला
प्रभू श्री रामाचा जन्म जाहला
त्रेता युगात धर्म स्थापनेला
पृथ्वीवर प्रभू राम अवतरला
प्रभू श्री रामाचा जन्म सोहळा
रामनवमी म्हणून साजरा झाला .
लेखक - उमेश महादेव तोडकर
Copyright © 2025 | Marathisrushti