(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • का पुन्हा पुन्हा मी

    का पुन्हा पुन्हा मी
    गुंतून जात आहे,
    कशी ओढ ही मग
    तुझ्याकडे ओढते आहे..

    नको होते मोहक
    तुझी आठवण ती,
    परी होते रोज मग
    तुझी गोड साठवण ती..

    न विसरले तुला मी
    न विसरल्या भावना,
    अबोल वेदना हृदयात
    उरल्या आठवणी पुन्हा..

    मन दुःखी होते असे
    ओढाळ होतात भावना,
    नको गुंतणे मग हे
    विरतात नाजूक जाणिवा..

    -- स्वाती ठोंबरे.

  • आम्ही नाही आहोत पाषाण – भाग २

    पोलीस दलातील श्री प्रताप गावडे यांचे मनोगत…..!! काव्यमय रुपात..!!!

  • पुनर्जन्म

    संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।

    आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।। १

    फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।

    त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।२

    उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।

    वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।३

    कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।

    वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।४

    आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।

    शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।५

    भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।

    बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।६

    कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।

    नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।७

    ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।

    पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।८

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • शब्दभावार्थ

    मी सारे ओळखूनी आहे
    तुही प्रीतभावार्थ जाणते
    जरी तू नि:शब्दी अबोल
    तव अव्यक्त मज उमजते
    मीच मन मोकळे करतो
    व्यक्त होतो, तुही जाणते
    सत्य उरि अबाधित आहे
    प्रीती, स्पंदनासवे वाहते
    कधीतरी न्याय देईल ईश्वर
    हीच भावनां अंतरी जागते
    प्रीत, निर्मळ, निर्मोही नाते
    निष्पाप लोचनांतुनी तरळते
    संकेत, तळहातीचीच रेषा
    वास्तवतेचे प्रतिबिंब दाविते

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१६२

    १२ - ७ - २०२२

  • ” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही “

    प्रा. विजय पोहनेरकर यांची
    एक लाईटमुडची
    खुसखुशीत कविता ......

    " डोक्याला ताण करून घ्यायचा नाही "

    उगीच गळा काढून
    बोन्बलायचं नाही
    अन डोक्याला ताण करून
    घ्यायचा नाही

    कामाच्या वेळेस
    खूप काम करायचं
    कष्ट करतांना
    झोकून द्यायचं
    पण Life कसं मजेत जगायचं .......

    फिरा वाटलं फिरायचं
    लोळा वाटलं लोळायचं
    सुनंला काय वाटल ?
    पोट्टे काय म्हणतेल ?
    फारसा विचार करायचा नाही
    अन डोक्याला ताण करून
    घ्यायचा नाही ..........!!

    पार्टी करा वाटायली
    पार्टी करायची
    आरती करा वाटायली
    आरती करायची

    Picture पहा वाटतो
    Picture पहायचा
    समोसा खा वाटतो
    समोसा खायचा

    B. P. वाढल का ?
    अन शुगर कमी होईल का ?
    मला जर ऍटॅक आला
    तर दवाखान्यात कुणी नेईल का ?

    अरे.......,
    लोकं कुत्र्या , मांजराला सुद्धा उचलून नेतेत
    तू तर माणूस आहेस ,
    मग , नको ती चिंता करतो कशाला ?
    स्वतःही परेशान व्हायचं नाही
    अन दुसर्यालाही " जाळूजाळू घ्यायचं नाही "
    अन डोक्याला अजिबात
    ताण करून घ्यायचा नाही ....!!!

    लाकडं बाभळीचे आणतील
    का चंदनात जाळतील ?
    खालून-वरून रॉकेल टाकतील
    का एखादा किलो तरी चांगलं तूप टाकतील ?
    सगळे पोरं येतील का ?
    मला खांदा देतील का ?
    फालतू गोष्टीची काळजी
    करायची नाही
    अन डोक्याला ताण करून
    घ्यायचा नाही .......!!!

    पोट्ट्याचं लग्न होईल का ?
    त्याला कुणी पोरगी देईल का ?
    नातवाला
    english medium मधे टाकायचं
    का Semi english च ठेवायचं ?

    अरे तुला काय करायचं ?
    मर न ! थोडं जग नं !!
    नको त्या गोष्टीचा
    कशाला ताण करून घेतो ?
    स्वतःही जागतो
    अन दुसऱ्यालाही जागवतो

    बगलतलं काढून बाजारात
    मांडायचं नाही
    अन डोक्याला ताण करून
    घ्यायचा नाही ......!!!!

    लग्न झाल्यावर पोट्ट
    विचारील का नाही ?
    सुनेला पुरणाची पोळी
    येईल का नाही ?

    कुलाचार करतेल का ?
    सवाष्ण जेवू घालतेल का ?
    शेती ठेवतील का विकतील ?
    माझं श्राद्ध-पक्ष करतील का ?

    आहेत का नाही फालतू प्रश्न ?

    अरे बाबा ,
    " मल्हार " गा वाटतो
    मल्हार गा ...
    मकाचं कणीस खा वाटतं
    मकाचं कणीस खा

    लावण्या आवडतात
    सुरेखा पुणेकरचा
    कार्यक्रम पहायचा
    दिंडीत जा वाटतं
    पंढरपूरला जायचं
    आंबट गाऱ्हाणे करायचेच नाही
    अन डोक्याला ताण करून
    घ्यायचा नाही .......!!!!!

    सगळ्याचं सगळं करायचं
    पण ढोपराचा पंचा काढून
    द्यायचा नाही
    अन उगीच डोक्याला
    ताण करून घ्यायचा नाही ......!!!!

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

  • देख तो दिल कि जाँ से उठता है

    प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.

  • गतकर्माची विस्मृती

    एके दिनीं निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा

    प्रवास माझा अनंतात कसा असेल त्या वेळेचा

    आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन

    'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन

    बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी

    सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी

    पूनर्जन्म घेण्याकरितां गर्भाची निवड करीन

    गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय जीवन जगेन

    शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची

    नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • आकाशाशी स्पर्धा करणे

    आकाशाशी स्पर्धा करणे,
    हीच मातीची ओढ असे,
    खालून मुळ्यांची पेरणी,
    झाडाझुडपांचा पायाच असे,
    वाढावे असेच उदंड,
    खालून वरवर जावे,
    कितीही वर गेलो तरी,
    पायाला न कधी विसरावे,
    गगन विस्तीर्ण भोवती,
    बुंध्यातून वाढीस लागावे,
    फांद्या पाने ,फुले यांनी,
    खोडास सतत बिलगावे,
    झाड लेकुरवाळे असते,
    तरी किती निस्संग,---!!!
    एक निळाई त्याच्या डोळी,
    दुसरा न कुठला रंग ,--!!!
    हिरवे असून, आसमानी जाई,
    अवती भोवती किती लेकरे,
    सोडून सगळ्या ऐहिक गोष्टी, मोक्षाचा फक्त माग काढे,--!!!
    फांद्या, पाने, फुले सारे,
    शिकती सारे झाडाकडुनी, दुसऱ्याला देऊन टाकणे,
    स्वार्थ कधी नसतोच मनी,--!!!
    म्हणूनच का एवढे जाते,
    उंचावरती पसरत ते ,------?
    कुठून आणे तटस्थ वृत्ती,
    संन्यस्त अश्वत्थ बनते,--?

    © हिमगौरी कर्वे.

  • तेज

    किरणात चमक ती असूनी,
    तेजोमय भासे वस्तूंचे अंग,
    सूक्ष्म अवलोकन करीता,
    कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।।

    जसे तेज असे सूर्यामध्यें,
    पत्थरांतही तेज भासते
    दृष्टी मधले किरणे देखील,
    सर्व जनांना हेच सांगते ।।२।।

    तेजामुळेंच वस्तू दिसती,
    विना तेज ती राहील कशी,
    तेज रूप हे ईश्वरी असूनी,
    तेज चमकते वस्तू पाशी ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • वातावरण

    विचारांची उठती वादळे ।

    अशांत होते चित्त सदा ।।

    आवर घालण्या चंचल मना ।

    अपयशी झालो अनेकदां ।।

    विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।

    नदीकांठच्या किनारीं गेलो ।।

    वटवृक्षाचे छायेखाली ।

    चौरस आसनावरी बसलो ।।

    डोळे मिटूनी शांत बसतां ।

    अवचित घटना घडली ।।

    विचारांतले दुःख जाऊनी ।

    आनंदी भावना येऊं लागली ।।

    एक साधूजन ध्यान लावीत ।

    बसत होता त्या आसनावरी ।।

    पावित्र्याची वलये फिरती ।

    आसन दिसले रिकामें जरी ।।

    वातावरणाची ही किमया ।

    अनुभवते प्रखरतेनें ।।

    शुद्ध अशुद्ध विचार येती ।

    सभोवतालच्या जाणिवेने ।।

    डॉ. बगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com