विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते,
भासे तीही एकटी,
चमकण्यात कमी जाणवते,--!!!
चेहरा तिचा उतरुनी,
निस्तेज ती दिसते,
का बुडाली कुणाच्या विरही,
कोडे मजला वाटते,--!!!
असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले,
चंद्र दिसे ना कुठे जवळी,
रजत किरणांचे लेऊन शेले,--!!!
समूहातून दूरच उभी,
अंतरी कोलाहल उठलेले,
लांबूनही ती दिसते "दुःखी*,
पाणी डोळां साठलेले,--!!!
वाट बघे सुधाकरांची,
जीव पहा कसा लावते,
तळमळत आत आत सारखी, सख्याची कल्पना करते,--!!!
मिलन दूर,- दर्शन नाही, अधिकाधिक उदास वाटते,
वाट पाहत साजणाची, चमचमण्याचा देखावा करते,--!!
गायब माझा राजा कुठे,
विचार करते अंतर्यामी ,
स्थानाहून ना ढळणे,
धोरण तिचे मनोमनी,--!!!
इथे धरणीवरती मी,
राजसा, तुझी वाट पाहते,
कढ पचवत विरहाचे, जिवाशिवांचीच ओढ लावते,--!!
© हिमगौरी कर्वे
मौन पांघरुनी चोरपाऊली
यामिनी, चांणदे पेरीत येते
नि:शब्दी, अव्यक्त भावनां
अलवार मिठीत घट्ट मिटते
दाटता काळोख नभांगणी
घरट्यातुनी विसावतो जीव
प्रतिक्षा! मौनात प्रभातीची
चाहूल, सोनपाऊली सजते
प्रसन्न! उषा किरण कांचनी
जगण्यासाठी देते आत्मबल
तेजाची ही कोवळी किमया
चैतन्याला, उधळीत उजळते
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५३.
१९ - २ - २०२२.
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी.....
भारतीय ! (१५-०८-२०१८)
नको हो माण, नको हो पैसा,
नको तो वायफळ जातीवाद,
कानी पडावी एकच गोष्ट,
भारतीय असल्याची तीक्ष्ण साद...!!
जो तो उठतो लढत बसतो,
वैयक्तिक वाद कुठेच नसतो,
सोडता ठिणगी राजकारण्यांनी,
हल्लाबोल कसा अंगी सळसळतो?!!
थोडातरी विचार करावा,
समजून उमजून निर्णय घ्यावा,
एकजात उरात आम्ही भारतीय,
अंती भारत मातेचा आदर उरावा.....!!
हे अशोकचक्रा पाहता तुझी शान,
गगनी भिडते अभिमानाने उंच मान,
हाच अहंकार प्यारा रे मजला ,
स्वीकार मानाचा मुजरा रे तुजला...!!
... श्र्वेता संकपाळ.
दोन थेंब गंगाजळ
मृत्युच्या दारी
स्वर्गाचे तिकीट
रोज पी गंगाजळ
त्वरित मिळेल
स्वर्गाचे तिकीट.
टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.
डोनेशनच्या पेट्या भरून दिले गेले अडमिशन,
दगड़ा मातीच्या विटांनी
उभारलेल्या चार भिंतित
मनातलं घरपण सजलयं
फुलदाणीच्या फुलांफुलात.....
सुखाला शोधित शोधित
दुःखांना निवारत निवारत
जणु सप्तरंगली सावलीच
उतरलीय नभातून अंगणात....
पण मन माझं भिरभिरतय
एकटंच निरभ्र नभांगणात
उरि, प्रारब्धाला कवटाळत
गुंतलय ऋणानुबंधी पाशात....
काळ, झरझर सरतो आहे
मनामनांत, मनेही गुंतलीत
सारं काही छान होणार आहे
हा भाव जपला आहे अंतरात....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४०
१९/९/२०२२
गोकुळीच्या आम्ही गोपिका,
निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,--!!
करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,--!!
ठुमक ठुमक चालीची
नक्कल करीत थांबशी, उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!!
नको नको रे मारुस खडा,
ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती तुमचा जथा,
मिळून घालता ना डांका--!
गोंडस तव रूपाला देखण्या,
नुसते आम्ही बघत राहतां,
अल्लद हे घडेही पळवतां, नवनीत सारेफस्त करतां, सांगा काय समजवावे तुम्हां,
दया कर आम्हांवर कान्हा,-!
भांडू कातुझ्याश गोविंदा* पाहता तुला,कासाविशीजीवां
सोड, वाट मनमोहना ,
कसे सांगावे नंद -यशोदा,--!
हिमगौरी कर्वे.©
सारेच आहे प्रभूमय,
अणूपासून ब्रह्मांड होय...१,
ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,
सर्वत्र व्यापले आकाश,
न जाणती त्याचे पाश, ....३,
वायूचा होवून संचार,
जीव जंतू जगविणार....४
वायू असे शक्तीचे रूप,
पेटवी तो प्राणदिप....५,
प्राण आपल्या अंतरी,
तोच असे रूप ईश्वरी....६
जसे शिव आणि शक्ती,
तसे प्राण व वायू असती...७,
बाहेरची वायू शक्ती,
अंतरिच्या प्राणास भेटती....८,
जाता दोन्ही एक होवूनी,
चेतना मिळते जीवनी...९
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बरेच दिवस झाले
काही लिहिले नाही
तुझ्या आठवणीत...
तुझी ती आठवणच
हरविली नाही ना ?
माझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज रचल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज सोडल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
माझ्या आयुष्यातील कित्येक
वर्षे वाया गेली
तुझ्या आठवणीत...
मी राहात होतो
तुझ्या नाजूक हृदयातील
माझ्या आठवणीत...
आठवणीतील माझी तू
तुझा मी राहतील
जगाच्या आठवणीत...
©निलेश बामणे
Copyright © 2025 | Marathisrushti