भरल्या ह्रदयी ओल्या नयनी
निरोप देई देवकी माता
भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. //धृ//
आकाशवाणीने बोले श्रीहरी
देवकीचे तो येईल उदरी
संहार करण्या दुष्टजनाचा
ईश्र्वर अवतरे ह्या जगता //१//
भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.
रक्षक सारे निद्रिस्त केले
कारागृहाचे दार उघडले
मार्ग दिसे वसुदेवाला परि
प्रभू शक्तीचे दर्शन धडता //२ //
भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.
उचलून नेई बाल प्रभूला
नंदाघरी तो ठेवून आला
चमत्कार तो दिसला नयनी
खंत कशाला बाळगी आता //३//
भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 5, 2020

गल्लीबोळा हिंडून हिंडून
बरीच झाली फिरती
आणि सुखाची झोप लागली
इवल्या जागेवरती
August 20, 2026
हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।
दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।
दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।
तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।
जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 21, 2020
शिखरासही जिंक तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू......
येतील वादळे
भयान अती ते
भेद त्या वादळाला
आहेच रे अजिंक्य तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू......
घेऊन वारे पंखामध्ये
सामावून घे जग तुझ्यात
बनून यारा आसमंत तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू.......
अंधारी वाटा तुला
आल्या कधी कुठेही
हो अंधाराचाही अंत तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू.....
तुफान अडवण्याची
ताकद तुझ्यातच आहे
घे गरुड झेप तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू
कवी - महेश सुखदेव पुंड
तामसवाडी,ता- नेवासा ,जि - अहमदनगर
मो - 8459043090
January 15, 2020
दृष्टांताची किमया
निराकार तो असूनी व्यापतो,
सर्व विश्व मंडळ,
सूक्ष्मपणातही दिसून येतो,
करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।
दर्शन देण्यास भक्त जणांना,
धारण करितो रूप,
तसाच दिसे नयनी तुमच्या,
ध्यास लागता खूप ।।२।।
दृष्टांत होणे सत्य घटना ती,
जीवनी तुमच्या घडे,
वेड लागता प्रभू चरणाचे,
सदैव स्वप्न पडे ।।३।।
कुणामध्येही अस्तित्व दाखवी,
हीच त्याची किमया,
परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,
दृष्टांताची ही माया ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 25, 2016
नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी
उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी...१,
नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले
परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले...२,
बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी
झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी...३,
'भक्ष्य बनने' दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला
जनक असता तोच सर्वांचा, गमंत येई त्या खेळाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 16, 2017
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
मैत्रीच्या घट्ट नात्याने जमलेल्या
दुधावरची साय असतं
तासंतास शाळेच्या आठवणीत रामल्यावर
भावनांच्या मंथनातून निघालेलं लोणी असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
बऱ्याच वर्षांनी अचानक
शाळेतील क्रश समोर दिसताच
हृदयाच्या आतून उमटलेले
हाssssय असतं
तरीही मनातलं दुःख बाहेर न दाखवता
हसून केलेलं हाय असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
मित्रांसोबत अड्डा जमल्यावर
आपसूकच कनेक्ट झालेलं वाय फाय असतं
स्वतःची आतली परिस्थिती कशीही असली
तरी बाहेर दाखवताना एकदम हाय फाय असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
आपला मित्र त्याचं दुःख सांगत नसला
तरी नुसती नजरा नजर होताच
या हृदयीचं त्या हृदयाला कळतं
त्याच्या मनात नेमकं काय डाचत असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
रोजच्या जीवनात कभी खुशी-कभी गम
सहन करत आयुष्य पार पडायचं असतं
पण मित्राची थाप पाठीवर पडतांच
आनंदाच्या लाटांवर स्वार होऊन
पुन्हा नव्यानं fresh होवून
जग रहाटीत मिसळून जायचं असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
आपण कामाच्या कितीही धावपळीत असतो
पण मित्राचा फोन आला तर
त्याच्या नुसत्या हॅलो शब्दाला ऐकून
त्याला काय म्हणायचंय हे जाणायचं असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
या GT ला टाटा करताना
पुढच्या GT ला भेटेपर्यंत
आठवणींचं गाठोडं बांधून
मनात लॉक केलेलं फिक्स डिपॉझिट असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
हे तर आपलं सर्वस्व असतं
हे तर आपलं सर्वस्व असतं.
@ मी सदाफुली?
✍️ संध्या प्रकाश बापट
April 5, 2020
आज एक टेम्पो दिसला,
धुळीत हरवलेला, गोंगाटात विरलेला…
आत मात्र शांत बसले होते,
मूर्तीरूपी विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम.
धूळ खाली बसली, रस्ता पुन्हा शांत झाला,
पण मनातला गोंगाट वाढतच राहिला.
मी अजूनही तिथेच उभा होतो,
जिथे देव “जात” होता…
आणि माणूस “राहत” होता.
रिकामा, थोडा हरवलेला.
एक विचार हळूच आत शिरला,
आपण देवाला कुठे नेत होतो?
मंदिरात… की पुन्हा एकदा
आपल्या सोयीच्या चौकटीत बंद करायला?
त्या मूर्तींनी काहीच मागितलं नव्हतं,
ना फुलं, ना नारळ, ना मोठी आरती…
फक्त एक साधा, निरागस भाव,
जो आपण कधीच दिलाच नाही.
आपण त्यांना उचललं, सजवलं, बसवलं…
पण कधी त्यांच्यासारखं जगण्याचा
एक क्षण तरी जगलो का?
ज्ञानेश्वरांच्या ओठांवरचं शांत स्मित
आज जणू विचारत होतं.
“तुम्ही आम्हाला वाचता,
पण स्वतःला का नाही?”
तुकारामांचा आवाज
कुठेतरी हरवून परत येत होता.
“नाम घेताय, पण मन हरवलंय,
देव शोधताय, पण माणूस हरवलाय…”
रखुमाईच्या मायेचा स्पर्श
आज जाणवला…
पण त्या स्पर्शातही एक वेदना होती.
“माझ्या लेकरांनो,
तुम्ही इतके दूर कसे झालात स्वतःपासून?”
आणि विठ्ठल…
तो अजूनही उभाच आहे,
काळाच्या पल्याड, भावाच्या प्रतीक्षेत…
पण आज पहिल्यांदाच असं वाटलं,
तो वाट पाहत नाहीये आपली,
तो वाट पाहतोय
आपण “माणूस” होण्याची…
टेम्पो गेला, मूर्ती पोहोचल्या,
उद्या पुन्हा आरती होईल, घंटा वाजतील…
पण जर मनात दिवा पेटलाच नाही,
तर त्या प्रकाशाचं काय?
आणि शेवटी एक सत्य
हळूच डोळ्यात पाणी आणून गेलं...
देव कधीच हलत नाही…
हलतो तो फक्त आपला विश्वास,
आणि हरवतं ते फक्त,
आपलं “माणूसपण”…
कदाचित म्हणूनच आज
मूर्ती प्रवास करत होत्या…
आणि देव मात्र
आपल्या आत कुठेतरी
एकटा, शांत, आपली
वाट बघत होता…
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 9, 2026
March 12, 2022
जीवनातील रगाड्यातून-
वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वताः केलेल्या प्रयोगांमुळे. तशीच मदत झाली ती, शरीर विच्छेदनाची (Dissection ), सुक्ष्म दर्शक यंत्राची, चार्टसची, ग्राफसची, आणि अशाच अनेक साधनांची.
मला अध्यात्मिक विषयामध्ये रुची आहे. हा जीव (प्राण वा आत्मा ) ज्याला संबोधीले, तो ह्या देहांत कोठे असतो, कसा असतो, ह्याचा मी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत, मासिकांत, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नोंद आढळून आली नाही. तरीही जेव्हां शरीरांतील टिश्युंचा वा सेल्सचा रचनात्मक उल्लेख होताना, ज्यामध्ये हलचाल दिसे त्याला जीवन्त असल्याची नोंद ' जीवमय ( प्राणमय ) live cells ' अशी होत असे. हलचाल नसलेल्याना ' मृत dead cells ' संबोधीत.
हलचालीचा मुख्य स्रोत, शक्ती, वा उर्जा हीच त्याचा जीव वा प्राण म्हणूनच ओळखली जाते.
यंत्राचे भाग निराळे, परंतु ते कार्यारत होण्यासाठी त्याला उर्जा लागते. ती विद्युत, उष्णता, इलेक्ट्रॉनिक वा दुसऱ्या कोणत्या प्रकारची असेल. जशी उर्जा यंत्रासाठी तसेच प्राण हा देहासाठी असतो. जरी प्राण दिसला नाही, तरी त्याचे अस्तित्व जिवंतपणासाठी गरजेचे. प्राण संपुर्ण देहामध्ये पसरला असतो. देहाचे प्रत्येक सुक्ष्म सेल्स जेव्हां जीवंतपणाचे लक्षण दाखवते, त्याचवेळी तीच्यामध्येंही आत्मा आहे. मेंदूपासून नखापर्यंत जे चैत्यन्य जाणवते. जी जीवंतपणाची लक्षणे दिसतात, ती त्या जीवात्म्यामुळेच. त्या उर्जा शक्तीसाठी, देहामध्ये स्वतंत्र, वेगळे अवयवा सारखे स्थान वा कार्य दिसून आले नाही. संपूर्ण शरीरावर शक्तीरुपाने ताबा ज्याचामुळे असतो, तो जीवात्मा. शरीर मृत होताच त्याच्यातील जीवात्म्याचे अस्तित्व नाहीसे होते. शरीराचे जेव्हां कांही कारणामुळे कार्य बंद पडते, त्याच क्षणी जीवात्म्याचे तेथील अस्तित्व नाहीसे होते. जीवाला शरीरांची एक प्रकारे ओढ असते. तो शरीरांत गुरफटून राहीलेला असतो. संपूर्ण शरीरांत पसरलेला असतो. जीव स्वतः शरीर त्यागीत नसतो. परंतु अवयवातून जे जे सेल्स निकामी होऊ लागतात, तेथून जीवात्मा लोप पावतो. शेवटी शरीराचे कार्य शिथील होता क्षणीच जीवात्मा ते शरीर सोडून देतो. शरीर व जीव दोघेही सदैव एकरुप असतात. फक्त कार्य करणे हे जीवामुळे तर कोणते कार्य करावे हे शरीर ठरवितो. दोन्हीही भिन्न बाबी आहेत. जसे घोडा फक्त घोडेस्वाराला वाहून नेण्याचे कार्य करतो. परंतु कोठे जायचे हे मात्र घोडेस्वारच जाणत असतो. त्याच प्रमाणे देहामधले जे अनेक इंद्रिये आहेत, त्याचे कार्य कसे चालावे हे त्यातील एक इंद्रिय मेंदू वा बुद्धी सतत ठरवित असते. मेंदूची चालक शक्ती जीव ही मेदूला जीवंत ठेवते. मेंदूने कसे व कोणते कार्य करावे हे मेंदूच स्वतंत्रपणे ठरवित असतो.
नैसर्गिक संसारीक घटनांचे पडसाद मेंदूवर सतत पडतात. त्याला जगाचे ज्ञान होत राहते. क्रियात्मक वा प्रतिक्रियात्मक गोष्टी मेंदू आपल्या देहाच्या अवयवाकडून करुन घेतो. संसाराचे चक्र चालत राहते.
मेंदूकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचे परिणाम सुख वा दुःख ह्या भावनिक अविष्कारांत होतात. त्या प्रमाणे परिस्थितीचा गुंता होत जातो. ह्या सर्व घटनामध्ये मेंदूचा सहभाग असतो. जीवाचा नव्हे. ह्यालाच केलेल्या कर्माचे फळ म्हणतात. कार्य कोणते व परिणाम कोणता ह्याच्याशी जीवाचा संबंध नसतो. म्हणजेच त्या ईश्वराचा संबंध नसतो. ईश्वर देहाशी एक रुप होऊन देखील नामानिराळा असतो. व्यक्ती अर्थात त्याच्या देहाशी संबंधीत त्याचा मेंदू , बुद्धी, मन, विचार, भावना इत्यादी होणाऱ्या कर्मात प्रत्यक्ष सहभागी असतात. जीव वा त्याची उर्जा नव्हे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
January 1, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti