कितीही देशी शीतल चांदणे
आनंदाचा ठरुनी मेरुमणी
काट्यापरि हा मध्येंच बोचतो
डाग तुझा लक्ष्य खेचूनी
ठाऊक नाहीं कधीं कुणाला
कसा लागला डाग उरीं
पडला असेल चुकून देखील
कुणी रंग उधळतां वेड्यापरि
शुभ्रपणाचा मानबिंदू हा
डागरहित जीवन त्याचे
केवळ एका डागापायीं
सत्य झांकाळते कायमचे
मिटून जातां डागही मिटतो
उरते मागें सत्य तेवढे
परि पुसण्यासाठी डाग एक तो
मिटणे उपाय जहाल केवढे
जोवरि जीवन चंद्रा तुझे
डाग दिसेल माथ्यावरचा
दुग्धामृताच्या घटांमधला
असेल थेंब तो विरजणाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
****
बरस बरसला घन
रिमझिमल्या धारा
चंद्र नभीचा भिजला
सुस्नात झाली वसुंधरा
धुंद सुगंध मृदगंधला
सभोवती दरवळणारा
श्वासात श्रावण श्रावण
पवन तो झुळझुळणारा
जीवास चाहुल तृप्तिची
सुखावितो विंझणवारा
सृष्टित साक्ष चैतन्याची
साक्षात स्वर्ग भुलविणारा
*******
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २९७
१९/११/२०२२
मन झाले फुलपाखरू
मन झाले फुलपाखरू
जीवन जगताना
गती स्वैर किती
मनाचा ठाव कोणा किती?
असते आपल्याच खुशीत
मनाचा लपंडाव कोणा कळला?
मन भरून राहिला कोपरा
देत राहिला ठोकरा
मन मनाच्या साखळ्या
गुंतता गुंती गुंता
सोडविण्या त्या सगळ्या
हैराण जीव पुरता
मन मनाचा मोठा गुंता
गुंता तुटता ना सूटता
मन मनाचे द्वैत
भांडते आतल्या आत
होण्या मन मोकळे
भटके स्वच्छंदे रानोमाळी
पळे इकडून तिकडे
फिरे गरगरा भोवऱ्यावाणी
मन थकले फिरफिरून
बसले एका फुलावर
फुलपाखरावीण
समजले त्याला जीवन !
-- जगदीश पटवर्धन
सोडून दे अहंकार तुझा,
लाचार आहेस आपल्या परि,
पूर्ण जीवन तुला न मिळे,
न्यूनता राहते कांहीं तरी ।।१।।
धनराशी मोजत असतां,
वेळ तुजला मिळत नसे,
शरीर संपदा हाती नसूनी,
मन सदा विचलित असे ।।२।।
शांत झोपला कामगार ,
दगडावरी ठेवूनी डोके.
देह सुदृढ असूनी त्याचा,
पैशासाठी झुरतां देखे ।।३।।
उणीवतेचा कांटा सलूनी,
बाधा येत असे आनंदी,
म्हणून खरे समाधान ,
लाभत नसते मग कधी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वंदन वंदन त्या विभूतीला..
मानवतेच्या महामानवाला..।। धृ ।।
जो जाणतो अर्थ मानवतेचा..
मानव! एकच धर्म मानवी..
सर्वाठायी एकची आत्मा..
वंदन वंदन त्या विभूतीला..।।..१
विवेकीनिधर्मी,चारित्र्यागृही..
स्पृश्यास्पृश्यतेचा, विरोधक..
जगती, मानवतेचाच पुजारी..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..२
प्रज्ञावंती, नितीज्ञ तो सहिष्णू..
मानवी संस्कृतीचा अध्यापक..
बुद्ध! आगळाच परिवर्तनाचा..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..३
भारतीय संविधानाचा उद्गाता..
जगतवंद्य! हा श्रेष्ठमहामानव..
अमर, देशभक्त भारतभूमीचा..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..४
भीमराव! सर्वांचाच कैवारी..
ज्ञान, विज्ञानाचा असे पाईक..
आदर्श पुत्र, हा भारतभूमीचा..
वंदन, वंदन, त्या विभूतीला..।।..५
रचना:-वि.ग.सातपुते.(भावकवी)
UK निघालंय् काडीमोड घ्यायला EU पासून
देशाच्या भवितव्याची बाब आहे ही.
पण MPs वागतायत् असे, की
जगात UK ला काडीची किंमत राहिली नाहीं.
EU मोडतंय् बोटं
पण तें बेटं
करणार काय !
ब्रेक्झिटवाल्या UK ला
‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’
म्हणणं आहे प्राप्त,
नाहीं अन्य उपाय.
कोण द्वाड?
EU की UK?
कोण unreasonable?
EU की UK?
कोणाला कायकाय हवं आहे ?
अन् कोण त्याला म्हणत नाहींये Ok ?
अगं बाई, थेरेसा मे
आतां झालं बस्स
आतां खाली बस.
आजवर झालीय् सगळी चर्चा फोल
आतां Parliament घेतेय् कंट्रोल.
अगं, तूं Houseमधें अऽस किंवा नऽस
आम्हाला ‘नन्ना’चा पाठ
झाला आहे पाठ.
ब्रेक्झिट चा आत्मा काय आहे ?
Exit की Backstop ?
की परदेशी नागरिक ?
की, टिकणें उद्योगधंद्यांची मत्ता ?
की, नोकर्यांची सुरक्षितता ?
अन् continued आर्थिक सुबत्ता ?
Priority काय आहे ?
Why आहे ?,
तें कुणीच सांगत नाहींये बेटा.
फक्त चर्विचर्वण चालूं आहे.
Parliament मधें जे कांहीं घडतंय्
तें फारच हळूं आहे.
Common Market
की Common Customs-tariff ?
पण कसल्याच विकल्पाची
होत नाहीं तारीफ.
सगळेच विकल्प
होतायत् fail.
होणार की काय
ब्रेक्झिट ची गाडी derail ?
UK ला घ्यायचाय् काडीमोड
ब्रेक्झिट च्या नांवं;
पण, त्याच्या terms काय
तें कुणालाच नाहीं ठावं.
ब्रेक्झिट-भाषणांत
Point of Order
उठसूठ.
चालूं आहे PM चं
बस आणि ऊठ
बस आणि ऊठ.
-- सुभाष नाईक
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
थोडंसं झुकून माझ्या डोळ्यांवर , तुझ्या पापण्या ठेव,---
त्यांच्यातील ओलावा घे टिपून, अलगद हृदयापर्यंत थेट,---
जखमी मनाला असा दिलासा,
तूच देऊ शकशील बघ,
घायाळ मनाची करूण व्यथा, तुलाच फक्त समजेल,---!!!
त्यातली शल्यें, टोंच, बोंच, त्यातला सगळा आक्रोश,
तुझ्यापर्यंतच ना पोहोचेल,-? रक्ताळलेला तो प्रत्येक अश्रू , बघण्याची, पुसण्याची कुवत,--- तुझीच असते नेहमीच,---!!!
त्या दुःखाला जीवघेण्या,
सुखात करतोस परावर्तित,
ही अशी जादू विलक्षण,
येते तरी तुझ्याकडे कुठून,--? वाटते कधी,-- सगळं संपलं,
कडेलोटाकरता उभे आपण,
पण तुझा जादू - ई-- स्पर्श,
थरारून उठते सगळे तनमन,--
लहान वाटतं दुनियेचं वर्तुळ,
इतकं मोठ्या आकाराचं,
माझं तुझं प्रेमावकाश,--!!!
कधीतरीच छळतं एकटेपण,
आसवं गळतात डोळे मिटल्यावर, यातना वेदनांची ती सरमिसळ, मध्ये भासतोस तू ,-उभा पहाड, खडा होतो कोसळता जीव, सामावण्यासाठी तुझ्या मिठीत यातना वेदना पडतात मागेच,
येऊन तू करतोस अमृतस्पर्श,--!!!
© हिमगौरी कर्वे.
गतजन्मांचे, सत्कर्म फळाला यावे
जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे...
सकल शक्तीचे, घेवुनी दान विवेकी
नरदेही, हरिहराने वाजतगाजत यावे...
असुरी, प्रवृत्तिंच्या निर्दालनासाठी
सर्वेश्वराने, आता ब्रह्मांडा सावरावे...
रामराज्याची सुखस्वप्ने जगण्यासाठी
प्रभुरामाने, पुन्हा जगती जन्मा यावे...
आत्मरंगी तृप्तलेल्या आत्मारामा
मोक्षामृत, पाजीत नारायणाने यावे...
गतजन्मांचे ते सत्कर्म फळाला यावे
जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे...
--वि.ग.सातपुते( भावकवी)
9766544908
रचना क्र. २६७
२१/१०/२२
Copyright © 2025 | Marathisrushti