सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,
कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे.....१,
उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,
परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा......२,
जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना
व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,
जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी
अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी....४,
निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार
हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार....५,
सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी
सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं......६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 17, 2017
हिरवेगार तृणपाते,
वाऱ्यावर डोलत होते,
मजेत इकडून तिकडे,
मान करत गुणगुणत होते,---
लहान बालिश वय कोवळे,
कंच हिरव्या रंगात खुलत,
खुशीत झोके घेत होते,
बाळां काय ठाऊक असे,
किती कठीण असते जगणे-?
मौजमजा आणि हुंदडणे,
करत करत एकदम कोसळणे वास्तवाशी सामना होतां,
भलेभले धुळीस मिळती,
हे तर इवलेसे तृणपाते,
कितीशी असेल लढाऊ शक्ती,-?
कुणीतरी आले तिकडून,
पाय ठेवुनी उभे राहिले,
हिरवेगार तृणपाते मग,
पायाखाली ,चुरडले गेले,--!!!
वेदना, यातना, भोग प्रवास, तृणपाते कळवळले मनांत,
चिरडल्याने कुठेतरी आंत,
उद्ध्वस्तही सर्व मनोरथ,
किती दिवस आले, आणिक
आलेले ,गेले, संपले,--!!!
तृणपाते कोलमडलेले पुन्हा,
बघां,--उठून उभे राहिले,--!!!
करूण दशा त्याची पाहून,
वारा फुंकर घाली,
काळी आई तळमळून,
खालून त्याला कवटाळी,
सूर्यराज गगनी उभे,
वरुन किरणे सोडती,
प्रकाश देऊन आपुला,
अलगद कसे कुरवाळती,
शेतातील पाटाचे पाणी,
खळबळे सारखे खाली,
थेंब थेंब देई त्याला,
अलोट जगण्याची शक्ती,--!!!
तृणपाते राहिले उभे,
एकवटून सारी जीवनशक्ती,
संकटाशी सामना करते,
सरतेशेवटी इच्छाशक्ती,--!!!!
एवढेसे असून तृणपाते,
शिकवी केवढे आपणां,
डोंगर कोसळले संकटांचे,
तरी दाखवा कणखरपणां,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
May 26, 2019
नाच नाचती तालावरती
मीरेची पाऊले
चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ
लागला प्रभुचा ध्यास
हरि दिसे नयनास
चलबिचल नजर होऊन
अंग सारे मोहरले - - -१
चित्त ते हरीमय जाहाले
न राही आपले भान
झाली भजनी तल्लीन
तनमन प्रभुचे ठायी जाता
संसार ते विसरले. - - - २
चित्त ते हरीमय जाहाले
विषाचा घेता प्याला
हरि तो त्यातची दिसला
झेपावूनी गेली त्याच क्षणी
घट घटा प्राशन केले. - - - ३
चित्त ते हरीमय जाहाले
जहाल होते विष
मृत्युचा तो पाश
प्रभूभक्तीच्या शक्तीने परि
अमृत ते बनले - - - ४
चित्त ते हरीमय जाहाले
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 19, 2016
विचारांची उठूनी वादळे
अशांत होते चित्त सदा
आवर घालण्या चंचल मना
अपयशी झालो अनेकदां
विष्णतेच्या स्थितीमध्यें
नदीकांठच्या किनारीं गेलो
वटवृक्षाच्या छायेखालच्या
चौरस आसनावरी बसलो
डोळे मिटूनी शांत बसतां
अवचित घटना ती घडली
विचारांतले दुःख जावूनी
आनंदी भावना येऊं लागली
एक साधूजन ध्यान लावीत
बसत होता त्या आसनावरी
पवित्र्याची वलये फिरती
आसन दिसले रिकामें जरी
वातावरणाची ही किमया
अनुभवते ती प्रखरतेनें
शुद्ध अशुद्ध ते विचार येती
सभोवतालच्या जाणिवेने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail - bknagapurkar@gmail.com
January 20, 2013
आठवते का तुला ?
पहिल्या पावसाची सर..
मृदुगंध ओल्या मातीचा
थेंब साचलेले ओंजळभर...
सरीवर सर झेलताना
अंगणात वेचल्या गारा..
धरेची तृष्णा शमवताना
बरसल्या ग्रीष्माच्या धारा..
July 13, 2026
काही गोष्टी फक्त आपल्या माणसांसाठी असतात.
त्यावर नाव आपलं पण हक्क फक्त त्यांचा असतो !
कर तु तुला हवं ते,
ती दणदणीत पाठीवर थाप असते,
आनंदात सहभागाची छोटीशी वाट हवी असते..!
काळ आणि वेळेनुसार सर्व बदलायचं असतं,
आपलं माणूस मात्र जिवापाड जपायचं असतं..!
– श्र्वेता संकपाळ
August 21, 2018
जगी काय मिळविले काय हरविले
अंती एकच प्रश्न अनुत्तरीत असतो
हव्यासापोटी किती, काय हरविले
सत्यभास हा जीवा अविरत छळतो
सारीपाट ! उलगडता जन्मभराचा
अंती सारा सत्याचा हिशोब स्मरतो
झाले गेले, सारे जरी विसरुनी जावे
तरी गतकाळ नित्य आठवीत असतो
अंती पश्चातापाचे दग्ध दुःख अंतरी
जीव ! क्षणक्षण निश:ब्दीच जगतो
जगण्याविना, न दूजा मार्गच कुठला
प्रारब्धभोग जन्मभरी भोगावा लागतो
चित्रगुप्ता जवळी, चोख हिशोब सारा
बिनचूक खरा इथेच चुकवावा लागतो
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३३
११ - १० - २०२१.
October 15, 2021
कशासाठी जगतो आपण,
विचार तुम्हीं करतां कां ?
मृत्यू येई तो जगावयाचे,
हेच धोरण समजतां कां ?
खाणे – पिणें वंश वाढविणे,
हेच जीवन असते कां ?
ऐष आरामी राहूनी तुम्ही,
देहासाठी सारे, हे मानता का ?
पाठीं लागूनी धनाच्या त्या,
बरोबर संपत्ती न्याल कां ?
पैसा मुलांसाठी ठेवून ही,
शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?
सारे कळूनी वळत नसते,
तत्व हे जाणून घ्याल कां ?
उपयोग करूनी ज्ञानाचा,
जीवन चांगले कराल कां ?
सारे आहे प्रभूचे समजून,
शांत चित्ताने जगाल कां ?
दया क्षमा शांती हे गुण,
अंगी आपुल्या बाणाल कां ?
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 21, 2017
कितीही सारी धडपड करशी,
लाचार ठरतो अखेरी,
जाण माणसा मर्यादा तव,
आपल्या जीवनी परी ।।१।।
क्षणाक्षणाला अवलंबूनी,
जीवन असे तुझे सारे,
पतंगा परि उडत राहते,
जसे सुटत असे वारे ।।२।।
निसर्गाच्याच दये वरती,
जागत राहतो सदैव,
कृतघ्न असूनी मनाचा तूं,
विसरून जातो ती ठेव ।।३।।
निसर्गाच्या मदती वाचूनी,
जगणे शक्य नसे तुजला,
जीवन कर्में करीत असतां,
आठवित जा प्रभूला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 22, 2015
जात असता गाडी मधूनी,
दुर्घटना ती घडली,
अचानकपणे एक दुचाकी,
आम्हा पुढे धडकली ।।१।।
प्रयत्न होऊनी योग्य असे,
थोडक्यात निभावले,
वखवखलेल्या काळालाही,
निराश व्हावे लागले ।।२।।
घिरट्या घालीत काळ आला,
झडप घातली त्याने,
वेळ आली नव्हती म्हणूनी,
बचावलो नशिबाने ।।३।।
अपमान झाला होता त्याचा,
सुडाने तो पेटला,
थोड्याशाच अंतरी जावूनी,
दुजाच बळी घेतला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti